Saturday 23 November 2019

रिमोट कंट्रोल : फक्त पहिल्या क्रमांकाच्या ईर्ष्येने मुलाची होणारी फरपट




रत्नागिरीत सुरू असलेल्या ५९व्या हौशी राज्य मराठी नाट्य स्पर्धेच्या  पाचव्या दिवशी (२२ नोव्हेंबर २०१९) रत्नागिरीतील राधाकृष्ण कला मंचाच्या कलाकारांनी 'रिमोट कंट्रोल'  हे नाटक सादर केले. त्याची ही ओळख..

.........
पटवर्धन आडनावाचं चौकोनी कुटुंब - श्रीकांत, राधिका, आठ-नऊ वर्षांचा शुभंकर नि श्रीकांतचे वडील नाना. एका आलिशान, श्रीमंती फ्लॅटमध्ये ते राहतायत, तसं बऱ्यापैकी सुखी कुटुंब. एकच खंत - तीही राधिकापुरती - तिचा मुलगा शुभंकर साध्या मराठी माध्यमाच्या शाळेत शिकतोय. सामान्य मुलांबरोबर. त्या शाळेत शिकून त्याचं पुढे काय होणार आहे? ही खंत रात्रंदिवस राधिकाला जाळतेय. श्रीकांत आणि ती स्वतः, दोघंही आयआयटीचे स्कॉलर; पण श्रीकांतच्या तत्त्वनिष्ठेमुळे त्यांना अमेरिकेला वगैरे जाता आलं नाही. हीच खंत.

नाना निवृत्त शिक्षक. मुंबईत वास्तव्य असलं तरी मूळ गावाशी-वडगावशी नाळ तुटलेली नाही. त्यांची नाहीच; पण कॉर्पोरेट विश्वात वावरणारा मुलगा श्रीकांत याचीही तुटलेली नाही. हा ऋणानुबंध शुभू-शुभंकरच्या माध्यमातून तिसऱ्या पिढीतही अतूट राहतोय. राधिका गृहिणीची कर्तव्यं पार पडते, नानांशीही चांगली वागते, श्री आणि राधिकाच्या नात्यात मिठाचा खडा पडलेला नाही; पण तरीही सारं काही आलबेल होतंय, असं म्हणता येत नाही!

एके दिवशी एक वेगळा योग जुळून येतो. अमेरिकेत राहणारा राधिकाचा एक भाऊ निखिल भारतात आलाय. त्याला ‘मिनरल वॉटर’चा ‘प्लांट’ इथं उभा करायचाय. त्यासाठी पटवर्धन कुटुंबाचं वडगाव हे ठिकाण त्याच्या डोळ्यापुढे आहे. श्रीकांतच्या मदतीने हे शक्य होणार असा त्याला ठाम विश्वास.

निखिलच्या या प्रस्तावाने राधिका हरखून जाते. अमेरिकेचे दरवाजे किलकिले होतायत असं समजते. आता शुभंकरला त्या ‘गावंढळ’ शाळेतून काढलंच पाहिजे हे वर्ष कसं तरी जाईल. तेवढ्यात एका ‘पॉश’ अमेरिकन संस्थेच्या ‘डे स्कूल’मध्ये दाखल होण्यासाठी प्रवेश परीक्षा द्यायची. त्यासाठी शुभंकरची कसून तयारी करून घ्यायची. इंग्रजी कविता म्हणताना त्याचे उच्चार अमेरिकेतल्या वास्तव्याला शोभतील असे घटवून घटवून तयार करून घ्यायचे. राधिका तयारीला लागते.
श्रीकांत तयारी सुरू करतो. वडगावमध्ये ‘सीएसआर’च्या माध्यमातून विकास कामं व्हायला हवीत अशी अट घालून निखिलच्या प्रकल्पाला सहकार्य करण्याचं मान्य करतो.

शुभंकर परीक्षेची तयारी करतो. ठरल्या दिवशी परीक्षेला जातो; पण कॉपी केली म्हणून त्याला बाहेर काढतात. हे फोनवरून कळताच श्रीकांत हादरतो.

पहिल्या क्रमांकाचं, गोल्डमेडलच उद्दिष्ट समोर ठेवणारी राधिका मात्र खटपट सोडत नाही. परीक्षेची फी चाळीस हजार रुपये भरलीच होती ना, शाळेला आणखी काही रक्कम देऊन पुन्हा परीक्षेची ती परवानगी मिळवते. दरम्यान, शुभंकरला समजवण्यासाठी निखिल ‘मामा’ फोन करतो. तो सांगतो, ‘कॉपी करूनच मी अमेरिकेला गेलो!’ शुभंकरला हे आवडत नाही. नानांचे संस्कार जागे असतात; पण दुसऱ्यांदा परीक्षेला गेल्यावर आजोबांशी फोनवरून बोलताना, मी तुम्हाला पण अमेरिकेला नेणार, हे सांगत असताना राधिका फोन काढून घेते आणि थोड्याच वेळाने मित्र हृषीकेश याला बेदम मारल्याबद्दल शुभंकरला बाहेर काढतात. पुन्हा वादळी अशांतता!

बिथरलेल्या शुभंकरची समजूत घालण्यात आजोबा पुढाकार घेतात. हळूहळू तो पुन्हा नानांशी नेहमीसारखा वागू लागतो. मग तो आजोबा नि नाना नातू असा खेळ सुरू होतो. या खेळात नातवाला गोष्ट सांगण्यासाठी शुभंकर श्रावणबाळाची हकीकत निवडतो. या गोष्टीत श्रावणबाळ आई-वडिलांना कावडीतून नेतो, पण त्याचे चालून चालून सुजलेले पाय, ठेचकाळलेली बोटं, रक्ताळलेले तळवे पाहून त्याची आई-जिला तो ‘रिमोट कंट्रोल’ म्हणतो - तिला वाईट वाटतं - रडू येतं ते आता श्रावणबाळ ‘रेस’ जिंकू शकणार नाही या कल्पनेमुळे!

दरम्यान, निखिलच्या प्रोजेक्टमधली लबाडी वगैरे लक्षात येऊन राधिकाचे डोळे उघडतात. ती वडगाव वाचवण्यासाठी श्रीकांतला साथ द्यायचं ठरवते. मघाशी सांगितलेल्या गोष्टीतला ‘रिमोट कंट्रोल’च्या तालावर चालणारा श्रावणबाळ राधिकापर्यंत कसा पोहोचतो ते मात्र प्रेक्षकांना पाहायला मिळत नाही. शेवट गोड होतो एवढंच!

शेखर ढवळीकर यांनी लिहिलेलं हे नाटक रत्नागिरीच्या ‘राधाकृष्ण कलामंच’नं सादर केलं. संजय गणपुले यांचा नाना आणि बालकलाकार सारंग जोशी याचा शुभंकर छान वठलेत. अलका बेंदरकर यांनी कॉर्पोरेट संस्कृतीनं प्रभावित झालेली राधिका आणि विनायक जोशी यांनी श्रीकांतचं मातीशी नातं जपणारं व्यक्तिमत्त्व चांगलं साकारलंय. दिग्दर्शक मिलिंद टिकेकर यांनी घेतलेली मेहनत प्रयोगातून व्यक्त होते.

- राजेंद्रप्रसाद मसुरकर, मोबाइल : ९९६०२ ४५६०१

(सौजन्य : आकाशवाणी रत्नागिरी केंद्र)








Friday 22 November 2019

५९ वी राज्य नाट्य स्पर्धा. रत्नागिरी केंद्र. फेरा

जिवंतपणी विरत जाणाऱ्या स्वप्नांची मृत्यूनंतर होते पूर्तता
नैसर्गिकरीत्या वाढलेल्या जंगलाच्या घेऱ्यातला छोटासा जमिनीचा तुकडा. त्यावर एक झोपडीवजा निवाऱ्याचं घर. जवळच नळाचं कोंडाळं. समोर दोन दगडी ओटे, माणूस झोपू शकेल इतपत आकाराचे. एकदोन वृक्षांच्या बुंध्याभोवती पार बांधलेले. रात्रीची वेळ. दाढी वाढलेला, मळकट-फाटके कपडे घातलेला एक कळकट मनुष्य झोपडीच्या बाहेर दारूच्या नशेत शिवीगाळ करीत, विडी ओढत बसलेला. एवढ्यात अर्धी चड्डी-शर्ट घातलेला, मजुरासारखा दिसणारा अर्ध्या वयाचा मनुष्य येतो. कळकट माणसाबरोबर काही बोलतो. कळकट मनुष्य त्याची दखल घेत नाही. कुणाला तरी शिव्या देत दुसरीकडे निघून जातो.
मग आणखी एक मनुष्य येतो. पँट-शर्ट, नीट राखलेली दाढी, सुसंस्कृत बोलणं. मजुरासारखा माणूस आणि हा या दोघांच्या छान गप्पा सुरू होतात. इतक्यात एक तरुणी अंगात संचार झाल्यासारखी जोरजोराने मागे-पुढे वाकत, मोठमोठ्याने श्वास टाकत येते. मजुरासारखा दिसणारा, मालवणीत बोलणारा बाबल्या नि शरद तिचं स्वागत करतात. ते दोघे एका सरमिसळ वस्तीतले रहिवासी असावेत...
असावेत? आहेतच. वैकुंठ रहिवासी संघाचे ते सगळे वस्तीवाले. बाबल्या तिथला पहिला नागरिक. तिथे तो अभिमानानं तशीच ओळख करून देतो स्वतःची. ठराविक पारावर बसून रोज चंद्र पाहत राहणारा, पौर्णिमेचा वाटोळा चांदोबा बघून प्रफुल्लित होणारा शरद, कायम चिंचेच्या झाडावर मुक्काम ठोकून कविता करणारा जांभेकर नि ही आत्ताच विस्तवातून धापा टाकत बाहेर पडलेली सौ. वेदा....!
वैकुंठ रहिवासी संघ? हे कसलं नाव? आणि सरमिसळ वस्ती ही काय, चिंचेच्या झाडावर मुक्काम म्हणजे काय? काय सगळं हे चमत्कारिक?
ती वसाहत स्मशानातली आहे. तिथले सगळे रहिवासी मृतात्मे आहेत. दारू पिऊन शिवीगाळ करणारा गंगाराम तेवढाच जिवंत माणूस. स्मशानाचा चौकीदार. एखादं प्रेत जाळलं, की त्याची चंगळ असते. दारूच्या नशेत तो बरंच बोलतो. ‘तरण्याताठ्या, चांगल्या, शहाण्या माणसांना इथं का पाठवतोस? पाजी, हरामखोरांना का पाठवत नाहीस,’ असं आकाशाकडे तोंड करून विचारतो. आपलं प्रेत, हे स्मशान झाल्यावर जाळलेलं ‘पहिलं’ याची आठवण सांगणारा बाबल्या पुढाऱ्यांची वाट पाहत आपण तिरडीवर तासभर कसे पडून होतो, पुढारी आल्याबरोबर सगळे जण त्याच्या स्वागताला कसे धावले, जिवंतपणे कुणी नाही, पण मेल्यावर का होईना पुढाऱ्यानं दोन अश्रू ढाळले आणि स्मशानाचं ‘उद्घाटन’ करण्यासाठी स्वतःच्या हातानं भला मोठा हार घालून त्या पुढाऱ्याने आपल्या चितेला चूड कशी लावली, ते सगळं मालवणीत गजाली सांगाव्या त्या थाटात सांगतो.
चितेच्या विस्तवातून बाहेर आलेली वेदा हळूहळू त्या वातावरणाला सरावू लागते. शरदचं असंबद्ध बोलणं, त्यानं दिलेली जांभेकराच्या कवितेची माहिती ऐकते. आपल्या गळ्यातलं आई-वडिलांनी केलेलं सात तोळ्याचं मंगळसूत्र त्यांनी काढून घेतलंय, सासूबाईंनी केलेल्या मोत्याच्या कुड्याही काढून घेतल्यात हे सांगते. शरद विचारतो, ‘आणि नवऱ्यानं काय केलं होतं?’ वेदाचा चेहरा पडतो. ‘त्याच्याबरोबर देण्याघेण्याचा व्यवहार झाला नाही, कसलाच झाला नाही!’ असं रुक्षपणे सांगते.
या मंडळींना वैकुंठ वसाहतीच्या बाहेर जाता येत नाही. तुमचा जीवखडा पाहायचाय? अजून असेल तो तिथं, असं म्हणून शरद तिला फाटकाजवळ नेऊ लागतो. ती नकार देते. विटलेली दिसते ती जगण्याला. कदाचित तिला या नव्या वसाहतीत, नव्या रहिवाशांसोबत बरं वाटत असावं. जांभेकरांचीपण ओळख होते.
एवढ्यात मंजी येते. मंजी-गंगारामची बायको. त्याचं घर वैकुंठाबाहेर. तो चौकीत एकटाच राहतो. रोज रात्री मंजी डबा घेऊन येते. तो तिची वाटच पहात असतो. मंजी तारुण्यानं मुसमुसलेली, घट्ट काष्टी नेसणारी, नीटनेटकी नि तो गचाळ दारुड्या गंगाराम; पण त्यांचा संवाद वेदाला आवडतो. संवाद म्हणजे काय? शिवीगाळ नि डाफरणं, ‘तू हडळ, मी खवीस’ हे शब्द ‘तू राधा मैं किशन’ म्हणावं... अशा उत्कटतेने गंगाराम उच्चारतो, ते भावतं वेदाला. गंगाराम ओढत घेऊन जातो मंजीला आत. वेदा प्रफुल्लित होते. गंगाराम-मंजीचं एकत्र जेवणं, थट्टामस्करी, त्यांचा रांगडा प्रणय, सामान्य माणसाला भयानक नि अशुभ वाटणाऱ्या स्मशानाच्या परिसरात भयाणतेच्या छाताडावर नाचत त्या दोघांनी केलेली दंगामस्ती आणि मग झोपडीत जाऊन बंदिस्त होणं...! मृतात्मे त्यांना दिसतच नसतात!
वेदा आसुसलेल्या नजरेनं खिडकीतून डोकावून, डोकावून बघत राहते. लग्नानंतरचं काही महिन्यांचं तिचं सहजीवन मृत्यूनं संपलेलं - ‘सह’ कसलं? म्हणायला पती-पत्नी; पण त्याला रसच नव्हता तिच्यात, ना तिच्याबरोबर बोलण्यात, ना जेवण्यात, ना शृंगारात. ती सहवासाला आसवलेली... इतकी, की ‘गंगाराम जरी आला असता तरी त्याला जवळ घेतलं असतं’ असं म्हणण्याइतपत अधासलेली!
कारणही तसंच होतं. नवरा अभिषेक - त्याला काहीच वाटत नव्हतं ना तिच्याबद्दल. खूपदा वाद. खोदून खोदून विचारल्यावर एकदा तिला समजलं, त्याला कुठल्याच स्त्रीबद्दल आकर्षण वाटत नव्हतं. त्याच्यासारखाच एक पुरुष त्याचा ‘पार्टनर’ होता. अभिषेक समलिंगी होता.
वेदा कोसळते!
तिची कर्मकहाणी ऐकून स्तब्ध झालेला शरद भानावर येतो. ‘तू आता इथून जायला मुक्त झालीस,’ असं म्हणतो; पण वेदा त्याला त्याची कहाणी ऐकवायला लावते. दोघांच्या मनातली मळमळ बाहेर पडलेली. आता दोघांनी इथून बाहेर पडायचं. हा ‘फेरा’ संपला, उजाडण्याची वेळ जवळ आलीय, नवं जीवन शोधण्यासाठी निघण्याची वेळ येऊन ठेपलीय. दोघं परस्परांना आलिंगन देतात. भुईतून धूर निघू लागतो, धुराच्या पडद्याआड ती दोघं झाकली जातात!
‘मृत्यूनंतरचं जग कसं असेल’ यावर अनेक तत्त्वचिंतकांनी शब्दांची चिरफाड करीत लिहिलेलं दिसतं; पण निखिल मोंडकर यांनी ते कलात्मकतेने ‘फेरा’ या नाटकात शब्दांत पकडलंय. संतोष सनगरे यांचं दिग्दर्शन आणि सर्वच कलाकारांचा उत्कृष्ट अभिनय यामुळे ‘समर्थ रंगभूमी, रत्नागिरी’ यांचं ‘फेरा’ हे नाटक ‘समर्थ’पणे वठलंय.
- राजेंद्रप्रसाद मसुरकर
(९९६०२४५६०१)
(सौजन्य : आकाशवाणी रत्नागिरी)

Thursday 21 November 2019

५९ वी राज्य नाट्य स्पर्धा. रत्नागिरी केंद्र. ‘अननोन फेस’


५९ वी राज्य नाट्य स्पर्धा. रत्नागिरी केंद्र.
दिवस तिसरा (२० नोव्हेंबर २०१९)

अननोन फेस’ : चेहरा बदलून वेदना लपविण्याच्या प्रयत्नांचं कलात्मक सादरीकरण

            अननोन फेसया नाटकाची घोषणा होऊन पडदा उघडतो, तेव्हा एका टुमदार फ्लॅटचा अंतर्भाग रंगमंचावर दिसू लागतो. या फ्लॅटमध्ये एकटीच राहणारी युवती - रश्मी - फोनवर मैत्रिणीशी बोलत असते. मैत्रीण तिच्या सोबतीला राहण्यासाठी एका तरुणाला पाठवणार असते आणि रश्मीला तिथं राहायला काही केल्या पुरुष सहनिवासी नको असतो. तिचं फोनवरून बोलणं पूर्ण होतं न होतं, एवढ्यात एक अठ्ठावीस-तिशीचा युवक आपलं सामानसुमान घेऊन तिथं राहायला येतो.... आणि ती नको, नकोम्हणत असतानाच एक मोकळी खोली बघून स्थिरस्थावर होतोसुद्धा!
            हे असं झाल्यावर काय होणार? ती चिडलेली, तर तो हसतमुख. एवढ्यातच तिला एक फोन येतो. पलीकडची व्यक्ती सांगत असते एका भयानक घटनेबद्दल. आठ वर्षांच्या मुलीवर सामूहिक बलात्कार झाल्याची ती घटना! रश्मी अस्वस्थ होते, भयंकर संतापते, पुरुषी मनोविकृतीबद्दल खूप बोलते, ऐकवते त्या नव्यानं आलेल्या सहनिवासी तरुणाला. तोही बोलतो, पण काहीसा पड खाल्ल्यासारखं. थोड्या वेळाने शांतता. तो - संघर्ष त्याचं नाव - टीपॉयवरची वही घेऊन तो चाळू लागतो. काव्या नावाच्या कवयित्रीनं लिहिलेल्या कविता असतात त्या वहीत. एका कवितेवर तो स्थिरावतो. कुठूनही पाहिलं तरी स्त्री ही भोग्य वस्तूअशी काहीशी कल्पना तीत मांडलेली...! पुन्हा एकदा गरमागरम चर्चा!
            एक-दोन दिवसांत दोघांचं सहवास्तव्य रुळतं. अहो-जाहोवरून अरे-अगंवर येतात. गंमत म्हणजे त्यानं केलेली कॉफी घेता घेता, संतापाने काही बोलताना रश्मीच एकदम अरे!म्हणून जाते. सूर जुळू लागलेत असं प्रेक्षकांना वाटू लागतं. एवढ्यात ती आतल्या खोलीत जाते, संघर्ष कुणाशी तरी फोनवर बोलतो, झटकन आपल्या खोलीत जातो, सॅक पाठीवर लावून बॅगा हातात घेऊन तिला काही न सांगता, कळू न देता निघून जातो.
            संघर्ष निघून गेल्यावर बुचकळ्यात पडलेली रश्मी दार लावून मागे फिरताना हळूहळू रंगमंचावर अंधार होतो. एकाकी ती भेदक किंचाळते. तिची किंकाळी ऐकून प्रेक्षागारही थरारून जातं...!
            मध्यंतरानंतर बदललेल्या दृश्यात संघर्ष पुन्हा तिला भेटतो, पण डॉक्टरच्या रूपात. हळूहळू ती दोघं पुन्हा सहजतेनं वागू लागतात. खरं म्हणजे संघर्ष सहज वागतच असतो, रश्मीही वागू लागते. त्या दोघांच्या एक-दोनदा भेटी होतात. पुन:पुन्हा संघर्षच्या गायब होण्याने रश्मी अस्वस्थ मन:स्थितीत असतानाच एके दिवशी अचानकपणे तो येतो. हातात काही तरी घेऊन... ती भेटवस्तू असते. तिच्या वाढदिवसानिमित्त आणलेली आणि मग येतो तो संभाषणाचा टप्पा...
            बोलता बोलता चार वर्षांपूर्वी आपल्या प्रेयसीबाबत घडलेल्या एका थरारक प्रसंगाचं वर्णन संघर्ष तिला ऐकवतो. त्या दुर्दैवी दिवशी त्याच्या प्रेयसीवर झालेल्या बलात्काराचं... ते कृत्य करणाऱ्या नराधमाला संघर्ष चोप देऊ लागतो, नराधम पळतो आणि एका ट्रकच्या चाकाखाली येऊन चिरडून जातो.
            पण रश्मी हे सगळं नाकारते. तू त्या वेळी तिथं नव्हतासच. होता तो यश - माझा प्रियकर.आणि एका उन्मादक क्षणी ओरडते, ‘ती मीच होते!
            काही क्षण सन्नाटा!!
            शांतपणे संघर्ष म्हणतो, ‘नाही. ती तू नव्हतीस.आणि पाकिटातून एका मुलीचा फोटो काढून दाखवतो. माझाच, माझाच फोटो आहे तो!रश्मी बोलते, अभावितपणे सांगून टाकते - मी चेहरा बदलून घेतलाय!
            अननोन फेस!
            हे सगळं ठाऊक असल्यानं आधीपासूनच तिच्यावर प्रेम करणारा संघर्ष, तिच्या मनावरचं ओझं उतरावं, तिचं लादून घेतलेलं एकटेपण संपवावं यासाठी आपण ही सारी धडपड केल्याचं सांगतो आणि तिला जीवनसाथी होण्याची ऑफर देतो...!
            चेहरा बदलून घेतल्यावरही मनातल्या वेदना कमी होत नाहीत. अत्याचार भोगलेलं शरीर तेच असतं आणि चिरडून गेल्याची व्यथाही तीच असते.हळुवारपणे कुणी तरी घातलेल्या फुंकरीनं मात्र तिचं जीवन बदलून जातं, अशी कल्पना मांडणारं हे नाटक उतरलं होतं कविता मोरवणकर यांच्या लेखणीतून. रंगमंचावर आणलं होतं संगमेश्वरमधल्या कोसुंब गावच्या श्री देवी जुगाई कलामंच या संस्थेनं. स्वानंद देसाई यानं सादर केलेला संघर्ष आणि श्रद्धा मयेकरनं साकारलेली रश्मी ही दोनच पात्रं. स्वानंदनं प्रकट केलेला मिश्किलपणा, प्रसंगानुरूप दाखवलेले, शंका येण्याजोगे पुरुषी चोरटेपणाचे भाव, उत्कटता आणि सहजता यांच्या जोडीला श्रद्धानं हुबेहूब वठवलेली, खूप सोसलेली रश्मी ही दोघं प्रेक्षकांना खिळवून ठेवतात. स्त्रीत्वाचा आणि आत्मसन्मानाचा भयंकर कुस्कर झाल्यानं एकटी पडलेली, किंबहुना एकटेपणा आवडू लागलेली, आतून संतप्त असलेली आणि शून्यात नजर लावणारी रश्मी प्रत्ययकारी साकारली गेलीय.
            त्याप्रसंगाचं संघर्ष वर्णन करत असताना खुर्चीवर पाय घेऊन, पायांना घट्ट मिठी घालून भेदरलेल्या चेहऱ्यानं, ती असह्य आठवण नाईलाजानं ऐकत बसलेली रश्मी, संघर्षने सहजीवनासाठी हात पुढे केल्यानंतर स्तिमित होत त्याच्या मिठीत हरवून गेलेली आणि बदललेला अननोन फेसगळून पडलेली रश्मी....हे सारं प्रत्यक्षच पाहायला हवं असं.
            विनायक सावर्डेकर यांचं दिग्दर्शन अप्रतिम. एक उदाहरण - एका प्रसंगात संघर्ष बाहेर गेल्यावर रश्मीनं दरवाजा आतून लावून घेतल्याचा ठक्कअसा त्या शांततेत स्पष्ट ऐकू येणारा आवाज! अशा बऱ्याच जागा प्रभावी दिग्दर्शनाचा प्रत्यय आणून देतात. प्रेक्षागृहाबाहेर पडताना हे सगळं मनात रेंगाळत राहतं, कलात्मकतेच्या ठशासह!

- राजेंद्रप्रसाद मसुरकर
मोबाइल : ९९६०२ ४५६०१
(सौजन्य : आकाशवाणी, रत्नागिरी)

Wednesday 20 November 2019

५९ वी राज्य नाट्य स्पर्धा. रत्नागिरी केंद्र. नांगर, आता उठवू सारे रान!

५९ वी राज्य नाट्य स्पर्धा. रत्नागिरी केंद्र.
दिवस दुसरा (१९ नोव्हेंबर २०१९)

`नांगर`मधून मांडले शेतकऱ्यांचे प्रश्न, `आता उठवू सारे रान` एक ठसठशीत नाटक
सर्वसामान्यांना भरडून टाकणाऱ्या निष्ठुर सामाजिक-राजकीय व्यवस्था - अलीकडे ज्याला सिस्टीम म्हटलं जातं - त्याचं रंगमंचावरून दर्शन घडविण्याचं काम बहुतेक प्रायोगिक नाट्य संस्थांना आवडतं. रत्नागिरीचा ‘संकल्प कला मंच’ अशी नाटकं नाट्य स्पर्धेत दर वर्षी सादर करतो. १९ नोव्हेंबरला, स्पर्धेच्या दुसऱ्या दिवशी या संस्थेनं राजेंद्र पोळलिखित ‘नांगर’ हे नाटक सादर केलं.
एकमेकांना जीवनसाथी बनवू इच्छिणारी, पण तात्त्विक मतभेदांमुळे दुरावलेली तरीही परस्परांवरील प्रेम मनात टिकवून ठेवणारी, दुरावूनही नित्य भेटत राहणारी युवक-युवतीची जोडी या नाटकाच्या मध्यवर्ती स्थानी आहे. ‘ती’ - पूर्वा - एका वाहिनीची रिपोर्टर. तो शहाजी - कृषी विषयात एमएस्सी - त्याला शेती करायची आहे. त्यासाठी तो चाळीस हजार रुपये पगाराची नोकरी सोडतो; पण आपला नवरा शेतकरी असावा हे मान्य नसल्याने पूर्वा त्याची जीवनसाथी बनण्यासाठी दिलेली अंगठी परत करते. शहाजीला शेतीतून सोनं पिकवण्याचा आत्मविश्वास असतो. धनुष्य आणि अन्य शस्त्रधारी देवांपेक्षा नांगरधारी बलरामाची मंदिरे बांधली पाहिजेत असं त्याचं मत. शेतकऱ्यांच्या नावाने केल्या जाणाऱ्या गलिच्छ राजकारणाला त्याचा विरोध, तर त्याच परिस्थितीवर सनसनाटी रिपोर्ट तयार करण्यात पूर्वाला खूपच इंटरेस्ट. नांगर या नाटकामध्ये दोन पुढाऱ्यांमधील संघर्षातून होणारे राजकारण, पुढाऱ्यांच्या विजयाने बेभान होऊन हिडीस नाचणारे सामान्य तरुण, विरोधकांना आयात करून, महामंडळांवर त्यांची वर्णी लावून त्यांची तोंडं बंद करणारे मुख्यमंत्री ही पात्रं आहेत.
अशाच प्रकारे आयात करण्यात आलेला ‘भालकर’ हा पुढारी एके दिवशी शहाजीला मुख्यमंत्र्यांकडे नेतो. सामान्य माणसांवर होणाऱ्या अन्यायाविरुद्ध दंड थोपटून उभा राहणारा तरुण शेतकरी अशी तोपर्यंत शहाजीची प्रतिमा तयार झालेली असते. भालकरच्या मते तो विस्तव असतो. आपल्या शेतकरी आंदोलनात तो हवाच असे त्याला वाटते. शहाजीची जळजळीत मतं मुख्यमंत्री शांतपणे ऐकतात आणि नंतर बोलावतो असं सांगून त्याची बोळवण करतात. थोड्याच वेळात बातमी येते, ‘मंत्रालयात नांगर नेण्याचं अभिनव आंदोलन करू पाहणाऱ्या शहाजीचा मोटारीच्या धडकेनं मृत्यू ..!’ मुख्यमंत्री आणि भालकरचे विरोधक मंत्री हस्तांदोलन करतात आणि पडदा पडतो. एका ज्वलंत विषयावर लिहिलेलं हे नाटक गणेश गुळवणी यांनी दिग्दर्शित केलं होतं.
त्याच दिवशी १९ नोव्हेंबरला सादर झालेलं ‘आता उठवू सारे रान!’ हे नाटक ठसा उमटवून गेलं. मंडणगड तालुक्यातील धामेळीवाडी इथल्या आकेश्वर सेवा मंडळानं सादर केलेल्या या नाटकात रत्नागिरीजवळच्या कोतवडे गावचे एक-दोन हौशी कलाकारही सहभागी झाले होते. आदर्श गाव, बिनविरोध येणारे ग्रामपंचायत सदस्य आणि खेळीमेळीनं राहणारे ग्रामस्थ अशा वातावरणात गावातल्या एक-दोघांना पक्षीय राजकारणाची दुर्बुद्धी सुचते. गावात दोन तट पडतात आणि त्यातून मार्ग काढण्यासाठी तरुण पिढी पुढे येते.
नाटकाचा प्रारंभ ग्रामसभेनं होतो. बराच वेळ होऊनही सुरू न झालेली मीटिंग, तिथंच आडवा होऊन घोरू लागलेला ग्रामस्थ, इकडच्या तिकडच्या गप्पा, हे सारं दाखवत अत्यंत गतिमानतेनं नाटक पुढे सरकतं. पक्षीय राजकारणाचा विषय निघाल्यानं बघता बघता तापलेलं वातावरण, सभेत होणारी गुद्दागुद्दी, फूट, एक-दोन दिवसांतच या प्रश्नावरून होणारी घमासान मारामारी हे प्रसंग दाखवत सादरकर्त्यांनी प्रेक्षकांना मूळ सूत्राकडे केव्हा नेलं हे कळतच नाही.
या परिस्थितीतून मार्ग शोधण्यासाठी तरुणांमध्ये चर्चा होऊ लागते. मुंबईतून गावी आलेले तरुण विचार करू लागतात. मुंबईतल्या कॉर्पोरेट कल्चरमध्ये रुळून सफाईदार इंग्रजी बोलणारी नेहा, चांगल्या हुद्द्यावर नोकरी करणारा जय, गावात राहणारा अर्जुन, उच्चशिक्षित प्रिया ही सारी जणं एकत्र येतात. गाव सोडून मुंबईला गेलेल्यांनी परतावं यासाठी ‘रिव्हर्स मायग्रेशन’ची योजना आखतात. कॉर्पोरेट विश्वात सरावलेली नेहा कृषी उत्पादन गट थेट ग्लोबल मार्केटमध्ये पोहोचविण्याची धडपड सुरू करते. सगळे श्रमदानाला लागतात. गावातला एकोपा पुन्हा जागा होतो. पार्श्वभूमीला साने गुरुजींचं ‘आता उठवू सारे रान’ हे गीत संपूर्ण नाट्यगृहातच एक वेगळं चैतन्य निर्माण करतं. एवढ्यातच महिलांसाठी आरक्षित झालेल्या सरपंचपदाची थेट निवडणूक लढवून प्रिया विजयी होते आणि भारावलेल्या नवतरुणांची सर्वांना सोबत घेऊन जाणारी सत्ता ग्रामपंचायतीवर स्थापन होते. शेवटच्या क्षणी विरोधकांचं मनही पालटतं.
सुनील माळी या युवकाने हे नाटक लिहून आणि दिग्दर्शित करून ‘खेड्याकडे चला’ या महात्मा गांधी यांच्या संदेशाचंच जणू कलात्मक सादरीकरण केलंय. यातली सर्वच पात्रं अभिनय, संवादफेक आणि टायमिंगच्या बाबतीत प्रभावी वाटली. एकूणच ‘आता उठवू सारे रान’ हे ठसठशीत नाटक वाटलं.

- राजेंद्रप्रसाद मसुरकर
(संपर्क: ९९६०२४५६०१)
(सौजन्य : आकाशवाणी, रत्नागिरी)

Tuesday 19 November 2019

‘अचानक’ नाटकाने रत्नागिरीत राज्य हौशी नाट्य स्पर्धेला प्रारंभ

राज्य शासनाच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयातर्फे घेण्यात येणाऱ्या ५९ व्या हौशी नाट्य स्पर्धेच्या प्राथमिक फेरीचा प्रारंभ रत्नागिरीत सोमवारी (ता. १८ नोव्हेंबर) झाला. अखिल भारतीय नाट्य परिषदेच्या रत्नागिरी शाखेचे अध्यक्ष राजकिरण दळी यांनी उद्घाटन केले. परिषदेचे सचिव समीर इंदुलकर, ज्येष्ठ रंगकर्मी सुहास साळवी, डॉ. शशिकांत चौधरी, गजानन कराळे आणि ज्योती केसकर हे तीन परीक्षक यावेळी उपस्थित होते.
रत्नागिरीच्या स्वातंत्र्यवीर सावरकर नाट्यगृहात होत असलेल्या या स्पर्धेसाठी यावर्षी अकरा संस्थांनी सहभाग घेतला आहे. स्पर्धा येत्या २९ नोव्हेंबरपर्यंत चालणार आहे. जांभारी (ता. रत्नागिरी) येथील श्री भैरी देव देवस्थान संस्थेने सादर केलेल्या ‘अचानक’ या नाटकाने स्पर्धेला प्रारंभ झाला. त्या नाटकाची ज्येष्ठ पत्रकार राजेंद्रप्रसाद मसुरकर यांनी करून दिलेली ओळख...
अनाहूतपणे घरी येऊन मुक्काम ठोकलेल्या पाहुण्यांनी आपली ओळख ‘दहशतवादी’ अशी सांगितली तर काय?... अंगावर काटा येईल ना! बँकेत कॅशिअर असणारा सोहेल आणि त्याचे कुटुंबीय यांचं असंच झालं.
सोहेल आणि राधा हे आंतरधर्मीय विवाह करून संसार थाटलेलं दाम्पत्य. सरीन ही त्यांची महाविद्यालयात शिकणारी मुलगी. आंतरधर्मीय विवाह करूनही आपापल्या धर्मश्रद्धा जपत, परस्परांच्या परंपरांचा आदर करणारं हे समाधानी जोडपं एक दिवस अचानक आलेल्या त्या दहशतवादी पाहुण्यांच्या कचाट्यात सापडतं. अब्बास आणि अमीर नावाचे ते दोघे सोहेलवर एक कामगिरी सोपवतात - सर्व जाती-जमातींमध्ये आदराचं स्थान असलेल्या एका ज्येष्ठ धर्मगुरूची हत्या करण्याची. पापभीरू, धर्मनिरपेक्ष नि देशप्रेमी वृत्तीच्या सोहेलला हे मान्य होत नाहीच.
‘दहशतवाद तुमच्या उंबरठ्यावर’ हे मिशन सुरू करणारा निष्ठुर अब्बास सोहेलच्या कुटुंबावर पद्धतशीर दडपण आणतो. लाखो रुपयांच्या बनावट नोटा बँकेच्या तिजोरीत ठेवून चलनातल्या नोटा आणायला भाग पाडतो. त्याला पिस्तूल हाताळायला शिकवतो. सोहेलची पत्नी राधा ही मानसशास्त्राची प्राध्यापक. अब्बासच्या शिकवणुकीचा, किंबहुना तो आणत असलेल्या मानसिक दबावाचा परिणाम होऊन सोहेलच्या हातून एखाद्याची हत्या कशा प्रकारे घडू शकते याचं मानसशास्त्रीय विश्लेषण राधा करते.
अब्बासचा साथीदार अमीर त्यांच्या मुलीला - सरीनला तिच्याच महाविद्यालयात घेऊन जातो. मूलतत्त्ववादी विचारांच्या युवकासोबत तिला पाहिल्यावर महाविद्यालयातील काही युवक तिच्यावर चिखलफेक करतात, ती भेदरून घरी येते. या सगळ्या वातावरणाचा सोहेलवर नकळत परिणाम होऊ लागतो... कदाचित, अब्बासला पाहिजे तसा!
धर्मगुरूची हत्या अजून दूर आहे. सोहेलला माणूस ठार झालेला पाहायला मिळावा यासाठी अब्बास एक दिवस अनपेक्षितपणे आपल्याच साथीदाराला गोळी घालून ठार करतो. त्याचं प्रेत घरातल्या एका खोलीत ठेवून देतो. अशा भेसूर वातवरणात ते कुटुंब कित्येक तास काढतं. ती परिस्थिती असह्य झाल्यानं, एका क्षणी तिथून निसटून जाण्याच्या तयारीत असणाऱ्या त्या तिघांना अब्बास रोखतो आणि सोहेलच्या हातून राधालाच गोळी घातली जाईल अशी परिस्थिती निर्माण करतो. ‘आज या घरात मुडदा पडलाच पाहिजे’ असं अब्बास सांगत असतानाच अचानकपणे मागे वळून सोहेल अब्बासवर गोळ्या झाडून त्याचा खात्मा करतो.

यानंतरच्या काही क्षणांतच भानावर आलेल्या सोहेलची हातून घडलेल्या कृत्यांबद्दल न्यायालयाने दिलेली शिक्षा भोगण्याची तयारी होते. त्याचं देशप्रेम जिवंत आहे या भावनेनं ते त्रिकोणी कुटुंब प्रफुल्लित होतं.
जांभारी इथल्या श्री भैरीदेव देवस्थानच्या कलाकारांनी हे नाटक सादर केलं. योगेश सोमण यांनी लिहिलेल्या या संहितेला प्रशांत पावरी यांच्या दिग्दर्शनाची साथ मिळाली. सदैव सावध असलेला अमीर, थंड डोक्याचा अब्बास, दडपणाखाली वाहत चाललेला सोहेल आणि भेदरलेली कॉलेजकन्यका सरीन यांच्या भूमिका चांगल्या वठल्या आहेत. स्वाती खापरे या तरुण कलावतीनं मध्यमवयीन राधा सादर करताना भीतीनं उठलेले काहूर, उद्वेग, विश्लेषण करण्याचं भान आणि संकटातही सत्त्व जपण्याची निष्ठा या भावना ताकदीनं पेश केल्या. दहशतवादाला सामोरं जाण्याचा प्रसंग सामान्य मध्यमवर्गीय कुटुंब कशा प्रकारे हाताळू शकतं याचं एक प्रात्यक्षिकच ‘अचानक’च्या रूपाने पाहायला मिळतं.
- राजेंद्रप्रसाद मसुरकर
(संपर्क: ९९६०२४५६०१)
.............
या नाटकाचा आढावा ऐकण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा. https://youtu.be/C5l-91xGcq8
(सौजन्य : आकाशवाणी, रत्नागिरी)


Friday 15 November 2019

राजकीय मह्त्त्वाकांक्षेपोटी मतदारांचा अवमान

महाराष्ट्र राज्य विधानसभेची निवडणूक गेल्या महिन्यात पार पडली आणि एक महिना पूर्ण होत आला तरी राज्यात कोणाचेच सरकार अधिकारावर येऊ शकलेले नाही. त्यामुळे अखेर राज्यात राष्ट्रपती राजवट सुरू झाली आहे. आधीच्या विधानसभेची मुदत संपण्यापूर्वी नवी विधानसभा अस्तित्वात येऊन सरकार स्थापन व्हावे, असा संकेत आहे. तसे यावेळच्या निवडणुकीनंतर घडलेले नाही. मोठा गाजावाजा करून निवडणूक किती महत्त्वाची असते, हे कानीकपाळी ओरडून सर्वच यंत्रणेवर अतिप्रचंड खर्च करून निवडणुकीचा सोहळा पार पडला. सर्वसामान्य मतदारांनी अधिकाधिक मतदान करावे, यासाठी खूप प्रयत्न केले गेले. प्रशासकीय पातळीवर आणि राजकीय पक्षांकडूनही हे प्रयत्न झाले. मतदानाचा आपला पवित्र हक्क बजावणाऱ्या सर्व मतदारांनी आपले अमूल्य क्षण मतदानासाठी देऊन निवडणूक प्रक्रियेतला सर्वांत महत्त्वाचा भाग पार पाडला. मात्र राजकीय अहमहमिकेमुळे कोणाचेच सरकार स्थापन होऊ शकले नसल्याने तो मतदारांचा एक प्रकारे अवमानच आहे. हा अवमान आपण लोकांचे प्रतिनिधी आहोत, असे ठणकावून सांगणाऱ्या, निवडून आलेल्या विधानसभेतील साऱ्या लोकप्रतिनिधींनी केला आहे.
या सर्व प्रकारात कोणत्याही एका राजकीय पक्षाला दोष देण्यात काहीही अर्थ नाही. सरकार ही आपली मालमत्ता आहे, ज्या लोकांसाठी आपण सत्ता राबवणार आहोत ती सर्वसामान्य जनता आम्ही सांगू तेच सहन करणार आहे, असा समज असलेले सारे लोकप्रतिनिधी एकत्र झाले की काय होते, ते महाराष्ट्राची सध्याची राजकीय परिस्थिती पाहिल्यावर लक्षात येते. एक ठरावीक उद्दिष्ट घेऊन दोन वेगवेगळे मतप्रवाह असलेले पक्ष एकत्र येतात, निवडणुकीसाठी मतदारांना आश्वासने देतात, निवडून आल्यानंतर मात्र त्या साऱ्याचा निवडून आलेल्यांना विसर पडतो, निवडणूक ही लोकशाहीतील एक महत्त्वाची प्रक्रिया आहे याकडे दुर्लक्ष केले जाते. निवडणूक हे एक निमित्त ठरते आणि सरकार चालविणे ही आपली जहागिरी आहे, असा समज लगेच निर्माण होतो. मतदार म्हणजे लोकशाहीमध्ये राजा असतो असे म्हटले जाते, पण ते कागदावरच राहते. निवडणूक लढविल्यामुळे आपणच या लोकांचे तारणहार आहोत, मालक आहोत, हाच आविर्भाव निर्माण होतो. त्यामुळेच सरकारच्या स्थापनेला खीळ बसली आहे.
एकूण मतदारांपैकी ६० टक्के मतदारांनी कोणत्याच एका पक्षाला सरकार स्थापन करण्याएवढे बहुमत दिलेले नाही. राहिलेल्या ४० टक्के मतदारांनी मुळातच मतदान केलेले नाही. तो नाराजीचा एक भाग आहे, असे समजले तर आपल्यापैकी कोणाबद्दलच जनतेला काही वाटत नाही, साऱ्यांच्या बाबतीतच नाराजी निर्माण झाली आहे, हा निवडणुकीच्या निकालांचा संदेश कोणत्याच पक्षाला समजलेला नाही. त्यातूनही सरकार स्थापन करण्याच्या दृष्टीने ज्या युतीला मतदान झाले आहे, त्या युतीचे एकमेकांशी पटत नाही. त्यापेक्षा कमी मते मिळालेली आघाडी सरकार स्थापन करण्याएवढी सक्षम नाही. ही राजकीय परिस्थिती राजकीय पक्षांच्या डोळ्यांत अंजन घालणारी आहे. मात्र त्याकडे पाहावे, असा विचारही कोणत्याच पक्षाच्या मनात येणार नाही. निवडणूक म्हणजे केवळ उपचार ठरला आहे. व्यक्तिगत महत्त्वाकांक्षाच राजकीय परिस्थिती अस्थिर करायला कारणीभूत ठरत आहे, ही गंभीर बाब आहे. हे गांभीर्य लक्षात न घेता या महत्त्वाकांक्षाच वारंवार मांडून जनतेसमोर संभ्रम निर्माण करणे हासुद्धा जनतेचा अवमानच आहे. महाराष्ट्रातील सर्वसामान्य मतदार याच अवमानाच्या छायेत सध्या वावरत आहे.
- प्रमोद कोनकर
(संपादकीय, साप्ताहिक कोकण मीडिया, रत्नागिरी. १५ नोव्हेंबर २०१९)

Thursday 24 October 2019

रत्नागिरीत शिवसेनेने कमावले, राष्ट्रवादीने गमावले, काँग्रेस जैसे थे


            शिवसेनेने कमावले, राष्ट्रवादीने गमावले आणि काँग्रेसची स्थिती जैसे थे राहिली, असेच विधानसभा निवडणुकीच्या निकालाचे रत्नागिरी जिल्ह्याचे विश्लेषण करता येऊ शकेल.
            या निवडणुकीने अनेक गमतीजमती रत्नागिरी जिल्ह्यात घडवून आणल्या आहेत. मावळत्या विधानसभेत शिवसेनेचे तीन, तर राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन आमदार होते. शिवसेनेने एक अधिक जागा मिळविली असली, तरी चिपळूणची आधीची एक जागा गमावली आहे. गेल्या निवडणुकीत गमावलेला दापोली मतदारसंघ शिवसेनेने पुन्हा खेचून आणला, तर गुहागरचा मतदारसंघ शिवसेनेने पहिल्यांदाच मिळवला आहे. जनता पक्षाचे रत्नागिरी आणि रत्नागिरी हे एकेकाळचे बालेकिल्ले आता शिवसेनेच्या ताब्यात गेले आहेत.
            चिपळूणची जागा शिवसेनेने गमावली. सलग दहा वर्षे आमदार असलेल्या उमेदवाराला तेथील मतदारांनी पराभूत केले आहे. रत्नागिरीमध्ये उदय सामंत ही व्यक्ती चौथ्यांदा निवडून आली आहे. दापोलीचे सूर्यकांत दळवी शिवसेनेचे सहा वेळा आमदार होते. त्या विक्रमाकडे उदय सामंत या व्यक्तीने वाटचाल सुरू केली आहे. पण सामंत यांची पहिली दहा वर्षे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अशी ओळख होती. गेल्या निवडणुकीपासून ते शिवसेनेचे आमदार म्हणून ओळखले जात आहेत. यावेळी ते चौथ्यांदा निवडून आले आहेत. सदानंद चव्हाण दोन वेळा निवडून आले. यावेळी ते पराभूत झाले. राष्ट्रवादी काँग्रेसचे संख्याबळ दोनवरून एकवर आले. पण त्याच वेळी गुहागरची जागा राष्ट्रवादीने गमावली आणि चिपळूणची जागा दहा वर्षांनंतर पुन्हा मिळवली आहे. यापूर्वी २००४ साली रमेश कदम राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार म्हणून चिपळूणमधून निवडून आले होते.
            गुहागरमध्ये शिवसेनेने प्रथमच खाते उघडले आहे. आतापर्यंत शिवसेनेचा एकही आमदार नव्हता. युतीच्या जागावाटपात गुहागरची जागा भाजपला दिली गेली होती. तेथे २००४ च्या निवडणुकीपर्यंत भाजपचे वर्चस्व होते. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये गेलेले भास्कर जाधव यांनी ते २००९ मध्ये मोडून काढले. गेल्या वेळी युती नव्हती. तरीही भाजपला आपली जागा पुन्हा मिळवता आली नाही. यावेळी युती झाली, तरी भाजपच्या वाट्याला गुहागरसह जिल्ह्यातील एकही जागा आली नाही. त्यामुळे गुहागरचा मतदारसंघ शिवसेनेकडे प्रथमच सुपूर्द झाला.
            राजापूरमध्ये १९६२ मध्ये काँग्रेसचे सहदेव मुकुंद ठाकरे निवडून आले होते. तेव्हा पराभूत झालेले प्रजासमावादी पक्षाचे लक्ष्मण रंगनाथ हातणकर १९६७ आणि १९७२ मध्ये प्रजासमाजवादी पक्षाचे उमेदवार म्हणून निवडून आले. १९७८ आणि १९८० मध्ये त्यांनी जनता पक्ष आणि जनता पक्ष जेपी या पक्षांमधून निवडणूक लढवून जिंकली होती. नंतरच्या १९८५ आणि १९९० च्या निवडणुकीत त्यांनी काँग्रेसचे उमेदवार म्हणून निवडणूक जिंकली. त्यामुळे तेवढी दहा वर्षे राजापूर मतदारसंघ काँग्रेसकडे होता. नारायण राणे यांच्या काँग्रेस प्रवेशानंतर २००६ मध्ये झालेल्या पोटनिवडणुकीत राजापूर आणि संगमेश्वरमध्ये काँग्रेसचे आमदार निवडून आले होते. पण ती पोटनिवडणूक होती आणि नारायण राणे यांच्या करिष्म्यामुळे त्यांच्या सुभाष बने आणि गणपत कदम या त्यांच्या दोघा अनुयायांना त्या जागा मिळाल्या होत्या. त्यानंतर राजापूरच्या रूपाने रत्नागिरी जिल्ह्यामध्ये काँग्रेस पुन्हा एकदा सुरुवात करील, असे यावेळच्या निवडणुकीची मतमोजणी सुरू झाल्यानंतर पहिल्या सात फेऱ्यांपर्यंत वाटले होते. मात्र आठव्या फेरीनंतर चित्र पूर्ण पालटले. शिवसेनेचे राजन साळवी यांनी आघाडी काँग्रेसचे अविनाश लाड यांच्यावर आघाडी घ्यायला सुरवात केली. त्यामुळे ही जागा पुन्हा मिळविण्याचे काँग्रेसचे स्वप्न अपुरेच राहिले आणि जिल्ह्यातील काँग्रेसची स्थिती होती तशीच राहिली.
            रत्नागिरी जिल्ह्यात कुणबी समाजाची लोकसंख्या मोठी आहे. या समाजाला कित्येक वर्षांत प्रतिनिधित्व मिळाले नव्हते. केवळ मतांच्या राजकारणापुरता कुणबी समाजाचा वापर करून घेतला जात असल्याची सार्वत्रिक भावना होती. या पार्श्वभूमीवर गुहागरमध्ये सहदेव बेटकर राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे तर राजापूरमध्ये अविनाश लाड काँग्रेसतर्फे निवडणूक लढवत होते. मात्र ते दोघेही पराभूत झाल्यामुळे कुणबी कार्ड या दोन्ही मतदारसंघांमध्ये चालले नाही, हेच स्पष्ट झाले.
            निवडणुकीतील यशापयशाचा शिवसेना, भारतीय जनता पक्ष, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस या चारही पक्षांनी विचार करायला हवा. चिपळूण तालुक्यातील तिवरे येथील धरण फुटल्यामुळे निर्माण झालेली नाराजी सदानंद चव्हाण यांच्या पराभवाला जितकी कारणीभूत ठरली, त्यापेक्षाही अधिक प्रमाणात शेखर निकम यांनी गेल्या वेळच्या निवडणुकीत पराभव झाल्यानंतरही संपूर्ण मतदारसंघाकडे दिलेले लक्ष, ठिकठिकाणी केलेली कामे आणि सतत ठेवलेला चांगला संपर्क त्यांना विजयापर्यंत घेऊन गेला. त्याउलट स्थिती दापोलीचे राष्ट्रवादी काँग्रेसचे पराभूत उमेदवार संजय कदम यांची होती. विरोधी पक्षात असल्यामुळे त्यांनी सरकारची धोरणे आणि राज्यस्तरावरच्या प्रश्नांबाबत अधिक मतप्रदर्शन केले. निषेध नोंदविला. आंदोलन केले. आमदार या नात्याने त्यांनी जेवढा संपर्क ठेवायला हवा होता, मतदारसंघातील विविध कामे करायला हवी होती, ती पाच वर्षांत केलेली नाहीत. त्याचा फटका त्यांना बसला. दापोलीमध्ये शिवसेनेचे योगेश रामदास कदम यांनी गेल्या पाच वर्षांपासूनच निवडणुकीची तयारी चालविली होती, हेही लक्षात घ्यायला हवे. राजापूर मतदारसंघात शिवसेनेचे राजन साळवी विजयी झाले असले तरी त्यांच्या मताधिक्यामध्ये घट झाली आहे. नाणार प्रकल्पासारख्या ज्वलंत विषयाच्या बाबतीत त्यांची आणि त्यांच्या पक्षाची भूमिका, भारतीय जनता पक्षाचे त्या प्रश्नाच्या बाबतीत न मिळालेले सहकार्य, तसेच प्रकल्पाच्या बाजूने असणारे मतदार या साऱ्यांचा एकत्रित परिणाम म्हणून साळवी यांच्या मतांमध्ये घट झाली आहे.
            मतमोजणीच्या सातव्या फेरीपर्यंत आघाडीवर असलेले अविनाश लाड यांनी आणि त्यांच्या पक्षानेही त्यांना ज्या भागातून मताधिक्य मिळाले, त्या भागातून ते का मिळाले आणि मतदारसंघातील इतर भागांमध्ये ते का मिळू शकले नाही, याचा विचार करायला हवा. शिवसेनेने रत्नागिरीची जागा टिकविली आहे. उमेदवार उदय सामंत यांनी मताधिक्याचा नवा उच्चांक प्रस्थापित केला आहे. मात्र त्यांना मिळालेले यश शिवसेनेचे नसून व्यक्तिगतरीत्या उदय सामंत यांचे आहे, हेही शिवसेनेने लक्षात घ्यायला हवे. गेल्या काही काळापासून उदय सामंत शिवसेना सोडून भारतीय जनता पक्षामध्ये जाणार असल्याची चर्चा होती. ती वस्तुस्थिती होती की अफवा होती, याबाबत काही सांगता येणार नाही. मात्र खरोखरीच श्री. सामंत भाजपमध्ये गेले असते तर यावेळी कदाचित रत्नागिरीची जागा भाजपने म्हणजेच उदय सामंत यांनीच जिंकली. असती यात शंका नाही.
            एकंदरीत या निवडणुकीने सर्वच पक्षांना विचार करायला लावायचा धडा शिकविला आहे.

-           प्रमोद कोनकर