Wednesday 19 December 2018

रत्नागिरीतील पाचवी जागतिक देवरुखे ब्राह्मण परिषद यशस्वी



      रत्नागिरी : पूर्वसंध्येला निघालेल्या भव्य शोभायात्रेसह रत्नागिरीत १४ ते १६ डिसेंबर या काळात झालेली तीन दिवसांची जागतिक देवरुखे ब्राह्मण परिषद यशस्वी झाली. शिस्तबद्धता आणि पर्यावरणस्नेह हे या परिषदेचे वैशिष्ट्य होते. प्रदूषणमुक्तीसाठी प्लास्टिकमुक्तीचा संदेश परिषदेतून दिला जात असल्याचे परिषदेचे अध्यक्ष डॉ. चंद्रशेखर निमकर यांनी उद्घाटन समारंभात सांगितले. तसेच तो उद्देश साध्य झाल्याचे त्यांनी समारंभ संपल्यानंतरही आवर्जून नमूद केले.
                रत्नागिरीच्या प्रमोद महाजन क्रीडा संकुलात उभारलेल्या आर. सी. काळे नगरीमध्ये ही परिषद झाली. जगभरातून सुमारे तीन हजार प्रतिनिधी परिषदेला उपस्थित होते. अमेरिकेतील सीटी ग्रुपचे डायरेक्टर प्रशांत जुवेकर उद्घाटन समारंभाला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. एआय, डेटा ॲनलिसिस, बिग डेटा, अशा स्वरूपाचे नवे अभ्यासक्रम येत आहेत. त्याचा उपयोग बँकिंग, विमा व वैद्यकीय क्षेत्रात केला जात आहे. त्यामुळे करिअरसाठी नव्या संधी आहेत. युरोप, अमेरिकेतील अनेक कंपन्या चीनमध्ये गेल्या आणि आयटी कंपन्या येथे येत आहेत. विद्यार्थ्यांनी विचार करून याचा फायदा उठवला पाहिजे, असे आवाहन त्यांनी केले. ते पुढे म्हणाले की, मी रसायन अभियांत्रिकी शिकलो. सिटी ग्रुपच्या ग्लोबल केमिकलचा मॅनेजिंग हेड आहे. माझी टीम लंडन, हाँगकाँगमध्ये काम करते. जगभरातील पेट्रोकेमिकल उद्योगांचा आम्ही सर्वांगीण अभ्यास करतो. ब्राझीलमध्ये मक्यापासून इथेनॉल निर्माण करतात आणि ते लिटरमागे दहा टक्के या प्रमाणात वापरतात. मात्र पेट्रोलमुळे मोठे प्रदूषण होत आहे. त्यामुळे आता इलेक्ट्रिक कार्स वापरणार्यांरची संख्या वाढणार आहे. येत्या २०२५ पर्यंत ही संख्या दहा टक्क्यांवर पोहोचेल.
                यावेळी खासदार विनायक राऊत यांनी रत्नागिरी शहर दर्जेदार बनवण्यासाठी सर्व सोयीसुविधा देण्याचा प्रयत्न असल्याचे सांगितले. नगराध्यक्ष राहुल पंडित यांनीही शुभेच्छा दिल्या. मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सुहास पेडणेकर, विद्यार्थी साहाय्याक संस्था व परिषदेचे अध्यक्ष डॉ. चंद्रशेखर निमकर, देवरुखे विद्यार्थी वसतिगृह संस्थेचे अध्यक्ष विनोद जोशी, सतीश शेवडे, नगरसेवक उमेश कुलकर्णी, राजू भाटलेकर, अभिनेत्री संपदा जोगळेकर-कुलकर्णी दिवाकर निमकर, श्रीनिवास कानडे, इंद्रनील भोळे आदी व्यासपीठावर उपस्थित होते. डॉ. आनंद जोशी, श्रीकांत मुकदम, वीणा ढापरे, प्रशांत जोशी, सुरेश शितूत, दीपक निमकर, उल्हास मुळे, सुरेंद्र कुलकर्णी, अनिल पिंपुटकर, ॲड. श्रीनिवास भोळे, जयंत चापेकर, वृंदा निमकर, अरुण जोशी, समीर निमकर, पत्रकार अरविंद कोकजे, यांचा यावेळी सत्कार करण्यात आला.
                कुलगुरू डॉ. पेडणेकर म्हणाले की, मुंबई विद्यापीठाअंतर्गत आठशे महाविद्यालयांत नऊ लाख विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. रत्नागिरी उपकेंद्राची ताकद वाढवण्यासाठी माझे प्रयत्न सुरू आहेत. उपकेंद्र सक्षम नसल्याने नवे अभ्यासक्रम सुरू करता येत नाहीत. लवकरच पालघर आणि वेंगुर्ले येथे नवीन उपकेंद्रे सुरू केली जाणार असून तेथे ओशनोग्राफी अभ्यासक्रम सुरू केला जाईल. ते म्हणाले की, १६१ वर्षे इतिहास असलेल्या या विद्यापीठाने देशाला पाच भारतरत्न, एक राष्ट्रपती आणि पंतप्रधान दिले. अशा विद्यापीठाला झपाट्याने बदलणाऱ्या जगाचीही दखल घेणे आवश्यक आहे. चौथी औद्योगिक क्रांती होत आहे. आणखी वीस वर्षांनंतर इंटरनेटवर आधारित ५० टक्के डिजिटल जॉब असतील. ऑफिस ही संकल्पना आता कमी होत जाणार आहे. शाळा-महाविद्यालयातही डेटा, थ्रीड डी प्रिंटिंग रोबोटिक्स, एआय असे अभ्यासक्रम सुरू झाले पाहिजेत. विद्यापीठात एआय मास्टर सायन्स सुरू केले आहे. मुंबईत विद्यापीठाच्या कलिना कँपस येथे इन्क्युबेटर सेंटर सुरू केले जाणार आहे. जर्मनीत कौशल्यावर आधारित पाच दशलक्ष, तर चीनमध्ये २० दशलक्ष नोकर्याम उपलब्ध आहेत. भारतातही काम वाढेल. त्यांच्यासाठी उपयुक्त अभ्यासक्रम सुरू होतीलच. पण आपण कोण आहोत, आपली स्वतःची ओळख झाली पाहिजे आणि समाज आणि देशासाठी शिक्षणाचा उपयोग करता आला पाहिजे. बदलणार्याओ जगात नवे ज्ञान शिकेल तोच टिकेल. मुलांना आधुनिक अभ्यासक्रम शिकण्यासाठी प्रोत्साहन द्यावे, असेही कुलगुरू म्हणाले.
                देशात असिष्णुता वाढली म्हणून पुरस्कार परत केले जातात. दुसरीकडे लोक रस्त्याला विरोध करतात. गंभीर हल्ले करायला तयार होतात. अंतर्गत आणि बाह्य मार्गाने ही संकटे देशावर आघात करत असतात. देशाच्या प्रगतीच्या आड न येता विकासात्मक भूमिका लोकांनी घ्यावी, असे आवाहन ज्येष्ठ सरकारी वकील पद्मश्री उज्ज्वल निकम यांनी परिषदेत केले.
                जागतिक देवरुखे ब्राह्मण परिषदेमध्ये श्री. निकम लेखक अच्युत गोडबोले आणि बाळासाहेब ठाकरे यांचे वकील बाळकृष्ण जोशी यांच्या प्रकट मुलाखतीचा कार्यक्रम झाला. त्यावेळी निकम यांनी आपली सडेतोड मते मांडली. वकिलीचा प्रवास, विविध खटले व तपास यासंदर्भात त्यांनी दिलखुलास मुलाखत दिली.
                निकम म्हणाले की, हल्ल्यांसाठी काही वेळा काही कारणांचे भांडवल केले जाते, त्यांना राजकीय हवापाणी मिळते. देशाच्या सुरक्षिततेला धोका पोहोचू नये, यासाठी नागरिकांनी लक्ष ठेवले पाहिजे. ट्रंप यांनी अमेरिकेत व्हिसासंदर्भात निर्णय घेतला, त्याबद्दल मला आनंद वाटला. कारण भारतीय हुशार विद्यार्थी तेथे जाऊन आपली बुद्धिमत्ता वापरतात. त्यांनी भारतातच राहून विकासासाठी आपली बुद्धी वापरावी. आपण नेहमी चांगले राहिले पाहिजे.
                अच्युत गोडबोले म्हणाले, ३२ वर्षे आयटी क्षेत्रात सीईओ, परदेशांत नोकरी केली. कोट्यवधी रुपये मिळवले. पण फक्त पैसे मिळवून काही नाही. त्यामुळे मराठी ज्ञानभाषा होण्यासाठी ३२ पुस्तके लिहिली. मला वाचकांचे भरपूर प्रेम मिळते, त्यामुळे समाधान वाटते. माझी पुस्तके वाचून १४ जण आत्महत्येपासून परावृत्त झाले, हे माझ्यासाठी खूप आहे.
                बाळकृष्ण जोशी यांनी सांगितले की मी १९८५ मध्ये मुलुंडमध्ये शिवसेनेचा पहिला नगरसेवक झालो. बाळासाहेबांच्या भाषणांनी प्रभावित झालो होतो आणि शिवसैनिक बनलो. बाबरी मशीद पाडली त्यावेळी बाळासाहेबांवरही खटला सुरू होता. खटला लढवायला लखनौला गेलो होतो. मी तिकडून येईपर्यंत बाळासाहेब जेवलेसुद्धा नव्हते. मला मुंबईत परत पाहिल्यावर ते जेवले. या प्रसंगामुळे मी भारावून गेलो.
                दरम्यान, प्रकट मुलाखतीनंतर पत्रकारांशी संवाद साधताना श्री. निकम यांनी नरेंद्र दाभोळकर हत्या प्रकरणातील संशयित आरोपींना जामीन मिळाल्याबद्दल तपास यंत्रणेला फटकारले. ते म्हणाले की, तपास यंत्रणांनी याचा गंभीरपणे विचार करावा. काल पुणे न्यायालयाने नरेंद्र दाभोळकर हत्या प्रकरणातील अटक करण्यात आलेल्या तीन संशयितांना जामीन दिला. अमोल काळे, राजेश बंगेरा आणि अमित दिगवेकर यांच्या विरोधात सीबीआयने ९० दिवसांत आरोपत्र दाखल केले नसल्याने या तिघांना पुणे न्यायालयाने जामन मंजूर केला. अशा प्रकराच्या हत्या कटातून निर्माण होत असतात. त्यासाठी तपास यंत्रणेला वेळ लागतो. पण अशा घटनांमध्ये तपासयंत्रणांनी वेळेत दोषारोपपत्र दाखल करणे आवश्यक असते. तसे झाले नसल्याने आरोपींनी जामीन मिळाला, असे श्री. निकम यांनी स्पष्ट केले.
                गांधीवादामुळे ७० वर्षांत देश अपयशी ठरला आहे. मात्र आज सावरकरवाद स्वीकारण्याची गरज असून तो स्वीकारला तरच भारत हिंदू राष्ट्र म्हणून यशस्वी ठरेल. विज्ञानाची कास, भाषाशुद्धी, संरक्षण सज्जता आणि अंधश्रद्धा निर्मूलनाचा विचार त्यांनी मांडला होता, असे प्रतिपादन अभिनेते शरद पोंक्षे यांनी केले.
                परिषदेत बोलताना ते म्हणाले की, स्वातंत्र्यवीर सावरकर ज्या भूमीत स्थानबद्ध होते आणि त्यांनी राष्ट्राला वंदनीय कार्य केले, तेथे बोलताना मला नेहमीच भरून येते. पतितपावन मंदिर असो वा कारागृहातील स्मारकात नतमस्तक कोणीही व्हावे. खरा इतिहास नेहरूंपासून सार्यांबनी लपवून स्वा. सावरकरांना बदनाम केले. भारत १९४७ मध्ये स्वतंत्र झाला तरी सावरकरांना १९६३ पर्यंत स्वातंत्र्यसैनिक म्हणून सिद्ध करण्यासाठी प्रयत्न करावे लागले, हे दुर्दैव. स्वा. सावरकरांना हिंदुत्ववादी सरकार अजूनही भारतरत्न देत नाही, यापेक्षा दुर्दैव कोणते?
                देशाने ७० वर्षे गांधीवाद जोपासला. नेहरूंनी पंतप्रधानपद स्वीकारल्यानंतर स्वा. सावरकरांनी काही सूचनांचे पत्र पाठवले होते. विज्ञानवादी राहा आणि सुरक्षा व्यवस्थेतील सैनिक, पोलीस आणि शिक्षणकार्य करणार्या  शिक्षकांना समाधानी ठेवा. ही सूचना न ऐकल्यामुळेच आज सैनिक किंवा पोलिसांबद्दल वाट्टेल ते बोलले जाते. शिक्षक मनापासून शिकवत नाहीत. गुरुकुल शिक्षण पद्धत अमलात आणा. सर्वाधिक संहारक शस्त्रे आपल्या दलामध्ये सामील करा, या सूचनेचेही पालन केली नाही. त्यामुळे चीनविरुद्ध आपण हरलो. दुबळ्या माणसाच्या तोंडी अहिंसा शोभून दिसत नाही. त्यामुळे सुरक्षेची काळजी घ्यायला हवी होती. चरख्यावरच्या सुताने नव्हे तलवारीच्या पात्याने व रक्ताने देशाच्या सीमा सुरक्षा करायल्या हव्या होत्या.
                कस्तुरबा गांधी आणि स्वा. सावरकर व त्यांच्या पत्नीची भेट रत्नागिरीतील वास्तव्यात झाली होती. गांधी व सावरकर यांची दीड तास चर्चा झाली पण दोघांची मते भिन्न होती. त्यानंतर गांधीजींनी सौ. सावरकरांना वंदन केले आणि ते म्हणाले, मी आज यांच्या मतांमध्ये पोळून निघालो. तू यांच्याशी संसार कसा करतेस, असा प्रसंग श्री. पोंक्षे यांनी सांगितला.
               
                दोन दिवसांची परिषद संपल्यानंतर परिषदेचे अध्यक्ष डॉ. चंद्रशेखर निमकर यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. ते म्हणाले, पर्यावरणस्नेही, प्लास्टिकमुक्तीचा संदेश देण्यात जागतिक देवरुखे ब्राह्मण परिषद झाली. आर. सी. काळेनगरी अर्थात प्रमोद महाजन क्रीडासंकुलची फारशी स्वच्छता करावी लागली नाही. खऱ्या अर्थाने हे संमेलन आनंददायी आणि पर्यावरणस्नेही झाले. देश-विदेशातील ज्ञातिबांधवांच्या उपस्थितीमुळे हे संमेलन संवादातून संपन्नतेकडे नेणारे ठरेल. प्लास्टिकमुक्त परिषदेचा संकल्प शंभर टक्के यशस्वी झाला. प्लास्टिक पिशव्या, बाटल्यांचा वापर केला नाही. परिषद संपल्यानंतर तासाभरातच आर. सी. काळे नगरीची साफसफाई करण्यात आली. पतितपावन मंदिरापासून निघालेल्या शोभायात्रेच्या शेवटी स्वच्छता पथक कार्यरत होते. त्यामुळे कोणत्याही कचऱ्याचा त्रास रत्नागिरीकरांना झाला नाही. फटाके टाळले आणि ध्वनी, वायुप्रदूषण टाळण्यात यश आले.
                मी परिषदेच्या निमित्ताने ७५ गावे, शहरांना भेट दिली. तेथील ज्ञातिबांधवांना परिषदेची माहिती दिली. संस्थेला अनेकांनी केलेल्या दानाचा विनियोग अधिक चांगल्या प्रकारे केला जाणार आहे. परिषदेच्यानिमित्त शंभर दिवस पत्राच्या माध्यमातून लिहीत होतो. कित्येक जणांनी या पत्रांचे पुस्तक प्रकाशित करण्याची सूचना केली आहे. परिषदेकरिता भेटलेले ज्ञातिबांधव, कामाचा आढावा, आलेल्या अडचणी सोडवल्या. जागतिक परिषदेच्या निमित्ताने समोर ठेवलेली उद्दिष्टे साध्य करण्यासाठी आजपासून सुरवात झाली आहे. पुढच्या वर्षी जे काम करायचे आहे, त्याची ही सुरवात आहे. आजपासून खऱ्या अर्थाने कामाला लागणार आहोत. त्यासाठी यापुढेही ज्ञातीबांधवांचे सहकार्य आवश्यक आहे, असेही ते म्हणाले. देवरुखे ज्ञातिबांधवांची जनगणना गेल्या चार महिन्यांपासून सुरू आहे. अजून काही दिवस ती सुरू राहणार आहे. आपण एकत्र राहणे महत्त्वाचे आहे. काम करताना मतभेद असले त्या त्या वेळी चर्चा करून प्रश्नस सोडवले पाहिजेत. यामुळेच आपला अधिक विकास होईल, असेही डॉ. निमकर म्हणाले. सामाजिक बांधिलकीच्या नात्याने परिषदेत शंभर जणांनी रक्तदान केले.
                विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास हा मुद्दा केंद्रस्थानी आहे. परीक्षेतील गुण महत्त्वाचे आहेतच. पण कला, क्रीडा, इतर छंद याप्रमाणे करावेसे वाटेल त्यात विद्यार्थ्यांचा परफॉर्मन्स नक्कीच चांगला असेल. परिषद यशस्वी करण्यासाठी विद्यार्थी साहाय्यक संस्थेचे विश्वस्त, कार्यकारिणी, देवरुखे विद्यार्थी वसतिगृह संस्थेचे अध्यक्ष विनोद जोशी व कार्यकारिणीचे मोलाचे योगदान लाभले. वृत्तपत्र, वृत्तवाहिन्या आणि सोशल मीडियावर परिषदेच्या बातम्यांना चांगली प्रसिद्धी मिळाल्याबद्दल डॉ. निमकर यांनी विशेष आभार मानले.
...................................

पाचव्या जागतिक देवरुखे परिषदेचे अध्यक्ष डॉ. चंद्रशेखर निमकर यांचे मनोगत पाहण्यासाठी कोकण मीडिया यूट्यूब चॅनेलच्या खालील लिंकवर क्लिक करा -

https://youtu.be/IkvDKT3o09c

Friday 30 November 2018

वेदमूर्ती जनूकाका फडके यांची जन्मशताब्दी कुर्धे-मेर्वी येथे सुरू


     
 रत्नागिरी : कुर्धे-मेर्वी गावचे माजी सरपंच वेदमूर्ती जनार्दन नारायण ऊर्फ जनूकाका फडके 
यांच्या जन्मशताब्दीच्या दोन दिवसांच्या कार्यक्रमाला आज (ता. ३० नोव्हेंबर) प्रारंभ झाला. त्यांच्या शिष्यांनी विविध धार्मिक विधींनी शताब्दी साजरी करायचे ठरविले आहे.
     
पवमान पंचसूक्त
कै. वेदमूर्ती जनार्दन नारायण फडके गुरुजी यांचा जन्म २५ नोव्हेंबर १९१८ रोजी झाला. काही काळ मेर्वी-कुर्धे ग्रामपंचायतीचे सदस्य आणि सरपंच म्हणून त्यांनी काम केले. या काळात गावातील सार्वजनिक विहिरीसह विविध सामाजिक कामे त्यांनी केली. गावातील पहिले गोबर गॅस संयंत्र स्वतःच्या घरी सुरू करून त्यांनी गावाला ऊर्जेच्या नव्या स्रोताची दिशा दिली. कुर्धे गावातील शतकोत्सवी वेदपाठशाळेत त्यांनी सुमारे २५ वर्षे ८० विद्यार्थ्यांना वेदांचे शिक्षण दिले. त्यांनी कीर्तन-प्रवचनेही केली.
     अशा या बहुआयामी व्यक्तिमत्त्वाची तिथीनुसार जन्मशताब्दी साजरी करण्यासाठी त्यांच्या वेदपाठशाळेत शिकलेल्या ५० विद्यार्थ्यांनी कुर्धे येथे दोन दिवसांच्या धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. आज पहिल्या दिवशी उदकशांत, पुण्याहवाचन, व्यासपूजा, पवमान, रुद्र, सौर, ब्रह्मणस्पती आणि रुद्रसूक्ताचा जप, वेदमूर्ती प्रभाकर पाध्ये यांचे प्रवचन, मंत्रजागर, आरती-मंत्रपुष्प, आगवे येथील मुळ्ये मंडळींचे भजन इत्यादी कार्यक्रम पार पडले. कै. फडके यांचे कुटुंबीय, स्नेही, विद्यार्थ्यांनी लिहिलेल्या आठवणींचे 'जनाशताब्दीहे पुस्तक आज प्रकाशित झाले. ज्येष्ठ लेखिका सौ. आशाताई गुर्जर, पत्रकार प्रमोद कोनकर, कै. फडके यांचे सुपुत्र प्रकाश फडके यांच्या हस्ते प्रकाशन झाले. रत्नागिरीच्या कोकण मीडियातर्फे हे पुस्तक प्रकाशित करण्यात आले आहे.
     
रुद्रावर्तने
उद्या सकाळी देवतापूजन, हवन, यतेआराधना आणि तीर्थराजपूजन होणार असून कार्यक्रमाची सांगता होईल.
........

'जनाशताब्दी’ संग्रह बुकगंगावर
..................

जनाशताब्दी हा संग्रह bookganga.com या संकेतस्थळावर ई-बुक स्वरूपात मोफत उपलब्ध करून देण्यात आला आहे. हे पुस्तक पुढील लिंकवर क्लिक करून डाउनलोड करून वाचता येईल. (बुकगंगाचा ई-बुक रीडरही डाउनलोड करावा लागेल.)




कुर्धे (ता. रत्नागिरी) : माजी सरपंच वेदमूर्ती जनूकाका फडके यांच्या जन्मशताब्दीनिमित्ताने प्रसिद्ध करण्यात आलेल्या 'जनाशताब्दी संग्रहाचे प्रकाशन करताना ज्येष्ठ लेखिका सौ. आशाताई गुर्जर, वेदमूर्ती मुंडले, प्रमोद कोनकर, प्रकाश फडके


Thursday 29 November 2018

स्कुबा डायव्हिंग पॉइंटमुळे रत्नागिरीच्या पांढऱ्या समुद्रकिनाऱ्याचा पर्यटन विकास



पांढऱ्या समुद्रकिनाऱ्यावरून सूर्यास्ताचे दर्शन
..........................................................................
      रत्नागिरी  : रत्नागिरीतील हर्षा स्कुबा डायव्हिंगचा डायव्हिंग पॉइंट आता मिऱ्याऐवजी रत्नागिरीच्या पांढरा समुद्र भागात स्थलांतरित करण्यात आला आहे. त्यामुळे डायव्हिंगसाठी येणाऱ्या पर्यटकांना समुद्राच्या शांत किनाऱ्यावरील जीवन आणि वैविध्याचा आस्वाद घेता येणार आहे. तसेच त्या भागातील पर्यटनाच्या विकासालाही चालना मिळणार आहे.
      सुमारे तीस वर्षांपूर्वी पांढरा समुद्र हे रत्नागिरीचे गजबजणारे पर्यटनस्थळ होते. मात्र त्या भागात सुकत घातली जाणारी मासळी आणि धूपप्रतिबंधक बंधाऱ्याच्या कामामुळे पांढरा समुद्र हे ठिकाण रत्नागिरीच्या पर्यटनाच्या नकाशावरून पुसले गेले. मात्र आता पुन्हा येथे पर्यटन विकासाचे प्रयत्न सुरू झाले आहेत. मासळी सुकविण्याचे केंद्र मिरजोळे येथे स्थलांतरित करण्यात आला आहे. शिवाय हर्षा स्कुबा डायव्हिंग या संस्थेने मिऱ्या गावातून आपला डायव्हिंग पॉइंट पांढऱ्या समुद्रकिनाऱ्यावर हलविला आहे.
      पांढरा समुद्र भागातील समुद्र खूप शांत आहे. या भागातील मोठ्या प्रमाणावर असलेल्या पांढऱ्या वाळूमुळे या किनाऱ्याला पांढरा समुद्र असे म्हटले जाते. सागरी आक्रमणामुनळे या किनाऱ्याची धूप होऊ नये, तेथे टेट्रॉपॉडचा धूपप्रतिबंधक बंधारा उभारण्यात आला आहे. त्यामुळे थेट समुद्राच्या लाटा या किनाऱ्यावर येत नाहीत. परिणामी हा किनारा सुरक्षित झाला आहे. या भागात पार्किंगची सुविधा असून स्थानिकांनी पर्यटकांसाठी विविध स्टॉल थाटले आहेत. लवकरच त्या भागात प्रशस्त रस्ताही होणार आहे. या किनाऱ्यावरील मुरूगवाडा, पंधरा माड येथील लोक विकासासाठी एकत्र आले आहेत. स्थानिकांनी एकत्र येऊन येथे स्टॉल मांडले आहेत. स्वच्छता केली आहे. स्कूबा डायव्हिंग पॉइंटमुळे या किनाऱ्यावर येणाऱ्या पर्यटकांची संख्या वाढली आहे. त्यांना या परिसरातील विविध प्रकारचे मासे व प्रवाळ पाहण्याची संधी मिळते. किनाऱ्यावर हजारो प्रकारचे शंख, शिंपले आढळतात. सात फूट लांबीच्या पंखाचा पसारा लाभलेल्या समुद्री गरुडाचे दर्शन या परिसरात होते. ब्राह्मणी घार, छोटे पक्षी तसेच व्हिंब्रेल, रेड शांक, ग्रीन शांक, प्लोवर, वेस्टर्न रिफ हेरॉन यासारखे अनेक स्थलांतरित पक्षीही येथे पाहायला मिळतात. रत्नदुर्ग किल्ल्याच्या भौगोलिक रचनेमुळे उत्तरेला पांढर्यास समुद्रावरील वाळूचा किनारा आहे. नारळी पौर्णिमेच्या मागे-पुढे पंधरा दिवस हा किनारा एका वेगळ्याच रूपात सजतो. रंगीबेरंगी शंख-शिंपल्यांनीही किनारा सजतो. पाऊल ठेवायलाही जागा नसते. हे शंख-शिंपले न्याहाळणे म्हणजे आनंददायी क्षण असतो. समुद्राच्या पूर्वेला काही अंतरावर मोठे कांदळवन असून त्यात जैवविविधता पद्धतीने अनुभवता येते. या खाजणात ऑक्टोपसचे दर्शनही होते, अशी माहिती पर्यावरण अभ्यासक सुधीर रिसबूड यांनी दिली.
     पांढऱ्या समुद्रकिनारी वाळू पायाला फार चिकटत नाही. रत्नदुर्ग किल्ला, दुर्मिळ औषधी वनस्पतींनी युक्त मिऱ्या डोंगर, शंखशिंपले, कांदळवनातील जैवविविधता, मत्स्यालय अशी पर्यटकांना आवडणारी अनेक स्थळे या किनाऱ्यावर असल्याने पांढरा समुद्रकिनारा पर्यटकांचे प्रमुख आकर्षण ठरणार आहे.
.............



रत्नागिरीतील हर्षा स्कुबा डायव्हिंगच्या पांढऱ्या समुद्रावरील डायव्हिंग पॉइंटवरून समुद्राच्या तळाशी गेल्यानंतर घडणारे समुद्राखालील सृष्टीचे दर्शन पाहण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.


.................
...............


हर्षा स्कुबा डायव्हिंगसाठी संपर्क - ७७१९९०५५३३९८२२२९०८५९
..........................




Tuesday 6 November 2018

‘कोकणातील जलवैभव आणि कलेचा वारसा जपायला हवा’


कोकण मीडियाच्या दिवाळी अंकाचे उक्षीच्या कातळशिल्पाजवळ प्रकाशन

उक्षी (रत्नागिरी) : ‘कोकणात सापडलेल्या कातळ-खोदचित्रांमध्ये पाणघोडा, हत्ती अशा अनेक प्राण्यांच्या प्रतिमा आहेत, ज्यातील बहुतांश प्राणी पाण्याशी निगडित आहेत. ही शिल्पे दहा हजार वर्षांपूर्वीची म्हणजेच अश्मयुगीन काळातील असल्याचा तज्ज्ञांचा अंदाज आहे. याचाच अर्थ असा, की कोकणातील जलसमृद्धीलाही एवढा इतिहास आहे,’ असे प्रतिपादन कातळ-खोद-चित्रांचे शोधकर्ते सुधीर तथा भाई रिसबूड यांनी केले. रत्नागिरीतील साप्ताहिक कोकण मीडियाच्या दिवाळी अंकाच्या प्रकाशनावेळी ते बोलत होते. कोकणातील जलवैभव, तसेच विविध कलांचा वारसा जपण्याची गरज या कार्यक्रमात मान्यवरांनी व्यक्त केली.

साप्ताहिक कोकण मीडियाच्या दिवाळी अंकाचे प्रकाशन करताना (डावीकडून) प्रमोद कोनकर, हरिश्चंद्र बंडबे, सरपंच मिलिंद खानविलकर, भाई रिसबूड, डॉ. रमेश साळुंखे आणि कांचन आठल्ये.
साप्ताहिक कोकण मीडियाच्या दिवाळी अंकाचे यंदा तिसरे वर्ष असून, यंदाच्या अंकात जलवैभव विशेष विभाग आहे. तसेच कोकणातील कातळ-खोद-चित्रांच्या ठेव्याची दीर्घ गूढरम्य शोधकथाही शोधकर्त्यांनी अंकात लिहिली आहे. याचे औचित्य साधून रत्नागिरी तालुक्यातील उक्षी येथील कातळ-खोद-चित्राजवळ वसुबारसेच्या दिवशी अंकाचे प्रकाशन करण्यात आले.


माजी अतिरिक्त जिल्हाधिकारी डॉ. रमेश साळुंखे, कातळ-खोद-चित्रांचे शोधकर्ते भाई रिसबूड, कोकण मीडियाचे संपादक प्रमोद कोनकर, ‘हर्षा हॉलिडेज’चे प्रतिनिधी कांचन आठल्ये, उक्षीचे सरपंच मिलिंद खानविलकर, उपसरपंच हरिश्चंद्र बंडबे, ग्रामविकास अधिकारी पद्मजा खटावकर, गावप्रमुख गणपत घाणेकर, मंगेश नागवेकर, अरविंद बंडबे, चंद्रकांत घाणेकर, संतोष देसाई आणि ग्रामस्थ या कार्यक्रमाला उपस्थित होते.

उक्षी गावात लोकसहभागातून संरक्षित करण्यात आलेले हत्तीचे कातळ-खोद-चित्र
‘या गावात सापडलेले हत्तीचे कातळशिल्प लोकसहभागातून संरक्षित करण्यात आले आहे. हा आदर्श जास्त लोकांपर्यंत पोहोचावा या हेतूने अंकाचे प्रकाशन उक्षी गावात करण्यात आले,’ असे संपादक प्रमोद कोनकर यांनी सांगितले. तसेच कोकणातील चांगल्या गोष्टी जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचण्याच्या उद्देशाने साप्ताहिक कोकण मीडिया कार्यरत असल्याचेही त्यांनी नमूद केले.


भाई रिसबूड यांनी या वेळी त्यांच्या शोधकार्याबद्दल थोडक्यात सांगून, ग्रामस्थांनी केलेल्या सहकार्याबद्दलही आवर्जून सांगितले. तसेच, ‘लोकसहभागातून कातळशिल्प संरक्षित केल्यामुळे गावात पर्यटक येऊ लागले. त्यामुळे चहावाल्याचा व्यवसाय वाढला. त्याचप्रमाणे पर्यटक अधिक प्रमाणात आले, तर सर्वांचाच फायदा होईल. म्हणूनच गावाची अस्मिता जपण्याची गरज आहे. गावातील तरुणच गाइड म्हणून तयार झाले, तर गावाचाच फायदा होईल,’ असे त्यांनी नमूद केले.

‘हर्षा हॉलिडेज’चे कांचन आठल्ये यांनीही हाच मुद्दा उचलून धरला आणि पर्यटकांना अशा गोष्टीच पाहण्यात रस असल्याचे आणि गावातील तरुणांनी माहिती दिल्यास ते अधिक उपयुक्त ठरेल, असे त्यांनी सांगितले.

माजी अतिरिक्त जिल्हाधिकारी डॉ. रमेश साळुंखे यांनी कातळशिल्प लोकसहभागातून संरक्षित केल्याबद्दल गावकऱ्यांचे कौतुक केले. ‘आता जग छोटे झाले आहे. त्यामुळे अमेरिकेतीलही क्षणात कळते; पण लिखित स्वरूपातील माध्यमे महत्त्वाची आहेत. तो अक्षर ठेवा आहे. कोकण मीडियाच्या माध्यमातून प्रसिद्ध होत असलेल्या विषयांचे हेच महत्त्व आहे. मिलिंद खानविलकरांसारखे उत्साही सरपंच गावाला लाभले आणि त्यांना लोकांचे सहकार्य मिळाले, त्यामुळे गावाचे नाव अजरामर झाले आहे. भाई रिसबूड यांचे कार्य अत्यंत मोलाचे आहे. त्यांच्या कार्यामुळे उक्षी गाव जगाच्या नकाशावर आले आहे. त्यांच्या म्हणण्याप्रमाणे गावातील तरुण मुलांनी गाइड होण्यासाठी प्रयत्न करावेत. अश्मयुगातील जुनी माणसे आज नसली, तरी कलेच्या रूपाने आजही ती जिवंत आहेत. अश्मयुगातील ही कला गावापुरती सीमित न राहता सर्वत्र जावी आणि पिढ्यानपिढ्या जपावी. त्यातूनच उपजीविकेचे साधनही उपलब्ध होईल. हा ठेवा जपला, तर पर्यटकांमध्येही गणपतीपुळे, पावसबरोबरच ही कला, इतिहास, संस्कृती बघण्याची आवड निर्माण होईल,’ असे डॉ. साळुंखे म्हणाले.

सरपंच मिलिंद खानविलकर यांनी आपले अनुभव सांगितले. ‘भाई रिसबुडांनी या कातळशिल्पाचे महत्त्व सांगितल्यावर आम्ही तो ठेवा जपण्यासाठी गावकऱ्यांपुढे प्रस्ताव ठेवला. गावकऱ्यांच्या सहकार्यामुळेच आम्ही तो ठेवा संरक्षित करू शकलो. कोणताही सरकारी निधी आम्ही घेतलेला नाही. कातळशिल्पाच्या माध्यमातून गावाची प्रसिद्धी झाली. अनेक माणसे येथे येत असतात. पुरातत्त्व विभागाचे संचालक तेजस गर्गे, आयुक्त जगदीश पाटील यांनीही अलीकडेच येथे भेट दिली. हा ठेवा आम्ही जतन केला, तसा आजूबाजूच्या परिसरातील लोकांनीही करावा,’ असे खानविलकर म्हणाले.

उपसरपंच हरिश्चंद्र बंडबे यांनी आभारप्रदर्शन केले.

(साप्ताहिक कोकण मीडियाचा दिवाळी अंक फक्त १२५ रुपये असून, ‘बुकगंगा डॉट कॉम’वरून अंक घरपोच मागविण्यासाठी https://www.bookganga.com/R/7X0YW येथे क्लिक करा. ‘बुकगंगा’वर अंक ई-बुक स्वरूपातही उपलब्ध आहे. ई-बुकची किंमत फक्त १०० रुपये. अंकासाठी आणि वार्षिक वर्गणीसाठी संपर्क : 9422382621)

(अंकाच्या प्रकाशनसोहळ्याची आणि उक्षीच्या कातळशिल्पाची झलक पाहा सोबतच्या व्हिडिओत...) 




Tuesday 23 October 2018

कैरीचा आस्वाद म्हणजे कोकणचा अस्सल अनुभव


      सागराची अथांगता, गर्द वनराईमधली आणि नारळी-पोमळीच्या बागांमधली शांतता, कौलारू घरांमधला निवांतपणा आणि आंबट-गोड रानमेव्याचा आस्वाद या सगळ्या गोष्टी एकाच ठिकाणी अनुभवायच्या असतील, तर त्याचं एकमेव उत्तर कोकण हे आहे. इथल्या या सगळ्या वातावरणाला एक ईश्वरी स्पर्श असलेला जाणवतो. कारण या सगळ्यातून मिळणारं समाधान मोजता न येण्याइतकं मोठं असतं. म्हणूनच आवर्जून फिरण्याच्या ठिकाणांच्या पर्यटकांच्या यादीत कोकण पहिल्या काही नंबरांत असतं. मग ती वीकेंडची शॉर्ट ट्रिप असो किंवा मोठ्या सुट्टीतली मोठी सहल, कोकण कायमच रिफ्रेश करून टाकतं.


      अशा या रिफ्रेशिंग कोकणात आल्यानंतर राहायला हॉटेल्स खूप असली, तरी कोकणाचा खरा फील हॉटेलमध्ये राहून नक्कीच येत नाही; पण मग फिरायला आल्यावर राहणार कुठे? आणि कुठे तरी दुर्गम भागात राहायला गेल्यावर कदाचित चांगला अनुभव घेता येईलही; पण तिथे बाकीच्या सोयी कशा असतील, तिथून बाकीच्या ठिकाणचं पर्यटन करणं किती अवघड असेल, असे अनेक प्रश्न तुमच्या मनात उभे राहिले असतील. या सगळ्या प्रश्नांचं समाधान करणारं उत्तर कोकणाशी खूप जवळचा संबंध असलेल्या एका शब्दात सामावलेलं आहे. तो शब्द म्हणजे कैरी.

      होय. कैरी! रत्नागिरी तालुक्यातल्या नेवरे गावातल्या उंबरवाडीत मकैरी विश्रांतीस्थळम वसलेलं आहे. अभय खेर आणि त्यांचे पुत्र किरण
खेर यांनी हे विश्रांतीस्थळ उभारलं आहे.

      हे नेवरे गाव आहे रत्नागिरी-गणपतीपुळे रस्त्यावर, रत्नागिरी शहरापासून अवघ्या 18 किलोमीटर अंतरावर.

कैरीपासून गणपतीपुळ्याचं प्रसिद्ध तीर्थक्षेत्र फक्त चार किलोमीटर अंतरावर आहे. शिवाय, नेवरे-काजिरभाटी, आरे आणि वारे, भंडारपुळे असे अनेक विस्तीर्ण आणि शांत समुद्रकिनारे इथून केवळ दोन-तीन किलोमीटरच्या परिसरात आहेत. गणपतीपुळ्यापासून पुढे दोन किलोमीटरवरच्या मालगुंड गावात कवी केशवसुतांचं स्मारक आहे. रत्नागिरी शहरातल्या आणि जवळपासच्या पर्यटनस्थळांबद्दल तर तुम्हाला माहिती असेलच.

      हे झालं आजूबाजूच्या पर्यटनस्थळांबद्दल... पण कैरीबद्दल काय?

      कैरी विश्रांतीस्थळ म्हणजे नेमकं काय आहे, हा प्रश्न अजूनही मनात असेलच ना! तर त्याबद्दल थोडी माहिती घेऊ या. हे विश्रांतीस्थळ खेर कुटुंबीयांच्या सात एकर क्षेत्रावरच्या शेतात आहे. नैसर्गिक डोंगरउतारावर कोकणातल्या पद्धतीनं उभारलेली पाच कौलारू घरकुलं म्हणजेच कॉटेजेस इथं आहेत. कोकणचं वैशिष्ट्य असलेल्या जांभ्या दगडापासून म्हणजेच चिर्‍याचा वापर करून ही घरं उभारली आहेत. छपरासाठी मंगलोरी कौलं वापरली आहेत. घरांना आतून आणि बाहेरूनही सिमेंटचा गिलावा केलेला नाही. बाहेरून ही घरं कोकणी पद्धतीची दिसत असली, तर आतून मात्र ती सर्व सोयींनी परिपूर्ण आहेत. नारळी-पोफळीच्या बागा, आंबा, काजू, मणस आणि बाकी सगळ्या कोकण मेव्याच्या समृद्ध वनराईच्या सान्निध्यात असलेली ही घरकुलं निवांतपणाचा नितांतसुंदर अनुभव देतात. विशेष म्हणजे कॉटेज उभारताना एकही जुनं झाड तोडलेलं नाही. सर्व झाडं मूळ अवस्थेत आहेत. पांगार्‍याचं एक झाड छप्पर घालताना अडचणीचं ठरत होतं. तरीही ते झाड न तोडता छपराचा तेवढा भाग आत घेतला आहे. थोडक्यात म्हणजे घरं बांधण्यासाठी नेहमीच्या रिवाजाप्रमाणे झाडं न तोडता आवश्यकतेनुसार घरांची जागाच मागेपुढे हलविली आहे. त्यामुळे पाच घरांच्या या ओळीला एक नैसर्गिक महिरपही लाभल्याचं उंचावरून पाहताना दिसतं. पर्यावरणाची हानी होऊ नये, यासाठी ही खबरदारी जाणीवपूर्वक घेतली आहे. प्रत्येक कॉटेज स्वतंत्र असली, तरी चिर्‍याच्या पाथवेनं ती एकमेकांना जोडली आहेत.

      अशा वातावरणात असलेल्या या घरकुलांत राहण्याच्या अनुभवाची तुलना अन्य कशाशी करता येणार नाही. कारण तो अनुभव खराखुरा निवांतपणा देणारा आणि रिफ्रेश करणारा असतो. बरं, हे विश्रांतीस्थळ गावात असलं, तरी शहरी पर्यटकांच्या गरजा पूर्ण करणार्‍या सर्व सुविधा इथं आहेत. त्याची अजिबातच काळजी नको. कोकणातला हा डोंगराळ भाग आहे. त्यामुळे विजेची समस्या अधूनमधून उद्भवते. दिवसा ठीक आहे, पण रात्री वीज नसेल, तर काय करायचं, असा प्रश्न निर्माण होईल. त्याचा विचार कैरी विश्रांतीस्थळावर केला आहे, इन्व्हर्टची सुविधा आहे. गरम पाण्याची केटल् व चहा-कॉफीची सामग्री प्रत्येक कॉटेजमध्ये आहे. सर्व पाचही कॉटेजमधली कमोडची सुविधा असलेली टॉयलेट चांगली ऐसपैस आहेत. बेसिन, शॉवरची सोय तर आहेच, पण विजेवरच्या गीझरचीही व्यवस्था करण्यात आली आहे.

      उत्तम प्रकारच्या कोकणी नाष्टा व भोजनाचा आस्वाद तुम्हाला घ्यायचा असेल, तर मात्र त्यासाठी आधी तसं कळवावं लागेल. कळवलं, तर तशी व्यवस्था करता येऊ शकेल.

      याशिवाय कॉमन फॅसिलिटी हॉलमध्ये वॉशिंग मशीन, फ्रिजचीही सुविधा असेल. म्हणजेच आधुनिक सुविधा आणि कोकणाचा खरा अनुभव यांची सांगड या विश्रांतीस्थळात उत्तमरीत्या घातलेली आहे.

      ज्या हंगामात तुम्ही याल, त्या हंगामातल्या रानमेव्याची अस्सल चव चाखता येईलच; पण जवळूनच वाहणार्‍या संथ, शांत ओढ्याच्या काठावर फिरता येईल. सात एकरात पसरलेल्या अस्सल कोकणी शिवारात सहज फेरफटका मारता येईल. आंबा, पोफळी अशा जुन्या खास कोकणी झाडांची राई या भागात आहेच, पण नारळी-पोफळीची नवी लागवडही केली आहे. याच शिवारात श्री. खेर यांनी कोकणीपणाला साजेसंच स्वतःचं घर उभारलं आहे. तब्बल सतरा फूट व्यासाची विहीर घराजवळच बांधली आहे. याच विहिरीतून सर्व कॉटेजना अखंड पाणीपुरवठा होतो.

      कोकणात धावतपळत फिरायला येण्यासाठी नव्हे, तर धकाधकीच्या जगण्यातून थोडासा चेंज म्हणून अस्सल कोकणपण अनुभवण्यासाठी, कोकणातल्या शांत वातावरणाचा आस्वाद घेण्यासाठी या कॉटेजमध्ये राहायला या. निवांत राहा. शांतता मिळवा. चिंता विसरा आणि फ्रेश होऊन परत जा. आणि हे सगळं अगदी किफायतशीर दरांत.

      मनात आलं तर आजूबाजूच्या पर्यटनस्थळांवर सवडीनं फिरणंही सोपं अगदी सहज शक्य आहे.

      थोडक्यात सांगायचं तर, कोकणात आल्यावर या कैरीचा आस्वाद घ्यायला पर्याय नाही!

      एक मात्र आहे, कैरी विश्रांतीस्थळावर सर्व सोयीसुविधांनी सज्ज असलं, तर राहण्यासाठी मात्र ही घरं 28 डिसेंबर 2018 नंतरच उपलब्ध होणार आहेत.

- प्रमोद कोनकर

..............

पत्ता : कैरी विश्रांती, उंबरवाडी, नेवरे, ता. जि. रत्नागिरी

संपर्क : किरण खेर - 9657932617 (मोबाइल, व्हॉट्सअ‍ॅप)

अभय खेर - 9422319711

Email - abhaykher@yahoo.co.in

......................



कैरी विश्रांतीस्थळावरील घरांची आणि परिसराची झलक पाहण्यासाठी खाली दिलेली यूट्यूबची लिंक क्लिक करा -




............

Saturday 13 October 2018

कुरतडे येथील संतोषीमाता मंदिरात नवरात्रोत्सवाचा जागर सुरू



संतोषीमाता
      रत्नागिरी – कुरतडे (ता. रत्नागिरी) येथील पालवकरवाडीतील संतोषीमाता मंदिरात नवरात्रोत्सवाचा जागर सुरू झाला आहे.
      कुरतडे येथील पालवकरवाडीतील निसर्गरम्य परिसरात एकतीस वर्षांपूर्वी संतोषीमाता मंदिराची स्थापना करण्यात आली. परिसरातील ग्रामस्थांनी वर्गणी काढून मंदिराची उभारणी आणि सुशोभीकरण केले. त्यामध्ये चाकरमान्यांचा मोठा हातभार लागला. मंदिर स्थापन झाल्यापासून दरवर्षी नवरात्रोत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. त्यानिमित्ताने गरबा नृत्यही आयोजित केले जाते. यावर्षीही नवरात्रोत्सव थाटात सुरू झाला आहे. पारंपरिक पद्धतीने विविध उपक्रम राबविले जात आहेत. त्यामध्ये दररोज देवीची आरती केली जाते. त्यामध्ये भाविकांचा मोठा सहभाग असतो. लहा मुले तसेच पुरुष आणि महिलांसाठीही दररोज फनीगेम्स घेतले जातात. तरुणांच्या आकर्षणाचा बिंदू असलेल्या गरबानृत्याचा कार्यक्रम दररोज रात्री आयोजित केला जातो. कोकणाची ओळख असलेल्या जाकडी नृत्याचे कार्यक्रमही केले जात असून त्याला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.
      नवरात्रोत्सवातील विविध कार्यक्रमांचा लाभ घेण्याचे आवाहन जय संतोषीमाता नृत्य नाच नमन मंडळातर्फे नारायण पालवकर  आणि गोपाळ पालवकर यांनी केले आहे.
........
कुरतडे (ता. रत्नागिरी) पालवकरवाडीतील संतोषीमाता मंदिर.


-    ...................

Sunday 7 October 2018

रत्नागिरीत दर महिन्याला सायकल फेरीचे आयोजन करावे – राहुल पंडित


      रत्नागिरी : सुदृढ आरोग्यासाठी सायकलिंग आवश्यक असून या उपक्रमाच्या प्रसारासाठी दरमहिन्याला रत्नागिरीत सायकल फेरीचे आयोजन केले पाहिजे. नगरपालिकेकडून आवश्यक ते सहकार्य केले जाईल, अशी ग्वाही रत्नागिरीचे नगराध्यक्ष राहुल पंडित यांनी दिली.

वीरश्री ट्रस्ट आणि ट्रिनिटी हेल्थ क्लबच्या संयुक्त विद्यमाने रत्नागिरीत नव्यानेच स्थापन झालेल्या सायकल क्लबतर्फे रत्नागिरी शहर ते हातखंबा आणि परत अशा वीस किलोमीटरच्या पहिल्या सायकल फेरीचे आयोजन करण्यात आले होते. नगराध्यक्ष श्री. पंडित यांनी रत्नागिरी ते हातखंबा आणि परत ही संपूर्ण फेरी पूर्ण केली. त्यानंत समारोप प्रसंगी ते बोलत होते.

तत्पूर्वी फेरीचे उद्घाटन जिल्हाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत सकाळी सहा वाजता झाले. शिवाजीनगर आठवडा बाजाराजवळ आयटीआयसमोर या फेरीचा प्रारंभ झाला. शहरात दुचाकी, चारचाकी व रिक्षांची भरपूर वाहतूक असते. त्यामुळे या रस्त्यांवरून सायकलस्वारांना जाताना अडथळ्यांना सामोरे जावे लागते. याकरिता स्वतंत्र ‘सायकल ट्रॅक’ करावा, अशी विनंती वीरश्री ट्रस्टचे अध्यक्ष डॉ. नीलेश शिंदे यांनी जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांच्याकडे केली. जिल्हाधिकार्यांंनी त्याला सहमती दर्शवत नव्या रस्त्यांवर अशी सुविधा देण्याचा मानस असल्याचे सांगितले. उद्घाटनानंतर जिल्हाधिकारी काही वेळ स्वतः सायकलने या फेरीत सहभागी झाले. वीरश्री ट्रस्ट आणि रत्नागिरी सायकल क्लबचे अध्यक्ष, रत्नागिरीतील प्रसिद्ध बालरोगतज्ज्ञ डॉ. नीलेश शिंदे यावेळी म्हणाले की, रत्नागिरी सुंदर शहर आहे. ते तसेच राहावे, हे एक नागरिक म्हणून मनापासून वाटते, तर एक डॉक्टर म्हणून सध्याच्या बदलत्या जीवनशैलीमध्ये रत्नागिरीकरांचे आरोग्य उत्तम राहावे हीदेखील भावना आहे. त्यातूनच सायकल क्लबची स्थापना करण्यात आली असून या क्लबचे उद्घाटन म्हणून सायकल फेरीचे आयोजन करण्यात आले आहे. सायकलिंग ही सर्वांची सवय बनावी, हा आमचा प्रयत्न असेल.

फेरीच्या उद्घाटनप्रसंगी उपविभागीय पोलिस अधिकारी गणेश इंगळे, पोलिस निरीक्षक अनिल विभूते, जिल्हा क्रीडाधिकारी मिलिंद दीक्षित आणि शासकीय अधिकारी उपस्थित होते. त्यानंतर ३०० विद्यार्थ्यांच्या फेरीचे उद्घाटन नगराध्यक्ष राहुल पंडित यांनी केले. या वेळी रोटरी क्लबचे ज्येष्ठ सदस्य आणि सामाजिक कार्यकर्ते धरमसी चौहान यांनी फेरीला झेंडा दाखवला.
फेरीसोबत रिकामा टेम्पो, वैद्यकीय व्यवस्था, रुग्णवाहिका ठेवण्यात आली होती. मार्गावर एनर्जी ड्रिंक, पाणी देण्याची व्यवस्था 10 ठिकाणी केली होती. येथे सामाजिक संस्थांनी सहकार्य केले. रत्नागिरी जिल्हा मराठी पत्रकार संघातर्फे चिरायू हॉस्पीटलशेजारील स्टॉलवर पाणी, बिस्कीटे व एनर्जी ड्रिंकची सुविधा सायकलपटूंना दिली. पत्रकार संघाचे अध्यक्ष राजेंद्र चव्हाण, संस्थापक अध्यक्ष दत्तात्रय महाडिक यांच्यासह सर्व सदस्य उपस्थित होते.
वीरश्री ट्रस्टचे अध्यक्ष डॉ. नीलेश शिंदे, डॉ. तोरल शिंदे, डॉ. निशीगंधा पोंक्षे, नितीन दाढे तसेच धन्वंतरी हॉस्पिटलचे सर्व कर्मचारी, सामाजिक संस्थांनी या फेरीचे उत्तम नियोजन केले होते. त्यांना इंडियन मेडिकल असोसिएशन, जाणीव फाउंडेशन, रोटरी क्लब, लायनेस क्लब, लायन्स क्लब, संस्कार भारती, मानवता संयुक्त संघ, रत्नागिरी जिल्हा मराठी पत्रकार संघ, लेन्स आर्ट, बाबुराव जोशी गुरुकुल व अॅधड. नानल गुरुकुल या संस्थांनी सक्रिय सहभाग नोंदवला. क्रेडाई, गद्रे मरीन्स, हिंद सायकल, कार्निव्हल, ट्रॅक्विलिटी यांचे सहकार्य लाभले. सांगता कार्यक्रमात सहभागी मोठ्या व्यक्तींना मेडल्स देण्यात आली तर विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र देण्यात आले.
आरोग्यवर्धक आणि इंधनाची बचत करणार्या  सायकल फेरीमुळे सर्व विद्यार्थ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण होते. असे उपक्रम दोन महिन्यांतून एकदा तरी व्हावे, अशी अपेक्षा सार्यां्नी व्यक्त केली.
नगराध्यक्ष राहुल पंडित यांनी स्वतः वीस किलोमीटरची रॅली पूर्ण केली. हा उपक्रम खूपच कौतुकास्पद आहे. स्वच्छ सुंदर रत्नागिरी प्रदूषणमुक्ततेकडे वाटचाल करण्यासाठी इंधन बचत करणारी व फिटनेस राखणारी सायकल सर्वांनी चालवावी व ‘सायकल डे’ साजरा व्हावा, अशी इच्छा व्यक्त केली.
सुदृढ आरोग्य, सुंदर शहर आणि वाढते इंधन दर यावर एकत्रित उपाय म्हणून सायकलस्वारांना प्रोत्साहन देण्याकरिता क्लब स्थापन झाला. आजच्या रॅलीनंतर सभासद संख्या वाढू लागली आहे. दररोज सायकलिंग आणि दर रविवारी सायकल भ्रमण मोहीम सुरू करण्याचा मानस या क्लबचा आहे.
  
 

.............

सायकल फेरीच्या समारोप समारंभात बोलताना रत्नागिरीचे नगराध्यक्ष राहुल पंडित. सोबत डॉ. सौ. निशिगंधा पोंक्षेडॉ. नीलेश शिंदेडॉ. सौ. तोरल शिंदे.
..........


सायकल फेरीच्या आयोजनाविषयी डॉ. नीलेश शिंदे यांचे मनोगत पाहा कोकण मीडियाच्या यूट्यूब चॅनेलवर. त्याकरिता खालील लिंकवर क्लिक करा –



............