Monday 21 August 2017

कोकण मीडिया दिवाळी अंकासाठी साहित्य पाठवावे

रत्नागिरीतील साप्ताहिक कोकण मीडियाच्या गेल्या वर्षीच्या पहिल्याच दिवाळी अंकाला मुंबईतील महाराष्ट्र मुक्त पत्रकार संघाचा सर्वोत्कृष्ट दिवाळी अंकाचा पुरस्कार मिळाला. तसाच उत्कृष्ट दिवाळी अंक यावर्षीही प्रसिद्ध करण्यात येणार आहे.
       कोकणाला स्वतःचा इतिहास आणि संस्कृती आहे. इतिहासाचे साक्षीदार असलेले अनेक प्राचीन वाडे, किल्ले आणि वास्तू कोकणात आहेतपालघर जिल्ह्यातील ६३२ वर्षांचा ऐतिहासिक वारसा लाभलेला जव्हारमधील जुना राजवाडा, चारशे वर्षांचा वसईचा किल्ला, मुंबईतील सव्वाशे वर्षे पूर्ण करणाऱ्या महापालिका आणि छत्रपती शिवाजी टर्मिनससारख्या इमारती, रत्नागिरीचा शतकोत्सवी थिबा राजवाडा, रत्नागिरीचा थिबा राजवाडा, चारशे वर्षांपूर्वीचा २५०० चौरस फूट विस्ताराचा तीनमजली २७ खोल्यांचा रहस्यमय मांडणीचा प्रशस्त आणि शीतलता देणारा सिंधुदुर्ग किल्ल्यासारखा मालवणातील भक्कम कुशेवाडा, नेरूरच्या चौपाटीवरचा वाडा, सावंतवाडीचा राजवाडा अशा अनेक वास्तू सांगता येतील. अशा वास्तूंचा अभ्यास आपल्याला संस्कृती आणि परंपरा उलगडवून सांगतो.
          अशाच काही वास्तूंचा ऐतिहासिक, अभियांत्रिकी, स्थापत्यशास्त्रीय अशा विविध अंगांनी परिचय यावर्षीच्या दिवाळी अंकात करून दिला जाणार आहे. आपणही कोकणातील आपल्या परिसरातील किंवा आपण माहिती देऊ शकाल, अशा वास्तूची परिपूर्ण माहिती आणि छायाचित्रे पाठवावीत. याशिवाय या विषयाला समर्पक कथा, कवितांचेही स्वागत केले जाईल.

         कोकणातील बोलीभाषांमधील साहित्याला साप्ताहिक कोकण मीडियामध्ये नेहमीच आवर्जून स्थान दिले जाते. दिवाळी अंकासाठीही कथा, कविता, स्फुट लेख, विनोदी लेखासारखे मालवणी, आगरी, संगमेश्वरी, बाणकोटी अशा कोकणातील विविध बोलीभाषांमधील साहित्य अवश्य पाठवावे.
          आपला मजकूर आणि छायाचित्रे kokanmedia1@gmail.com या ई-मेलवर किंवा कोकण मीडिया, कुसुमसुधा, ६९७, रामचंद्रनगर (श्रीनगर), खेडशी, रत्नागिरी-४१५६३९ या पत्त्यावर ३० सप्टेंबर २०१७ पर्यंत पाठवावीत.


Sunday 6 August 2017

निराधारांना मदत करण्याची रत्नागिरीकरांना आज संधी

जीवन आनंद या सामाजिक संस्थेमार्फत पणदूर (ता. कुडाळ, जि. सिंधुदुर्ग) येथे संविता आश्रम चालविला जातो. समाजातील असहाय, निराधार, मतिमंद अशा समाजाने नाकारलेल्या लोकांसाठी तो एक भक्कम आधार ठरला आहे. राजाश्रयाविना केवळ लोकाश्रयावर ही संस्था खऱ्या अर्थाने चालविली जाते. या संस्थेच्या मदतीसाठी रत्नागिरीतील माया फाउंडेशन या सामाजिक संस्थेने रविवार, ६ ऑगस्ट रोजी सांगीतिक कार्यक्रम आयोजित केला आहे. त्या निमित्ताने संस्थेला मदत करण्याची संधी रत्नागिरीवासीयांना मिळणार आहे.

संविता आश्रम स्थापन करणाऱ्या संदीप परब यांची आणि त्यांच्या अनोख्या कार्याची ओळख करून देणारा विशेष लेख वाचा 'बाइट्स ऑफ इंडिया'वर. त्यासाठी खालील लिंकला भेट द्या.

.. http://www.bytesofindia.com/Details/?NewsId=4830959351638911950