Friday 10 July 2015

यशवंतराव चव्हाण पारितोषिकासाठी नावे सुचविण्याचे आवाहन

रत्नागिरी - यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानतर्फे दिल्या जाणाऱ्या राज्यस्तरीय पारितोषिकासाठी सुयोग्य व्यक्ती किंवा संस्थेचे नाव सुचविण्याचे आवाहन प्रतिष्ठानतर्फे करण्यात आले आहे.
महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या पहिल्या स्मृतिदिनी यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानची मुंबईत स्थापना झाली. माजी केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली प्रतिष्ठानचे कामकाज चालते. प्रतिष्ठानतर्फे वर्षभर विविध उपक्रम राबविले जातात. वैशिष्ट्यपूर्ण काम करणाऱ्या व्यक्तीला किंवा दरवर्षी दोन लाख रुपयांचे राज्यस्तरीय पारितोषिकही दिले जाते. यावर्षी कृषी-औद्योगिक समाजरचना व्यवस्थापन किंवा प्रशासन, सामाजिक एकात्मता, ग्रामीण विकास, मराठी साहित्य आणि संस्कृती या क्षेत्रात महाराष्ट्रात भरीव आणि पथदर्शी कार्य करणाऱ्या संस्थेला किंवा व्यक्तीला हे पारितोषिक दिले जाणार आहे. रोख दोन लाख रुपये आणि मानपत्र असे पारितोषिकाचे स्वरूप आहे.
      या पारितोषिकासाठी सुयोग्य व्यक्ती किंवा संस्थेचे नाव विहित पद्धतीनुसार सुचविण्यासाठी यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्या मुंबईतील मुख्य कार्यालयाशी (जनरल जगन्नाथराव भोसले मार्ग, नरिमन पॉइंट, मुंबई-२१) संपर्क साधावा, असे आवाहन प्रतिष्ठानचे कोकण विभागाचे अध्यक्ष राजाभाऊ लिमये यांनी केले आहे. नावे सुचविण्याची अंतिम मुदत येत्या ३० सप्टेंबरपर्यंत आहे.
.............
प्रेषक – राजाभाऊ लिमये, कोकण विभाग अध्यक्ष, रत्नागिरी. (फोन - ९४२३०५१९७४))

No comments:

Post a Comment