Tuesday 3 November 2015

रत्नागिरीत २८-२९ नोव्हेंबरला राष्ट्रीय खुली जलद बुद्धिबळ स्पर्धा



रत्नागिरी : रत्नागिरीचे सुपुत्र व भारताचे पहिले बुद्धिबळ चँपियन (कै.) रामचंद्र सप्रे यांच्या जन्मशताब्दीनिमित्त फिडे मानांकन खुली जलद बुद्धिबळ स्पर्धा नोव्हेंबरच्या अखेरीस रत्नागिरीत होणार आहे. चेसमन रत्नागिरी संस्थेने याचे आयोजन केले असून यात सव्वा लाखाची बक्षीसे दिली जाणार आहेत. यामध्ये ग्रँडमास्टरसह अन्य नामवंत खेळाडू सहभागी होणार आहेत.
नाचणे-पॉवरहाऊस येथील दैवज्ञ भवन येथे २८ व २९ नोव्हेंबरला स्पर्धा होईल. नावनोंदणीसाठी २४ नोव्हेंबर अंतिम तारीख आहे. चेसमन आणि सप्रे कुटुंबियांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. या वेळी सप्रे यांचे सुपुत्र मोहन, कन्या सौ. शुभांगी पोळ, जावई प्रबोध पोळ, फिडे मानांकनाचे भारत चौगुले, महाराष्ट्र बुद्धिबळ संघटनेचे सहसचिव अनिल राजे, चेसमनचे पदाधिकारी दिलीप टिकेकर, चैतन्य भिडे, सचिन देसाई आदी उपस्थित होते.
पुण्यातील दिलीप नवरे यांनी चेसमनच्या मदतीने सप्रे स्मृतिप्रीत्यर्थ पहिल्या वर्षी जिल्हास्तरीय, गेल्यावर्षी राज्यस्तरीय बुद्धिबळ स्पर्धा घेतली. यंदा प्रथमच राष्ट्रीय स्पर्धा होत आहे. यातील सर्व बक्षिसे सप्रे यांच्या पत्नी श्रीमती सुधा यांनी ती प्रायोजित केली आहेत.
(कै.) सप्रे हे भारताचे पहिले राष्ट्रीय बुद्धिबळ चँपियन, बाँबे चँपियन, महाराष्ट्र चँपियन होते. १९९९ मध्ये त्यांचे निधन झाले. सलग चाळीस वर्षे बुद्धिबळाचे सदर ते वृत्तपत्रात लिहीत होते. लहानपणी आजोबांकडून ते शिकले. महाराष्ट्रासह भारतात बुद्धिबळ प्रसारासाठी त्यांनी मोठे योगदान दिले. त्यांच्या स्मृती जतन करण्यासाठी अशा स्पर्धा सातत्याने घेण्यात येणार आहेत.
माहिती देण्यासाठी घेतलेल्या पत्रकार परिषदेच्या दिवशी सकाळच्या टप्प्यात ग्रँडमास्टर अभिजित कुंटे याचा २२ जणांशी एकाचवेळी प्रदर्शनीय सामना रंगला. लांज्यातील अक्षय खेर या विद्यार्थ्याने त्याच्याशी सामन्यात बरोबरी करण्यात यश मिळवले. अन्य खेळाडूंमध्ये सुहास कामतेकर, मंगेश मोडक, विवेक सोहनी, मुक्ताई देसाई, सिद्धांत सावंत, नेहा मुळ्ये, श्रेयस विद्वांस, सोहम रुमडे, अक्षय खेर, अनंत गोखले, प्राची मयेकर, सौरभ देवळे, विनायक पेठे, अ‍ॅड. विनय गांधी, वल्लभ महाबळ, अलंकार कांबळे, अभिषेक आखाडे, अनीश पंडीत, हर्ष मंत्रवाडी, सायली qशदे, विराज आठल्ये आणि शीतल देवरूखकर यांचा समावेश होता.
त्यानंतर अभिजितने पत्रकारांशी संवाद साधला. तो म्हणाला, रत्नागिरीत चांगले बुद्धिबळपटू आहेत. मात्र भरपूर मेहनत, कष्ट व विविध स्पर्धांमध्ये सहभाग घेतल्याशिवाय अव्वल खेळाडू होता येणार नाही. मी १५ व्या वर्षी ग्रँडमास्टर होतो. पण आपल्याकडे दहा वर्षानंतर खेळायला सुरवात होते. त्यामुळे शाळेतही बुद्धिबळाचा प्रसार झाला पाहिजे. अव्वल बुद्धिबळपटू होण्यात शॉर्टकट नाही, भरपूर मेहनत हवी. खेळाडू घडण्यासाठी सातत्याने उपक्रम व्हायला हवेत. चेस अ‍ॅकॅडमी स्थापन करून त्याद्वारे हे काम करता येईल.

------------------
बक्षिसे
                                          
एक ते वीस क्रमांकांसाठी बक्षिसे व चषक दिला जाईल. ७, , ११, १३, १५ वर्षांखालील गटात प्रथम तीन पारितोषिके देण्यात येतील. खुल्या गटातील बक्षिसे अशी : १- २५ हजार, २-१७ हजार, ३- १० हजार, ४- ८ हजार, ५- ७ हजार, ६- ६ हजार, ७- ५ हजार, ८- ४ हजार, ९- ३ हजार, १०- २ हजार, ११ ते १५ प्रत्येकी १५०० रुपये, १६ ते २० प्रत्येकी १ हजार रुपये.

.........................
रत्नागिरी : चेसमन संस्थेतर्फे आयोजित प्रदर्शनीय
सामन्यात खेळताना ग्रँडमास्टर अभिजित कुंटे

Add caption

No comments:

Post a Comment