Tuesday 31 January 2017

सीएस फाउंडेशनच्या परीक्षेत अचीव्हर्स अॅकॅडमीचे तीन विद्यार्थी उत्तीर्ण




अदिती रायकर
रत्नागिरी - येथील अचीव्हर्स अॅकॅडमीमध्ये कंपनी सेक्रेटरी कोर्ससाठी मार्गदर्शन घेणाऱ्या तीन विद्यार्थ्यांना सी. एस. फाउंडेशन या परीक्षेत यश मिळाले आहे.
      ही परीक्षा इन्स्टिट्यूट ऑफ कंपनी सेक्रेटरीज ऑफ इंडिया या इन्स्टिट्यूटकडून घेण्यात येते. या परीक्षेत अदिती रायकर, उन्नती वैद्य आणि स्वप्नील सांडीम हे विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. या विद्यार्थ्यांना सौ. मुग्धा करंबेळकर, गौरव महाजनी, रोहन फळणीकर आणि सौ. शिवानी ठाकूर यांचे मार्गदर्शन लाभले.
                दरम्यान, अचीव्हर्स कॅडमीतर्फे कंपनी सेक्रेटरी (सीएस) कोर्ससाठी मार्गदर्शनाची तिसरी बॅच नुकतीच सुरू झाली आहे. रत्नागिरीतील जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी या क्लासचा लाभ घ्यावा आणि अधिक माहितीसाठी mugdha118@gmail.com या ईमेलवर संपर्क साधावा, असे आवाहन कॅडमीच्या संचालिका सीएस
उन्मती वैद्य
मुग्धा करंबेळकर यांनी केले आहे.
(संपर्कासाठी दूरध्वनी क्र. ८२३७७५३०३६, ८३८००६९३२०)
स्वप्नील सांडीम

Monday 23 January 2017

कोकण इतिहास परिषदेकडून आर. एच. कांबळे यांचा दुहेरी सन्मान


      रत्नागिरी – येथील गोगटे-जोगळेकर महाविद्यालयाच्या इतिहास विभागाचे प्रमुख प्रा. डॉ. आर. एच. कांबळे यांचा कोकण इतिहास परिषदेने दुहेरी सन्मान केला आहे. त्यांच्या पुस्तकाला परिषदेने पुरस्कार जाहीर केला असून या महिनाअखेरीला होणाऱ्या परिषदेच्या अधिवेशऩातील एका सत्राचे अध्यक्षपदही त्यांना देण्यात आले आहे.
      कोकणविषयक आणि कोकणातील इतिहास संशोधकांना चालना देण्यासाठई २०१० साली कोकण इतिहास परिषदेची स्थापना करण्यात आली. प्रा. कांबळे यांनी पुढाकार घेऊन परिषदेचे पहिले अधिवेशन रत्नागिरी २०११ साली भरविले. त्यानंतर ठाणे, गोवा, रायगड, शहापूर आणि ठाणे येथे अधिवेशने भरविण्यात आली. परिषदेचे सातवे अधिवेशन येत्या २८ आणि २९ जानेवारी २०१७ रोजी वैभववाडी येथे भरणार आहे. परिषदेतर्फे संशोधनकार्याला प्रोत्साहन देण्यासाठी वर्षभरातील संधोथनात्मक लेखनाला पुरस्कार देण्यात येतो. यावर्षीच्या पुरस्कारासाठी प्रा. कांबळे यांच्या मराठ्यांच्या इतिहासातील चिमाजी अप्पांचे योगदान या पुस्तकाची निवड करण्यात आली असून वैभववाडीतील अधिवेशनात तो पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. याच अधिवेशनात प्राचीन, मध्ययुगीन आणि अर्वाचीन अशा तीन सत्रांमध्ये इतिहासविषयक चर्चा होणार असून त्यापैकी मध्ययुगीन चर्चासत्राचे अध्यक्षपद प्रा. आर. एच. कांबळे भूषविणार आहेत.
      प्रा. डॉ. कांबळे यांनी आतापर्यंत राज्य, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय ३० परिषदांमध्ये सहभाग घेऊन शोधनिबंध सादर केले आहेत. त्यांच्या प्रकाशित शोधनिबंधांची संख्या ३४ आहे. विद्यापीठ अनुदान आयोग, मुंबई विद्यापीठाकरिता स्थानिक इतिहास या विद्याशाखेत त्यांनी ८ संशोधन प्रकल्प सादर केले असून एका प्रकल्पाला विद्यापीठाने नुकतीच मंजुरी दिली आहे. यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ, एसएनडीटी विद्यापीठांकरिता त्यांनी अभ्यासक्रमाची पुस्तके लिहिली आहेत. इतिहासविषयक विविध चर्चासत्रे, व्याख्यानमालांमध्येही त्यांनी भाग घेतला असून शोधनिबंधांचे संपादन आणि प्रकाशनही केले आहे. मोडीलिपी प्रशिक्षण, दुर्ग अभ्यास आदी वर्गांचे आयोजनही त्यांनी केले असून इतिहास या ज्ञानशाखेत आपला वेगळा ठसा उमटवला आहे.
      कोकण इतिहास परिषदेने त्यांच्या कार्याची उचित दखल घेऊन पुस्तकाला पुरस्कार आणि एका चर्चासत्राचे अध्यक्षपद देऊन केलेल्या दुहेरी सन्मानाबद्दल डॉ. कांबळे यांचे अभिनंदन होत आहे.

      

विकासाचे प्रशिक्षण




कोकण रेल्वेने रौप्यमहोत्सवाचा टप्पा गाठला, तरी कोकणाचा तितकासा औद्योगिक विकास झाला नाही. आता रेल्वेचा रोलिंग स्टॉक कंपोनंटचा कारखाना कोकणात होऊ घातला आहे. त्याकरिता लागणारे सुटे भाग कोकणातच उपलब्ध व्हावेत, म्हणून स्थानिकांना प्रशिक्षण दिले जाणार आहे. त्यामुळेच कोकणाच्या उद्योगीकरणाला चालना मिळण्याची प्रक्रिया सुरू झाली, असे म्हणायला वाव आहे.
................................
खालील लिंकवर अधिक वाचन करता येईल.


Sunday 25 December 2016

केबीबीएफमुळे रत्नागिरी कोकणची आर्थिक राजधानी होईल - राहुल पंडित

रत्नागिरी – आपल्या व्यवसायातील अनुभव केबीबीएफच्या सदस्यांना सांगताना नगराध्यक्ष राहुल पंडित.
रत्नागिरी – कऱ्हाडे ब्राह्मण बिझनेस फोरममुळे (केबीबीएफ) रत्नागिरीची ओळख कोकणची आर्थिक राजधानी अशी होईल, असा विश्वास रत्नागिरीचे नूतन नगराध्यक्ष राहुल पंडित यांनी येथे व्यक्त केला.
      केबीबीएफची सातवी मासिक बैठक कऱ्हाडे ब्राह्मण संघाच्या राणी लक्ष्मीबाई सभागृहात नुकतीच पार पडली. बैठकीत केबीबीएफचे सदस्य आणि नूतन नगराध्यक्ष राहुल पंडित यांचा सत्कार करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते. शाल, श्रीफळ आणि स्मृतिचिन्ह देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला.
      श्री. पंडित म्हणाले, ब्राह्मण समाजाने एकत्र येऊन जास्तीत जास्त जणांनी व्यवसायाकडे वळण्याची आवश्यकता आहे. त्याकरिता सर्वांनी स्वतःचा कौशल्यविकास करून आणि कायदेशीर बाबींची पूर्तता करून आपल्या व्यवसायाचे आणि उत्पादनांचे ब्रँडिंग करण्याचा प्रयत्न करावा. अशाच प्रयत्नांतून केबीबीएफमुळे रत्नागिरीची ओळख कोकणाची आर्थिक राजधानी अशी होऊ शकेल. नगराध्यक्ष म्हणून व्यवसायाभिमुख सुविधा उपलब्ध करण्याचा मानस असल्याचे त्यांनी सांगितले.  आपल्या योगिता टायपिंग आणि कॉम्प्युटरच्या व्यवसायातील अनुभवही त्यांनी सदस्यांना सांगितले. 
     
केबीबीएफचे सदस्य योगेश मुळ्ये,    सुहास ठाकूरदेसाई, संदेश शहाणे, पुरुषोत्तम पाध्ये, श्री. जायदे, श्रीमती भागवतयांनी यावेळी मनोगत व्यक्त केले आणि नगराध्यक्षांनी यशस्वी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
      नगराध्यक्षांच्या हस्ते केबीबीएफच्या अँड्रॉइड ॲपचे उद्घाटन तसेच नव्या वर्षाच्या डायरीचे प्रकाशन करण्यात आले. केबीबीएफचे सदस्य आणि रत्नागिरीतील सॉफ्टवेअर डेव्हलपर आर्यक सोल्युशन्स प्रा. लि. चे प्रशांत आचार्य आणि ऋषिकेश सरपोतदार यांनी हे अँड्रॉइड ॲप विकसित केले आहे. त्यात रत्नागिरीतील सदस्यांची आणि त्यांच्या व्यवसायाची संपूर्ण माहिती संकलित करण्यात आली आहे. हे ॲप सर्वांना मोफत उपलब्ध आहे.आर्यक सोल्युशन्सचे संचालक प्रशांत आचार्य यांनी आपल्या व्यवसायाची यशोगाथा यावेळी सांगितली.
...

Thursday 24 November 2016

मनोरंजनाचा खेळ


रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातही सध्या नगरपालिका आणि नगर पंचायत निवडणुकांचा संग्राम सुरू आहे. युती आणि आघाडीसाठी राज्यात एकत्र आलेले पक्ष स्थानिक पातळीवर एका शहरात मित्र म्हणून तर अवघ्या तीस किलोमीटवरच्या दुसऱ्या शहरात एकमेकांच्या विरोधात उभे आहेत. मी मारल्यासारखे करतो, तू रडल्यासारखे कर, असे म्हणत चाललेल्या या खेळामुळे मतदारांचे मात्र मनोरंजन होत आहे.

...........


रत्नागिरीतील मैदानांच्या व्यवस्थेकडे विशेष लक्ष देणार- कौस्तुभ सावंत

                रत्नागिरी, २४ नोव्हेंबर, (हिं. स.) : गुणवंत खेळाडूंना पोषक वातावरण तयार करण्यासाठी आपण विशेष प्रयत्न करणार असून त्यासाठी सर्वप्रथम मैदानाचा प्रश्न मार्गी लावणार असल्याची घोषणा जनजागृती संघाने पाठिंबा दिलेले नगराध्यक्षपदाचे उमेदवार कौस्तुभ सावंत यांनी केली आहे.
याविषयी बोलताना श्री. सावंत म्हणाले की, मुलांचे मैदानी खेळ कमी होताहेत अशी ओरड सगळेच करताना दिसतात. विशेषतः राष्ट्रीय, ऑलिम्पिक स्पर्धा सुर झाल्या की आपल्या या काळजीला विशेष धार येते. पण काही प्रश्न आपण स्वतःला तर काही प्रशासनाला विचारायला हवेत. सर्वप्रथम मुलांना खेळायला आपण मैदाने शिल्लक ठेवली आहेत का? आपल्या शहरातही एखादा धोनी, तेंडुलकर तयार व्हावा, असे आपल्याला वाटते जरूर, पण त्यासाठी गरज आहे ती परिपूर्ण मैदानांची, खेळाडूंना योग्य सुविधा, प्रोत्साहन उपलब्ध करून देण्याची, मैदानाच्या सुरक्षिततेची. यातल्या कोणत्या गोष्टीची जबाबदारी कर्तव्यदक्ष नागरिक म्हणून आपण आणि जबाबदार स्थानिक स्वराज संस्था म्हणून नगर परिषद उचलते? असा सवाल सावंत यांनी उपस्थित केला.
ते पुढे म्हणाले की, रत्नागिरीत पूर्वी शिवाजी क्रीडांगणावर अनेक लोक रोज क्रिकेट खेळायचे. पण जेव्हा तेथील खेळपट्टी तयार केल गेली, तेव्हा अनेकांना सरावाला जागाच उरली नाही. मैदानासाठी आरक्षण दिसते पण मैदान दिसत नाही. दुर्दैव म्हणजे यात बदल व्हावा, असे णालाही वाटत नाही. सध्या रत्नागिरीच्या शिवाजी स्टेडियममध्ये मुलांना खेळता येत नाही आणि प्रमोद महाजन क्रीडा संकुल तर बांधकामापासूनच वेगवेगळे उत्सव, शॉपिंग एक्सिबिशन, कार्यक्रम, समारंभ, सभा, मेळावे, फन फेअर यांच्यासाठीच बनवलेय की काय अशी शंका येते. खरतर रत्नागिरीसारख्या मोठ्या वस्तीच्या शहरात वरच्या भागात आणि खालच्या भागात प्रत्येकी एकेक मैदान असायला हवे, जे केवळ खेळाडूंसाठी उपलब्ध असेल.

रत्नागिरीची व्याप्ती पहता रणजी किंवा अगदी आंतरराष्ट्रीय दर्जाचे सामने होतील असे स्टेडियम हवे आहे आणि स्थानिक तरुणांना सराव करता येईल असेही मैदान हवे आहे. हे मैदान फक्त खेळासाठी असेल. तथे सभा, कार्यक्रम होणार नाहीत. तथून खेळाडूंना हुसकावून लावले जाणार नाही. तथे गुरे चरायला येणार नाहीत, थे गवताची कापणी वेळेत होईल. विशेष म्हणजे या मैदानाच्या सुरक्षिततेसाठी नगर परिषद स्वतःहून प्रयत्न करेल. रत्नागिरीतल्या खेळाडूंना उत्तम, सुसज्ज क्रीडांगण उपलब्ध करून देण्यासाठी, मैदानाच्या सुरक्षिततेसाठी आम्ही कटिबद्ध आहोत,शी ग्वाही श्री. सावंत यांनी दिली. या प्रकल्पाला इच्छाशक्तीची जोड असल्यामुळे आम्ही ते पूर्णत्वाला नेऊ असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.

Wednesday 23 November 2016

रिक्षाचालकांनी कौस्तुभ सावंत यांच्याकडे मांडल्या आपल्या व्यथा




    
  रत्नागिरी : वडाप वाहतुकीचा त्रास होत असल्याने तेवढे बंद करता आले तर पहा आणि रत्नागिरीतल्या रस्त्यांची अवस्था सुधारली तर आम्हांला बराच फायदा होऊ शकेल, या रस्त्यांवर गाड्या चालवणं अगदी कठीण होऊन बसलंय अशा शब्दांत ऑटोरिक्षा चालकांनी आपली व्यथा जनजागृती संघाने पाठिंबा दिलेले नगराध्यक्षपदाचे उमेदवार कौस्तुभ सावंत यांच्याशी बोलताना व्यक्त केली. यावर काही तोडगा काढता आला तर पहा अशी विनंतीही त्यांनी यावेळी श्री. सावंत यांच्याकडे केली.
      जनजागृती संघाने पाठिंबा दिलेले नगराध्यक्षपदाचे उमेदवार कौस्तुभ सावंत यांनी आज आपल्या प्रचारफेरीदरम्यान ऑटोरिक्षा चालकांची भेट घेतली. यावेळी त्यांनी चालकांशी संवाद साधत त्यांच्या समस्या समजून घ्यायचा प्रयत्न केला आणि त्यावर तोडगा काढण्याचे आश्वासन दिले. विशेष म्हणजे यावेळी काही चालकांनी आपण ग्रामीण भागात राहत असल्याने आमचे प्रश्न तुमच्यासमोर कसे मांडावे, अशी शंका उपस्थित केली. मात्र कौस्तुभ सावंत यांनी त्याचे निराकरण करत आपण व्यवसाय रत्नागिरी नगर परिषद हद्दीत करत असल्याने तुमची सोय पाहणे हे आमचे कर्तव्य असल्याचे सांगितले. त्यांच्या या भूमिकेचे रिक्षाचालकांनी कौतुक केले.
      रत्नागिरी शहरात रिक्षा व्यवसाय करताना येणाऱ्या अडचणींबाबत बोलताना चालकांनी प्रामुख्याने खराब रस्त्यांचा आणि वडापचा मुद्दा मांडला. शहरातले रस्ते खराब असल्याने वाहतुकीदरम्यान बरेच इंधन वापरले जाते. शिवाय खड्डयांचा त्रास जाणवतो तो भाग वेगळाच! रस्ते सुधारण्याची मागणी त्यांनी यावेळी प्रामुख्याने मांडली. शहरात सुरू असलेल्या अनधिकृत वडापचा फटकासुद्धा आपल्या व्यवसायाला बसत असून वडाप बंद व्हावे, अशी अपेक्षा त्यांनी यावेळी व्यक्त केली.
      शहरातील रिक्षांची संख्या ध्यानात घेता रिक्षा थांबे कमी आहेत. त्यामुळे निर्धारित रिक्षसंख्येपेक्षा अधिक रिक्षा थांब्यांवर लावल्या जातात आणि त्याचा परिणाम व्यवसायावर होतो असेही रिक्षाचालकांनी आपले म्हणणे श्री. सावंत यांच्याकडे मांडले. रिक्षसंदर्भातील शासकीय कागदपत्रे, टॅक्स वगैरे संदर्भातील पूर्ततेमध्ये सुलभता यावी असे मत रिक्षाचालकांनी यावेळी व्यक्त केले.
      यावेळी त्यांना दिलासा देताना श्री. सावंत म्हणाले की, रिक्षासंदर्भातील कामकाजात सुसूत्रता यावी यासाठी आपण नक्की लक्ष घालू. शहरातील मोक्याच्या जागा हेरून रिक्षा थांबे वाढवण्याचा प्रयत्न केला जाईल. राम आळीत होणारा ट्रॅफिक जाम लक्षात घेता तेथे रिक्षाचालक व नागरिक दोघांच्या दृष्टीने सोयीची ठरेल अशी एखादी विशेष योजना राबवण्याचा आपला मनोदय असल्याचे त्यांनी सांगितले. याशिवाय रिक्षाचालकांच्या कामाचं स्वरूप लक्षात घेता त्यांच्यासाठी टॉयलेट बांधण्याचा आपला मानस असल्याचे सांगुन कौस्तुभ सावंत यांनी रिक्षाचालकांना दिलासा दिला.