Friday 20 November 2015

झाशीच्या राणीचा इतिहास तरुणांच्या मनावर ठसवायला हवा



डॉ. सच्चिदानंद शेवडे : सैन्यात जायला तरुण तयार होत नाहीत ही खंत

कोट (ता. लांजा) : झाशीच्या राणीचा प्रेरणादायी इतिहास आजच्या तरुणांसाठी आदर्श आहे. खरा इतिहास आजच्या पिढीपर्यंत पोहोचत नाही, म्हणूनच सैन्यात जायला तरुण तयार होत नाहीत,’’ अशी खंत इतिहासाचे प्रगाढ अभ्यासक डॉ. सच्चिदानंद शेवडे यांनी येथे व्यक्त केली.

     

झाशीची राणी लक्ष्मीबाई हिचे माहेर आणि सासर लांजा तालुक्यात कोलधे आणि कोट येथे आहे. तिचा इतिहास आजच्या पिढीला समजावा आणि तिचे स्मारक गावात उभारले जावे कोट आणि कोलधे ग्रामस्थांनी स्मारक समिती स्थापन केली आहे. या समितीमार्फत कोट येथे राणीची १८१ वी जयंती काल (ता. १९) उत्साहात साजरी करण्यात आली. त्यावेळी डॉ. शेवडे यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. त्यावेळी ते म्हणाले, ``कोणत्याही व्यक्तीचे मूळ महत्त्वाचे असते. राणी लक्ष्मीबाई बालपणात या गावांमध्ये आली की नाही, याला महत्त्व नाही. त्यांचे मूळ गाव महत्त्वाचे आणि त्यांची आठवण ग्रामस्थांकडून ठेवली जाते, हे त्याहून महत्त्वाचे आहे. रणरागिणी लक्ष्मीबाईचा इतिहास तेजस्वी आहे. इतिहास शाईने नव्हे, तर क्रांतिकारकांच्या रक्ताने लिहिला जातो. राणीने १८५७ साली स्वातंत्र्यसंग्राम सुरू केला आणि त्यानंतर १९४७ साली भारत स्वतंत्र झाला. मात्र भारताला स्वातंत्र्य मिळाले, असे सांगितले, शिकविले जाते. ते चुकीचे आहे. स्वातंत्र्य म्हणजे मागितल्यानंतर मिळणारे दान किंवा भीक नव्हे. ज्ञात-अज्ञात असंख्य क्रांतिकारकांच्या बलिदानातून भारताने स्वातंत्र्य मिळविले आहे. तसेच सांगितले गेले पाहिजे. ते न सांगितले गेल्यामुळे आजच्या पिढीला स्वातंत्र्य सहज मिळाले, असे वाटते. त्यामुळे स्वातंत्र्याचे मोल कळत नाही. म्हणूनच देशाच्या संरक्षणासाठी सैन्यात भरती व्हायला तरुण मिळत नाहीत. प्रेरणादायी कविता, धडे अभ्यासातून काढून टाकले गेले. त्यामुळे प्रेरणादायी खरा इतिहास मुलांना समजतच नाही. देशाच्या सीमा तलवारीच्या टोकाने आखल्या जातात, चरख्याच्या सुताने नव्हेत, हे तरुणांना पटविणे आवश्यक आहे.``

राणी लक्ष्मीबाईचे शौर्य, तिचा संघर्षमय जीवनप्रवास, १८५७ चा स्वातंत्र्यसंग्राम, त्याबाबत ब्रिटिशांनी लिहून ठेवलेल्या चुकीच्या नोंदी, चुकीचा इतिहास शिकविल्यामुळे झालेले नुकसान, स्वातंत्र्यपूर्व काळापासून सुरू असलेला मिठावरील कर, न्यायव्यवस्थेमुळे विश्वासाला गेलेला तडा इत्यादीविषयी शेवडे यांनी ओघवत्या शैलीत आपले विचार मांडले. त्यामुळे सभागृह भारावून गेले. संत आणि राष्ट्रपुरुष एखाद्या जातीसाठी, समाजासाठी नव्हे, तर देशासाठी कार्य करतात, हे नेहमीच लक्षात ठेवले पाहिजे, असे आवाहनही त्यांनी शेवटी केले.
प्रारंभी अंध कलाकार योगिता अरुण तांबे हिचा शिवसेनेतर्फे सत्कार करण्यात आला. अॅड. विलास कुवळेकर यांनी प्रास्ताविक केले. राणी लक्ष्मीबाईच्या स्मारकाला पर्यटनस्थळाचा नव्हे, तर स्फूर्तिस्थळाचा दर्जा मिळावा, अशी अपेक्षा त्यांनी यावेळी व्यक्त केली. दिनकर नेवाळकर यांनी डॉ. शेवडे यांचा सत्कार केला.
       समारंभाला आमदार राजन साळवी, जिल्हा परिषद अध्यक्ष जगदीश राजापकर यांच्यासह परिसरातील लोकप्रतिनिधी आणि ग्रामस्थ उपस्थित होते..
.........

स्मारकासाठी २५ लाखाची तरतूद
``राणी लक्ष्मीबाईच्या कोट येथील नियोजित स्मारकासाठी जिल्हा नियोजन मंडळातून २५ लाख रुपयांच्या निधीची तरतूद केली जाईल आणि समितीच्या येत्या बैठकीत त्याची नोंद घेतली जाईल, असे आश्वासन जिल्ह्याचे पालकमंत्री रवींद्र वायकर यांनी दिले आहे``, अशी माहिती राजापूरचे आमदार राजन साळवी यांनी यावेळी केली. या स्मारकासाठी आपणही प्रयत्नशील राहू आणि निधी मंजूर करून घेण्यासाठी प्रयत्न करू, असे आश्वासन श्री. साळवी यांनी यावेळी दिले.



राणी लक्ष्मीबाईच्या स्मारकासाठी ग्रामस्थांनीच पुढाकार घ्यावा



अॅड. विलास कुवळेकर – कोट येथे १८१ वी जयंती उत्साहात साजरी



कोट (ता. लांजा) : ``रणरागिणी झाशीच्या राणीचे स्मारक उभारण्यासाठी लोकांनी सरकारकडे मागणी करूच नये. `गाव करील ते राव काय करील` या उक्तीनुसार ग्रामस्थांनीच त्यासाठी पुढाकार घ्यावा. राणीने केलेल्या पराक्रमाच्या स्फूर्तीची ज्योत मनात निर्माण होणार असेल, तर चिरंतन स्मारक निर्माण होईल``, असे प्रतिपादन लांजा येथील ज्येष्ठ विधीज्ञ अॅड. विलास कुवळेकर यांनी येथे केले.
समारंभात बोलताना अॅड. विलास कुवळेकर.
राणी लक्ष्मीबाई हिची १८१ वी जयंती काल (ता. १९) कोट या राणीच्या मूळ गावी समारंभपूर्वक साजरी करण्यात आली. त्यावेळी झालेल्या समारंभात ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर दिनकर नेवाळकर, ज्येष्ठ पत्रकार प्रमोद कोनकर, सरपंच सौ. जयश्री भुवड, माजी सरपंच शांताराम सुर्वे, कृष्णा आगरे, प्रकाश घडशी, जिल्हा परिषद सदस्य सौ. स्वरूपा साळवी आदी उपस्थित होते. समारंभापूर्वी राणीच्या स्मारकाच्या नियोजित स्थळी प्रतिमेचे पूजन आणि पोवाड्यांचे गायन करण्यात आले. त्यानंतर झालेल्या समारंभात श्री. कुवळेकर पुढे म्हणाले, ``भारतीय स्वातंत्र्यासाठी लढणारी राणी लक्ष्मीबाई म्हणजे तांबे किंवा नेवाळकर घराण्यापुरती मर्यादित नाही. सर्वांनाच तिच्या अनुवंशाचा वारसा आहे. अशा स्वातंत्र्यसेनानींच्या बलिदानाला काळीमा फासण्याचे काम चालू आहे. अशा स्थितीत तिच्या पराक्रमापासून प्रेरणा देण्यासाठी तिचे उचित स्मारक उभारले गेले पाहिजे. मात्र त्यासाठी शासनावर अवलंबून राहून चालणार नाही. चांगला विचार करून प्रेरणादायी स्मारक उभारावे. आज भारत स्वतंत्र झाल्याने आता ब्रिटिशांना हद्दपार करण्याची गरज राहिलेली नाही. मात्र भ्रष्टाचारासारख्या दुर्गुणांना हद्दपार करण्याची गरज आहे. त्यासाठी प्रेरणा देणारे स्मारक उभारले पाहिजे.``
माजी सरपंच आबा सुर्वे म्हणाले की, मेरी झाँसी नही दूंगी म्हणणाऱ्या राणी लक्ष्मीबाईच्या गावात आपण राहत असल्याने आपल्याला तिचा अभिमान वाटला पाहिजे. तिचा इतिहास लहान मुलांसमोर ठेवला पाहिजे. त्यासाठी त्यांना वाचनाची गोडी लावली पाहिजे. प्रमोद कोनकर यांनी सांगितले की, राणीने ब्रिटिशांविरुद्ध संघर्ष करून स्वातंत्र्यसंग्रामाची ज्योत पेटविली. तिचे स्मारक उभारण्यासाठी संघर्ष करण्याची वेळ येऊ नये. तिचे जिवंत स्मारक उभारण्यासाठी कालबद्ध कार्यक्रम आखण्यासाठी ग्रामस्थांनीच आग्रह धरला पाहिजे.
      श्री. रानडे, रामचंद्र डाफळे आदींनीही यावेळी विचार व्यक्त केले. राजू नेवाळकर यांनी सूत्रसंचालन केले.
-    कोट (ता. लांजा) - झाशीची राणी लक्ष्मीबाईच्या नियोजित स्मारकाच्या ठिकाणी दीपप्रज्वलन
करून जयंती समारंभाचे उद्घाटन करताना अॅड. विलास कुवळेकर. शेजारी अन्य मान्यवर.