Wednesday 15 February 2017

कोकणाला पेलणार का दळणवळणाचे जाळे?



कोकण रेल्वेचे दुपदरीकरण आणि विद्युतीकरण, मुंबई-गोवा महामार्गाचे चौपदरीकरण, सागरी महामार्गाची चाचपणी, रत्नागिरीत सुरू होण्याची शक्यता असलेली विमानसेवा आणि दृष्टिपथात आलेली सुलभ आणि जलद जलवाहतुकीची योजना प्रत्यक्षात आली, तर येत्या दोन-तीन वर्षांत कोकणात सर्व तऱ्हेच्या दळणवळणाचे मोठेच जाळे निर्माण होणार आहे. त्याचा स्थानिक कोकणवासीयांच्या विकासाच्या दृष्टीने फायदा उचलला जाणार का आणि एकंदरीतच कोकणाला दळणवळणाचे हे जाळे पेलणार का, हा प्रश्न आहे.
...................
महाराष्ट्र टाइम्समधील या संपूर्ण लेखासाठी पाहा खालील लिंक - 



Monday 6 February 2017

जैतापूरची संधी



केंद्र सरकारचा महत्त्वाकांक्षी जैतापूर अणुऊर्जा प्रकल्प वादग्रस्त ठरला असला, तरी तो आता आकार घेऊ लागला आहे. प्रकल्पाविरोधात अखेरपर्यंत लढा देण्याचा स्थानिकांचा निर्धार आणि त्यांना शिवसेनेचा पाठिंबाही कायम आहे. काँग्रेस आणि भाजप हे प्रमुख पक्ष मात्र प्रकल्पाचे समर्थन एवढ्याच भूमिकेत वावरत आहेत. प्रकल्पामुळे निर्माण होणाऱ्या अनेक संधींचा फायदा स्थानिकांना करून देण्याकडे त्यांचे लक्ष गेलेले नाही.
.........................


Tuesday 31 January 2017

सीएस फाउंडेशनच्या परीक्षेत अचीव्हर्स अॅकॅडमीचे तीन विद्यार्थी उत्तीर्ण




अदिती रायकर
रत्नागिरी - येथील अचीव्हर्स अॅकॅडमीमध्ये कंपनी सेक्रेटरी कोर्ससाठी मार्गदर्शन घेणाऱ्या तीन विद्यार्थ्यांना सी. एस. फाउंडेशन या परीक्षेत यश मिळाले आहे.
      ही परीक्षा इन्स्टिट्यूट ऑफ कंपनी सेक्रेटरीज ऑफ इंडिया या इन्स्टिट्यूटकडून घेण्यात येते. या परीक्षेत अदिती रायकर, उन्नती वैद्य आणि स्वप्नील सांडीम हे विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. या विद्यार्थ्यांना सौ. मुग्धा करंबेळकर, गौरव महाजनी, रोहन फळणीकर आणि सौ. शिवानी ठाकूर यांचे मार्गदर्शन लाभले.
                दरम्यान, अचीव्हर्स कॅडमीतर्फे कंपनी सेक्रेटरी (सीएस) कोर्ससाठी मार्गदर्शनाची तिसरी बॅच नुकतीच सुरू झाली आहे. रत्नागिरीतील जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी या क्लासचा लाभ घ्यावा आणि अधिक माहितीसाठी mugdha118@gmail.com या ईमेलवर संपर्क साधावा, असे आवाहन कॅडमीच्या संचालिका सीएस
उन्मती वैद्य
मुग्धा करंबेळकर यांनी केले आहे.
(संपर्कासाठी दूरध्वनी क्र. ८२३७७५३०३६, ८३८००६९३२०)
स्वप्नील सांडीम

Monday 23 January 2017

कोकण इतिहास परिषदेकडून आर. एच. कांबळे यांचा दुहेरी सन्मान


      रत्नागिरी – येथील गोगटे-जोगळेकर महाविद्यालयाच्या इतिहास विभागाचे प्रमुख प्रा. डॉ. आर. एच. कांबळे यांचा कोकण इतिहास परिषदेने दुहेरी सन्मान केला आहे. त्यांच्या पुस्तकाला परिषदेने पुरस्कार जाहीर केला असून या महिनाअखेरीला होणाऱ्या परिषदेच्या अधिवेशऩातील एका सत्राचे अध्यक्षपदही त्यांना देण्यात आले आहे.
      कोकणविषयक आणि कोकणातील इतिहास संशोधकांना चालना देण्यासाठई २०१० साली कोकण इतिहास परिषदेची स्थापना करण्यात आली. प्रा. कांबळे यांनी पुढाकार घेऊन परिषदेचे पहिले अधिवेशन रत्नागिरी २०११ साली भरविले. त्यानंतर ठाणे, गोवा, रायगड, शहापूर आणि ठाणे येथे अधिवेशने भरविण्यात आली. परिषदेचे सातवे अधिवेशन येत्या २८ आणि २९ जानेवारी २०१७ रोजी वैभववाडी येथे भरणार आहे. परिषदेतर्फे संशोधनकार्याला प्रोत्साहन देण्यासाठी वर्षभरातील संधोथनात्मक लेखनाला पुरस्कार देण्यात येतो. यावर्षीच्या पुरस्कारासाठी प्रा. कांबळे यांच्या मराठ्यांच्या इतिहासातील चिमाजी अप्पांचे योगदान या पुस्तकाची निवड करण्यात आली असून वैभववाडीतील अधिवेशनात तो पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. याच अधिवेशनात प्राचीन, मध्ययुगीन आणि अर्वाचीन अशा तीन सत्रांमध्ये इतिहासविषयक चर्चा होणार असून त्यापैकी मध्ययुगीन चर्चासत्राचे अध्यक्षपद प्रा. आर. एच. कांबळे भूषविणार आहेत.
      प्रा. डॉ. कांबळे यांनी आतापर्यंत राज्य, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय ३० परिषदांमध्ये सहभाग घेऊन शोधनिबंध सादर केले आहेत. त्यांच्या प्रकाशित शोधनिबंधांची संख्या ३४ आहे. विद्यापीठ अनुदान आयोग, मुंबई विद्यापीठाकरिता स्थानिक इतिहास या विद्याशाखेत त्यांनी ८ संशोधन प्रकल्प सादर केले असून एका प्रकल्पाला विद्यापीठाने नुकतीच मंजुरी दिली आहे. यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ, एसएनडीटी विद्यापीठांकरिता त्यांनी अभ्यासक्रमाची पुस्तके लिहिली आहेत. इतिहासविषयक विविध चर्चासत्रे, व्याख्यानमालांमध्येही त्यांनी भाग घेतला असून शोधनिबंधांचे संपादन आणि प्रकाशनही केले आहे. मोडीलिपी प्रशिक्षण, दुर्ग अभ्यास आदी वर्गांचे आयोजनही त्यांनी केले असून इतिहास या ज्ञानशाखेत आपला वेगळा ठसा उमटवला आहे.
      कोकण इतिहास परिषदेने त्यांच्या कार्याची उचित दखल घेऊन पुस्तकाला पुरस्कार आणि एका चर्चासत्राचे अध्यक्षपद देऊन केलेल्या दुहेरी सन्मानाबद्दल डॉ. कांबळे यांचे अभिनंदन होत आहे.

      

विकासाचे प्रशिक्षण




कोकण रेल्वेने रौप्यमहोत्सवाचा टप्पा गाठला, तरी कोकणाचा तितकासा औद्योगिक विकास झाला नाही. आता रेल्वेचा रोलिंग स्टॉक कंपोनंटचा कारखाना कोकणात होऊ घातला आहे. त्याकरिता लागणारे सुटे भाग कोकणातच उपलब्ध व्हावेत, म्हणून स्थानिकांना प्रशिक्षण दिले जाणार आहे. त्यामुळेच कोकणाच्या उद्योगीकरणाला चालना मिळण्याची प्रक्रिया सुरू झाली, असे म्हणायला वाव आहे.
................................
खालील लिंकवर अधिक वाचन करता येईल.


Sunday 25 December 2016

केबीबीएफमुळे रत्नागिरी कोकणची आर्थिक राजधानी होईल - राहुल पंडित

रत्नागिरी – आपल्या व्यवसायातील अनुभव केबीबीएफच्या सदस्यांना सांगताना नगराध्यक्ष राहुल पंडित.
रत्नागिरी – कऱ्हाडे ब्राह्मण बिझनेस फोरममुळे (केबीबीएफ) रत्नागिरीची ओळख कोकणची आर्थिक राजधानी अशी होईल, असा विश्वास रत्नागिरीचे नूतन नगराध्यक्ष राहुल पंडित यांनी येथे व्यक्त केला.
      केबीबीएफची सातवी मासिक बैठक कऱ्हाडे ब्राह्मण संघाच्या राणी लक्ष्मीबाई सभागृहात नुकतीच पार पडली. बैठकीत केबीबीएफचे सदस्य आणि नूतन नगराध्यक्ष राहुल पंडित यांचा सत्कार करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते. शाल, श्रीफळ आणि स्मृतिचिन्ह देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला.
      श्री. पंडित म्हणाले, ब्राह्मण समाजाने एकत्र येऊन जास्तीत जास्त जणांनी व्यवसायाकडे वळण्याची आवश्यकता आहे. त्याकरिता सर्वांनी स्वतःचा कौशल्यविकास करून आणि कायदेशीर बाबींची पूर्तता करून आपल्या व्यवसायाचे आणि उत्पादनांचे ब्रँडिंग करण्याचा प्रयत्न करावा. अशाच प्रयत्नांतून केबीबीएफमुळे रत्नागिरीची ओळख कोकणाची आर्थिक राजधानी अशी होऊ शकेल. नगराध्यक्ष म्हणून व्यवसायाभिमुख सुविधा उपलब्ध करण्याचा मानस असल्याचे त्यांनी सांगितले.  आपल्या योगिता टायपिंग आणि कॉम्प्युटरच्या व्यवसायातील अनुभवही त्यांनी सदस्यांना सांगितले. 
     
केबीबीएफचे सदस्य योगेश मुळ्ये,    सुहास ठाकूरदेसाई, संदेश शहाणे, पुरुषोत्तम पाध्ये, श्री. जायदे, श्रीमती भागवतयांनी यावेळी मनोगत व्यक्त केले आणि नगराध्यक्षांनी यशस्वी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
      नगराध्यक्षांच्या हस्ते केबीबीएफच्या अँड्रॉइड ॲपचे उद्घाटन तसेच नव्या वर्षाच्या डायरीचे प्रकाशन करण्यात आले. केबीबीएफचे सदस्य आणि रत्नागिरीतील सॉफ्टवेअर डेव्हलपर आर्यक सोल्युशन्स प्रा. लि. चे प्रशांत आचार्य आणि ऋषिकेश सरपोतदार यांनी हे अँड्रॉइड ॲप विकसित केले आहे. त्यात रत्नागिरीतील सदस्यांची आणि त्यांच्या व्यवसायाची संपूर्ण माहिती संकलित करण्यात आली आहे. हे ॲप सर्वांना मोफत उपलब्ध आहे.आर्यक सोल्युशन्सचे संचालक प्रशांत आचार्य यांनी आपल्या व्यवसायाची यशोगाथा यावेळी सांगितली.
...

Thursday 24 November 2016

मनोरंजनाचा खेळ


रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातही सध्या नगरपालिका आणि नगर पंचायत निवडणुकांचा संग्राम सुरू आहे. युती आणि आघाडीसाठी राज्यात एकत्र आलेले पक्ष स्थानिक पातळीवर एका शहरात मित्र म्हणून तर अवघ्या तीस किलोमीटवरच्या दुसऱ्या शहरात एकमेकांच्या विरोधात उभे आहेत. मी मारल्यासारखे करतो, तू रडल्यासारखे कर, असे म्हणत चाललेल्या या खेळामुळे मतदारांचे मात्र मनोरंजन होत आहे.

...........