Monday 19 June 2017

रत्नागिरी कऱ्हाडे ब्राह्मण संघाची राणी लक्ष्मीबाईंना ग्रंथरूप आदरांजली



रत्नागिरी :  रत्नागिरी कऱ्हाडे ब्राह्मण संघाने झाशीच्या राणीला १५९ व्या पुण्यतिथीला ग्रंथरूप आदरांजली वाहिली. क्रांतिज्वालानामक या गीतसंग्रहाचे प्रकाशन करतानाच या संग्रहातील सर्व गीते सादर करून दुहेरी औचित्य साधले.
          
क्रांतिज्वालाच्या प्रकाशन समारंभात बोलताना अ‍ॅड. विलास कुवळेकर.
व्यासपीठावर उपाध्यक्ष मिलिंद आठल्ये, माधव हिर्लेकर,  नगराध्यक्ष राहुल पंडित,
 डॉ. श्रीकृष्ण जोशीमाजी अध्यक्ष चंद्रकांत हळबे
कर्‍हाडे ब्राह्मण संघातर्फे रविवारी (दि. १८ जून) झाशीची राणी लक्ष्मीबाईंच्या १५९ व्या पुण्यस्मरणानिमित्त
क्रांतिज्वालापुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. सन १८५७ च्या स्वातंत्र्यलढ्यातील राणी लक्ष्मीबाईंचे शौर्य राष्ट्रभक्ती शिकवते. अनेक स्वातंत्र्यसैनिकांनी कोणत्याही अपेक्षेशिवाय भारतराष्ट्रासाठी हौतात्म्य पत्करले. स्वातंत्र्यानंतर ७० वर्षांनी आपल्या सर्वांनाच राष्ट्रभक्ती म्हणजे काय हे शिकवण्याची वेळ यावी, हे दुर्दैवच. अशा स्थितीत राणी लक्ष्मीबाईंवर क्रांतिज्वालाया गीतसंग्रहातून डॉ. श्रीकृष्ण जोशी यांनी समाजाला निश्‍चितच शौर्याची व राष्ट्रनिष्ठेची जाणीव करून दिली आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ साहित्यिक अ‍ॅड. विलास कुवळेकर यांनी यावेळी केले.
      या वेळी व्यासपीठावर संघाचे अध्यक्ष माधव हिर्लेकर, उपाध्यक्ष मिलिंद आठल्ये, डॉ. जोशी, नगराध्यक्ष राहुल पंडित, माजी अध्यक्ष चंद्रकांत हळबे आदी उपस्थित होते.
      नगराध्यक्ष राहुल पंडित यांनी आपल्या भाषणात राणी लक्ष्मीबाईंचा पुतळा लवकरच उभारू, अशी ग्वाही दिली. लक्ष्मी चौक या नावाने चौक असला तरी साळवी स्टॉप परिसरामध्ये पुतळा झाला पाहिजे. यातून १८५७ च्या स्वातंत्र्यसमराची आठवण व राणी लांज्यातील असल्याने तिच्या शौर्याचे स्मरण केले जाईल, असेही त्यांनी सांगितले.
      डॉ. जोशी यांनी मनोगतामध्ये सांगितले, लहानपणी माझे वडील (कै.) सखाराम व आई (कै.) शकुंतला यांनी मला लक्ष्मीबाईंच्या कोट येथील गावी नेले होते. तेव्हा जाणीवपूर्वक दोघांनी लक्ष्मीबाईंची कथा सांगितली. तू राणीवर कविता लिही, अशी इच्छा त्यांनी व्यक्त केली होती. आई-वडिलांची इच्छा व माझे स्वप्न पूर्ण होण्याचा योग इतक्या वर्षांनी आला. लक्ष्मीबाईंचे आयुष्य धगधगते होते. तिच्यासह अनेक स्वातंत्र्यसैनिकांनी भारताला स्वातंत्र्य मिळवून दिले, त्यांचे स्मरण, वाचन पुढच्या पिढीने केले पाहिजे, याकरिता हे पुस्तक लिहिले आहे. पुस्तक विक्रीतील सर्व फायदा कर्‍हाडे ब्राह्मण संघाला देणार असल्याचेही त्यांनी जाहीर केले.
      श्री. हिर्लेकर यांनी स्वागत केले. सौ. प्रतिभा प्रभुदेसाई यांनी सूत्रसंचालन केले. पराग आंबेकर यांनी आभार मानले.
    
उत्तरोत्तर रंगत गेलेली मैफल
पुस्तकाच्या प्रकाशनानंतर राणी लक्ष्मीबाईंचा संघर्षमय जीवनप्रवास उलगडणार्‍या गीतांची
क्रांतिज्वालाही सुरेल मैफलही रंगली. उत्तरोत्तर रंगलेल्या कार्यक्रमाला रत्नागिरीकरांचा उदंड प्रतिसाद लाभला. राणी लक्ष्मीबाईंच्या शौर्य, स्वातंत्र्यलढ्याचे धगधगते चित्र या गीतांमधून समोर उभे राहिले. डॉ. श्रीकृष्ण जोशी यांच्या सुरेख शब्दरचनेला संगीत दिग्दर्शक आनंद प्रभुदेसाई यांनी स्वरसाज चढवला. राणी लक्ष्मीबाईंच्या पुण्यस्मरणातून श्रोत्यांमध्ये राष्ट्रभक्ती जागविली गेली. राम तांबे आणि सौ. श्‍वेता तांबे-जोगळेकर यांनी गायिलेल्या या गीतांचे संगीत दिग्दर्शन आनंद प्रभुदेसाई यांनी केले होते. डॉ. श्रीकृष्ण जोशी यांनी स्वतःच निवेदन केले. मैफलीत  तबलासाथ राजू धाक्रस, संवादिनी विनय वळामे, सिंथेसायजर वैभव फणसळकर, ऑक्टोपॅड प्रवीण पवार यांनी केली. हरेश केळकर यांनी तालवाद्यांची बाजू सांभाळली. अभिजित नांदगावकर, सुनील बेंडखळे यांनी समूहसाथ केली. आधी नमन विघ्नराजाला, छळ कपट साहती गुलाम अंधारात, करी हिन्दभूध्वजा आणून द्यावी खास, कुठून लाभले काही कळेना पंख विहंगांचे, तुम्ही अंबारीत, हे सदन सुखाचे भरले आनंदाने, घन तिमिराचे, निमिषात कोसळे तिमिराचा घनलोळ, कोसळे आपदा कालगती संपेना, क्षुब्ध जनांचे उष्ण उसासे चेतविती हृदयास, ही कथा क्रांतिज्वालेची आदी गीतांमधून लक्ष्मीबाईंचे संघर्षमय जीवन मैफलीत उलगडले गेले.
मैफलीत रंगून गेलेले श्रोते

Thursday 15 June 2017

सागर निःस्तब्ध झाला!

चिपळूण (जि. रत्नागिरी येथील दैनिक `सागर`चे संपादक, चिपळूणचे माजी आमदार आणि सामाजिक कार्यकर्ते निशिकांत माधव ऊर्फ नाना जोशी यांचे ३ जून २०१७ रोजी निधन झाले. कोकणासाठी ती खूपच धक्कादायक घटना होती. कोकणाच्या हितासाठी लेखणीचा सातत्याने वापर करणारा सव्यसाची पत्रकार काळाच्या पडद्याआड गेल्याने कोकण किनारपट्टीवरचा सागरच जणू निःस्तब्ध झाला आहे.
रत्नागिरीच्या साप्ताहिक कोकण मीडियाने त्यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी प्रसिद्ध केलेला अंक.








..........



Wednesday 7 June 2017

मुंबईच्या माझे माहेर अनाथाश्रमातील मुलींनी रत्नागिरीत अनुभवले कौटुंबिक जीवन



        रत्नागिरी : मुंबईच्या अनाथाश्रमातील त्या मुली रत्नागिरीतील चार दिवसांच्या भ्रमंतीने भारावून गेल्या. निसर्गाचा जवळून परिचय होण्याबरोबरच त्यांनी कौटुंबिक जीवनही अनुभवले. मुंबईतील अंकुर प्रतिष्ठानने आयोजित केलेल्या मातृभूमी परिचय शिबिराच्या निमित्ताने रत्नागिरीची सैर घडलेल्या या मुलींनी पुन्हा एकदा या परिसरात येण्याचा मनोदय व्यक्त केला.
               
केळ्ये-मजगाव (ता. रत्नागिरी) माध्यमिक विद्यालयातल्या
आपल्याच वयाच्या मैत्रिणींमध्ये रंगून गेलेल्या
मुंबईतील माझे माहेर संस्थेच्या मुली.
अनाथ मुलांमधील सुप्त कौशल्यांचा शोध घेऊन अशा मुलांमधील आत्मविश्वास वाढविण्यासाठी आणि त्यांना मदत करण्यासाठी मुंबईतील अंकुर प्रतिष्ठान ही सेवाभावी संस्था काम करते. अनाथाश्रमात बंदिस्त वातावरणात राहिलेल्या मुलांना बाहेरील जगाशी परिचय करून देण्याकरिता मुंबईच्या काळाचौकीतील माझे माहेर अनाथाश्रमातील अकरा मुलींना प्रतिष्ठानतर्फे मातृभूमी परिचय शिबिराच्या निमित्ताने रत्नागिरीत चार दिवसांची सहल आयोजित केली होती. रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीच्या मुलींच्या वसतिगृहात त्यांची राहण्या-जेवण्याची व्यवस्था करण्यात आली होती. तेथेच शिबिराचे उद्घाटन करण्यात आले. वसतिगृहाचे रेक्टर महेश नाईक, अंकुरच्या व्यवस्थापकीय समितीचे डॉ. विद्याधर गोखले, प्रणव भोंदे, प्रा. अवधूत आपटे, यांच्या उपस्थितीत हा समारंभ झाला.
त्यानंतरच्या चार दिवसांत या मुलींनी रत्नागिरी शहर आणि परिसराचा फेरफटका मारला. त्यामध्ये रत्नदुर्ग किल्ला, पतितपावन मंदिर, लोकमान्य टिळक जन्मस्थान, भोके येथील देवधर डेअरी, कर्ला परिसरात रात्रीचा नौकाविहार, फेरीबोटीतून प्रवास करून जयगड, हेदवी, वेळणेश्वरचे दर्शन, बामणघळ, गणपतीपुळ्यातील प्राचीन कोकण, प्रा. सुरेंद्र ठाकूरदेसाई यांच्यासमवेत निसर्गदर्शन, कातळशिल्पे, प्रा. विवेक भिडे यांनी घडविलेली खगोलशास्त्राची सफर इत्यादींचा समावेश होता. मोकळ्या वातावरणात प्रथमच फिरणाऱ्या मुलींना वेगळाच आनंद मिळाला. रत्नागिरीच्या राष्ट्रसेविका समितीने आयोजित केलेल्या मातृहस्ते भोजनाच्या कार्यक्रमाने तर मुलींना गहिवरून आले. यावेळी मुलींनी नृत्य व गाणे सादर करून आपला आनंद व्यक्त केला. केळ्ये माध्यमिक शाळेतील मुलींशी परिचय आणि त्यांच्यासमवेत एक दिवस राहण्याचा कार्यक्रमही पार पडला. एकाच दिवसाच्या मैत्रीतही मुलींनी ती घरे आपलीशी केली.
                शिबिराच्या समारोपाला महेश नाईक, ज्येष्ठ पत्रकार प्रमोद कोनकर, अंकुर प्रतिष्ठाने डॉ. विद्याधर गोखले उपस्थित होते. शिबिराविषयी सना मंडल आणि मनीषा या विद्यार्थिनींनी प्रातिनिधिक स्वरूपात आपली मते मांडली. मुंबईपासून दूर कोकणात खूप काही मिळाले. अनेक गोष्टी शिकायला मिळाल्या. खूपच वेगळा अनुभव मिळाला, अशी मते त्यांनी व्यक्त केली. अंकुर प्रतिष्ठानच्या वतीने अदिती भट हिने रत्नागिरीतील सोयीबाबत आणि प्रा. अवधूत आपटे यांनी केलेल्या व्यवस्थेबाबत समाधान व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मधुरा भोंदे यांनी केले.

.......




Monday 5 June 2017

कोकणातील उद्योगांच्या संधींना विचारांची जोड आवश्यक - डॉ. श्रीधर ठाकूरदेसाई



      रत्नागिरी – कोकणात उद्योगाच्या अनेक संधी आहेत. पण अभिमान आणि अहंकारामुळे या संधी नाहीशा होतात. विचारांची प्रक्रिया थांबते. प्रगती साधायची असेल, तर विचारांचा प्रवाह सुरू राहिला पाहिजे आणि विचारांचा हा वेग कृतीमध्ये आणला, तर यश मिळेल, असे प्रतिपादन मुंबईतील डॉ. श्रीधर ठाकूरदेसाई यांनी केले.
      कऱ्हाडे ब्राह्मण बेनेव्होलंट फाउंडेशनतर्फे आयोजित केलेल्या बिझिनेस कॉन्फरन्समध्ये प्रमुख वक्ते म्हणून ते बोलत होते. माळ नाका येथील हॉटेल सनस्टारमध्ये रविवारी (ता. ४ जून) झालेल्या या कॉन्फरन्समध्ये रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यांसह पुणे, डोंबिवली आणि ठाण्यातील सुमारे शंभर उद्योजक उपस्थित होते.
      मूळचे भांबेड (ता. लांजा) येथील रहिवासी असलेले डॉ. ठाकूरदेसाई न्यूरोसर्जन आहेत. देशात तसेच परदेशात विविध ठिकाणी त्यांचा सतत दौरा सुरू असतो. आपल्या मूळ गावीही ते दर महिन्याला येऊन शेतीबागायतीची देखभाल करतात. आंब्याच्या ३६, तर फणसांच्या शंभर जातींची लागवड त्यांनी केली आहे. देशविदेशात फिरताना आलेल्या विविध अनुभवांमधून त्यांनी कोकणात फलोत्पादन आणि प्रक्रिया उद्योगांबाबत उपलब्ध असलेल्या विविध संधींचा आढावा घेतला. आंध्र प्रदेशातील फणस लागवड आणि प्रक्रियायुक्त पदार्थ, मलेशियातील सुकविलेले फणस, पक्षिदर्शन पर्यटन, प्राणिपर्यटन, वृक्ष पर्यटन, टाकाऊ म्हणून फेकून दिल्या जाणाऱ्या जुन्या दुर्मिळ वस्तूंचा संग्रह, ऑर्किडची शेती, आंबा-काजूव्यतिरिक्त लागवडीबाबत कोणतीही स्पर्धा नसलेले कोकम, खिरणी, बिब्बा इत्यादी फळांचा उपयोग इत्यादी क्षेत्रात कोकणात उपलब्ध असलेल्या अनेक उद्योगांच्या संधीबाबत डॉ. ठाकूरदेसाई यांनी नेमकेपणाने मार्गदर्शन केले.
      ठाण्यातील सौ. गौरी खेर यांनी व्यवसायाकरिता आवश्यक असलेल्या कौशल्यांविषयी माहिती दिली. व्यवसायात यशस्वी होण्यासाठी संवाद, सादरीकरण, वक्तृत्वशैली, वाटाघाटींचे कौशल्य, व्यावसायिक शिष्टाचार, नेतृत्वशैली, ग्राहकसेवा, टीमवर्क, मानसिक लवचिकता आणि अविरत शिक्षण आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.
  रत्नागिरी – केबीबीबीएफच्या बिझिनेस कॉन्फरन्सचे उद्घाटन करताना
गौरी खेर, सोबत (डावीकडून) गोविंद हर्डीकर, केबीबीएफच्या रत्नागिरी विभागाचे
अध्यक्ष योगेश मुळ्ये, डॉ. श्रीधर ठाकूरदेसाई.
      पुण्यातील गोविंद हर्डीकर यांनी प्रक्रिया उद्योग आणि त्यासाठी ते तयार करीत असलेल्या विविध यंत्रसामग्रीविषयीची माहिती दिली. मूळचे इलेक्ट्रिकल इंजिनिअर असलेले श्री. हर्डीकर यांनी कोकम, जांभूळ आणि करवंदांविषयी कोकण कृषी विद्यापीठाशी संलग्न असलेल्या बहुराष्ट्रीय प्रकल्पाकरिता तीन वर्षे काम केले. पुण्यात गेली सतरा वर्षे प्रक्रिया उद्योगासाठी आवश्यक यंत्रसामग्रीची निर्मिती ते करीत आहेत. या यंत्रसामग्रीच्या आधारे कोकणातील उत्पादनांवर कोणत्या आणि कशा प्रक्रिया करता येतील, याविषयीची सविस्तर माहिती त्यांनी दिली. कोकम सरबताची पावडर, कापे गरे, करवंद इत्यादी फळे आणि रस छोट्या प्रमाणात पॅकबंद करून त्याची विक्री केल्यास वाया जाणाऱ्या फळांचा उपयोग होईल आणि शेतकऱ्यांनाही फायदा होईल, असे त्यांनी सांगितले. नाचणीची इन्स्टंट आंबील तयार करण्यात आल्याचेही ते म्हणाले. उद्योगाचा एकेक विभाग घेऊन त्यावर निश्चित कालावधीचा कृती आराखडा तयार करून त्यादृष्टीने काम केले पाहिजे, असे आवाहन त्यांनी केले.
      रत्नागिरीचे नगराध्यक्ष राहुल पंडित यांचा यावेळी सत्कार करण्यात आला. व्यवसायात यशस्वी होण्यासाठी आत्मविश्वास वाढला पाहिजे. हा आत्मविश्वास अनुभवातून आणि निरीक्षणातून साध्य होतो, असे त्यांनी सांगितले. केबीबीएफ ग्लोबलचे प्रकाश गुण्ये, रत्नागिरी कऱ्हाडे ब्राह्मण संघाचे अध्यक्ष श्री. हिर्लेकर यांचाही यावेळी सत्कार करण्यात आला.
      केबीबीएफच्या रत्नागिरी विभागाचे अध्यक्ष योगेश मुळ्ये यांनी परिषदेचे प्रास्तविक केले. यावेळी केबीबीएफचे उद्गाते मनोज कळके यांच्यासह ठाणे, डोंबिवली आणि पुणे विभागाचे प्रतिनिधी उपस्थित होते.