Sunday 10 April 2016

मठ येथील लक्ष्मीपल्लीनाथाचा शतकोत्सवी चैत्रोत्सव १७ पासून


       रत्नागिरी :  मठ (ता. लांजा) येथील श्रीलक्ष्मीपल्लीनाथाचा शतकोत्सवी चैत्रोत्सव येत्या १७ एप्रिलपासून सुरू होत असून तो २२ एप्रिलपर्यंत चालणार आहे.
लक्ष्मीपल्लीनाथ हे जागृत देवस्थान असून तो चाळीस कुळांचा स्वामी आहे. मूळ मंदिरात सेवा करताना येणाऱ्या अडचणींमुळे पल्लीनाथाच्या कुलोपासकांनी मठ येथे दोन एक जागा घेऊन तेथे चार वर्षांपूर्वी स्वतंत्र मंदिर उभारायचे ठरविले. त्यानुसार मंदिराचे काम पूर्णत्वाकडे आले आहे. मंदिराचा गाभारा म्हैसूरमधील ग्रॅनाइटमध्ये, तर रेखीव कळसाचे काम कोकणातील जांभ्या दगडात करण्यात आले आहे. गेल्या मंदिरात पंचकुंडी यज्ञासह प्राणप्रतिष्ठा करण्यात आली. या मंदिराचा वर्धापनदिन १६ एप्रिल रोजी साजरा करण्यात येणार आहे.
पल्लीनाथाचा चैत्रोत्सव १९१५ साली सुरू झाला. यावर्षी उत्सवाचा शतकोत्सव साजरा होत आहे. त्यासाठी पंचायतन याग आणि चतुःषष्टी राजोपचार पूजा केली जाणार आहे. रविवारी (ता. १७) सौरयाग आणि मंत्रजागराने उत्सवाला प्रारंभ होईल. त्यानंतर वेगवेगळ्या दिवशी रुद्रस्वाहाकार, गणेशयाग, लघुविष्णु स्वाहाकार, दत्तयाग आणि नवचंडी असे धार्मिक कार्यक्रम आणि २२ एप्रिल रोजी रात्री साडेनऊ वाजता स्वप्नील गोरे (सावंतवाडी) यांचा अभंग आणि नाट्यगीतांचा कार्यक्रम होईल. उत्सवकाळात रात्री कैलासबुवा खरे (रत्नागिरी) आणि मकरंदबुवा रामदासी (पुणे) यांची कीर्तने होणार आहेत. शास्त्र काय सांगते या विषयावर १९ एप्रिल रोजी विवेकशास्त्री गोडबोले (सातारा) यांचे प्रवचन होणार आहे. अखेरच्या दिवशी २३ एप्रिल रोजी पहाटे पाच वाजता मकरंदबुवा रामदासी यांचे लळिताचे कीर्तन होऊन उत्सवाची सांगता होईल.
      चैत्रोत्सवाला उपस्थित राहण्याचे आवाहन लक्ष्मीपल्लीनाथ संस्थानतर्फे करण्यात आले आहे.
      उत्सवकाळात निवासाची व्यवस्था, वैयक्तिक श्रीपूजा, अभिषेक, लघुरुद्र आदी उपासना कार्यक्रमासाठी उत्सवापूर्वी किमान आठ दिवस संपर्क साधावा. संपर्कासाठी दूरध्वनी क्र. : (०२३५२) २४९०११, २४९३६४. मोबाइल क्र. – ९४२२६४६७६५, ७८७५८९३२९, ७८७५९९३६९९.

1 comment:

  1. भरपुर चुका आहेत. त्या काढाव्यात

    ReplyDelete