Monday 23 May 2016

भारतात संस्कृतकडे दुर्लक्ष ही गंभीर बाब : दिनेश कामत

रत्नागिरी : भारतात संस्कृतबद्दल अज्ञान व जगभरात संस्कृतची जाण आहे. संस्कृतमधील असंख्य ग्रंथ आज परदेशांमध्ये आहेत. सुमारे ४०० विद्यापीठांमध्ये संस्कृत अनिवार्य केले आहे. पण भारतातच संस्कृतकडे दुर्लक्ष केले जाते. ही गंभीर बाब आहे, असे प्रतिपादन संस्कृत भारतीचे अ. भा. संघटनमंत्री दिनेश कामत यांनी व्यक्त केले.
संस्कृत भारतीतर्फे येथील गोगटे-जोगळेकर महाविद्यालयात आयोजित दहा दिवसांच्या प्रशिक्षण शिबिराची आज (दि. २३ मे) सांगता झाली. त्यावेळी ते बोलत होते. ते पुढे म्हणाले की, जो संस्कृत जाणतो, त्याच्यासाठी अन्य भाषा शिकणे कठीण नाही. संस्कृतशिवाय अन्य भाषांना अस्तित्त्व नाही. संस्कृत वगळून भारत म्हणजे इंडिया आहे. देशात ३२ ठिकाणी संस्कृतचे वर्ग सुरू आहेत. संस्कृत भारती देशात जोमाने काम करत आहे. सर्व शास्त्रे, विद्यांचे ज्ञानभांडार संस्कृतमध्ये आहे.
सांगता समारंभास उपस्थित असलेले जिल्हा परिषद प्राथमिक विभागाचे शिक्षणाधिकारी एकनाथ आंबोकर यांनी राज्याच्या प्रधान सचिवांकडे संस्कृत अध्ययनाचा परिपूर्ण प्रस्ताव देण्याची सूचना संस्कृत भारतीला केली. लहान वयात संस्कृतचे संस्कार झाले तर उच्चारणासाठी फायदा होईल. पुढील वर्षी संस्कृत संभाषण वर्गात नक्की प्रवेश घेऊ, असेही त्यांनी आवर्जून सांगितले. रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीचे कार्याध्यक्ष अॅवड. विलास पाटणे यांनी सांगितले की, संस्थेच्या परदेशी भाषा केंद्रातही संस्कृतचे वर्ग सुरू करू. यातून संस्कृतप्रेमींची संख्या वाढेल. परदेशी भाषा शिकण्यासह संस्कृतचाही अभ्यास होईल.
कोकण प्रांत मंत्री चिन्मय आमशेकर यांनी प्रास्ताविक केले. संस्कार भारतीच्या कार्याचा आढावा संस्कृत विभागप्रमुख डॉ. कल्पना आठल्ये यांनी घेतला. वर्गाधिकारी श्री. शेवडे यावेळी उपस्थित होते.
रत्नागिरीत तीन प्रकारचे वर्ग घेण्यात आले. कोकण प्रांतातून १२५ हून अधिक शिबिरार्थींनी यात भाग घेतला. रुमानियाचा मोइझ आयोनट या तरुणासह सॉफ्टवेअर डेव्हलपर अर्जुन व्यास आणि ७५ वर्षीय निवृत्त शिक्षणाधिकारी डॉ. शिवणेकर यांचाही त्या समावेश होता. पूर्णपणे संस्कृत निवेदन आणि भाषणांनी वातावरण संस्कृतमय झाले. या कार्यक्रमाला सुजाण रत्नागिरीकरांची उपस्थिती लाभली.
...........


No comments:

Post a Comment