Saturday 19 March 2016

कोकणात पावसाचे पाणी साठविण्यासाठी जलवर्धिनीचा मदतीचा हात



रत्नागिरी - राज्य शासनातर्फे सुरू असलेल्या जलजागृती सप्ताहाला प्रतिसाद म्हणून मुंबईतील जलवर्धिनी प्रतिष्ठानने रत्नागिरीवासीयांसाठी फेरोसिमेंटच्या जलसाठवण टाक्या बांधण्याचे तंत्रज्ञान उपलब्ध करून देण्याचे जाहीर केले आहे. श्रमदानातून टाक्या उभारू इच्छिणाऱ्या ग्रामस्थांसाठी बांधकाम साहित्य तसेच तंत्रज्ञानही मोफत उपलब्ध करून दिले जाणार आहे.
राज्य शासनाच्या निर्णयानुसार कोकण पाटबंधारे विभागातर्फे रत्नागिरी जिल्ह्यात १६ मार्च रोजी जलजागृती सप्ताह सुरू झाला. या सप्ताहानिमित्ताने मुंबईतील जलवर्धिनी प्रतिष्ठानचे विश्वस्त उल्हास परांजपे यांना सिंधुदुर्गच्या जिल्हाधिकाऱ्यांनी मार्गदर्शनासाठी निमंत्रित केले होते. फेरोसिमेंट तंत्रज्ञानाच्या आधारे पावसाचे पाणी साठविण्याच्या पद्धती जलवर्धिनीने विकसित केल्या आहेत. कोकणात प्रचंड प्रमाणात पाऊस पडूनही अनेक भागात उन्हाळ्यात शेतीसाठी आणि पिण्यासाठीही पाणी शिल्लक राहत नाही. पावसाचे पाणी साठविणे हा त्यावरचा उपाय आहे. कमी खर्चात पाणी साठविण्याचे अनेक नमुने जलवर्धिनीने विकसित केले आहेत. रायगड, सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्यातही त्या नमुन्याच्या साठवण टाक्या बांधण्यात आल्या आहेत. त्याविषयीची माहिती परांजपे यांनी तेथे दिली.
तेथील मेळाव्यात उपस्थित झालेले मुद्दे, शासनाने पाणी साठविण्यासाठी केलेले सहभागाचे आवाहन आणि कोकणवासीयांची गरज लक्षात घेऊन जलवर्धिनीतर्फे गरजूंना मदतीचा हात देण्याचे श्री. परांजपे यांनी जाहीर केले. त्यानुसार रत्नागिरी जिल्ह्यात जलसाठवण टाक्या बांधण्यासाठी मदत केली जाणार आहे. गरजू शेतकऱ्यांकरिता जमिनीवरील दहा हजार लिटरपर्यंतची क्षमता असलेल्या साठवण टाक्या बांधल्या जातील. शेतकऱ्यांनी पाया बांधणे, बांधकाम साहित्य पुरवून श्रमदान केल्यास टाक्यांच्या उभारणीसाठी आवश्यक स्टील, जाळ्या, सिमेंट इत्यादी साहित्य जलवर्धिनीतर्फे पुरविले जाईल. तसेच आवश्यक ती देखरेख ठेवण्याचे कामही केले जाईल.
इच्छुक शेतकरी तसेच संस्थांनी ९८२०७८८०६१ या दूरध्वनी क्रमांकावर त्वरित संपर्क साधावा, असे आवाहन श्री. परांजपे यांनी केले आहे. जलवर्धिनी संस्थेविषयीची माहिती www.jalvardhini.org या संकेतस्थळावर उपलब्ध होईल.
.........................


Saturday 27 February 2016

सौ. लक्ष्मी पटवर्धन यांचे निधन



रत्नागिरी : तालुक्यातील गणेशगुळे येथील सौ. लक्ष्मी नरहरी पटवर्धन (वय ६५) यांचे २५ फेब्रुवारी रोजी पहाटे निधन झाले. दुपारी अमरधाममध्ये त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी पावस दशक्रोशीतील अनेक लोक उपस्थित होते. आप्त, स्नेहीजनांनी पटवर्धन कुटुंबीयांचे सांत्वन केले. लक्ष्मी पटवर्धन यांच्या पश्चात पती, मुलगा, मुली, जावई, नातवंडे, दीर, जाऊ, पुतण्या, पुतणी असा मोठा परिवार आहे.

Friday 26 February 2016

शालेय शिक्षण जीवनाला दिशा देणारे - प्रशांत दामले



देवरूख - आई वडील आपल्यावर संस्कार करतातच मात्र शाळा आणि गुरुजन जे काही शिकवतात, ते शिक्षण जीवनाला दिशा देणारे ठरते. शाळेत मिळालेली शिक्षा म्हणजे पट्टी बोलते, अंगठे धरलेले लक्षात राहते, अशा चुकांमधून काय चांगले करावे ते समजते, म्हणून चुका करा, नवनवीन चुका करा म्हणजे चांगले काय ते तुम्हाला समजेल आणि तुम्ही चांगले नागरिक बनाल, असे मत सुप्रसिद्ध सिने नाट्य अभिनेते प्रशांत दामले यांनी व्यक्त केले.
ताम्हाने माध्यमिक विद्यामंदिरात विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना प्रसिद्ध
अभिनेते प्रशांत दामले, शेजारी समीर सप्रे, अशोक सप्रे, बाळासाहेब पाटील आदी.

देवरूखजवळच्या ताम्हाने पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळाच्या माध्यमिक विद्यामंदिरातील दहावीच्या विद्यार्थ्यांना निरोप आणि शुभेच्छा देण्याचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून दामले उपस्थित होते. त्यांच्यासोबत पनवेलचे उद्योजक आणि दुनियादारी समहाचे प्रमुख समीर सप्रे, कोल्हापूरचे राजन गुणे, ज्येष्ठ पत्रकार आणि कोकण मीडिया कन्सल्टन्सी सर्व्हिसेसचे संचालक प्रमोद कोनकर, कोकण रेल्वेचे अधिकारी महेश पेंडसे, कौस्तुभ कागलकर, प्रसिद्ध ऑर्गन वादक बाळासाहेब दाते, संस्थाध्यक्ष शशिकांत सप्रे, सचिव अशोक सप्रे, मुख्याध्यापक बाळासाहेब पाटील, अप्पा पाध्ये आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी विद्यार्थ्यांशी संवाद साधताना दामले प्रत्यक्ष जीवनातील अनुभव कथन करीत आपल्या शालेय जीवनाला उजाळा दिला. प्रत्येक नागरिक हा जन्मजात कलाकार असतो. शाळा ही संस्कार देणारी आहे, आपण काय आहोत हे शाळेतच आपल्याला समजते, आपल्या शाळेचा निकाल १०० टक्के लागणारच आहे तरीही खरे जीवन काय हे इथून बाहेर पडल्यावरच समजणार आहे, इथे मिळालेले शिक्षण हे बाहेरचे जीवन जगण्यासाठी उपयुक्त ठरणार आहे. आपले म्हणणे ठामपणे मांडणे हे आपल्याला शाळेतच शिकवले जाते, मी शालेय जीवनात अभ्यासात फार काही करू शकलो नाही पण शाळेच्या संस्कारामुळे मी चांगला कलाकार होऊ शकलो असे त्यांनी आवर्जून नमुद केले. आज मी शाळेचा अभ्यास शिकवू शकत नाही मात्र ४०० मुलांना मी आत्मविश्वासपूर्वक वागणे, जगात कसे वागावे, जगावे, हे शिकवू शकतो. ते कार्य मी करीतच आहे, शाळेतून बाहेर पडलात तरी शिकत राहा, वाचत राहा विशेषतः वर्तमानपत्र आणि त्यातील संपादकीय जरूर वाचा. यातून तुमच्या वागण्या बोलण्यात खूपच रक पडेल आणि जीवनात प्रगती होईल, असा सल्ला त्यांनी दिला. स्वागतगत सादर करणाऱ्या सानिका नावाच्या विद्यार्थिनीला तू चांगली नृत्यकलाकार होशील असा आशीर्वाद त्यांनी दिला. त्यांचे भाषण सुरू असताना विद्यार्थ्यांनी त्यांना मला सांगा सुख म्हणजे नक्की काय असतं हे लोकप्रिय गाणे सादर करण्याची विनंती केली मात्र दामले यांनी विद्यार्थ्यांना संदेश देण्यासाठी कविवर्य मंगेश पाडगावकर यांची सांगा कसं जगायचं ही कविता आपल्या मधुर आवाजात सादर करीत विद्यार्थ्यांची मने qजकली.

यावेळी दहावीच्या मार्गदर्शक शिक्षकांचा सत्कार करण्यात आला. विद्यार्थ्यांनी आपली मनोगते व्यक्त केली.
कार्यक्रमाचे औचित्य साधून उपस्थित राहिलेल्या प्रशांत दामले यांचे शाळेच्या वतीने ढोल, ताशे आणि झांज पथकातून स्वागत करण्यात आले. संस्थेच्या वतीने शाल, श्री, सन्मानचिन्ह देऊन प्रशांत दामले यांचा सत्कार करण्यात आला. तर दहावीच्या विद्यार्थ्यांकडूनही दामले यांना भेटवस्तू देण्यात आली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक अशोक सप्रे यांनी तर सूत्रसंचालन सनगरे सर यांनी केले. कार्यक्रमाला सर्व विद्यार्थी, पालक, शिक्षक, ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.