Tuesday 27 March 2018

मठ येथील लक्ष्मीपल्लीनाथ मंदिराचे कलशारोहण थाटात

करवीर पीठाचे शंकराचार्य विद्यानृसिंह भारती यांनी स्वतः कलशारोहण केले.

कॅन्सर म्हणजे अयोग्य आचरणामुळे निर्माण झालेली विकृती – शंकराचार्य विद्यानृसिंह भारती

मठ (ता. लांजा) : कॅन्सरला रोग म्हटले जाते. पण तो रोग नाही. कारण रोगाचे जंतू नसतात. माणसाच्या आचरणामध्ये जे अयोग्य बदल झाले आहेत, त्यामुळे निर्माण झालेली कॅन्सर ही एक विकृती आहे. सनातन धर्माच्या शिकवणीचे अनेक पुरावे विज्ञानानेही आता सिद्ध केले आहेत. म्हणून दैनंदिन शुद्ध आचरणाची शिकवण देणारा हिंदू धर्म श्रेष्ठ आणि परिपूर्ण आहे, असे प्रतिपादन करवीर पीठाचे शंकराचार्य विद्यानृसिंह भारती यांनी केले.
भक्तांनी रांग लावून अभिषेकाकरिता कलश हस्तांतरित केले.
मठ येथे  मुंबई-गोवा महामार्गावर लक्ष्मीपल्लीनाथाच्या कुलोपासकांनी उभारलेल्या नव्या मंदिराचे कलशारोहण शंकराचार्यांच्या हस्ते काल (दि. २६ मार्च) झाले. त्यावेळी झालेल्या प्रवचनात ते बोलत होते. धर्माचरणात सांगितलेल्या अनेक बाबी आजच्या विज्ञानाने सिद्ध केल्या आहेत, असे सांगून ते म्हणाले की, मूल जन्माला आले की, त्याचे नामकरण केले जाते. तेव्हा सनातन वैदिक नामकर्मातील संस्कारांमध्ये बालकाला त्याचा जन्म पणजोबापासून झाल्याचे मंत्र ऐकविले जातात. आताच्या विज्ञानानेही जनुकांच्या साह्याने हेच सिद्ध केले
कलशावर अभिषेक
आहे. पूर्वीच्या लोकांनी सनातन धर्म पाळला,  त्यातून त्यांना आनंद मिळाला. आजही तो धर्म पाळला, तर आपल्यालाही समाधान होईल. परिपूर्ण धर्मामध्ये इदं न मम अशी समर्पणाची भावना सांगितली आहे. ती निर्माण होण्यासाठी आणि पापक्षालनासाठी जुन्या मंदिरांचा जीर्णोद्धार करावा, नवी मंदिरे बांधावीत, असे सांगितले आहे. मंदिराच्या कळसाचे दर्शन घ्यावे, असे सांगितले जाते. पंढरपूरच्या वारीला जाणारे वारकरीही रांगांमुळे पांडुरंगाचे दर्शन घेता आले नाही, तरी कळसाचे दर्शन घेऊन परतात. कारण गाभाऱ्यातील देवतेचे अधिष्ठान कळसामध्ये निर्माण केलेले असते. सगुण मूर्तीच्या दर्शनाचे फळ कळसाच्या दर्शनाने मिळते. कळस म्हणजे निर्गुणस्वरूप, तर गाभाऱ्यातील अवयवांनी बद्ध असलेली मूर्ती म्हणजे सगुण रूप असते. कोणत्याही मंदिराचा कळस एकाच प्रकारचा शंकूच्या आकाराचा असतो. अवकाशातील सत्त्वगुण कळसाच्या बिंदूमधून खेचला जाऊन तो गाभाऱ्यातील मूर्तीपर्यंत पोहोचतो. तेथे दर्शन घेणाऱ्यांना तोच सत्त्वगुण दिला जातो, असे सांगून शंकराचार्यांनी सत्त्व, रज आणि तमो गुणांविषयी ऊहापोह केला. हिंदू विवाह संस्थेमध्येही धर्माच्या परिपूर्णतेचे दर्शन घडते. धर्माचरण करताना धर्म, अर्थ आणि काम हे तिन्ही पुरुषार्थ आपल्या संमतीनेच आचरण्याचे वचन वराकडून वधू घेते. पत्नीला
शंकराचार्यांच्या पादुकांची पाद्यपूजा
किती महत्त्व आहे, हेही त्यातून सिद्ध होते. ज्ञानेश्वर, तुकाराम महाराजासारख्या संतांनीही पतिव्रता महिलांची महती सांगितली आहे. असे धर्माचरण सांगणाऱ्या भारतीय संस्कृतीवर इतकी आक्रमणे झाली, तरी संस्कृती आहे आजही जपली गेली आहे. त्यामुळेच ती श्रेष्ठ आहे, असेही शंकराचार्यांनी सांगितले.
प्रवचनापूर्वी शंकराचार्यांच्या हस्ते कलशारोहण समारंभानिमित्ताने श्री लक्ष्मी्पल्लीनाथ संस्थानतर्फे तयार करण्यात आलेल्या गाथा श्री लक्ष्मीपल्लीनाथाची या स्मरणिकेचे प्रकाशन करण्यात आले.
शंकराचार्यांच्या हस्ते गाथा श्री लक्ष्मीपल्लीनाथाची स्मरणिकेचे प्रकाशन
यावेळी संस्थानचे अध्यक्ष सुधाकर चांदोरकर, उपाध्यक्ष शशिकांत गुण्ये आणि अन्य पदाधिकारी उपस्थित होते. स्मरणिकेची निर्मिती कोकण मीडिया कन्सल्टन्सी अँड सर्व्हिसेसतर्फे करण्यात आली आहे.
कलशारोहणापूर्वी कलशाची मिरवणूक काढण्यात आली. शंकराचार्यांनी स्वतः मंदिरावर जाऊन कलशाची स्थापना केली. तत्पूर्वी मंदिरात धार्मिक विधी पार पडले.
दरम्यान, नव्या मंदिराच्या प्रांगणातील सहावा आणि संस्थानाचा शतकोत्तर दुसरा चैत्रोत्सव सुरू झाला असून तो ३१ मार्चपर्यंत चालणार आहे. दररोज सकाळपासून दुपारपर्यंत धार्मिक विधी, दुपारी महाप्रसाद, रात्री भोजन, सायंकाळी आरत्या व नामजप, रात्री कीर्तन आणि मध्यरात्री पारंपरिक पद्धतीनुसार छबिना आणि भोवत्या असे कार्यक्रम पार पडणार आहेत. रोज रात्री नऊ ते १२ या वेळेत हभप मकरंदबुवा सुमंत (रामदासी) यांची कीर्तने होणार आहेत.
......

गाथा श्री लक्ष्मीपल्लीनाथाची स्मरणिका चैत्रोत्सवात उपलब्ध
           स्मरणिकेचे देणगीमूल्य ५० रुपये असून स्मरणिकेच्या विक्रीतून येणारा निधी संस्थानात जमा होणार आहे. चैत्रोत्सवाच्या ठिकाणी ही स्मरणिका उपलब्ध आहे. भक्तांनी ही स्मरणिका खरेदी करून अल्पशा देणगीरूपाने संस्थानाला हातभार लावावा, असे आवाहन संस्थानातर्फे करण्यात आले आहे.

...............
 कळसाने सुशोभित झालेले श्री लक्ष्मीपल्लीनाथ मंदिर.

Sunday 25 March 2018

केबीबीएफच्या ग्लोबल मीटने दिला उद्यमशीलतेला चालना



                बेळणे (ता. कणकवली) - केबीबीएफ (कऱ्हाडे ब्राह्मण बनेव्होलंट फोरम) या संस्थेची ग्लोबल मीट निसर्गसौंदर्याने नटलेल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यात बेळणे (ता. कणकवली) १० मार्च रोजी पार पडली. वेगवेगळ्या विषयांवरच्या व्याख्यानांनी उद्यमशीलतेला चालना दिली. सिंधुदुर्ग केबीबीएफचे अध्यक्ष प्रदीप जोशी यांच्या नेतृत्वाखाली पार पडलेला हा मेळावा नीटनेटक्या नियोजनामुळे संस्मरणीय ठरला. या मेळाव्याचा संक्षिप्त आढावा येथे घेतला आहे.
रत्नागिरीचे नगराध्यक्ष राहुल पंडित यांच्या हस्ते  ग्लोबल मीटचे उद्घाटन झाले. शेजारी मान्यवर

                आपल्या समाजात व्यावसायिकतेची गोडी वाढावी, त्यात उपलब्ध होणाऱ्या संधी ज्ञातिबांधवांपर्यंत पोहोचाव्या, शिवाय ज्ञातिबांधवांना एक व्यासपीठ उपलब्ध होऊन ज्ञातीअंतर्गत संपर्ककक्षा वाढाव्यात, यासाठी या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. मेळाव्याच्या उद्घाटनाचा छोटेखानी समारंभ झाला. यावेळी केबीबीएफ-ग्लोबलचे श्री. गुणे, सचिव अमित शहाणे, अजिता भावे, व्याख्याते डॉ. यश वेलणकर, विनोद देशपांडे, अमोल करंदीकर, मुकुंद सप्रे, रत्नागिरी केबीबीएफचे अध्यक्ष योगेश मुळ्ये, सिंधुदुर्ग केबीबीएफचे सर्व पदाधिकारी तसेच अन्य शाखांचे प्रतिनिधी मिळून सुमारे १५० जण उपस्थित होते. रत्नागिरीचे नगराध्यक्ष राहुल पंडित यावेळी खास उपस्थित होते. आपण आधी उद्योजक आहोत, त्यानंतर नगराध्यक्ष आणि अन्य भूमिका मी निभावत आहे. उद्योजक या नात्याने केबीबीएफला आवश्यक ती मदत आपण करणार असल्याची ग्वाही त्यांनी दिली.
                आयुर्वेदाचार्य यश वेलणकर यांनी भगवद्गीतेतील तीन सूत्रांच्या आधारे व्यवसाय आणि त्यातून येणाऱ्या ताणतणावांसंदर्भाची उत्तम मांडणी केली. मेंदूची रचना आणि कार्य, ताणतणावासंदर्भातील मेंदूतील केंद्रे, ताणामुळे शरीरात होणारे बदल याविषयी त्यांनी स्लाइडशोसह सविस्तर माहिती दिली. व्यवसायासाठी गाठीभेटी, संपर्क आवश्यक आहेच, पण कोणत्याही परिस्थितीत मनाचा समतोल ढळून चालणार नाही, असे त्यांनी सांगितले. तणावमुक्त जगता यावे, अशी अपेक्षा असते. मात्र ताणतणाव आले, तरच उद्योजकाला यशस्वी होता येते. योग्य प्रमाणात तणाव असला, तर तो एक प्रकारची ऊर्जा निर्माण करत असतो. आवश्यक त्या गोष्टींवर लक्ष केंद्रित करण्याकरिता मेंदूला एक प्रकारचे प्रशिक्षण देणे आवश्यक आहे. लहानपणापासूनच तसे शिकविले गेले पाहिजे. व्यवसायातही तो वाढविण्यासाठी आणि टिकविण्यासाठी माइंडफुलनेस म्हणजे पूर्णभानाची आवश्यकता असते. त्याकरिता मेंदूची कार्यक्षमता वाढविली गेली पाहिजे, सजगता आली पाहिजे, असे त्यांनी सांगितले. मनावरचा ताण कमी करण्याकरिता दोन छोट्या योगक्रिया त्यांनी यावेळी शिकविल्या.
                डोंबिवली नागरी सहकारी बँकेला मल्टीस्टेट शाखांचा परवाना मिळाला आहे. बँकेने रत्नागिरीपाठोपाठ सिंधुदुर्गातही कुडाळमध्ये शाखा सुरू केली आहे. अन्य बँकांपेक्षा काही वेगळ्या कर्जयोजना बँकेकडे आहेत, अशी माहिती बँकेतर्फे पराग नवरे यांनी दिली.
                व्यक्तिमत्त्व आणि व्यवसायवृद्धी या विषयावर बेळगावचे विनोद देशपांडे यांनी कन्नड आणि मराठी भाषेतील विविध म्हणी आणि वाक्प्रचारांचा वापर करत मार्गदर्शन केले. एखाद्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांना भेट देण्याची टाळाटाळ करणारे प्रधानमंत्री देशी-विदेशी उद्योजकांसाठी खास वेळ देतात, त्यांच्यासमवेत वेळ व्यतीत करतात. हे लक्षात घेऊन ब्राह्मण उद्योजकांनी आर्थिकदृष्ट्या सक्षमता आणि उद्योग क्षेत्रात उत्तुंगता गाठली पाहिजे, असे श्री. देशपांडे यांनी सांगितले. उद्योग-व्यवसाय करताना आवश्यक असलेल्या अनेक बारकाव्यांचा त्यांनी तपशिलाने ऊहापोह केला. उद्योगांसाठी एखादे उत्पादन घ्यायलाच हवे असे नाही. ॲमेझॉनसारख्या अनेक कंपन्या स्वतःचे उत्पादन नसतानाही जागतिक पातळीवर आपला व्यवसाय करत आहेत. उद्योग सुरू करताना किंवा वाढविताना अशा नव्या आणि वेगळ्या संधींकडे लक्ष दिले पाहिजे. भविष्याचा वेध घेतला पाहिजे. एकत्रित सेवा देता येतील का, कोणते आधुनिक तंत्रज्ञान वापरता येईल, तंत्रज्ञानाच्या वापरातून विस्तार कसा करता येईल, भविष्यातील गरजा यांचा वेध घेतला पाहिजे. उद्योगांच्या नवनवीन शाखा आणि नवनवी उत्पादने तयार करायला हवीत. उद्योग करताना सर्पदृष्टी आणि गरुडदृष्टी हवी. म्हणजे अल्पकालीन आणि दीर्घकालीन दृष्टिकोन आवश्यक आहे. सर्वांत महत्त्वाचे म्हणजे आपण तयार केलेले एखादे उत्पादन किंवा दिलेली एखादी सेवा एका ब्राह्मण उद्योजकाने दिली आहे, त्यामुळे ती उत्तम आणि उत्कृष्टच असणार, असा विश्वास आपल्याबाबत आपल्याला निर्माण करता आला पाहिजे, असा कानमंत्री श्री. देशपांडे यांनी दिला.
                कणकवलीजवळच सुरू असलेल्या पंचगव्य थेरपीविषयी डॉ. धनंजय प्रभुदेसाई यांनी माहिती दिली. अधिक माहितीसाठी त्यांच्याशी (०२३६७) २४७८२५ किंवा ९८६०७९७२७४ या दूरध्वनीवर संपर्क साधता येईल.
                पितांबरी प्रॉडक्ट्सतर्फे पराग साळवी यांनी सगुंधी कोकण या संकल्पनेची माहिती दिली. गवती चहाच्या उत्पादनावर पितांबरी उद्योगाने आता लक्ष केंद्रित केले असून साखळोली (दापोली), तळवडे (राजापूर) आणि पेढांबे (चिपळूण) या रत्नागिरी जिल्ह्यात सुरू असलेली लागवड, गवती चहाची वैशिष्ट्ये, लागवडीचे चक्र इत्यादीविषयी त्यांनी सांगितले. गवती चहाच्या लागवडीपासून दरवर्षी दरएकरी ३० हजार ते ४० हजार रुपयांचे उत्पन्न मिळू शकते. किमान सहा एकर क्षेत्रात लागवड केली गेली, तर त्याच परिसरात प्रक्रिया करता येऊ शकेल. हा सर्व माल पितांबरी उद्योग विकत घेऊ शकेल. या लागवडीसाठी कंपनीकडून मार्गदर्शन आणि लागवडीसाठी वाण मिळू शकेल, असे त्यांनी सांगितले. पराग साळवी यांचा संपर्क क्रमांक ९५४५७०७०६६.
                सायंकाळच्या सत्रात कृषी आणि उद्योजकता या विषयावर कृषी अधिकारी अमोल करंदीकर आणि जिल्हा उद्योग केंद्राचे मुकुंद सप्रे यांनी मार्गदर्शन केले. राज्य शासनाच्या कृषी विभागामार्फत विस्तार, फलोत्पादन, गुणनियंत्रण आणि प्रशासन या चार टप्प्यांमध्ये कशी मदत केली जाते, अभ्यास दौरे, अपघात विमा योजना, विविध पुरस्कार, महात्मा गांधी रोजगार हमी योजना, मागेल त्याला शेततळे, जलयुक्त शिवार योजना, चांदा ते बांदा योजना अशा विविध योजनांची नेमकी माहिती श्री. करंदीकर (९४२३६८४०९५) यांनी अत्यंत विनोदी निवेदनातून दिली.
                सिंधुदुर्ग जिल्हा उद्योग केंद्राचे मुकुंद सप्रे यांनी नवउद्योजकांना सिंधुदुर्ग जिल्ह्यात नारळ आणि काजू या पिकांच्या प्रक्रिया उद्योगाच्या किती व्यापक संधी आहेत, याचा आढावा घेतला. नारळाचा काथ्यापासून तयार केल्या जाणाऱ्या कुंड्यांमधील रोपांची निर्मिती, शोभेच्या वस्तू, खोके असे अनेक उद्योग करता येणे शक्य आहे. महिला उद्योजकांना दिला जाणारा १०० टक्के इन्सेन्टिव्ह, उद्योगांनुसार मिळणारी अनुदाने आणि पतपुरवठा याबाबत त्यांनी माहिती दिली. फळप्रक्रिया उद्योगांमध्ये प्रचंड वाव असल्याचे त्यांनी उदाहरणांसह स्पष्ट केले. बांबू प्रक्रिया उद्योगाकडेही त्यांनी लक्ष वेधले. अधिक माहितीसाठी त्यांना त्यांच्या कार्यालयीन दूरध्वनीवर (०२३६२-२२८७०५) किंवा व्यक्तिगत (८८०५८९५६५७) संपर्क साधता येऊ शकेल.
                मेळावा यशस्वी होण्यासाठी केबीबीएफ सिंधुदुर्ग चाप्टरचे अध्यक्ष प्रदीप जोशी, उपाध्यक्ष विहंग देवस्थळी, सचिव नितीन घाटे, खजिनदार संजय पाध्ये आणि त्यांच्या संपूर्ण चमूने उत्तम तयारी केली होती. त्यांना मयूरेश पुरोहित सक्रिय मदत करताना दिसत होते. कार्यक्रम वेळेत सुरू होऊन वेळेत संपला. नियोजित कार्यक्रमापैकी कोणताही कार्यक्रम रद्द झाला नाही. एकंदरीत मेळावा यशस्वी झाल्याची पावती उपस्थितांकडून दिली जात होती.
                ...................


बेळणे (ता. कणकवली, जि. सिंधुदुर्ग) येथे केबीबीएफच्या ग्लोबल मीटमध्ये सहभागी झालेले प्रतिनिधी


Saturday 24 March 2018

मठ येथील श्री लक्ष्मीपल्लीनाथ मंदिर कलशारोहणासाठी सज्ज


रत्नागिरी : मठ (ता. लांजा, जि. रत्नागिरी) येथील श्री देव लक्ष्मीपल्लीनाथ मंदिराचा कलशारोहण सोहळा येत्या सोमवारी (दि. २६ मार्च) होणार आहे. संस्थानाचा शतकोत्तर दुसरा चैत्रोत्सव आजपासून सुरू झाला असून तो ३१ मार्चपर्यंत चालणार आहे. याच कालावधीत सोमवारी नूतन मंदिरावर करवीर पीठाच्या शंकराचार्यांच्या हस्ते कळस चढविला जाणार आहे.


      मुंबई-गोवा महामार्गावर पालीजवळ मठ गावात लक्ष्मीपल्लीनाथाच्या कुलोपासकांनी उभारलेल्या नव्या मंदिराच्या प्रांगणातील हा सहावा उत्सव आहे. चैत्र शुद्ध दशमी ते चैत्र पौर्णिमा या कालावधीत दरवर्षी चैत्रोत्सव होतो. यंदा कलशारोहणामुळे हा उत्सव आज सप्तमीपासूनच सुरू झाला. परंपरा जपणारे कार्यक्रम, तरुणांचा मोठा सहभाग आणि नेटके नियोजन ही या उत्सवाची वैशिष्ट्ये असतात. यंदाच्या उत्सवात, २६ मार्च रोजी करवीर पीठाचे श्रीमद् शंकराचार्य विद्यानृसिंह भारती यांच्या हस्ते कलशारोहण होणार आहे. त्यानंतर ते उपस्थितांना मार्गदर्शनही करणार आहेत. दरवर्षीप्रमाणेच श्रींची पूजा, अभिषेक, लघुरुद्रादी धार्मिक विधी आणि कीर्तन, प्रवचन, नामजप आदी कार्यक्रम या कालावधीत होणार आहेत. दररोज सकाळपासून दुपारपर्यंत धार्मिक विधी, दुपारी महाप्रसाद व रात्री भोजन, सायंकाळी आरत्या व नामजप, रात्री कीर्तन आणि मध्यरात्री पारंपरिक पद्धतीनुसार छबिना आणि भोवत्या अशी कार्यक्रमांची सर्वसाधारण रूपरेषा आहे. उद्या (दि. २५ मार्च) रात्री स्थानिक भक्तमंडळींचे भजन होणार असून, २७ मार्च रोजी रात्री वेदमूर्ती आचार्य गुरुजी आणि ब्रह्मवृंद मंत्रजागर करणार आहेत. २६ ते ३१ मार्च या कालावधीत रात्री नऊ ते १२ या वेळेत हभप मकरंदबुवा सुमंत (रामदासी) यांची कीर्तने होणार आहेत.

      अखेरच्या दिवशी रोजी रात्री साडेनऊ ते १२ या वेळेत ‘मी विनायक दामोदर सावरकर’ हा कार्यक्रम योगेश सोमण सादर करतील. त्यानंतर सुमंतबुवांचे लळिताचे कीर्तन होऊन उत्सवाची सांगता होणार आहे, असे संस्थानाच्या कार्यकारिणीतर्फे कळविण्यात आले आहे. या सोहळ्यात आवर्जून सहभागी होण्याचे आमंत्रण संस्थानातर्फे देण्यात आले आहे.

Thursday 8 March 2018

अचीव्हर्स ॲकॅडमीची मधुरा आठल्ये सीएस फौंडेशन परीक्षेत गुणवत्ता यादीत


मधुरा आठल्ये
              रत्नागिरी - येथील अचीव्हर्स ॲकॅडमीमध्ये सीएस फौंडेशन परीक्षेसाठी मार्गदर्शन घेणारे पाच सीएस फौंडेशन परीक्षा इन्स्टिट्यूट ऑफ कंपनी सेक्रेटरीज ऑफ इंडियाकडून घेतली जाते.
विद्यार्थी यशस्वी झाले असून त्यापैकी मधुरा आठल्ये ही विद्यार्थिनी गुणवत्ता यादीत आली आहे. हर्षदा वाकणकर, ऋतू गुढेकर, निधी सुर्वे आणि अभिषेक साळवी हे विद्यार्थी उत्तम गुणांनी उत्तीर्ण झाले आहेत.
या विद्यार्थ्यांना अचीव्हर्स ॲकॅडमीमध्ये सौ. मुग्धा करंबेळकर, गौरव महाजनी, शिवानी ठाकूर, रोहिणी काटदरे, धनश्री करमरकर आणि ऋचा पित्रे यांचे मार्गदर्शन लाभले. ॲकॅडमीमध्ये सीएस व सीए या परीक्षांच्या मार्गदर्शनाबरोबरच आता अकाउंटिंग अँड फायनान्स व बीएमएस या विशेष शाखांच्या विद्यार्थ्यांसाठीही मार्गदर्शन सुरू करण्यात येत आहे. जे विद्यार्थी जून २०१८मध्ये सीए सीपीटी ही परीक्षा
हर्षदा वाकणकर
देऊ इच्छितात, त्यांच्यासाठी लॉ आणि इकॉनॉमिक्स या विषयांचे मार्गदर्शन लवकरच सुरू होत आहे. या विद्यार्थ्यांना सीपीटीच्या सर्व विषयांसाठी ऑनलाइन टेस्ट सिरीजदेखील देता येतील. विद्यार्थ्यांनी या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन ॲकॅडमीच्या संचालिका सौ. मुग्धा करंबेळकर यांनी केले आहे.
(संपर्कासाठी दूरध्वनी : ८२३७७५३०३६, ८३८००६९३२०, ९४०४९१७०५६)
ऋतू गुढेकर

निधी सुर्वे


भिषेक साळवी

Tuesday 9 January 2018

सीएच्या विविध परीक्षांसाठी रत्नागिरीत प्रथमच ऑनलाइन टेस्ट सिरीज

     रत्नागिरी – सीएस फाउंडेशन, सीए सीपीटी व लॉ सीइटी या परीक्षांसाठी रत्नागिरीत प्रथमच ऑनलाइन टेस्ट सिरीजच्या सुविधेचा लाभ अचीव्हर्स ॲकॅडमीमध्ये विद्यार्थ्यांना उपलब्ध करण्यात आली आहे.
      विद्यार्थ्यांच्या उत्तम सहकार्यामुळे अचीव्हर्स ॲकॅडमी यशस्वीपणे तिसऱ्या वर्षात पदार्पण करत आहे. २०१६ मध्ये सीएस कोर्ससाठी सुरू झालेल्या ॲकॅडमीने आता सीएचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांनादेखील मार्गदर्शनाची संधी उपलब्ध करून दिली आहे. सीएस फाउंडेशन, सीएस एक्झिक्युटिव्ह आणि सीएस प्रोफेशनल या परीक्षांच्या जून व डिसेंबर २०१८साठीच्या ॲडमिशन्स सुरू झाल्या आहेत. तसेच सीएसीपीटी व आयपीसीसी या परीक्षांच्या मार्गदर्शनासाठीदेखील प्रवेश सुरू आहेत. विद्यार्थ्यांकडे वैयक्तिक लक्ष देता यावे, यासाठी प्रवेशसंख्या मर्यादित ठेवण्यात आली आहे. त्यामुळे प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांनी त्वरित संपर्क साधावा.      जे विद्यार्थी जून २०१८मध्ये सीएसीपीटी हि परीक्षा देऊ इच्छितात, त्यांच्यासाठी लॉ आणि इकॉनॉमिक्स या विषयांचे मार्गदर्शन मार्च महिन्यापासून सुरू होणार आहे. या विद्यार्थ्यांना सीपीटीच्या सर्व विषयांसाठी ऑनलाइन टेस्ट सिरीजदेखील देता येणार आहे. विद्यार्थ्यांकरिता तज्ज्ञ शिक्षकांच्या नोट्सही दिल्या जातील.
      जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी या सुविधांचा लाभ घ्यावा, असे आवाहन क्लासच्या संचालिका सौ. मुग्धा करंबेळकर यांनी केले आहे. संपर्क : ८२३७७५३०३६, ८३८००६९३२०, ९४०४९१७०५६.


कॅशलेस व्यवहारांसाठी सुलभ भीम अॅपचा वापर वाढला



      कॅशलेस व्यवहारांसाठी अत्यंत सुलभ असलेल्या भीम अॅपचा वापर वाढला आहे. नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडियाने विकसित केलेले क्रांतिकारक अॅप भारत इंटरफेस फॉर मनी म्हणजे भीम अॅप वर्षभरात देशातील ६५ बँकांच्या ग्राहकांसाठी व्यवहार करण्यासाठी उपलब्ध झाले आहे.
      पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ३० डिसेंबर २०१६ रोजी हे अॅप सुरू केले होते. वैशिष्ट्यपूर्णतेमुळे हे अॅप भारतीयांच्या पसंतीस उतरले आहे. भीम अॅपचा वापर केल्यास पैसे वापरकर्त्याच्या बँक खात्यात थेट जमा होतात. क्यू आर कोड स्कॅन करूनही रक्कम भरता येते. या अॅपचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे कोणत्याही भीम अॅप किंवा युनिफाइड पेमेंट्स इंटरफेस (UPI) वापरकर्त्याला पैसे मागविण्यासाठी कलेक्ट रिक्वेस्ट पाठवता येते. मुंबईतील २३ वर्षाचे सत्यम मंगलमूर्ती ह्युमन रिसोर्सेस व्यावसायिक असून हे अॅप ते नियमितपणे वापरतात. ते म्हणतात की, माझ्या घराच्या जवळच एक डिपार्टमेंटल स्टोअर असून घरातील सर्व किराणा माल मी तेथूनच घेतो. बिलाची रक्कम भीम अॅपद्वारे तेथे स्वीकारली जाते. लहानसहान वस्तूंच्या खरेदीसाठी मला पैशाचे पाकीट किंवा तत्सम कोणतेही साधन बरोबर घेऊन जाण्याची गरजच नाही. शिवाय मला गुंतागुंतीची अॅप्स मुळीच आवडत नाहीत. भीम अॅपद्वारे व्यवहार करण्यासाठी तांत्रिक मुद्दे समजून घेण्याची काहीच गरज नाही, हे मला सर्वांत जास्त आवडते. माझ्या प्रशिक्षण कालावधीत माझे मित्र मेसमधील जेवण टाळण्यासाठी रात्री बाहेर जेवायला जात तेव्हा आम्ही भीम अॅपचा उपयोग करून बिले एकमेकांमध्ये विभागून घेत असू. अशा अॅपमुळे सामूहिक खर्च करण्याची व्यवस्था इतकी सोपी आहे की, काही सेकंदांत तुम्हाला कलेक्ट रिक्वेस्ट पाठवता येते. अनेक प्रकारचे पासवर्ड मी लक्षात ठेवू शकत नाही. त्याचमुळे भीम अॅपद्वारे देवघेवीचे व्यवहार करणे मला खूपच सोपे जाते.
      सत्यमने शिल्लक रक्कम जाणून घेण्यासाठी आणि पैसे हस्तांतरित करण्यासाठी आपले बँक खाते भीम अॅपशी जोडले आहे. त्याने आर्थिक व्यवहार करण्याच्या पत्त्यासाठी UPI आयडी तयार केला असून पैसे हस्तांतरित करताना बँकेचा खाते क्रमांक तसेच आयएफएस कोडऐवजी हा आयडी देता येतो. भीम अॅपचा उपयोग करून संपर्कातील व्यक्तींना पैसे पाठविता येतात. देय रक्कम चुकती करणे विसरले जाऊ नये म्हणून रिमाइंडर तयार करता येतो आणि आपल्या संदर्भासाठी व्यवहाराची स्टेटमेंट डाऊनलोड करता येतात. अनोळखी कलेक्ट रिक्वेस्टला स्पॅम म्हणून नोंदवण्याच्या वैशिष्ट्यामुळे वाढीव सुरक्षितता मिळते.
                      केंद्र सरकारच्या महत्त्वाकांक्षी भीम अॅपचा वापर वाढण्याकरिता आता प्रोत्साहनपर रक्कम ग्राहकांना दिली जाणार आहे. भीम अॅप वापरण्याची शिफारस एकमेकांना केल्यास शिफारस करणारा आणि ज्याला अशी शिफारस केली आहे त्या दोघांनाही काही ठरावीक व्यवहार पूर्ण केल्यानंतर प्रोत्साहनपर रक्कम दिली जाणार आहे.
      भीम अॅपचे आणख एक वैशिष्ट्य म्हणजे या अॅपची शिफारस करणाऱ्याला आणि ते डाऊनलोड करून त्याचा वापर करणाऱ्याला अशा दोघांनाही प्रोत्साहनपर रक्कम दिली जाते. ज्याला शिफारस करायची आहे, त्याला भीम अॅप डाऊनलोड करण्यासाठी प्रोत्साहित करावे आणि रेफरल कोडमध्ये आपला मोबाइल क्रमांक टाकावा. या अॅपचा वापर सुरू केल्यानंतर शिफारस करणारा आणि अॅप डाऊनलोड करणाऱा या दोघांनीही किमान ५० रुपयांचे किमान तीन व्यवहार केले, तर त्या दोघांनाही प्रत्येकी २५ रुपये बक्षीस मिळणार आहेत. BHIM अॅपसंदर्भात अधिक माहितीसाठी कृपया www.bhimupi.org.in/ वर मिळू शकेल.

      अँड्रॉइड फोन वापरणारे भीम अॅप गुगल प्ले स्टोअरवरून डाऊनलोड करू शकतात तर आय फोन वापरकर्त्यांना ते  अॅपल अॅप स्टोअरमध्ये उपलब्ध आहे.  एकदा हे अॅप डाऊनलोड केले की UPI पिन, UPI आय डी तयार करावा लागेल. त्यानंतर या अॅपद्वारे व्यवहार सुरू करता येतात. BHIM अॅप मराठीसह अनेक प्रादेशिक भाषांमध्ये उपलब्ध आहे. पैसे झटपट  पाठवण्यासाठी आणि मिळवण्यासाठी फोनची  संपर्क यादी शोधून त्यातून ज्यांच्याशी व्यवहार करायचे आहेत त्यांची निवड करता येते.
      नॅशनल पेमेंट्स ऑफ कॉर्पोरेशन ऑफ इंडियाची (NCPI) भारतातील विविध ठिकाणी किरकोळ रक्कम भरण्याच्या व्यवस्थेसाठी मध्यवर्ती पायाभूत सुविधा म्हणून २००९ मध्ये स्थापना करण्यात आली आणि देशातील सर्व बँकांकरिता उपयुक्त सेवा म्हणून भारतीय रिझर्व्ह बँकेने त्याचा विचार केला आहे. राष्ट्रीय वित्तीय सेवेच्या माध्यमातून आन्तरबँक एटीएम व्यवहार या एकमेव सेवेपासून धनादेश देवाणघेवाण व्यवस्था, नॅशनल ऑटोमेटेड क्लिअरिंग हाऊस (NACH),   आधार एनेबल्ड पेमेंट सिस्टीम (AePS), यूएसएसडी आधारित ``99#’’, रुपे कार्ड, इमिजिएट पेमेंट सर्व्हिस (IMPS),  युनिफाईड पेमेंट इंटरफेस (UPI), भारत इंटरफेस फॉर मनी (BHIM), BHIM आधार, नॅशनल इलेक्ट्रॉनिक टोल कलेक्शन  आणि भारत बिल पेपर्यंत आता या सेवांचा विस्तार झाला आहे. अधिक माहिती www.npci.org.in या संकेतस्थळावर मिळू शकेल. अधिकाधिक ग्राहकांनी भीम अॅपचा वापर करावा, असे आवाहन नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडियाने केले आहे.

...........


Monday 8 January 2018

जगाचे नेतृत्व करण्याकडे हिंदुस्थानची वाटचाल – चारुदत्तबुवा आफळे

कीर्तनसंध्या – पाचवे आणि अखेरचे पुष्प


      रत्नागिरी : स्वा. विनायक दामोदर सावरकरांनी हिंदुस्थान जगाचे नेतृत्व करणारे राष्ट्र बनेल, अशी भविष्यवाणी केली होती. त्या दिशेने भारताचे प्रवास सुरू झाला आहे. लोकमान्य टिळकांनंतर कित्येक वर्षांनी हिंदुस्थानला प्रभावी नेतृत्व लाभले आहे. त्या नेत्याला सर्व हिंदूंनी जातपात न बघता पक्ष न बघता हिंदुस्थानी म्हणून पाठबळ द्यावे, असे आवाहन राष्ट्रीय कीर्तनकार चारुदत्तबुवा आफळे यांनी केले.


      येथील कीर्तनसंध्या परिवाराने आयोजित केलेल्या कीर्तन महोत्सवाच्या पाचव्या आणि शेवटच्या दिवशीच्या कीर्तनात (ता. ७ जानेवारी) ते बोलत होते. यावेळी श्री. आफळे यांनी लोकमान्य टिळकांच्या उत्तरायुष्यातील कार्यावर प्रकाश टाकला. पूर्वरंगात लोकमान्यांच्या गीतारहस्य या ग्रंथाचे सार सांगतानाच श्रीकृष्णाला निष्काम कर्म कसे अपेक्षित होते, याचे विवेचन त्यांनी केले. लोकमान्यांनी गीतारहस्यामध्ये निष्काम कर्मयोग पटवून दिलाच, पण प्रत्यक्ष जीवनातही देशासाठी आयुष्य वेचून तो योग त्यांनी साधला, असे बुवांनी स्पष्ट केले.
      उत्तररंगात लोकमान्यांविषयी ते म्हणाले, राजद्रोहाच्या आरोपाखाली इंग्रजांनी टिळकांना मंडालेच्या तुरुंगात जावे लागले. त्यांची १९१४ साली सुटका झाली. याच काळात आफ्रिकेतून परतलेले मोहनदास करमचंद गांधी यांचा काँग्रेसमध्ये उदय झाला होता. जहाल राजकारण मागे पडून काँग्रेसमध्ये मवाळ विचारसरणीचा प्रभाव दिसू लागला. दरम्यान १९१४ मध्ये सुरू झालेल्या पहिल्या महायुद्धात इंग्रज सरकारने भारताकडे फौजेची मागणी केली. तेव्हा ब्रिटिश सैन्यात दाखल व्हायला भारतीय तरुणांना प्रवृत्त केले. संधी मिळाली आहेच, तर इंग्रजांच्या सैन्यात शिरावे, लष्कर ताब्यात घ्यावे, म्हणजे खरे स्वराज्य मिळेल असे टिळकांचे मत होते. नंतर महात्मा झालेल्या गांधींनी मात्र महायुद्धात हिंदुस्थानी सैनिकांनी इंग्रजांना विनाअट मदत करण्याचा प्रस्ताव ठेवला. त्यामुळे इंग्रज भारावून आपल्याला साम्राज्यातील सुराज्य देतील, असा त्यांचा अंदाज होता. इंग्रजांकडून काहीही मिळणार नाही, हे लोकमान्यांना चांगलेच माहीत होते. त्यामुळे लोकमान्यांनी या प्रस्तावाला विरोध दर्शवला. मात्र विनाअट मदतीचा ठराव मंजूर झाला. त्याचे दुष्परिणाम झालेच. अनेक तुघलकी कायदे इंग्रजांनी लादले. मालकाला न विचारता त्याची जमीन, पैसे सरकारजमा होऊ लागले. परिणामी काळात इंग्रजांविरोधात प्रचंड असंतोष वाढला. लोकमान्य टिळकांचे नेतृत्वच लोकांना हवेसे वाटू लागले. लखनौमध्ये १९१६ साली झालेल्या काँग्रेसच्या अधिवेशनाचे नेतृत्व टिळकांनी करावे, अशी जोरदार मागणी होऊ लागली. टिळकांनी ती मान्य केली आणि अधिवेशनाला जाण्यासाठी निघाले. ते पुण्याहून लखनौकडे रवाना झाले, तेव्हा प्रत्येक स्थानकावर आगगाडी थांबवून लाखो हिंदुस्थानी लोकांनी टिळकांना अभिवादन केले. लखनौमध्ये टिळक मोटारीत बसले तर लोकांनी सर्व टायरची हवा काढली आणि जनतेने त्यांना बग्गीमध्ये बसण्यास सांगितले. मग बग्गीचे घोडे काढून कार्यकर्त्यांनी स्वतः बग्गी ओढली. जनतेकडून असा मान अखंड भारतात फक्त लोकमान्यांना मिळाला. याच अधिवेशनात त्यांनी स्वराज्य, माझा जन्मसिद्ध अधिकार आहे आणि ते मी मिळवणारचअशी सिंहगर्जना केली, असे श्री. आफळेबुवा यांनी सांगितले.  संभाव्य तिसर्याम महायुद्धात हिंदुस्थान वाचला पाहिजे म्हणून सार्यांजनी व्यायाम, योगसाधना आणि बलवान व्हावे, असे कळकळीचे आवाहनही त्यांनी केले. कीर्तनाला रत्नागिरीकरांची तुफान गर्दी कीर्तनाला झाली.
      जोडोनिया धन, आधी लगीन कोंडाण्याचे, विजयाचा क्षण आला, कृष्ण माझी माता आदी पदे बुवांनी कीर्तनात सादर केली. बुवांना संगीतसाथ करण्यासाठी प्रख्यात पखवाजवादक राजा केळकर यांनी ढोलकी, दिमडी, संबळ, शंख, ढोल अशी सहा वाद्ये आणली होती. या वाद्यांना वापर करण्याकरिता बुवांनी अष्टविनायक चित्रपटातील गीत पंधरा मिनिटे ऐकवून श्रोत्यांना मंत्रमुग्ध केले. हेरंब जोगळेकर, प्रथमेश तारळकर, उदय गोखले, मधुसूदन लेले, सौ. आदिती चक्रदेव, महेश सरदेसाई व आदित्य पोंक्षे यांची सुरेख संगीतसाथही मिळाली. निबंध कानिटकर यांनी निवेदन केले.
      पूर्वरंगानंतर आफळेबुवांच्या संकेतस्थळाची झलक दाखवण्यात आली. संकेत सरदेसाई यांनी हे संकेतस्थळ साकारले आहे. त्यांचा बुवांनी सत्कार केला. हे संकेतस्थळ कीर्तनसंध्या परिवाराच्या सहकार्याने साकारण्यात आले असून याच परिवाराने संकेतस्थळाचा मान पटकावला असे बुवांनी सांगताच टाळ्यांचा कडकडाट झाला. या संकेतस्थळावर बुवांची ४० कीर्तने पाहायला मिळणार आहेत. जुने फोटो, माहिती उपलब्ध होईल. पुढील महिन्यात संकेतस्थळाचे अनावरण होणार आहे. आफळेबुवांचे वडील कै. गोविंदस्वामी यांना श्रीपाद ढोलेबुवा यांनी वयाच्या चौदाव्या वर्षी सुमारे वर्षभर झांजसाथ केली होती. काल त्यांचाही सत्कार करण्यात आला.

      दिल्लीच्या नाटक अकादमीवर आफळेबुवा महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करतात. त्यामुळे अखिल भारतीय स्तरावरील कीर्तन संमेलन घेण्याचा प्रस्ताव आल्यावर बुवांनी पुण्या-मुंबईऐवजी रत्नागिरीच्या कीर्तनसंध्या परिवाराच्या खांद्यावर ही जबाबदारी टाकण्याचे ठरवले. कीर्तनसंध्या परिवार गेली सात वर्षे भव्य दिव्य स्वरूपात कीर्तन महोत्सवाचे यशस्वी नियोजन करत आहे. त्यामुळे बुवांनी कीर्तनसंध्याच्या कार्यकर्त्यांचे कौतुक करून अ. भा. संमेलन रत्नागिरीत घेऊ, असे दिल्लीमध्ये सांगितले. या संमेलनात बंगाली, आसामी, तमिळ अशा विविध भारतीय भाषांतील कीर्तनकारांची कीर्तने ऐकण्याची पर्वणी रत्नागिरीकरांना मिळेल, असे त्यांनी जाहीर केले.
...........


रत्नागिरी-  कीर्तनसंध्या महोत्सवाला जमलेले हजारो श्रोते.


यावेळच्या कीर्तनसंध्या महोत्सवातील कीर्तनांकरिता चारुदत्त आफळेबुवांनी संदर्भासाठी घेतलेले ग्रंथ असे –
१)      लोकमान्य टिळक (लेखक - धनंजय कीर, पॉप्युलर प्रकाशन)
२)      आद्य क्रांतिकारक वासुदेव बळवंत फडके (लेखक - विष्णु महादेव जोशी, वीर सावरकर प्रकाशन)
३)      कंठस्नान आणि बलिदान (चापेकर) (लेखक - विष्णु महादेव जोशी, वीर सावरकर प्रकाशन)
४) गीतारहस्यसार (लेखक – कै. वा. रा. कोठारी (संपादक, दै. प्रभात), गीताधर्म मंडळ प्रकाशनमाला)