Monday 4 April 2016

संस्कृतपंडित दा. गो. जोशी यांचे निधन

रत्नागिरी : येथील विख्यात संस्कृत पंडित दामोदर गोपाळ जोशी (वय ९९) यांचे रविवारी (ता. ३ एप्रिल) रात्री राहत्या घरी निधन झाले. ते शेवटपर्यंत सक्रिय होते. आज सकाळी चर्मालय अमरधाम येथे जोशी यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
कै. जोशी यांचा संस्कृत, पाली, मोडी भाषांचा सखोल अभ्यास होता. ते मूळचे बेळगावजवळील कोवाड गावचे. इचलकरंजी येथील पाठशाळेत सुरुवातीचे शिक्षण झाल्यावर त्यांनी काव्यतीर्थ ही पदवी संपादन केली. रत्नागिरीच्या पटवर्धन हायस्कूलमध्ये त्यांनी ३२ वर्षे संस्कृतचे अध्यापन केले. निवृत्तीनंतरही अनेक वर्षे ते शालेय, महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना उत्तम मार्गदर्शन करीत होते. संस्कृत पाठशाळेमध्येही ते अनेक काळ अध्यापन करत होते. त्यांनी वाई येथे तीन वर्षे धर्मकोशाचे उपसंपादक म्हणून काम केले. रत्नागिरी कऱ्हाडे ब्राह्मण संघाच्या समितीत ते कार्यरत होते. काही काळ उपाध्यक्ष म्हणूनही त्यांनी काम केले. ते सतत व्यासंगरत होते. उत्तरायुष्यात त्यांनी श्रीमद्शंकराचार्यांच्या गीताभाष्याचे मराठीत भाषांतर सुंदर हस्ताक्षरात लिहिले. ते आता ते प्रकाशनाच्या वाटेवर आहे. सन १९९४ मध्ये महाराष्ट्र शासनाने दा. गो. जोशी यांचा संस्कृत विद्वान म्हणून सत्कार केला होता. २०१३ मध्ये कोजागिरी पौर्णिमेला सांगलीच्या पु. ना. गाडगीळ शाखेनेनेही संस्कृत विद्वान म्हणून मानपत्र देऊन सत्कार केला होता.
कै. जोशी यांच्या पश्चात मुलगा, सून, मुलगी, चार विवाहित मुली, नातवंडे, पतवंडे असा मोठा परिवार आहे.

No comments:

Post a Comment