Wednesday 28 October 2015

राणी लक्ष्मीबाईची जयंती थाटात साजरी करणार



कोट-कोलधे ग्रामस्थांचा निर्णय :  १९ नोव्हेंबर रोजी कोट येथे विविध कार्यक्रम

लांजा :  लांजा तालुक्यातच माहेर आणि सासर असलेली झाशीची राणी लक्ष्मीबाई हिची १७१ वी जयंती कोट येथे राणीच्या सासरच्या गावी थाटात साजरी करण्यात येणार आहे. कोट आणि राणीचे माहेरघर असलेल्या कोलधे येथील ग्रामस्थांच्या नुकत्याच झालेल्या संयुक्त बैठकीत याबाबतचा निर्णय झाला. जयंतीच्या निमित्ताने १९ नोव्हेंबर या जयंतीदिनी विविध कार्यक्रम आयोजित करण्याचे निश्चित करण्यात आले.
      ब्रिटिशांविरुद्धच्या १८५७ सालच्या पहिल्या स्वातंत्र्यलढ्यात झाशीच्या राणीने महत्त्वाची भूमिका निभावल्याचा इतिहास आहे. `मेरी झाँसी नही दूंगी` ही तिची स्फूर्तिदायी घोषणा क्रांतिकारकांना प्रेरणादायी ठरली. राणीने १८५८ साली ब्रिटिश सैन्याविरोधात ११ दिवस लढाई केली. या लढाईचा साक्षीदार असलेले ब्रिटिश सेनानी आणि कर्तबगार राजकारणी सर ह्यू रोज यांनी सर्वोत्कृष्ट सैनिक आणि सर्वाधिक हिंमतवान व्यक्ती असे राणीचे वर्णन केले होते. मनकर्णिका तांबे असे नाव असलेल्या या राणीचे मूळ गाव कोलधे (ता. लांजा) येथे, तर कोट (ता. लांजा) येथील नेवाळकरांकडे तिचे सासर होते. विवाहानंतर राणीचे नाव लक्ष्मीबाई नेवाळकर असे झाले. विवाहानंतर ती झाशी येथे राहायला गेली, तरी ती तिच्या सासर-माहेरी तसेच रत्नागिरीतील रत्नदुर्ग किल्ल्यावरील भगवतीच्या दर्शनासाठी आल्याचे उल्लेख आढळतात. कोकणवासीयांना आणि प्रामुख्याने लांजा तालुक्याला राणीचा अभिमान आहे.
     
तिच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी येत्या १९ नोव्हेंबर २०१५ रोजी राणीची जयंती प्रथमच मोठ्या उत्साहात साजरी करण्याचा निर्णय नुकत्याच झालेल्या बैठकीत घेण्यात आला. त्यासाठी राणी लक्ष्मीबाई स्मारक समिती स्थापन करण्यात आली आहे. या समितीतर्फे झालेल्या बैठकीला उपसरपंच कृष्णा आगरे, दिनकर नेवाळकर, मिलिंद पाध्ये, दिलीप मेस्त्री, संतोष मांडवकर, प्रभाकर रेवाळे, शांताराम सुर्वे, नंदकुमार नेवाळकर,
अॅड. विलास कुवळेकर, प्रफुल्ल सप्रे, डॉ. अशोक शहाणे, वसंत थोरात, सूर्यकांत सरदेसाई, वसंत देसाई, अविनाश बागाव, सुधीर तांबे, वसंत घडशी, संतोष तांबे, दत्तभूषण पराडकर, विजय कुरूप, प्रसन्न दीक्षित, जितेंद्र खानविलकर, दत्ताराम गोरुले इत्यादी राणीचे स्थानिक वंशज, माहेरच्या कोलधे येथील ग्रामस्थ, तालुक्यातील इतिहासप्रेमी उपस्थित होते. बैठकीत समारंभाचा तपशील ठरविण्यात आला. त्यानुसार जयंतीदिवशी राणीची ऐतिहासिक आणि कौटुंबिक माहिती असणारे अभ्यासक, त्यांच्याबद्दल आदर असणाऱ्या सर्वांना निमंत्रित करण्यात आले आहे. सकाळच्या सत्रात विचारांचे आदानप्रदान होईल. दोन वर्षांपूर्वी तत्कालीन पालकमंत्री उदय सामंत यांनी राणीच्या आठवणी जपण्यासाठी कोट येथे स्मारक उभारून गावाची पर्यटनस्थळ म्हणून नोंद करण्यास मान्यता दिली होती. त्याबाबतही यावेळी चर्चा होईल. दुपारी डॉ. सच्चिदानंद शेवडे यांचे व्याख्यान होईल.
राणी लक्ष्मीबाईच्या जयंतीसाठी कोट येथे उपस्थित राहावे. तसेच अधिक माहितीसाठी ९४२२७३४३६६, ८९७५४०९०५४, ९२७०९८५२०० किंवा ९२७०९६३५७४ या दूरध्वनी क्रमांकांवर संपर्क साधावा, असे आवाहन स्मारक समितीतर्फे करण्यात आले आहे.
 

Thursday 22 October 2015

कुरतडे येथे शुक्रवारपासून भरणार आठवडा बाजार



महिला बचत गटांच्या उत्पादनांना हमखास बाजारपेठ उपलब्ध


रत्नागिरी : तालुक्यातील कुरतडे येथे येत्या शुक्रवारपासून (ता. २३ ऑक्टोबर) आठवडा बाजार भरणार आहे. त्यामुळे परिसरातील अनेक गावांची सोय होणार असून प्रामुख्याने महिला बचत गटांच्या उत्पादनांना जवळच बाजारपेठ उपलब्ध होणार आहे.
ग्रामस्थांच्या वेळेची आणि आर्थिक बचत व्हावी, तसेच ताजा, दर्जेदार माल उपलब्ध व्हावा,  यासाठी कुरतडे येथे आठवडा बाजार भरवावा, अशी अनेक वर्षांची ग्रामस्थांची मागणी होती. ज्येष्ठ ग्रामस्थ नारायण पालवकर यांनी या मागणीचा सातत्याने पाठपुरावा केला. परिसरातील व्यापाऱ्यांच्या गाठीभेटी घेतल्या. त्यानंतर कुरतडे ग्रामपंचायतीने आठवडा बाजार सुरू करण्याचा ठराव मंजूर केला. त्याची अंमलबजावणी येत्या शुक्रवारपासून होणार आहे.
या आठवडा बाजाराचा लाभ कुरतडे गावासह डुगवे, आगवे, हरचिरी, चांदोर, तोणदे, हातीस इत्यादी गावांना होणार आहे. या सर्व गावांना कुरतडे हे मध्यवर्ती ठिकाण असल्याने या गावांमधील ग्रामस्थ आणि व्यापाऱ्यांनाही होणार आहे. या सर्व गावांमध्ये शासनाच्या ग्रामीण विकासाच्या विविध योजनांमधून महिलांचे अनेक बचत गट स्थापन झाले आहेत. या गटांनी विविध उत्पादने तयार केली आहेत. त्यांना आपली उत्पादने जवळच्या चांदेराईतील आठवडा बाजारात किंवा रत्नागिरी आणि इतरत्र विक्रीसाठी न्यावी लागत होती. त्यामुळे नफ्याच्या प्रमाणात घट होत होती. आता गावातच हक्काची बाजारपेठ उपलब्ध झाल्याने बचत गटांच्या उत्पादनांची विक्री मोठ्या प्रमाणावर व्हायला मदत होणार आहे.
कुरतडे येथील आंब्रे यांच्या दुकानाजवळच्या विस्तीर्ण माळावर आठवडा बाजार भरणार असून त्याचा ग्राहकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

...........................
(संपर्क – नारायण पालवकर – 9403614782)

Wednesday 21 October 2015

फिनोलेक्स कामगार संघटनेची सामाजिक बांधिलकी कौतुकास्पद



अॅड. विलास पाटणे – स्नेहसंमेलनात अंध विद्यालयाच्या संगीत कार्यक्रमाने भरली रंगत


रत्नागिरी : एखाद्या कामगार संघटनेने सामाजिक भान ठेवणे ही फारच दुर्मिळ बाब आहे. म्हणूनच फिनोलेक्स कामगार संघटनेने स्नेहसंमेलनाच्या निमित्ताने अंध विद्यालयाच्या मदतीसाठी कार्यक्रम आयोजित करणे कौतुकास्पद आहे, असे उद्गार रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीचे कार्याध्यक्ष अॅड. विलास पाटणे यांनी येथे काढले.
-    रत्नागिरी – फिनोलेक्स कामगार संघटनेच्या स्नेहसंमेलनात बोलताना
अॅड. विलास पाटणे. शेजारी (डावीकडून) योगेश सामंत, प्रतिभा सेनगुप्ता,
किशोर सुखटणकर, टी. के. काकडे.
संघटनेने खातू नाट्यगृहात आयोजित केलेल्या समारंभात प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. यावेळी घराडी (ता. मंडणगड) येथील स्नेहज्योती अंध विद्यालयाच्या मुख्याध्यापिका प्रतिभा सेनगुप्ता, गोगटे-जोगळेकर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. किशोर सुखटणकर, फिनोलेक्स इंडस्ट्रीजच्या एच. आर. विभागाचे महाव्यवस्थापक टी. के. काकडे व्यासपीठावर होते. अॅड. पाटणे पुढे म्हणाले, ज्या संस्थेच्या मदतीसाठी हा कार्यक्रम आयोजित केला आहे, ते अंध विद्यालय म्हणजे सामाजिक बांधिलकीचे उत्तम उदाहरण आहे. आशा कामत आणि प्रतिभा सेनगुप्ता या भगिनींनी आपल्या माहेरची सर्व जागा विद्यालयासाठी दिली. अंधांच्या प्रगतीसाठी अहोरात्र कष्ट घेतले. मिशन म्हणून हे आदर्शवत आहे. जगभरातच अंधांची समस्या मोठी आहे. जगभरातल्या अंधांपैकी एकतृतीयांश अंध भारतात राहतात. अशाच अंधांपैकी बेनो झेपीन नावाची एक अंध विद्यार्थिनी पहिल्याच प्रयत्नात केंद्रीय लोकसेवा आयोगाची परीक्षा उत्तीर्ण झाली आणि केंद्र शासनाच्या प्रशासनात ती आता कार्यरत आहे. तिच्यासारख्या अनेक प्रेरणादायी व्यक्ती अंधांना नवीन प्रकाशवाटा निश्चितच दाखवतील.
स्नेहसंमेलनात अंध विद्यालयाविषयी माहिती देताना प्रतिभा सेनगुप्ता.  
प्राचार्य डॉ. सुखटणकर यांनीही अंध विद्यालयाला आणि फिनोलेक्स कामगार संघटनेच्या सामाजिक कार्याला शुभेच्छा दिल्या. कौटुंबिक स्नेहमेळावा जवळीक निर्माण करायला मदत करतो, असेही ते म्हणाले. अंध विद्यालयाचे कार्य ऐकल्यानंतर या विद्यालयाला फिनोलेक्स कंपनीही विद्यालयाला शक्य तेवढी मदत करील, असे आश्वासन फिनोलेक्स इंडस्ट्रीजचे महाव्यवस्थापक (एचआर) यांनी दिले आणि त्यांनी कामगार संघटनेच्या कार्याचे कौतुक केले. औद्योगिक क्षेत्रातील वाढत्या स्पर्धेचा विचार करता व्यवस्थापन आणि कामगार संघटनांनी यापुढे एकाच व्यासपीठावर येऊन काम करण्याची गरज आहे, असेही त्यांनी सांगितले. मुख्याध्यापिका सेनगुप्ता यांनी तेरा वर्षांपूर्वी स्थापन झालेल्या स्नेहज्योती अंध विद्यालयाचा धावता आढावा घेतला. सुरुवातीला केवळ ४ मुले असलेल्या या निवासी शाळेत आता ३० मुले आहेत. प्रारंभी एका घरात भरणारी ही शाळा आता लोकांच्या पाठिंब्यामुळे मोठी झाली असली, तरी मुले घरच्यासारखीच राहतात. त्यांना संगीत साधना दिली जाते आणि मुख्य म्हणजे त्यांच्यामध्ये आत्मविश्वास निर्माण झाला आहे. त्या जोरावर ते आपले आयुष्य सुखासमाधानाने जगू शकतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
स्नेहसंमेलनात कामगार संघटनेचे कौतुक करताना टी. के. काकडे
संघटनेचे संजय चव्हाण यांनी प्रास्ताविकात २००२ साली स्थापन झालेल्या संघटनेच्या कार्याचा आढावा घेतला. छोटेमोठे सामाजिक उपक्रम, रक्तदान शिबिर, शाळांना पिण्याच्या पाण्याच्या टाक्या देणे असे अनेक उपक्रम संघटनेने राबविले असून कंपनीनेही त्यासाठी सहकार्य केल्याचे त्यांनी सांगितले. यावर्षी प्रथमच स्नेहसंमेलनातून सामाजिक उपक्रम राबविण्याचा प्रयत्न केल्याचे ते म्हणाले.
संघटनेचे अध्यक्ष योगेश सामंत यांनी सामाजिक उपक्रम राबविण्याच्या संकल्पनेविषयी अधिक माहिती दिली. अंध विद्यालय केवळ देणगी स्वीकारत नाही. कार्यक्रम सादर केल्यानंतर बिदागी म्हणून विद्यालयाकडून देणगी स्वीकारली जाते. हे धोरणच विचार करायला लावणारे वाटले, असे त्यांनी सांगितले. संघटना, कंपनीतील कॅटरर्स आणि विविध उद्योगांतर्फे ६१ हजाराचा निधी श्रीमती सेनगुप्ता यांच्याकडे अंध विद्यालयासाठी मदत म्हणून सुपूर्द करण्यात आला. याशिवाय आविष्कार मतिमंद शाळा आणि अभ्यंकर मूकबधिर विद्यालयातील मुलांनाही संघटनेतर्फे खाऊवाटप करण्यात आले.
यावेळी सदस्यांच्या विशेष प्रावीण्य मिळविणाऱ्या पाल्यांचा सत्कार करण्यात आला. त्यामध्ये तन्मय जाधव, अंकिता बापट (सातवी शिष्यवृत्ती), सुश्मिता पालकर, अमृता चांबले, नेहा झगडे, नम्रता चांबले (दहावी) आणि शाल्वी पाटील (बारावी) या विद्यार्थ्यांचा समावेश होता. श्री. घारकर यांनी आभार मानले.
............................................

अंधांच्या कार्यक्रमाने सभागृह दणाणले

घराडी अंध विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी यावेळी सादर केलेल्या स्वरझंकार सांगीतिक कार्यक्रमाने सभागृह दणाणून सोडले. त्यामध्ये चित्रपट आणि नाट्यगीते, भक्तिगीते, लावणी, पथनाट्य, नृत्य अशा विविध प्रकारांचा समावेश होता. ओंकारस्वरूपा या गीताने मैफलीची सुरवात झाली. अनेक गाण्यांना प्रेक्षकांनी ठेका धरला. वाजले की बारा या नटरंग चित्रपटातील लावणीला तर वन्समोआर मिळाला. विद्यार्थ्यांना राकेश सोळंकी, गणेश काकडे, मनीष व्याघ्रांबरे या संगीत शिक्षकांनी साथ दिली. मीरा भावे यांनी ओघवत्या शैलीत रसपूर्ण निवेदन केले.
...............................................
-    फिनोलेक्स कामगार संघटनेच्या स्नेहसंमेलनात स्वरझंकार सादर करताना घराडी (ता. मंडणगड) येथील स्नेहज्योती अंध विद्यालयाचे विद्यार्थी