Tuesday 12 January 2016

कीर्तनसंध्या रत्नागिरी- २०१६ पुष्प पाचवे आणि अखेरचे

बारभाईंनी अखंड भारतात वाढवला मराठशाही, पेशवाईचा दरारा



     
        रत्नागिरी - वयाच्या अवघ्या चाळिसाव्या दिवशी सवाई माधवराव पेशवे झाले. त्यांच्या पालनपोषणासह वीस वर्षे बारा मंत्र्यांनी मराठशाही जगण्यासाठी व वाढण्यासाठी बहुमोल योगदान दिले. ५२ लढाया जिंकल्या आणि मराठशाहीचा दरारा एवढा वाढवला की फारशी मोठी युद्धे करावी लागली नाहीत. इंग्रजांनाही रोखून धरले होते, असे प्रतिपादन राष्ट्रीय कीर्तनकार चारुदत्त आफळेबुवा यांनी केले.
             रत्नागिरीच्या कीर्तनसंध्या परिवाराने आयोजित केलेल्या पाच दिवसांच्या कीर्तन महोत्सवाची सांगता रविवारी (ता. १०) रात्री स्व. प्रमोद महाजन क्रीडा संकुलात झाली. त्यावेळी ते बोलत होते. त्यांना प्रसाद करंबेळकर, हर्षल काटदरे, राजा केळकर आणि महेश सरदेसाई यांनी साथसंगत केली.
आफळेबुवांनी यावेळी पेशवाईतील सुवर्णक्षण सांगितले. माधवरावांच्या मृत्यूनंतर धाकटे बंधू नारायणराव पेशवे झाले. नाना फडणवीसांनी राघोबाच्या घरावर पहारे बसवले. एका वर्षात राघोबांनी दहा वेळा पळून जाण्याचा प्रयत्न केला. नारायणरावाला धरावे असे पत्र लिहिले. त्यात आनंदीबाईने
धचा मा केला अशी दंतकथा सांगितली जाते. याला इतिहासात पुरावा नाही व धचा मा करण्याकरिता पत्रात तेवढी जागा नव्हती व मा करणे शक्यच नव्हते. पेशव्यांच्या गणेशोत्सवात अनंत चतुर्दशीला नारायणास कैद करावे, असे सुमेर सिंग गारद्याला सांगण्यात आले. त्या बदल्यात स्वराज्याचा ३ लाखांचा हिस्सा तोडण्याचे ठरले. ७०० गारदी शनिवारवाड्यात घुसले. पानिपतातील विजयानंतर आमचे पगार वाढला नाही, अशी दंडेलशाही करत गारद्यांनी नारायणाचा पाठलाग केला. काका मला वाचवा असे ओरडत नारायण राघोबाच्या खोलीत घुसले. पण गारद्यांनी राघोबाला तलवारीचे भय दाखवून नारायणाला हिसकावले व शनिवारवाड्यातच नारायणचा वध केला, असे बुवा म्हणाले. या घटनेने पुणे हादरले आणि पेशव्यांच्या रामशास्त्री, नाना फडणवीस, महादजी शिंदे अशा बारा मंत्र्यांनी राज्यकारभार चालविण्याचे ठरविले. त्याला बारभाईंचे कारस्थान असेही म्हणतात. मुळा नदीच्या काठी शिवपिंडी करून पूजन केले. प्रजेचे अहित करणाऱ्यांच्या हातात सत्ता द्यायची नाही, प्रसंगी मरू पण मराठशाहीची सत्ता वाढवू अशी शपथ घेण्यात आली. नारायणाच्या मृत्यूनंतर अवघ्या चौदा दिवसांतच राघोबाने पेशवाईची वस्त्रे घातली. न्यायाधीश रामशास्त्री प्रभुणे यांनी राघोबाला नारायण वधाचे कारस्थान तुमचेच आहे, त्यामुळे देहांत प्रायश्चित्त घ्यावे लागेल, असे ठणकावले. राघोबाने ते नाकारल्याचे आफळेबुवांनी सांगितले.
            श्री. आफळे पुढे म्हणाले, बारभाईंनी सातारच्या छत्रपती शाहूंना सांगून राघोबाला कर्नाटक मोहिमेवर पाठवले आणि तेवढ्या काळात त्याची पेशवाईही रद्द करवून घेतली. राघोबा पोर्तुगीजांकडे मदतीसाठी गेला. नंतर इंग्रजांकडे गेला. इंग्रजांनी पुण्यावर हल्ला चढवण्याच्या उद्देशाने पत्र लिहिले. फ्रेंचांचा पाडाव करायला जात आहोत म्हणून आम्हाला स्वराज्यातून प्रवेश द्यावा, असे त्यांनी सांगितले. ही चाल नाना फडणविसांना कळताच ती नाकारली. पण इंग्रज निघाले होते. ते वडगावपर्यंत पोहोचले. तेव्हा इंग्रजांचे ते पत्र दाखवून फ्रेंचांची मदत घेतली. तोफगोळे उडवण्याकरिता फ्रेंचांनी तंत्रज्ञ दिले आणि भिऊराव पानसेंच्या तोफखान्याने इंग्रजांना तह करण्यास भाग पाडले. राघोबाला आमच्या हवाली करा, ४० लाख रुपये भरपाई असे तहात ठरले. अशा मुत्सद्देगिरीमुळे नानांचा डंका इंग्लंडमध्ये वाजला.
     नारायणाची पत्नी पुरंदर किल्ल्यावर प्रसूत झाली व चाळीस दिवसांच्या त्या बाळाला सवाई माधवराव नाव ठेवून पेशवेपद दिले. बारभाईंनी वीस वर्षे सवाई माधवरावांची देखभाल करताना मराठशाही जगवली. मराठशाहीचा दरारा वाढल्यानेच फारशी मोठी युद्धे झाली नाही. पण सुमारे पन्नास युद्धे झाली. इंग्रजांनी मान वर काढली नाही. तिकडे सातारच्या गादीला वारस नसल्याने बारभाईंनी त्र्यंबक भोसलेंच्या पुत्राला गादीवर बसवले. मध्य प्रदेशातील सागर संस्थानाजवळील किल्ला इंग्रजांनी जिंकल्यावर एक पाय नसूनही महादजी शिंद्यांनी पराक्रम दाखवून इंग्रजांना पराभूत केले. सवाई माधवरावाला मंत्र्यांमध्ये फूट पाडण्यासाठी फितविण्याचे प्रयत्न व्हायचे. पण एकदा त्याने महादजी व नाना हे स्वराज्याचे दोन्ही आहेत, त्यांना कसे तोडू असे सांगून बुद्धिचातुर्य दाखवले, असे बुवांनी सांगितले.
             बुवा म्हणाले, पानिपतच्या पराभवानंतर सदाशिवरावभाऊ सापडले नाहीत. त्यांचे नाव घेऊन काही तोतये आले होते. त्यापैकी एकाने तर आपणच सदाशिवभाऊ असल्याचे अनेक पुरावे दिले. सदाशिवभाऊंच्या पत्नी पार्वतीकाकू तेव्हा जिवंत होत्या. कर्मठ पेशवाईमध्येही त्यांनी सौभाग्यलेणी उतरवली नव्हती. तिच्या पतिव्रतेला कसं फसवणार, असे विचारताच मग त्या तोतयाने कबुली दिली. जय देव जय देव जयजय शिवराया ही आरती, फ्रेंचांचा पाडाव करण्या, मोरया मोरया गणपती बाप्पा मोरया अशा पदांनी कीर्तनात रंग भरला.
               पूर्वरंगात बुवांनी शरण हनुमंता, तुम्हा रामदूता यावर निरूपण केले. हनुमंताची महती वर्णन केली. संत नामदेवांनी विठ्ठलाचे कार्य घुमान (पंजाब) येथे नेले. त्यामुळे. भा. साहित्य संमेलन तेथे घडू शकले, असे सांगितले. लहान मुलांनी हनुमंताचा आदर्श ठेवायला हवा. संभाव्य युद्धाला तोंड देण्यासाठी शंभर सूर्यनमस्काराची पद्धत घराघरात सुरू झाली पाहिजे. शारीरिक क्षमता वाढवण्यासाठी प्रयत्न करा, असे आवाहन केले.

स्वा. सावरकर व बाबारावांची राष्ट्रभक्ती

                      अंदमानातून सुटताना दादूलाल या कैद्याने स्वा. सावरकरांच्या गळ्यात ङ्कुलांची माळ घातली. त्यावेळी मोठे बंधू बाबाराव हेसुद्धा सुटले. ते महाराष्ट्रात परत आले तेव्हा काहींनी बाबारावांना सांगितले, तुम्ही त्रास सोसला व माळ धाकट्या भावाच्या गळ्यात. तुम्ही वेगळे व्हा, असा सल्ला दिला. त्यावर बाबारावांनी सांगितलेले उत्तर महत्त्वाचे आहे. स्वातंत्र्यदेवीचे मंदिर उभारताना मी पायरी झालो आणि विनायकाला गाभाऱ्यात फुलांची जागा मिळाली. अनेक भक्त पायरीला नमस्कार करून आत जातात म्हणून कोणाचेच महत्त्व कमी होत नाही. असे बाबाराव म्हणाले. ही गोष्ट सर्वांनी ध्यानात घ्यायला हवी. रत्नागिरीत स्वा. सावरकरांनी मोठे योगदान दिल्याचेही श्री. आफळे यांनी सांगितले.

                     कीर्तनसंध्या परिवाराची सामाजिक बांधिलकी

      
रत्नागिरी - कीर्तन महोत्सवात पालिकेच्या स्वच्छतादूतांकरिता
नगराध्यक्ष महेंद्र मयेकर यांच्याकडे हातमोजे देताना आफळेबुवा.
शेजारी बाळ माने, अशोक मयेकर आदी.

कीर्तनसंध्याने गेल्या वर्षी रत्नागिरी शहरातील स्वच्छतादूतांचा हृद्य सत्कार केला होता. त्याचा पुढचा भाग म्हणून सांगतेच्या दिवशी कीर्तनसंध्याने या १०० दूतांना हातमोजे देण्यात आले. जोगेंद्र जाधव, प्रीतम कांबळे, योगेश मकवाना यांना प्रातिनिधिक स्वरूपात नगराध्यक्ष महेंद्र मयेकर, माजी आमदार बाळ माने व माजी नगराध्यक्ष अशोक मयेकर यांच्या हस्ते त्याचे वाटप केले. आफळेबुवांच्या हस्ते उर्वरित हातमोजे नगराध्यक्षांकडे सुपूर्द करण्यात आले. आफळेबुवांनीही या उपक्रमाचे कौतुक करून समाजातील अन्य संस्थानीही असे काम करावे, असे सांगितले. पुण्यामध्ये महानगरपालिकेने माझ्याकडून स्वच्छतेविषयी कीर्तन करून घेतले. त्याची सीडी दररोज घंटागाडीमध्ये वाजवली जाते. कचरा उचलणाऱ्यांना आपण कचरावाले असे न म्हणता स्वच्छता करणारे दूत म्हटले पाहिजे. मंदिरामध्ये दररोजच्या निर्माल्यापासून खतनिर्मितीचा प्रकल्पही करता येईल. यासाठी रत्नागिरीतील तरुणांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहन आफळेबुवांनी केले.

आफळेबुवांसोबत कीर्तनसंध्या परिवार
            प्रतिमहा कीर्तनसेवा, व्हिडिओ दाखवणे, एखादे राष्ट्रभक्तीवरील उद्बोधक भाषण ऐकवणे असे कार्यक्रम कीर्तनसंध्यातर्फे आयोजित करण्यात येणार आहेत, असे यावेळी जाहीर करण्यात आले. एसटीने महोत्सवातकरिता आलेल्या श्रोत्यांसाठी शहर वाहतुकीच्या जादा गाड्यांची सोय केली होती. नगरपालिकेने मोबाइल प्रसाधनगृह देऊन मोलाचे सहकार्य केले.
            कीर्तन महोत्सव यशस्वी करण्यासाठी अवधूत जोशी, नितीन नाफड, रत्नाकर जोशी, मकरंद करंदीकर, गुरुप्रसाद जोशी, उमेश आंबर्डेकर, गौरांग आगाशे, योगेश हळबे, अभिजित भट, योगेश गानू, कौस्तुभ आठल्ये, धनंजय मुळ्ये, महेंद्र दांडेकर, उदयराज सावंत, ओम साई मंडप डेकोरेटर्स, गुरुकृपा मंगल कार्यालय, श्री. पावसकर, माधव कुलकर्णी, विनीत फडके आणि पराग हेळेकर यांनी मेहनत घेतली.

­­­­­­­­

कीर्तन महोत्सवासाठी झालेली गर्दी.

(माऊली फोटोज, रत्नागिरी)

..............................

No comments:

Post a Comment