Sunday 10 January 2016

इतिहासाचा चुकीचा अर्थ नको, समग्र अभ्यास करावा – चारुदत्त आफळे




रत्नागिरी : पुण्याच्या इतिहास संशोधन मंडळाकडे उपलब्ध असलेल्या मोडी लिपीतील अनेक कागदपत्रांचे भाषांतर, संशोधन सुरू आहे. इंग्रजांनी कोट्यवधी कागदपत्रे जाळली तरी आज चार कोटी कागदपत्रे उपलब्ध आहेत. रासायनिक प्रक्रियेद्वारे हा प्रत्येक कागद खरा आहे किंवा कोणत्या सालातील आहे, हे समजते. त्यातून हिंहदवी स्वराज्याचा खरा इतिहास कळणार आहे. काही वेळा एखाद्या कागदावरून अर्थ न लावता समग्र वाचल्यानंतरच अर्थ घ्यावा. कारण अर्धवट माहितीतून गैरसमज पसरतात आणि एखाद्या व्यक्तीचे कार्य पुढे येत नाही. याकरिता शाळांमध्ये शिक्षकांनी इतिहास शिबिरे घेऊन विद्यार्थ्यांना खरा इतिहास सांगावा, असे मत राष्ट्रीय कीर्तनकार चारुदत्त आफळे यांनी व्यक्त केले.
रत्नागिरीच्या गुरुकृपा मंगल कार्यालयात शनिवारी (ता. ९ जानेवारी २०१६) झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. या वेळी कीर्तनसंध्या परिवाराचे अवधूत जोशी, नितीन नाफड, उमेश आंबर्डेकर उपस्थित होते.
रत्नागिरीमध्ये गेल्या पाच वर्षांपासून ऐतिहासिक विषयांवरील कीर्तने आयोजित करून जनजागरण करणारा कीर्तनसंध्या परिवार हा महाराष्ट्रातील एकमेव गट म्हणावा लागेल. कारण उत्सवापुरती मर्यादित असलेली कीर्तने सभागृहातून यंदा क्रीडा संकुलापर्यंत आली. यावरून रत्नागिरीकरांचे कीर्तनावरील प्रेम दिसून येते. याकरिता रत्नागिरीतील सर्वच वृत्तपत्रांनी भरपूर प्रसिद्धी दिल्याबद्दल श्री. आफळे यांनी विशेष आभार मानले. या बातम्या महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातही पोहोचल्या असून तिथले श्रोते माझ्याकडे विचारणा करतात, असे त्यांनी सांगितले.
ते म्हणाले, हिंदवी स्वराज्याच्या दप्तरातील सव्वा कोटी कागदपत्रांचे भाषांतर झाले आहे. त्यातून खरा इतिहास उलगडतो आहे. मात्र उर्वरित पत्रांचे भाषांतर व संशोधनासाठी युवकांनी पुढे यावे. इतिहासात चांगले करिअर करता येईल. मोडी लिपीतील अनेक कागदपत्रांचे संशोधन सुरू आहे. इंग्रजांनी किल्ले qजकल्यानंतर कोट्यवधीची कागदपत्रे जाळून टाकली होती. त्यातूनही अनेकांनी ही कागदपत्रे जपून ठेवली. आता रासायनिक प्रयोगशाळेमध्ये प्रत्येक कागद खरा आहे किंवा कोणत्या सालातील आहे, हे कळत असल्याने कागदांविषयी सत्य माहिती मिळते. शाळेमध्येही इतिहास शिबिरे घेऊन खरा इतिहास सांगण्याचे काम शिक्षकांनी करावे. एखाद्या कागदावरून अर्थ न लावता समग्र वाचल्यानंतरच अर्थ घ्यावा. कारण अर्धवट माहितीतून गैरसमज पसरतात.
ते म्हणाले, कीर्तन म्हणजे मंदिरामध्ये जन्मोत्सव कार्यक्रमावेळी केले जाते. पण त्यावेळी जन्मोत्सवाचाच विषय असतो. हिंदवी स्वराज्याच्या इतिहासातील दडलेले क्षण बाहेर काढण्यासाठी व्यासपीठ मिळत नाही. मात्र कीर्तनसंध्याने येथे जाणीवपूर्वक केलेला हा महोत्सव भावी पिढीसाठी उपयुक्त ठरणारा आहे.

Saturday 9 January 2016

कीर्तनसंध्या महोत्सव पुष्प तिसरे



पानिपतावर सतत मराठशाहीचा विजयच, पण

रत्नागिरी : पानिपतची पहिली लढाई वर्षभर चालली. प्रत्येक लढाईत सदाशिवरावभाऊ, विश्वासराव पेशवे व सहकाऱ्यांनी अहमदशहा अब्दालीवर विजय मिळवला. मात्र दिल्लीकडे कूच करताना अंतिम अडीच तासांत सेनेला पराभव पत्करावा लागला. यात ७० हजार सेना, यात्रेकरू गेले. पण वर्षभरात अब्दालीची दीड लाखांची सेना मराठशाहीने गारद केली. एका बाजूला पराभव झाला तरी दुसरीकडे हिंदवी स्वराज्याचा विजयही झाला होता, हे विसरून चालणार नाही, असे प्रतिपादन राष्ट्रीय कीर्तनकार चारुदत्त आफळे यांनी व्यक्त केले.
रत्नागिरीच्या स्व. प्रमोद महाजन क्रीडा संकुलात कीर्तनसंध्या आयोजित कीर्तन महोत्सवाच्या तिसऱ्या दिवशी ते बोलत होते. या वेळी प्रसाद करंबेळकर (तबला), हर्षल काटदरे (ऑर्गन), राजा केळकर (पखवाज, ढोलकी) आणि महेश सरदेसाई (तालवाद्य) यांनी संगीतसाथ केली.
पानिपतच्या पहिल्या लढाईचा सविस्तर रणसंग्राम बुवांनी उलगडला. ते म्हणाले, पानिपतामध्ये मराठशाहीचा पराभव झाला असला तरीही अखेरच्या दिवशी मकरसंक्रांतीला सकाळी ६ ते दुपारी २ या वेळेत मराठी सैन्याने अब्दालीवर विजयच मिळवला होता. अब्दालीने पराभव होणार या भीतीने सैन्याला पंजाबकडून इराणकडे जाण्यास सांगितले होते. इकडे सदाशिवरावभाऊंनी गारद्यांच्या सूचनेनुसार विशिष्ट व्यूहरचना करून सेनेची अंडाकृती रचना करून दक्षिणेकडे कूच केले. पण हत्तीवर बसलेल्या विश्वासराव पेशव्याला गोळी लागल्याने मराठी सैन्यात गोंधळ उडाला. शिस्त न पाळणे आणि गारद्यांनी सुचविलेल्या रणनीतीवरील अविश्वासामुळे मराठी सरदारांनी सहकार्य न केल्याने अडीच तासात सत्तर हजार सेना संपली. मात्र एक वर्षाच्या काळात अब्दालीचे दीड लाख फौज मराठी सैन्याने संपवली होती. त्यामुळे एका बाजूला पराभव झाला तरी हिंदवी स्वराज्याचा विजयही विसरून चालणार नाही.
तत्पूर्वीच्या लढाईत रघुनाथराव तथा राघोभरारी पेशव्याने पराक्रम करून अटकेपर्यंत भगवा फडकावला. अब्दालीच्या सैन्याला मागे रेटले. नजीबखान, कुतुबशहाने दत्ताजी शिंशदेला क्रूरपणे मारले. पण त्याचा वचपा मराठी फौजेने पानिपतावरील लढाईपूर्वी कुंजपुरा किल्ला घेऊन कुतुबशहाला संपवले. हा किल्ला घेतला तरी फौज दोन महिने तीर्थयात्रा करत राहिली. त्यावेळी सदाशिवराव पेशवे दिल्ली गाठू या असे सांगत होते. पण वेळेचा उपयोग केला नाही.
पूर्वरंगामध्ये देव बसे जिचे चित्ती या अभंगावर त्यांनी निरूपण केले. ते म्हणाले, अलीकडे महिलांचे संस्कारांकडे दुर्लक्ष होत असून महिला उपासनेपासून दूर गेल्या आहेत. त्यांच्या वेशाबाबतही समुपदेशनाची गरज निर्माण झाली आहे. सुट्टीच्या दिवशी संपूर्ण कुटुंबाने सामूहिक उपासनेसह एकत्र राहणे, जेवणे आवश्यक आहे. अलीकडे समुपदेशन नसल्याने कोणताही वेश परिधान केला जातो. यामुळे मुलींवरही अन्या होतो. नको तितक्या मोकळ्या वागण्याने प्रश्न निर्माण होतात. मुलींचा वेष मनावर परिणाम करत असल्याने तो चांगलाच असावा. मुलगा व मुलीला सर्वच बाबतीत समान न्याय न देता मुलीला काचेप्रमाणे संरक्षण देण्याची गरज आहे. स्त्रिया, पुरुष व युवक, युवतींचे संघटन हवे. उपासनेची शक्ती व शक्तीची उपासना गरजेची आहे. कुटुंबामध्येही ती व्हावी.


कीर्तन महोत्सवाची रविवारी सांगता
पाच दिवसांच्या कीर्तन महोत्सवाची रविवारी (ता. १०) दिमाखात सांगता होणार आहे. यामध्ये श्री. आफळेबुवा ४० दिवसांच्या सवाई माधवराव पेशव्याला बारभार्इंनी वीस वर्षे कसे सांभाळले हे सांगणार आहेत. महादजी शिंशदे, रामशास्त्री प्रभुणे, सखाराम बापू बोकील आणि नाना फडणवीस आदी १२ जणांनी हिंहदवी स्वराज्य राखले. फ्रेंच, डच, पोर्तुगीज, इंग्रज आणि घरभेद्यांचा सामना करत त्यांनी पेशवाईसाठी दिलेले अमूल्य योगदान बुवा उलगडणार आहेत.

देवरूख येथे कोकण विभागीय युवा साहित्य संमेलन



रत्नागिरी : कोकणमराठी साहित्य परिषदेतर्फे देवरूख येथे कोकणातील रायगड, रत्नागिरी व सिंसधुदुर्ग जिल्ह्यातील एक हजार युवकांचे युवा साहित्य संमेलन येत्या २४ जानेवारीला होणार आहे. कोमसापच्या देवरुख शाखेतर्फे या संमेलनाचे संयोजन करण्यात येणार आहे. जिल्ह्यातील ग्रामीण भागांमध्ये नमन, वगनाट्य, जाखडी, टिपरी नृत्य आदीकरिता लेखन, काव्य करणाèया कलाकारांना ग्रा मीण साहित्यिकांचा दर्जा वर्षभरात  मिळवून देण्याकरिता प्रयत्न केले जाणार आहेत. रत्नागिरीच्या शासकीय विश्रामगृहात झालेल्या पत्रकार परिषदेत यासंदर्भात  माहिती देण्यात आली.
या वेळी संमेलनाचे स्वागताध्यक्ष रोहन बने, संमेलन प्रमुख युयुत्सु आर्ते, कोमसाप शाखाध्यक्ष दीपक लिंगायत, कार्यवाह प्रमोद हर्डीकर आदी उपस्थित होते. या संमेलनाच्या अध्यक्षपदी मूळची देवरूखची आणि सध्या पुण्याच्या फर्गसन महाविद्यालयात शिकणारी अक्षता लिंलगायत हिची निवड केंद्रीय कार्यकारिणीने केली आहे. दहा जणांमधून तिची निवड झाली आहे. तिला यापूर्वी जिजाऊ पुरस्कार, कोमसापचा देवरूखभूषण पुरस्कार मिळाला आहे. संमेलनातील प्रत्येक कार्यक्रम वेळेत सुरू करण्याकडे कटाक्ष ठेवला जाणार आहे.
श्री. लिंगायत म्हणाले, कोमसापमध्ये युवकांसाठी कोकण युवा शक्ती विभाग सुरू करण्यात आला. त्याद्वारे दापोलीमध्ये पहिले युवा संमेलन झाले. आता कोकण विभागाचे संमेलन देवरुखात भव्यदिव्य स्वरूपात करण्यात येणार आहे.
संमेलनाच्या आदल्या दिवशी २३ जानेवारीला दुपारी साडेतीन वाजता ग्रंथदिंडीने संमेलनाची सुरवात होईल. त्यामध्ये नामवंत कवी अशोक नायगावकर, अशोक बागवे, अरुण म्हात्रे, महेश केळुसकर आदी सहभागी होणार आहेत. सायंकाळी पद्मश्री मधु मंगेश कर्णिक यांच्यावरील लघुपट दाखवण्यात येईल. २४ ला संमेलनाचे उद्घाटन सकाळी ९ वाजता मान्यवरांच्या उपस्थितीत होईल. देवरूखमधील नवोदित ९ लेखक, कवींची पुस्तके यावेळी प्रकाशित केली जातील. ११ वाजता मुक्त काव्यकट्टा सुरू होईल. तो दिवसभर चालणार आहे. प्रत्येक सहभागीला प्रमाणपत्र दिले जाईल. ११ वाजता राष्ट्रीय पुरस्कारप्राप्त अपंग मनाली जोशी हिची मुलाखत होईल. ११.३० वाजता आजची युवा पिढी संस्कारहीनतेच्या उंबरठ्यावर उभी आहे का? या विषयावर परिसंवाद होईल. १२.३० वाजता आजच्या शिक्षणाची जीवनाशी सांगड घालता येते का? ही महाचर्चा होईल.
दुपारी २.३० वाजता कथाकथन, ३ वाजता काव्यतुषारमध्ये तिन्ही जिल्ह्यांतील विजेत्यांच्या कवितांचे सादरीकरण व बक्षीसवितरण होईल. ३.३० वाजता काव्यतरंगमध्ये ज्येष्ठ कवी नायगावकर व बागवे कविता ऐकवतील. ४.३० वाजता संमेलनाचा समारोप होईल.
रोहन बने यांनी सांगितले की, देवरूख शहराने साहित्य, कला, क्रीडा, शैक्षणिक क्षेत्रात भरीव योगदान दिले आहे. कोमसापतर्फे युवकांना लिहिते करण्यासाठी हे संमेलन घेतले जात आहे. देवरूखमध्ये तब्बल १९ वर्षानंतर असे  मोठे सं मेलन होत आहे.
टिपरीनृत्य, नमन, जाखडीकरिता ग्रामीण भागातील कवी, लेखक लेखन करून लोककलेच्या रूपात सादरीकरण करत असतो. या कलाकारांना ग्रामीण साहित्यिकांचा दर्जा  मिळावा, याकरिता कोमसाप प्रयत्नशील आहे. यामुळे जिल्ह्यातील प्रत्येक वाडी कोमसापला जोडली जाईल. केंद्रीय समितीशी चर्चा झाली असून वर्षभरात सर्वेक्षण करून त्यावर कार्यवाही केली जाणार आहे. सन २०१७ मध्ये या सर्व कलाकारांचे संमेलनही घेण्याचा विचार आहे, असे युयुत्सु आर्ते यांनी सांगितले.

कीर्तनसंध्या महोत्सव २०१६ - पुष्प दुसरे


हिंदवी स्वराज्याला नानासाहेब पेशव्यांनी लावली प्रशासकीय शिस्त



चारुदत्त आफळे : दुसऱ्या दिवशी पाच हजार श्रोत्यांची गर्दी

रत्नागिरी : ``हिंदवी स्वराज्याचा कारभार पुण्यात नेल्यानंतर नानासाहेब पेशव्यांनी भविष्याचा विचार करून पुण्याचे सुशोभीकरण करण्यावर भर दिला. शहर वसविण्यासाठी कष्टकरी व सेवेकरी दहा ज्ञातीतील लोकांना कर माफ केला. मुळा, मुठा नद्यांचे ९० टक्के पाणी शेतकऱ्यांसाठी पुरविले जाईल, अशी व्यवस्था केली.. कात्रजच्या जलाशयात मोठे हौद बांधून दगडी नळ्यांद्वारे शहरात पाणीपुरवठा केला. नानांच्या दूरदृष्टीने हिंदवी स्वराज्याला प्रशासकीय शिस्तही मिळाली``, असे प्रतिपादन राष्ट्रीय कीर्तनकार चारुदत्त आफळे यांनी केले.
येथील स्व. प्रमोद महाजन क्रीडा संकुलात सुरू असलेल्या कीर्तनसंध्या महोत्सवातील दुसऱ्या दिवशीचे पुष्प गुंफताना ते बोलत होते. यावेळी पाच हजार श्रोते उपस्थित होते. या वेळी बुवांना हर्षल काटदरे, प्रसाद करंबेळकर, राजा केळकर आणि महेश सरदेसाई यांनी साथसंगत केली.
श्री. आफळे यांनी पूर्वरंगामध्ये `आपुलिया हिता जो जागता, धन्य मातापिता तयाचिया` हा अभंग निरूपणाला घेतला. भगवद्गीतेमधील कर्मयोग, सावतामाळीची कथा सांगितली. मंत्रपुष्पांजली म्हणजे सर्व हिंदूंचे राष्ट्रगीत आहे. नाशिकला झालेल्या कुंभमेळ्यामध्ये सर्व पंथांनी मिळून दहा श्लोकांचे स्तोत्र तयार केले आहे. ते सर्व पंथांनी म्हणावे. हिंदू म्हणून एकत्र येण्याचा हा प्रयत्न असून हे सर्व एकत्र असल्याची भावना निर्माण होण्यासाठी हे स्तोत्र म्हणावे, असे त्यांनी सांगितले. ते म्हणाले, ``बाजीरावांनंतर पेशवेपद कोणाला द्यावे हा प्रश्न होता. छत्रपती शाहूंनी या पदासाठी इच्छुक असलेल्या काही जणांची पारख करून अखेर बाजीरावांचे बंधू नानासाहेब यांना अठराव्या वर्षी हे पद दिले. त्यांनी वीस वर्षांच्या कालावधीमध्ये अनेक युद्धे जिंकली आणि प्रशासकीय घडी नीट बसवली. पहिल्या चार वर्षांतच बुंदेलखंडामध्ये समेट घडवला. त्यासाठी बाजीराव-मस्तानी पुत्र समशेरबहाद्दर याची मदत घेतली. एका बाजूला पोर्तुगीजांचा धोका व दुसरीकडे सावनूरचा नबाब कोल्हापूरवर चाल करून येणार होता. त्यावेळी तुळाजी आंग्रेंच्या आरमाराने हिंदवी स्वराज्याविरोधात बंड पुकारल्याने नानासाहेबांनी क्षणभर इंग्रजांशी हातमिळवणी केली. नंतर नानांनी नवीन आरमार उभारून ते समृद्ध करण्यासाठी प्रयत्न केले. निधनापूर्वी छत्रपती शाहूंनी नानासाहेब पेशव्यांना बोलावून वंशपरंपरागत पेशवाई देतो, असे कागद करवून घेतल्याचे सांगितले. मात्र नानांनी त्यास स्पष्ट नकार दिला आणि हिंदवी स्वराज्याच्या गादीवर भोसले वंशच असावा,  असे निक्षून सांगितले. त्यानुसार नानांनी ताराराणीचा नातू दुसरा राजाराम याला गादीवर बसवले. शाहूंच्या सांगण्यानुसार स्वराज्याची सर्व कागदपत्रे, दरबार पुण्यात नेला. परंतु अंतिम शिक्कामोर्तब सातारच्या गादीकडेच राहील, अशी व्यवस्था केली. पुण्यामध्ये पर्वतीवर नानांनी देवदेवेश्वर संस्थानात पंचायतन स्थापन केले. त्यातील एका कोनाड्यात शाहूंच्या पादुका पूजनासाठी ठेवल्या होत्या. यावरूनच त्यांची शाहूनिष्ठा दिसून येते.``
माणसांची पारख नानासाहेब सुरेख करत होते. न्यायमूर्ती रामशास्त्री प्रभुणेही त्यातीलच एक. हिंदवी स्वराज्याचे मुख्यालय पुण्यात नेले. मराठशाहीचे अधिकार माळवा ते बंगाल आणि चित्रदुर्ग, दक्षिणेकडील विस्तीर्ण भागात असल्याने तिथले लोक कामानिमित्त पुण्यात यायचे. त्यातून पुण्याची लोकसंख्या वाढणार होती. याकरिता सेवेकऱ्यांच्या दहा ज्ञातींचा कर माफ केला. शहर सुशोभीकरणामध्ये नानांनी विशेष लक्ष दिले. गणेश हे पेशव्यांच्या आराध्य दैवत. त्यामुळे थेऊरच्या गणपतीला पेशव्यांची सुवर्णतुला केली जायची. नानासाहेबांची तीन वेळा तुला झाली आणि त्यातील मोहरा दारिद्र्यरेषेखालील लोकांना देण्यात आल्या. शनिवारवाड्याच्या दुरुस्तीनंतर नानांनी कारभारासाठी गणेशमहाल, गणेश दरवाजा, दिल्ली दरवाजा, मस्तानी दरवाजा अशी नावे दिली. बावनखणी हे विविध प्रांतांमधली कलाकारांचे दालन होते. त्यावेळी बैठकांमध्ये एखाद्या सरदार, प्रेक्षकाला नाकारण्याचा अधिकार या कलावंतांना होता. दुर्दैवाने कलावंतीणी देहविक्रय करतात, असा गैरसमज समाजात पसरवला गेला, अशी खंत आफळेबुवांनी व्यक्त केली.
``बुंदेलखंड, बंगालच्या लोकांनी आम्ही पेशव्यांना कर का द्यायचा अशी बंडाळी करण्याचा प्रयत्न केला. मात्र नानांनी खरमरीत पत्र लिहून त्यांना ठणकावले, तुमच्या प्रांताच्या संरक्षणासाठी मराठ्यांच्या फौजा येतात. तुमची सुरक्षा आम्ही करतो, त्यासाठी हा कर दिला पाहिजे. हा कर हिंदवी स्वराज्यासाठीच वापरला जातो. आजही भारतामध्ये अशी दुहीची भाषा केली जाते. नागालँड, मिझोराम आदी राज्ये "आमचा दिल्लीशी काय संबंध?" असे विचारतात. अहिंदूंची संख्या वाढल्यानंतर भारताने हजारो वर्षे अन्याय पाहिला आहे. पुन्हा असे घडू नये यासाठी हिंदूंनी आता जागे झाले पाहिजे. इंग्रजांनी ब्राह्मण आणि इतर हिंदूंमध्ये फूट पाडली, तेव्हाच त्यांना राज्य करता आले. मात्र आज हिंदूंनी जागरूक राहण्याची गरज आहे,`` असे मतही श्री. आफळे यांनी व्यक्त केले.

................................................................

`झोंपाळ्यावरच्या गीते`च्या पाठांतर स्पर्धा घ्याव्यात


कवी अनंतततनय यांनी शंभर वर्षांपूर्वी लिहिलेल्या `झोंपाळ्यावरची गीता` या भगवद्गीतेच्या ओवीबद्ध मराठी श्लोकसंग्रहाचा आफळेबुवांनी पूर्वरंगात आवर्जून उल्लेख केला. झोपाळ्यावर बसून सहज गुणगुणाव्यात आणि त्या गुणगुणताना गीतेचा अर्थ समजावा, अशी या गीतेची रचना आहे. सुबोध मराठीमध्ये लिहिलेले हे श्लोक ओव्यांप्रमाणे पाठ कराव्या आणि गीतेविषयीची गोडी वाढविण्याकरिता या झोंपाळ्यावरची गीतेच्या पाठांतर स्पर्धा घ्याव्यात, असे, त्यांनी सूचित केले. तसेच झोंपाळ्यावरच्या गीतेमधील कर्मयोग या तिसऱ्या अध्यायातील
कर्माहूनी जरी । वरचढ बुद्धी  । कर्म करीं आधीं । सांगसी कां ?
नको घोटाळून  । घेऊं देवा मशीं  । सांग हृषीकेशी  । एक कांहीं  ।।
कर्मयोग्या कर्म  । सांख्यियांना ज्ञान  । दोन्हीही प्रमाण  । कृष्ण बोले  ।।
कर्म न केल्यानें  । कर्मशून्यता न  । कर्म टाकील्यानं  । ज्ञान नाही  ।।
कर्म केल्यावीण  । सांग राहे कोणे? घडवीती गुण  । कर्म लोकीं  ।।
कर्म टाकल्यानें  । देहही चालेना  । म्हणूनी अर्जुना  । करावें तें  ।।
स्वधर्म म्हणोनी  । कर्म तें करावें  । परी नसूं द्यावें  । फलीं मन  ।।
या ओव्या त्यांनी गाऊन दाखविल्या.

(`झोंपाळ्यावरची गीता` हे पुस्तक रत्नागिरीच्या कोकण मीडिया कन्सल्टन्सी अँड सर्व्हिसेसतर्फे सत्त्वश्री प्रकाशनने अलीकडेच पुनर्मुद्रित केले आहे.)

................
`झोंपाळ्यावरची गीता` या पुस्तकाविषयी निरूपण करताना राष्ट्रीय कीर्तनकार चारुदत्त आफळेबुवा