Saturday 9 January 2016

देवरूख येथे कोकण विभागीय युवा साहित्य संमेलन



रत्नागिरी : कोकणमराठी साहित्य परिषदेतर्फे देवरूख येथे कोकणातील रायगड, रत्नागिरी व सिंसधुदुर्ग जिल्ह्यातील एक हजार युवकांचे युवा साहित्य संमेलन येत्या २४ जानेवारीला होणार आहे. कोमसापच्या देवरुख शाखेतर्फे या संमेलनाचे संयोजन करण्यात येणार आहे. जिल्ह्यातील ग्रामीण भागांमध्ये नमन, वगनाट्य, जाखडी, टिपरी नृत्य आदीकरिता लेखन, काव्य करणाèया कलाकारांना ग्रा मीण साहित्यिकांचा दर्जा वर्षभरात  मिळवून देण्याकरिता प्रयत्न केले जाणार आहेत. रत्नागिरीच्या शासकीय विश्रामगृहात झालेल्या पत्रकार परिषदेत यासंदर्भात  माहिती देण्यात आली.
या वेळी संमेलनाचे स्वागताध्यक्ष रोहन बने, संमेलन प्रमुख युयुत्सु आर्ते, कोमसाप शाखाध्यक्ष दीपक लिंगायत, कार्यवाह प्रमोद हर्डीकर आदी उपस्थित होते. या संमेलनाच्या अध्यक्षपदी मूळची देवरूखची आणि सध्या पुण्याच्या फर्गसन महाविद्यालयात शिकणारी अक्षता लिंलगायत हिची निवड केंद्रीय कार्यकारिणीने केली आहे. दहा जणांमधून तिची निवड झाली आहे. तिला यापूर्वी जिजाऊ पुरस्कार, कोमसापचा देवरूखभूषण पुरस्कार मिळाला आहे. संमेलनातील प्रत्येक कार्यक्रम वेळेत सुरू करण्याकडे कटाक्ष ठेवला जाणार आहे.
श्री. लिंगायत म्हणाले, कोमसापमध्ये युवकांसाठी कोकण युवा शक्ती विभाग सुरू करण्यात आला. त्याद्वारे दापोलीमध्ये पहिले युवा संमेलन झाले. आता कोकण विभागाचे संमेलन देवरुखात भव्यदिव्य स्वरूपात करण्यात येणार आहे.
संमेलनाच्या आदल्या दिवशी २३ जानेवारीला दुपारी साडेतीन वाजता ग्रंथदिंडीने संमेलनाची सुरवात होईल. त्यामध्ये नामवंत कवी अशोक नायगावकर, अशोक बागवे, अरुण म्हात्रे, महेश केळुसकर आदी सहभागी होणार आहेत. सायंकाळी पद्मश्री मधु मंगेश कर्णिक यांच्यावरील लघुपट दाखवण्यात येईल. २४ ला संमेलनाचे उद्घाटन सकाळी ९ वाजता मान्यवरांच्या उपस्थितीत होईल. देवरूखमधील नवोदित ९ लेखक, कवींची पुस्तके यावेळी प्रकाशित केली जातील. ११ वाजता मुक्त काव्यकट्टा सुरू होईल. तो दिवसभर चालणार आहे. प्रत्येक सहभागीला प्रमाणपत्र दिले जाईल. ११ वाजता राष्ट्रीय पुरस्कारप्राप्त अपंग मनाली जोशी हिची मुलाखत होईल. ११.३० वाजता आजची युवा पिढी संस्कारहीनतेच्या उंबरठ्यावर उभी आहे का? या विषयावर परिसंवाद होईल. १२.३० वाजता आजच्या शिक्षणाची जीवनाशी सांगड घालता येते का? ही महाचर्चा होईल.
दुपारी २.३० वाजता कथाकथन, ३ वाजता काव्यतुषारमध्ये तिन्ही जिल्ह्यांतील विजेत्यांच्या कवितांचे सादरीकरण व बक्षीसवितरण होईल. ३.३० वाजता काव्यतरंगमध्ये ज्येष्ठ कवी नायगावकर व बागवे कविता ऐकवतील. ४.३० वाजता संमेलनाचा समारोप होईल.
रोहन बने यांनी सांगितले की, देवरूख शहराने साहित्य, कला, क्रीडा, शैक्षणिक क्षेत्रात भरीव योगदान दिले आहे. कोमसापतर्फे युवकांना लिहिते करण्यासाठी हे संमेलन घेतले जात आहे. देवरूखमध्ये तब्बल १९ वर्षानंतर असे  मोठे सं मेलन होत आहे.
टिपरीनृत्य, नमन, जाखडीकरिता ग्रामीण भागातील कवी, लेखक लेखन करून लोककलेच्या रूपात सादरीकरण करत असतो. या कलाकारांना ग्रामीण साहित्यिकांचा दर्जा  मिळावा, याकरिता कोमसाप प्रयत्नशील आहे. यामुळे जिल्ह्यातील प्रत्येक वाडी कोमसापला जोडली जाईल. केंद्रीय समितीशी चर्चा झाली असून वर्षभरात सर्वेक्षण करून त्यावर कार्यवाही केली जाणार आहे. सन २०१७ मध्ये या सर्व कलाकारांचे संमेलनही घेण्याचा विचार आहे, असे युयुत्सु आर्ते यांनी सांगितले.

No comments:

Post a Comment