Sunday 5 June 2016

सचोटीचा व्यवसाय करणे म्हणजे देशसेवाच – रवींद्र प्रभुदेसाई

रत्नागिरी - कऱ्हाडे ब्राह्मण बिझिनेस कॉन्फरन्सचे उद्घाटन
करताना ठाण्याचे व्यावसायिक सल्लागार नरेंद्र महाजनी,
शेजारी उमेश आंबर्डेकर, मनोज कळके, रवींद्र प्रभुदेसाई, रुची महाजनी
रत्नागिरी : गरजूंना रोजगार देणे आणि सर्व कर भरून केला जाणारा व्यवसाय म्हणजे देशसेवाच आहे, असे मत पितांबरी उद्योग समूहाचे मुख्य व्यवस्थापकीय संचालक रवींद्र प्रभुदेसाई यांनी व्यक्त केले.
कऱ्हाडे ब्राह्मण बिझिनेस फोरमतर्फे रत्नागिरीत आज (ता. ५) रत्नागिरीच्या राणी लक्ष्मीबाई सभागृहात झालेल्या पहिल्या बिझिनेस कॉन्फरन्समध्ये व्यवसायाच्या अभिनव कल्पना या विषयावर ते बोलत होते. पितांबरी उद्योगाचा प्रारंभ आणि विकासाची माहिती देतानाच घरोघरी वापरल्या जाणाऱ्या विविध उत्पादनांची उदाहरणे देऊन ते म्हणाले की, ग्राहकाच्या मनावर राज्य करेल, तो आपल्या व्यवसायाच्या माध्यमातून जग जिंकेल. व्यवसाय करून इच्छिणाऱ्या प्रत्येकामध्ये वेगवेगळी क्षमता असते. आपल्यातील क्षमता प्रत्येकाने ओळखली पाहिजे. संगणक आणि इतर यंत्रसामग्री नव्हे, तर व्यवसायातील माणसेच धंदा करतात, हे लक्षात ठेवले पाहिजे. माणसांची किंमत जाणून घ्यायला हवी. व्यवसाय म्हणजे फायदा हेच मनात ठसवून उद्योजकीय मानसिकता विकसित केली पाहिजे. आपल्या व्यवसायाची विशिष्ट ओळख निर्माण करून आपला ग्राहक आपण शोधला, तर व्यवसाय करणे कठीण नाही. इनोव्हेशन, ब्रँडिंग आणि मार्केटिंग ही फायदेशीर व्यवसायाची त्रिसूत्री आहे. व्यक्तिगत जीवनात ध्यानधारणा आणि ब्रह्मविद्येसारखी मन शांत ठेवायला मदत करणारी साधनाही दररोज करणे आवश्यक आहे, असे त्यांनी सांगितले.
उद्योगाचे अर्थ आणि आणि नियोजन या विषयावर मार्गदर्शन करताना ठाण्याचे व्यावसायिक सल्लागार नरेंद्र महाजनी म्हणाले की, वाढ होत असेल, तरच कोणताही व्यवसाय टिकतो. व्यवसायात वेळोवेळी बदल करणे आवश्यक आहे. व्यवसाय वाढवायचा असेल, तर स्वस्तात भांडवल उपलब्ध करण्याचा मार्ग निवडला पाहिजे. प्राप्तिकर किंवा रिटर्न्स भरण्याची वेळ येऊ नये, ही मानसिकता आधी बदलली पाहिजे. रिटर्न्स भरले असतील, तर बँकांकडून कर्ज सुलभतेने मिळू शकते. तरच भांडवल उभे राहू शकते. व्यवसाय वाढवायचा असेल, तर तो प्रोप्रायटरी न ठेवता प्रायव्हेट आणि पब्लिक लिमिटेड कंपनीपर्यंत विस्तारित करून कंपनीचे भागधारक वाढविले पाहिजेत. आगामी काळात चलनी व्यवहार बंद होऊन ऑनलाइन व्यवहार वाढणार आहेत, हे लक्षात घेऊन छोट्यात छोट्या व्यावसायिकांनीसुद्धा आपल्या व्यवसायाच्या आर्थिक व्यवहारांना तंत्रज्ञानाची जोड द्यायला हवी. योग दिन आंतरराष्ट्रीय पातळीवर नेण्याच्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपक्रमाचे कौतुक करून त्यामागील भूमिका श्री. महाजनी यांनी स्पष्ट केली. ते म्हणाले की, योगाचा प्रसार झाला, तर लोक खाण्यापिण्याच्या सवयी बदलतील. अधिक स्वास्थ्यपूर्ण आहार घेतील. त्यात वाढ झाली, तर शरीराला अपायकारक फसफसणाऱ्या पेयांसारख्या खाद्यपदार्थांचा व्यवसाय कमी होऊन ताज्या फळांच्या रसाची मागणी वाढण्यात परिवर्तित होईल.
कऱ्हाडे ब्राह्मण बिझिनेस फोरमविषयी ठाण्याचे मनोज कळके यांनी माहिती दिली. ते म्हणाले की, काठियावाडी, पालनपुरी आणि मारवाडी लोकांनी आपल्या ज्ञातीच्या माध्यमातून एकमेकांना साह्य करून व्यवसाय वाढविला. पोलाद उद्योगाचे जनक जमशेदजी टाटा यांनी पारशी जमातीसाठी १८८४ साली स्थापन केलेल्या मंडळाचा एवढा विस्तार झाला, की मुंबईतील कोणीही पारशी व्यक्ती आजही घरासाठी कर्ज घेत नाही. पारशी जमातीकडूनच त्यांना घरासाठी कर्ज मिळते. अशा जमातींकडून प्रेरणा घेऊनच केबीबीएफची स्थापना करण्यात आली आहे. ठाणे, डोंबिवली, पुणे, बेळगावनंतर कोकणात या फोरमचा विस्तार होत आहे. संपर्क वाढावा आणि त्यातून व्यवसाय वाढीस लागावा, हा त्यामागचा उद्देश आहे.
कऱ्हाडे ब्राह्मण बिझिनेस कॉन्फरन्समध्ये आपले विचार
व्यक्त करताना रवींद्र प्रभुदेसाई. शेजारी रुची महाजनी,
नरेंद्र महाजनी, मनोज कळके
कॉन्फरन्सला रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील १६० उद्योजकांनी नोंदणी केली. यापुढे दर महिन्याला कॉन्फरन्सची बैठक रत्नागिरीत होणार आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात तसेच दोन्ही जिल्ह्यांच्या प्रत्येक तालुक्यात फोरमची शाखा सुरू करण्याचे प्रयत्न आहेत, असे यावेळी सांगण्यात आले.

योगेश मुळ्ये यांनी प्रास्ताविक केले, तर प्रशांत पाध्ये यांनी आभार मानले.

No comments:

Post a Comment