Sunday 17 April 2016

संस्कृत भाषेच्या नव्हे, भारतीय संस्कृतीच्या रक्षणासाठी प्रयत्न हवेत – पंडित धायगुडे


            रत्नागिरी  : पाश्चात्य संस्कृतीच्या प्रभावामुळे भारतीय संस्कृती विसरली गेली आहे. अशा वेळी केवळ संस्कृत भाषा टिकवून ठेवण्यासाठी नव्हे, तर भारतीय संस्कृतीच्या रक्षणासाठी प्रयत्न करायला हवेत, असे मत प्रतिपादन पुण्यातील पंडित शिवराम कृष्ण धायगुडे यांनी येथे व्यक्त केले.
संस्कृत पाठशाळा शतक महोत्सवात बोलताना नगराध्यक्ष महेंद्र मयेकर.
येथील गोविंद कृष्ण रानडे संस्कृत पाठशाळेच्या शतक महोत्सवी कार्यक्रमात ते बोलत होते. या वेळी नगराध्यक्ष महेंद्र मयेकर, पाठशाळेचे अध्यक्ष वैद्य रघुवीर भिडे, विनायक पोखरणकर गुरुजी, धनंजय चितळे आदी उपस्थित होते. श्री. धायगुडे यांनी पाश्चिमात्य संस्कृतीच्या पगड्यामुळे भारतीय संस्कृती कशी बिघडली आहे, यावर  प्रकाश टाकला. आपण लोकशाहीत राहत असलो, तर आपणच चांगले बदल घडवले पाहिजेत. शब्द म्हणजे ज्ञान नव्हे. शब्द हे वाहक आहेत. त्यांचा उपयोग करून ज्ञान मिळविले पाहिजे. म्हणूनच भाषेवर नव्हे तर संस्कारांवर प्रेम करावे. संस्कृती शिकवणारी भाषा म्हणजे संस्कृत. त्यासाठी पाठशाळेचा उपयोग करून घ्यावा. संस्कृती टिकवली तरच राष्ट्र टिकू शकते. संस्कृतीचे रक्षण करायचे असेल तर आपणच पुढे आले पाहिजे. इंग्रजांनी भारतीय संस्कृतीचा बुरखा घेऊन भारतीय संस्कृती बुडवायचा प्रयत्न केला. त्याची सुरवात १८३४ साली मॅक्समुल्लरने सुरू केलेल्या नव्या शिक्षणपद्धतीमुळे झाली. ते इंग्रजांचे षड्यंत्रच होते. स्वातंत्र्य मिळाले, तरी आपण भारतीय झालो नाही. त्यामुळेच संस्कारहीनता निर्माण झाली असून अनाचार वाढले आहेत. ही स्थिती बदलायची असेल, तर केवळ संस्कृत भाषेचे नव्हे, भारतीय संस्कृतीचे जतन केले पाहिजे. भारतात पूर्वी दोन हजार संस्कृत पाठशाळा होत्या. पाठशाळा या प्रयोगात्मक शिक्षण देतात. मात्र ब्रिटिशांनी या शाळा बंद पाडून पाश्चिमात्य संस्कृती येथे रुजवली. यामुळेच आपण बिघडलो आहोत. संस्कृती शिकण्यासाठी पाठशाळांचा उपयोग करून घेतला पाहिजे. या पाठशाळांचे जतन केल्यास शतक महोत्सवच नव्हे तर सहस्र महोत्सवही साजरा करता येईल.
        
              यावेळी माजी शिक्षक आणि विद्यार्थ्यांचा सन्मान करण्यात आला. (कै.) पुरुषोत्तमशास्त्री फडके, बाळकृष्ण हर्डीकर आणि कै. दा. गो. जोशी या माजी शिक्षकांच्या वतीने अनुक्रमे आशा गुर्जर, विजय हर्डीकर आणि विजयानंद जोशी यांनी पुरस्कार स्वीकारला. माधव जोशी, अच्युत फडके, मनोहर फडके, कीर्तनकार नाना जोशी, अनंत मराठे, सुनील भाटवडेकर, महेश बोंडाळे, प्रकाश साधले, श्री. कापरे, पद्मनाभ जोशी, श्रीकृष्ण पाध्ये, प्रवीण पाटणकर, श्रीपती सिधये, चंद्रकांत नामजोशी, दिनकर सायनेकर, गजानन हर्डीकर हे माजी विद्यार्थी आणि संस्कृत अध्यापिका मधुरा बोंद्रे यांचा सत्कार करण्यात आला. देणगीदार राजाराम प्रभुदेसाई यांच्या वतीने डॉ. शरद प्रभुदेसाई, दिलीप वैद्य, बापू जोशी, बाळासाहेब पित्रे, सौ. नीला भिडे या देणगीदारांचाही सत्कार केला.
            शतक महोत्सवानिमित्त काढलेल्या स्मरणिकेचे प्रकाशन श्री. धायगुडे यांनी केले. त्यानंतर सीए ऋषीकेश फडके, स्मरणिकेसाठी मदत करणारे संतोष खडपे आणि ज्ञानेश्वर मुद्रणालयाचे दादा जोशी यांचा सत्कार केला. सौ. निशा काळे यांनी सूत्रसंचालन केले. श्रीकृष्ण जोशी यांनी प्रास्ताविकात शाळेची माहिती दिली.
           संस्कृत पाठशाळेत सर्वांनी यावे, असे आवाहन अध्यक्षीय भाषणात वैद्य रघुवीर भिडे यांनी केले. पद्मनाभ जोशी यांनी आभार मानले.
  नगराध्यक्ष श्री. मयेकर म्हणाले, रत्नागिरी शहराची शान वाढवणाऱ्या या संस्कृत पाठशाळेला पालिकेकडून दोन लाख रुपयांचा निधी दिला आहे. या पाठशाळेत ब्राह्मण विद्यार्थीच येतात, असा गैरसमज आहे. मात्र येथे आल्यानंतर मला संस्कृतबद्दल प्रेम व आकर्षण वाटू लागले आहे. परदेशी लोक संस्कृत शिकून येथे येत आहेत. आपण मात्र संस्कृतकडे दुर्लक्ष करत आहोत. भारतात नावलौकिक होईल, असे विद्यार्थी या शाळेतून घडावेत, याच सदिच्छा.
................

No comments:

Post a Comment