Sunday 10 January 2016

कीर्तनसंध्या महोत्सव – पुष्प चौथे



माधवराव पेशव्यांची मुत्सद्देगिरी मराठशाहीच्या हिताची – चारुदत्त आफळे

रत्नागिरी : माधवराव पेशवे मुत्सद्दी होते. अल्पायुष्यात त्यांनी त्यांच्या या स्वभावाची चुणूक दाखवली. इंग्रजाने सत्ता प्रस्थापित करण्याच्या हेतूने व्यापारी कंपनीचा माल ठेवण्यासाठी वसई, साष्टीमध्ये किल्ले बांधण्याची परवानगी मागितली. पण माधवरावांनी इंग्लंडमध्ये आम्हालाही दोन किल्ले बांधण्यास जागा द्यावी, ती मिळाली की आम्हीसुद्धा परवानगी देऊ, असे सांगून इंग्रजाची बोळवण केली. माधवराव असेपर्यंत आपल्याला येथे हातपाय पसरता येणार नाहीत, याची इंग्रजांना कल्पना आली, असे सांगत राष्ट्रीय कीर्तनकार चारुदत्त आफळेबुवा यांनी पेशवाईची महती सांगितली.
रत्नागिरीच्या स्व. प्रमोद महाजन क्रीडा संकुल येथे कीर्तनसंध्या परिवार आयोजित कीर्तन महोत्सवाच्या चौथ्या दिवशी ते बोलत होते. पानिपताच्या दुसऱ्या लढाईतील विजय आणि माधवराव पेशव्यांचे गुणवर्णन त्यांनी केले.
उत्तररंगामध्ये ते म्हणाले, पानिपतातील पहिल्या माघारीचा पराभव नानासाहेब पेशव्यांच्या जिव्हारी लागला. त्यानंतर त्यांचे अवघ्या ५० दिवसांनी निधन झाले. त्यांच्या जागी १६ वर्षांच्या माधवराव पेशव्यांची निवड झाली. काका राघोबा (रघुनाथराव) याचा कारस्थानी, अंतःस्थ स्वभावामुळे त्यांच्याऐवजी माधवरावांना qशदे, तुकोजी होळकर, रामशास्त्री प्रभुणे, नाना फडणवीस यांची भक्कम साथ मिळाली. मात्र राज्यकारभाराऐवजी अध्यात्माकडे वळलेल्या कोवळ्या वयातील माधवरावांची रामशास्त्रींनी कानउघाडणी केली. निस्पृहतेसाठी प्रसिद्ध असलेल्या रामशास्त्रींनी कलावंतीण, घरकाम करणाऱ्या बायका, नोकर विकण्याची प्रथा सर्वप्रथम बंद केली.
श्री. आफळे यांनी सांगितले, वीस वर्षांचा माधवराव कर्नाटक मोहिमेवर गेल्यानंतर राघोबाने पैठण लुटले. त्यादरम्यान पुणे लुटणाऱ्या निजामाला मदत करणारा माधवरावांचा मामा त्र्यंबक रास्ते याला ५० लाखांचा दंड रामशास्त्रींनी ठोठावला. त्यावेळी आईने दंड करू नको नाही तर मी घर सोडून जाईन व पुन्हा कधीही भेटणार नाही अशी माधवरावांना शपथ घातली. पण माधवराव न्यायाच्या बाजूने उभे राहिले. त्यांची आई गोपिकाबार्इंनी शनिवारवाडा सोडला व त्या नाशिकला गेल्या. त्यानंतर या दोघांची कधीही भेट झाली नाही.
माधवरावांबाबतचा एक किस्सा सांगितना आफळे म्हणाले, पेशव्यांच्या परवानगीने इंग्रजांनी बंदरात उभ्या केलेल्या बोटींवरील माल विसाजी लेले यांनी लुटला मात्र स्वराज्याच्या तिजोरीत न भरता तो स्वतःसाठी ठेवला. त्या प्रकरणात न्यायदानावेळी न्यायासमोर पेशव्यांचा मुलाहिजा ठेवणार नाही, असे रामशास्त्रींनी बजावले. त्याचा गैरअर्थ घेऊन राघोबाने रामशास्त्रींना माधवरावांसमोर उभे केले. पण माझे विधान बदलणार नाही, असे सांगितल्यानंतर माधवरावांनीही रामशास्त्रींना मोत्यांची माळ व खंजीर दिला व माझ्याबाबतीतही असाच न्याय करा, असे सांगितले.
पानिपतावरील पहिल्या लढाईत झालेल्या पराभवाचे उट्टे काढण्यासाठी आठ वर्षांनी ५५ हजारांची मराठी फौज पानिपतावर गेली. क्षय झाल्यामुळे माधवरावांना मात्र मोहिमेवर जाता आले नाही पण त्यांनी उत्तरक्रिया म्हणजे उत्तर दिशेला पानिपतावर मारल्या गेलेल्या मराठ्यांचे श्राद्ध न करता विजय मिळवून उत्तरक्रिया करा, असा आदेश दिला. या लढाईत मराठे विजयी झाले. यावर स्वा. सावरकरांनी उत्तरक्रिया हे नाटक लिहिले आहे. लढाईनंतर थेऊरच्या गणेशासमोर माधवरावांनी प्राण सोडला. तत्पूर्वी राघोबादादांनी पेशवाईचा हिस्सा मागितला व माधवरावांनी पेशवाई हे स्वराज्य आहे, वाटणीची गोष्ट नव्हे असे सांगितले. पण हिंदवी स्वराज्यात राघोबाचा अडथळा येऊ नये म्हणून थोडी तरतूद करून दिली. तरीही नंतर राघोबादादांनी पेशवेपदावर बसलेला माधवरावांचा भाऊ नारायणाचा बळी घेतला, असे श्री. आफळे यांनी सांगितले. अन्यायासी राजा न करी जरी दंड संत तुकारामांचा अभंग, तेजोनिधी लोहगोल हे नाट्यपद सुरेख झाले.

पाने वाहण्यापेक्षा बेलाची झाडे लावा
श्री. आफळे यांनी शरण हनुमंता या अभंगाने पूर्वरंग सुरू केला. हनुमंतांची नवविधा भक्ती वर्णन केली. आपण अमराठी प्रांतात गेलो की तिथली भाषा लगेच शिकतो पण अन्य भाषिक मातृभाषेला विसरत नाहीत. त्यामुळे आपण संस्कृत व मराठीची जोपासना केली पाहिजे. परिस्थितीनुसार पद्धती बदलायला हव्यात. पूर्वी अकरा लाख बेलपत्रे वाहत असत. आता झाडे तोडली गेली. पर्यावरणाची हानी झाली. म्हणून आता बेलाची पाने वाहण्याऐवजी अकरा बेलाची झाडे लावायला हवीत, हेच खरे पूजन होय, असा समाजोपयोगी संदेश श्री. आफळेबुवांनी दिला.
धोतर, सदरा हा हिंदूचा पारंपरिक वेष आहे. इंग्रजांनी भारतात पँट, शर्टचा प्रचार केला. आपण ते विसरलो. किमान आपल्या धार्मिक सणावेळी qकवा उत्सवामध्ये पारंपरिक वेष परिधान करा व संस्कृती जपण्यास हातभार लावा, असे आवाहनही त्यांनी केले.

No comments:

Post a Comment