Wednesday 30 December 2015

रत्नागिरीत आजपासून (ता. ६) कीर्तन महोत्सव

     चारुदत्त आफळे यांची कीर्तनमालिका


रत्नागिरी : येथील कीर्तनसंध्या संस्थेतर्फे आयोजित केला जाणारा यावर्षीचा कीर्तनसंध्या महोत्सव येत्या ६ ते १० जानेवारी या काळात रत्नागिरीच्या प्रमोद महाजन क्रीडा संकुलात होणार आहे.
              सत्य इतिहासाची ओळख करून देणारा, सामाजिक प्रश्नावर चर्चा करून त्यावर उपाय सांगणारा, लहान मुलांना संस्कारांचे महत्त्व पटवून देणारा आणि सर्व वयोगटातील माणसांना आर्य सनातन वैदिक हिंदू धर्माचे महत्त्व समजावून सांगणारा बहुआयामी कीर्तन महोत्सव येथील कीर्तनसंध्या संस्था गेली पाच वर्षे आयोजित करत आहे. राष्ट्रीय कीर्तनकार चारुदत्त आफळे यांची ही कीर्तनमालिका उत्तरोत्तर रंगत जाते, असा अनुभव रसिकांनी घेतला आहे. कीर्तन महोत्सवातून समाजप्रबोधन केले जात असून त्याचे पहिले पुष्प २२ ते २४ जून २०१२ या काळात गुंफले गेले. त्यावेळी संभाजी महाराजांचे चरित्र असा विषय होता. या महोत्सवाला दररोज ६०० ते ७०० कीर्तनप्रेमी उपस्थित होते. पुढच्या वर्षी २२ ते २४ जानेवारी २०१३ या काळात सुभाषचंद्र बोस या विषयावरचा कीर्तन महोत्सवही रंगला. या महोत्सवाला दररोज १५०० ते १८०० रसिक श्रोते उपस्थित राहत होते. नंतरच्या वर्षी १ ते ५ जानेवारी २०१४ या काळात आफळेबुवांनी शिवचरित्र हे आख्यान सादर केले. दररोज किमान चार हजार श्रोत्यांची उपस्थिती या महोत्सवाला लाभली. गेल्या वर्षी १ ते ५ जानेवारी २०१५ या काळात स्वराज्याकडून साम्राज्याकडे या विषयावर झालेल्या कीर्तन महोत्सवात ५५०० कीर्तनप्रेमी दररोज उपस्थित राहत होते.
         पाचवा कीर्तन महोत्सव यावर्षी ६ ते १० जानेवारी २०१६ या काळात होणार आहे. यावर्षी शिर्के प्रशालेऐवजी आठवडा बाजाराजवळच्या प्रमोद महाजन क्रीडासंकुलात हा महोत्सव होणार आहे. वेळ सायंकाळी ६ ते १० अशीच आहे. यावर्षी मराठेशाहीची देशव्यापी झुंज असा विषय राष्ट्रीय कीर्तनकार चारुदत्त आफळे उलगडणार आहेत. पानिपतच्या लढाया आणि १८५७ पर्यंतच्या काळाचा आढावा आफळेबुवा घेणार आहेत.
        आफळेबुवांना तबलासाथ कणकवलीचे प्रसाद करंबेळकर, ऑर्गनसाथ चिपळूणचे हर्षल काटदरे आणि पखवाजसाथ राजा केळकर करणार आहेत. एस. कुमार्स साऊंड सर्व्हिसेस आणि ओम साई मंडप डेकोरेटर्सचे बहुमोल सहकार्य कीर्तन महोत्सवला लाभणार आहे. कीर्तनसंध्येसाठी सर्व श्रोत्यांना प्रवेश विनामूल्य आहे. देणगीदारांसाठी सन्मानिका उपलब्ध आहेत.
          गेल्या वर्षीच्या कीर्तनांच्या ऑडिओ सीडी तसेच अनंततनय यांनी शंभर वर्षांपूर्वी लिहिलेले आणि सत्त्वश्री प्रकाशनतर्फे पुनर्मुद्रित केलेले झोपाळ्यावरची गीता हे पुस्तक कार्यक्रमस्थळी उपलब्ध करून दिले जाणार आहे.

 या कीर्तनमहोत्सवाचा आस्वाद रत्नागिरीतील जास्तीत जास्त कीर्तनप्रेमींनी घ्यावा, असे आवाहन कीर्तनसंध्या परिवाराच्या वतीने अवधूत जोशी, नितीन नाफड, रत्नाकर जोशी, मकरंद करंदीकर, उमेश आंबर्डेकर, गुरुप्रसाद जोशी आणि योगेश हळबे यांनी केले आहे.

Sunday 27 December 2015

रत्नागिरीत जानेवारीत सावरकर साहित्य संमेलन



रत्नागिरी - अठ्ठाविसावे सावरकर साहित्य संमेलन येत्या जानेवारीत रत्नागिरीत होणार आहे. मुंबईतील सावरकर साहित्य अभ्यास मंडळ आणि सावरकर दर्शन प्रतिष्ठानच्या सहकार्याने रत्नागिरीच्या (जिल्हा) नगर वाचनालयातर्फे हे संमेलन होणार आहे. तीन दिवसांच्या या संमेलनाचे उद्घाटन केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नीतिन गडकरी यांच्या हस्ते २९ जानेवारीला होणार असून केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांच्या हस्ते ३१ जानेवारीला समारोप होईल. रत्नागिरी (जिल्हा) नगर वाचनालयाचे अध्यक्ष दीपक पटवर्धन यांनी ही माहिती दिली.
सावरकर चरित्राचे तसेच साहित्याचे अभ्यासक दादा इदाते यांच्या अध्यक्षतेखाली १८७ वर्षांचा इतिहास लाभलेल्या रत्नागिरी (जिल्हा) नगर वाचनालयात हे संमेलन होईल. संमेलनात परिसंवाद, चर्चासत्राबरोबर सावरकरांच्या कल्पनेतील हिंदू राष्ट्र, भारतातील सामाजिक क्रांती आणि सावरकरांचे योगदान, सावरकरांच्या घराण्याची देशभक्ती, "अनादी मी अवैध मी" या सांस्कृतिक कार्यक्रमाबरोबर "वक्ता दशसहस्रेषु" या विषयावरील वक्तृत्व स्पर्धा होईल. "आंतरराष्ट्रीय राजकारण आणि सावरकरांचे द्रष्टेपण" या विषयांतर्गत "भारताची परराष्ट्र नीती" तसेच भारत आणि चीन सीमेवर होत असलेली घुसखोरी यासारख्या विषयांचा समावेश आहे, असे पटवर्धन यांनी सांगितले.
सावरकरांनी विस्तृत लिखाण केले आहे. त्यांचे साहित्यातील विचार, तत्त्वचिंतन, साहित्यातील विविध पैलू उलगडण्याबरोबर त्यांच्या साहित्यातील देशभक्ती आणि राष्ट्रप्रेमाचे दर्शन नव्या पिढीला व्हावे, यासाठी हे संमेलन घेण्यात येणार आहे. सावरकरप्रेमी, साहित्यप्रेमी नागरिकांनी आणि विशेषत: तरुण मंडळीनी या संमेलनास उपस्थित राहावे, असे आवाहन संयोजकांनी केले आहे.

Wednesday 23 December 2015

पिंपरी साहित्य संमेलनात भालचंद्र नेमाडे यांची प्रथमच मुलाखत



स्वागताध्यक्ष डॉ. पी. डी. पाटील यांची कणकवलीत माहिती

कणकवली : ज्ञानपीठ पुरस्कार विजेते मराठी कादंबरीकार भालचंद्र नेमाडे हे प्रथमच संमेलनाच्या निमित्ताने स्वागत समितीच्या नियोजनानुसार मुलाखत देणार आहेत. त्यांच्या आणि देशातील अन्य आठ ज्ञानपीठ पुरस्कार विजेत्यांच्या मुलाखतीचा काही भाग संमेलनाच्या मंचावरून प्रसारित करण्यात येणार आहे, अशी माहिती संमेलनाचे स्वागताध्यक्ष डॉ. पी. डी. पाटील यांनी येथे दिली.
पिंपरी येथे भरणार असलेल्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे निमंत्रण सिंधुदुर्गवासीयांना देण्यासाठी डॉ. पाटील नुकतेच कणकवली येथे आले होते. त्यावेळी ते पत्रकार परिषदेत बोलत होते. सिंधुरत्न फाऊंडेशनतर्फे येथील नीलम कंट्रीसाइड येथे त्यांची पत्रकार परिषद झाली. यावेळी डॉ. पाटील यांनी प्रथमच संमेलनाच्या प्रसारासाठी मोबाईल बनविण्यात आल्याचे सांगितले. जिंगलही बनविण्यात आल्याचे त्यांनी स्पष्ट केले. यावेळी ज्येष्ठ पत्रकार मधुकर भावे, फाऊंडेशनचे अध्यक्ष डॉ. जयेंद्र परुळेकर, डॉ. मिलिंद कुळकर्णी, सचिन येतकर, कवी अरुण शेवते आदी उपस्थित होते.
डॉ. पाटील म्हणाले, संमेलन फक्त भव्य व्हावे, असाच उद्देश नाही, तर ते वैचारिकदृष्टय़ा अधिक चांगले व्हावे, असाही आमचा प्रयत्न आहे. त्यामुळेच देशातील विविध भाषांतील नऊ ज्ञानपीठ पुरस्कार विजेत्या लेखकांच्या मुलाखती त्यांच्या घरी जाऊन घेण्यात येणार आहेत. त्यातील काही भाग संमेलनात प्रसारित करण्यात येणार आहे. यात डॉ. नेमाडे यांची मुलाखतही घेण्यात येणार असून ते प्रथमच संमेलनाच्या निमित्ताने अशी मुलाखत देत आहेत. आठ ज्ञानपीठ विजेते साहित्यिक साहित्य संमेलनाला उपस्थित राहणार आहेत.
माझी संस्कृती-माझा अभिमानअसा विचार ठेवून हे संमेलन आयोजित करण्यात येत आहे. हिंदी कवी गुलजार आणि मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत या संमेलनाचे उद्घाटन होणार आहे. पहिल्या दिवशी गुलजार यांची,  दुसऱ्या दिवशी शरद पवार यांची, तर तिसऱ्या दिवशी चेतन भगत यांची मुलाखत होणार आहे. संमेलनात बारा परिसंवाद आणि निमंत्रितांची दोन कविसंमेलनेही आयोजित करण्यात आली आहेत. संमेलनानिमित्त अभिनव विद्यापीठात कायमस्वरूपी मराठी अध्यासन सुरू करण्यात येणार आहे, असेही डॉ. पाटील यांनी सांगितले. संमेलनात साहित्य आणि समाज यांची सांगड घालण्यात आली आहे. संमेलनातून महाराष्ट्रातील दुष्काळग्रस्त भागातील आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या कुटुंबांना ७० लाख रुपये देण्यात येणार आहेत, असे स्वागताध्यक्षांनी सांगितले.

Saturday 19 December 2015

चेसमेनतर्फे रत्नागिरी जिल्ह्यात चेस इन स्कूल उपक्रम



प्रशिक्षकांची गरज : महाराष्ट्र बुद्धिबळ संघटनेतर्फे राज्यात हजार शाळांमध्ये राबवणार

रत्नागिरी : महाराष्ट्र बुद्धिबळ संघटनेतर्फे राज्यातील एक हजार शाळांतील पन्नास हजार विद्यार्थ्यांना बुद्धिबळाचे प्राथमिक शिक्षण देण्याचे चेस इन स्कूलचे उद्दिष्ट आहे. रत्नागिरीत चेसमेन संघटनेतर्फे हा उपक्रम तीन वर्षे सुरू असून आतापर्यंत ४०० विद्यार्थ्यांना शिकवले आहे. शाळांमध्ये जाऊन विद्यार्थ्यांना शिकवण्यासाठी प्रशिक्षकांची गरज आहे. याकरिता लवकरच ट्रेन द ट्रेनर्सद्वारे इच्छुकांना प्रशिक्षण दिले जाणार असल्याची माहिती चेसमेनचे अध्यक्ष प्रसन्न आंबुलकर, चेस इन स्कूलचे जिल्हा संघटक चैतन्य भिडे यांनी   पत्रकार परिषदेत दिली.
पत्रकार परिषदेला दिलीप टिकेकर, मंगेश मोडक, विवेक सोहनी, राधा देवळे, सौरभ देवळे आदी उपस्थित होते. बुद्धिबळ शिकण्याचे व खेळण्याचे अनेक ङ्कायदे आहेत. बुद्धिबळ हा ङ्कक्त युद्धतंत्रावर आधारलेला एक खेळ नसून ती एक कला आहे व त्याचा शास्त्रीय पद्धतीने अभ्यास करता येतो. विशेषतः लहान वयात बुद्धिबळाचे धडे गिरवल्यास मुलांना   संयम व एकाग्रता वाढवण्यास, निर्णयक्षमता व चुकलेल्या निर्णयांची स्वतः जबाबदारी स्वीकारण्याची जाणीव विकसित करण्यात मदत होऊ शकते. याशिवाय कल्पनाशक्ती,       लढण्याची जिद्द, स्वतंत्र विचार करण्याची सवय आदी अनेक गुण विकसित केले जाऊ शकतात.
युरोप खंडातील अनेक देशांमध्ये बुद्धिबळ हा शालेय अभ्यासक्रमातला एक अनिवार्य विषय आहे. या धर्तीवर महाराष्ट्र बुद्धिबळ संघटनेने महाराष्ट्रात चेस इन स्कूल हा प्रोजेक्ट राबविला आहे. शालेय मुलांना बुद्धिबळाची तोंडओळख व प्राथमिक धडे देणे, त्यांच्या स्पर्धा भरविणे, बुद्धिबळ खेळण्याकरिता पोषक वातावरण निर्माण करणे हे चेस इन स्कूलचे उद्दिष्ट आहे. २०१२-१३ या शैक्षणिक वर्षात सुरू झालेल्या या प्रकल्पाचे यंदाचे चौथे वर्ष असून, दरवर्षी चेस इन स्कूलला मिळणारा प्रतिसाद वाढत आहे. प्रथम वर्षात प्रायोगिक तत्त्वावर सुरू झालेल्या या प्रकल्पामध्ये मागील वर्षी राज्यातील २३५ शाळा व १२,५०० विद्यार्थी सहभागी झाले. २२ जिल्ह्यांमधील शाळांमध्ये हा प्रकल्प सुरू असून चालू शैक्षणिक वर्षात एक हजार शाळांमध्ये पन्नास हजार विद्यार्थ्यांना सहभागी करून घेण्याचे महाराष्ट्र बुद्धिबळ संघटनेचे उद्दिष्ट आहे. पहिली तीन वर्षे चेस इन स्कूलची वाटचाल ग्रँडमास्टर अभिजित कुंटे यांच्या मार्गदर्शनाखाली झाली. यंदाच्या वर्षापासून सांगलीचे गिरीष चितळे यांनी चेस इन स्कूलच्या कमिशनरपदाची धुरा सांभाळली आहे.
रत्नागिरी जिल्हा पहिल्यापासून चेस इन स्कूलमध्ये सहभागी आहे. जीजीपीएस आणि (कै.) के. प. अभ्यंकर मूकबधिर विद्यालयात सलग तीन वर्षे हा प्रकल्प राबवण्यात आला. या शैक्षणिक वर्षातही या शाळांमध्ये सुरू आहे. याशिवाय सॅक्रेड हार्ट कॉन्व्हेंटमध्ये दोन वर्षे प्रकल्प राबवला. जिल्ह्यात हा प्रकल्प मोठ्या प्रमाणात राबवण्यासाठी चेसमेनला बुद्धिबळ प्रशिक्षकांची आवश्यकता आहे. महाराष्ट्र बुद्धिबळ संघटनेतर्फे बुद्धिबळाचा मान्यताप्राप्त अभ्यासक्रम उपलब्ध करून दिला जातो. येत्या २६-२७ डिसेंबरला कोल्हापूरमध्ये ट्रेन द ट्रेनर्समधून प्रशिक्षकांना तांत्रिक मार्गदर्शन केले जाणार आहे. शालेय पातळीवर बुद्धिबळ कसे शिकवावे, चेस इन स्कूलचा ३२ सत्रांचा अभ्यासक्रम, परीक्षा, शालेय स्पर्धा आदींची माहिती यात दिली जाते.
बुद्धिबळाची तोंडओळख, बुद्धिबळाचा मनोरंजक इतिहास, प्राथमिक धडे दिले जातात. किमान दहा व्यक्तींनी चेसमेन संस्थेशी संपर्क साधून प्रशिक्षण घेतल्यास हा प्रकल्प अधिक जोमाने राबवता येणार आहे. क्रीडा शिक्षकांनाही यात भाग घेता येईल. नव्या वर्षात आणखी तीन शाळांमध्ये उपक्रम सुरू होणार आहे.
चेस इन स्कूल उपक्रमात विद्यार्थ्यांना शिकवण्यासह परीक्षा, स्पर्धा भरवण्याचा समावेश आहे. महाराष्ट्र बुद्धिबळ संघटनेचे विशेष लक्ष या उपक्रमाकडे आहे. तसेच निरीक्षकही शाळांना भेट देऊन पाहणी करतात. त्याचे अहवाल केले जातात. ना नङ्का ना तोटा या तत्त्वार संघटना हे उपक्रम राबवत असून शाळांनी यात सहभागी व्हावे,  असे आवाहन चेसमेन संस्थेने केले आहे.