Monday 14 September 2015

विनायक बापट पूजेसाठी पुरवितात 21 प्रकारची पत्री

पंधरा वर्षांचा उपक्रम – पर्यावरणाची ओळख करून देण्याचा प्रयत्न


अगस्ती
रत्नागिरी – इकोफ्रेंडली गणेशोत्सवाचे महत्त्व पटवून देतानाच येथील पर्यावरणप्रेमी विनायक बापट गणपतीच्या पूजेसाठी लागणारी 21 प्रकारची पत्री जमवून अनेकांना मागणीनुसार त्याचे वाटप करत आहेत. उत्सवापूर्वी रत्नागिरी तालुक्यातील जंगलांमध्ये फिरून गोळा केलेली ही पाने ग्राहकांना पुरविण्याचा त्यांचा हा उपक्रम गेली पंधरा वर्षे सुरू आहे.
गणेशोत्सव आता अगदी काही तासांवर आला आहे. त्यामुळे घरोघरी लगबग सुरू झाली आहे. चित्रशाळांमधून गणेशमूर्ती घरोघरी जाऊन पोहोचत आहेत. वेळात वेळ काढून घरे सजविली गेली असून पूजासाहित्य, सजावट आणि आरास करण्यासाठी लागणाऱ्या साहित्याची जमवाजमव सुरू आहे. या साहित्यामध्ये पत्रीला म्हणजे विविध झाडांच्या पानांना खूपच महत्त्व आहे. मधुमालती, माका, बेल, पांढऱ्या दुर्वा, बोर, धोत्रा, तुळस, शमी, आघाडा, डोरली, कण्हेरी, रुई, अर्जुनसादडा, विष्णुक्रांता, डाळिंब, देवदार, पांढरा मरवा, पिंपळ, जाई, केवडा आणि अगस्ती या 21 झाडांची पत्री गणपतीला वाहिली जाते. शहरात आणि ग्रामीण भागातही गणपतीचे पूजन करताना वाहिल्या जाणाऱ्या विविध वनौषधींची ही पाने अनेकांना माहीत नसतात. त्यामुळे एक तर पत्री वाहिली जात नाही किंवा मिळतील तेवढ्याच झाडांची पाने वाहिली जातात.
अनेक झाडांची जोपासना करणारे रत्नागिरीचे पर्यावरणप्रेमी विनायक या साऱ्या वनौषधींची माहिती अनेकांना सांगत असत. त्यातूनच ही सारी पत्री जमवून देण्याची मागणी त्यांच्याकडे पंधरा वर्षांपूर्वी त्यांच्या एका परिचिताने केली. हाच धागा पकडून श्री. बापट यांनी विविध ठिकाणी फिरून पत्री जमवून ती अल्प मोबदल्यात उपलब्ध करून देण्याचे ठरविले. सर्वच झाडांची त्यांना चांगलीच ओळख असल्याने ती झाडे मिळवून पत्री गोळा करण्यासाठी त्यांनी रत्नागिरी शहराच्या अनेक भागांसह पावस, कोळंबे, जयगड परिसरात भटकंती केली. जंगलांमधून ही झाडे शोधून काढली आणि पत्री जमविली. पहिल्या वर्षी दहा संच त्यांनी तयार केले. त्यापैकी केवळ चार संचांनाच मागणी आली. त्यानंतर मात्र हळूहळू दरवर्षी त्यांच्याकडे पत्रीची मागणी वाढू लागली. यावर्षी तर त्यांनी पाचशेहून अधिक संच तयार केले आहेत.
शमी
महिनाभर भटकंती करून पाने जमविणे, ती व्यवस्थित आणि ताजी राहण्यासाठी पाण्यात ठेवणे, वाया गेलेली पाने काढून टाकून त्यांची निगा राखणे, भाद्रपद महिना सुरू होताच एकवीस प्रकारच्या पत्रीचे संच तयार करणे अशी सर्व किचकट व्यवधाने श्री. बापट अत्यंत आनंदाने पार पाडतात आणि 40 रुपये एवढ्या अत्यंत अल्प मोबदल्यात ही पत्री मागणीनुसार उपलब्ध करून देतात. आरास आणि सजावटीसाठी लागणाऱ्या साहित्याच्या किमती पाहिल्या, तर श्री. बापट आकारत असलेली किंमत अत्यंत नगण्यच वाटते. पत्रीच्या पिशव्या भरून त्या वेळेत उपलब्ध करून देण्यासाठी श्री. बापट यांना कुटुंबीयांबरोबरच मित्रमंडळी आणि कुडाळ (जि. सिंधुदुर्ग) येथूनही त्यांचा एक स्नेही आवर्जून मुद्दाम उपस्थित राहतो. परस्परस्नेह वाढावा आणि पर्यावरणाबाबत जागृती व्हावी, लोकांनी निसर्ग समजून घ्यावा, दैनंदिन जीवनातील पर्यावरणाचे महत्त्व लक्षात घेऊन त्याचे लोकांनी संरक्षण करावे, हाच आपला प्रयत्न असल्याचे श्री. बापट यांनी सांगितले.
(विनायक बापट यांचा संपर्क क्र. – 9423048991)
..................
विविध 21 प्रकारची पत्री एकत्रित करून ती बांधण्याचे काम श्री. बापट यांच्या घरी सुरू आहे.


No comments:

Post a Comment