Sunday 7 August 2016

प्रश्न, प्रश्न आणि प्रश्न... सावित्रीच्या दुर्घटनेने निर्माण केलेले!

गेल्या सोमवारी रात्री महाडमध्ये अत्यंत भीषण असा अपघात घडला. या दुर्दैवी अपघातात अनेक कुटुंबांनी आपली कर्ती-सवरती, जवळची माणसं गमावली. त्यांचं हे दुःख कधीही भरून न येणारं आहे. या अपघातानं अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. अशा वेळी कसं वागायला नको, याचं उत्तमदर्शनही अनेक घटकांनी घडवलं आहे.
मनामनांत हर्ष खुलवणाऱ्या श्रावण महिन्याचं आगमन यंदा निदान महाराष्ट्रासाठी  तरी दुःखद आणि धक्कादायक बातमीनं झालं. महाडला सावित्री नदीला आलेल्या पुराचा ताण सहन न झाल्यानं तीवरचाब्रिटिशकालीन पूल वाहून गेला आणि सोबत अनेक कुटुंबांच्या आशा-आकांक्षा, नातीगोतीही  पुराच्या लोटात घेऊन गेला. एक लाट तोडी दोघां, पुन्हा नाही गाठया ओळींची तीव्रता प्रकर्षानं जाणवली आणि कितीही  प्रगती झाली असली, तर पराधीन आहे जगती पुत्र मानवाचायाचीही सत्यता पटली.
झालेला अपघात नक्कीच कल्पनेच्या पलीकडचा आणि दुर्दैवी होता; मात्र तरीही या अपघातानंतर अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत. अशा प्रकारच्या अपघातांची कल्पना कदाचित सामान्य माणूस करू शकत नसला, तरी सरकारी यंत्रणांना ती असायलाच हवी. तशी ती  आपल्याकडच्या यंत्रणांना नाही, हे या अपघातामुळे उघड झालं. हा पूल वाहून गेल्यानंतर अचानक जाग आल्याप्रमाणे राज्यातल्या सर्व पुलांच्या स्ट्रक्चरल ऑडिटचे आदेश सार्वजनिक बांधकाममंत्र्यांनी  दिले. सांगलीतला आयर्विन पूल, मुंबईतला कळवा पूल वाहतुकीसाठी बंद करण्यात आला. मग ही दुर्घटना घडलीच नसती, तर काय झालं असतं, असा प्रश्न मनात आल्यावाचून राहत नाही. कारण हा अपघात झालाच नसता, तरी यंत्रणेला जाग आणण्यासाठी पुढे एखादा अपघात घडावाच लागला असता, असं म्हणायला पुरेपूर वाव आहे. वास्तविक ज्या मुंबई-गोवा महामार्गावरचा हा पूल वाहून गेला, त्याच महामार्गावरचे किमान वीस ते बावीस पूल ब्रिटिशकालीन किंवा जुने आहेत. सावित्रीसह जगबुडी, वाशिष्ठी, शास्त्री, सोनवी, बाव, काजळी, अर्जुना, पियाळी, गड, भंगसाळ, पीठढवळ अशा अनेक नद्या या महामार्गाला छेदून जात असल्यामुळे एवढे पूल ही या मार्गाची अपरिहार्यता (आणि सौंदर्यही) आहे.
हा संपूर्ण महामार्ग कोकणातून जातो आणि कोकण-गोवा हा वार्षिक सरासरी साडेतीन हजार मिलिमीटर पाऊस पडणारा प्रदेश असल्यामुळे तिथल्या नद्यांना पूर येणं, पुरात पूल पाण्याखाली जाणं या गोष्टी नव्या नाहीत. (सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या कुडाळचा पीठढवळ पूल हे याचं एक चांगलं उदाहरण आहे.) हे सगळेच पूल जीर्ण झाले नसले, तरीही महाडसारखा अपघात कोकणात कोणत्याही जिल्ह्यात कधीही घडू शकतो, अशी स्थिती आहे. शिवाय अलीकडे कोकणातल्या पर्यटनाचं प्रमाणही वाढीला लागलेलं असल्यानं या मार्गावर कायमच वर्दळ असते. गणपती, नवरात्र, दिवाळी अशा सणासुदीच्या काळात तर ही वर्दळ कित्येक पटींनी वाढीला लागते. अशी परिस्थिती असतानाही या मार्गावरच्या पुलांचं ऑडिट होण्यासाठी महाडचा अपघात घडण्याची वेळ यावी लागली.
महाडच्या नागरिकांनी या पुलाबाबत अनेकदा यंत्रणेला सावध केलं होतं. असं असतानाही पुरेशी काळजी घेऊन हा पूल वाहतुकीसाठी वेळीच बंद का करण्यात आला नाही, हा नागरिकांचा सवाल नक्कीच दुर्लक्ष करण्यासारखा नाही. शिवाय पर्यायी पूल बांधून तयार असताना आणि वाहतुकीसाठी खुलाही असताना असं का करण्यात आलं, या प्रश्नाचं ठोस उत्तर सरकारकडे नाही. संगमेश्वरातल्या शास्त्री आणि सोनवी नदीवरच्या पुलांच्या नव्यानं उभारणीसाठीही तिथले नागरिक, स्थानिक वृत्तपत्रं यांच्या माध्यमातून सातत्यानं मागणी केली जात आहे; पण आतापर्यंत तरी त्यातून केवळ त्या नागरिकांनाच आपल्या समस्येची उजळणी होण्यापलीकडे  काहीही साध्य झालेलं नाही.
दुसरा महत्त्वाचा प्रश्न म्हणजे शोधकार्य सुरू केल्यानंतर पहिला संपूर्ण दिवस केवळ घटनास्थळाजवळच सर्व यंत्रणा शोध घेत होत्या. घटनास्थळावरून थोड्याच अंतरावर खाडी आहे आणि तिथून ती नदी अरबी समुद्राला मिळते. अपघात घडला त्या रात्रीपासून दुसऱ्या दिवशीपर्यंत नदीच्या प्रवाहाला प्रचंड वेग होता. तरीही ती गोष्ट लक्षात न घेता शोधकार्याची व्याप्ती चार-पाच किलोमीटरपर्यंतच मर्यादित ठेवण्याचा उद्देशच कळला नाही. तिसऱ्या दिवशी दापोली तालुक्यातल्या आंजर्ल्यात एसटी चालकाचा मृतदेह सापडल्यानंतर शोधाची व्याप्ती वाढवण्यात आली. पाण्याच्या वेगामुळे अधिकाधिक मृतदेह किंवा वाहने लांब अंतरावरच जातील, ही गोष्ट कोणत्याच यंत्रणेच्या कशी लक्षात आली नाही?
आणखी एक गोष्ट म्हणजे विमानाच्या ब्लॅक बॉक्सप्रमाणे एखादी यंत्रणा, जीपीएस यंत्रणा, तसेच आपोआप आपत्कालीन संदेश पाठवणारी यंत्रणा सार्वजनिक वाहतूक करणाऱ्या, किंबहुना प्रत्येक वाहनातच असायला हवी, अशी गरज या अपघातामुळे अधोरेखित झाली आहे. त्यामुळे अपघाताची माहिती मिळण्यास, वाहनांचा शोध घेण्यास नक्कीच हातभार लागू शकतो.
आणखी एक प्रश्न आहे तो राजकीय नेत्यांचा. असा एखादा अपघात झाल्यावर किंवा काहीतरी विचित्र घटना घडल्यावर सरकारला कोंडीत कसं पकडता येईल याचाच विचार विरोधक करत असतात, हे या निमित्तानं पुन्हा एकदा दिसून आलं. चंद्रकांत पाटील यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी अजित पवार यांनी केली. तसंच परिस्थिती हाताळण्यात सरकार अपयशी ठरलं, अशी टीकाही करण्यात आली. सरकारचं दुर्लक्ष झालं नसतं, तर हा अपघात टळला असता, हे शंभर टक्के खरं आहे. त्यामुळे अपघात नैसर्गिक आपत्तीमुळे झाला असला, तरी सरकारही निश्चितच दोषी आहेच; पण दोन वर्षांपूर्वी कोणाचं सरकार सत्तेत होतं, ही गोष्ट विरोधी पक्ष सोयीस्करपणे विसरले. कारण सावित्री नदीवरच्या या पुलाचा प्रश्न साधारणतः तीनेक वर्षांपूर्वी चर्चेत आला होता. तेव्हाच्या सरकारने तरी कोणती कार्यवाही केली होती? त्यामुळे खरं तर आताच्या सरकारला या मुद्द्यावरून दोषी धरण्याचा नैतिक अधिकार विरोधी पक्षाला नाही. आताचं आणि मागचं अशा दोन्ही सरकारांचा यात तितकाच दोष आहे. अर्थात नैतिकता-अनैतिकतेच्या गोष्टी करण्यासारखे दिवस अजून शिल्लक आहेत का, असाही एक प्रश्न आहेच.
केंद्रीय मंत्री अनंत गीते यांनी घटनास्थळाला भेट दिली, त्या वेळी हा नैसर्गिक आपत्तीचा प्रकार असल्याचं त्यांनी सांगितलं. अशा परिस्थितीत कुठे ना कुठे तरी असे प्रकार होतच असतातअसंही ते म्हणाले. त्या वेळी मुंबई हल्ल्यानंतर आर. आर. पाटील यांनी उच्चारलेल्या बडे बडे शहरों मे ऐसे छोटे छोटे हादसे होते हैंया वाक्याची आठवण झाली. या अपघाताला नैसर्गिक आपत्ती तर कारणीभूत आहेच; पण सगळी जबाबदारी निसर्गाच्या गळ्यात मारून सरकारची जबाबदारी संपत नाही, याचा गीते यांना विसर पडला का?
आणखी एक मुद्दा आहे तो म्हणजे इलेक्ट्रॉनिक माध्यमांचा. २४ तास प्रसारण दाखवण्याच्या स्वतःच घालून घेतलेल्या अवाजवी आणि (सरसकट) गरज नसलेल्या उद्दिष्टाच्या पूर्तीसाठी आपण काय दाखवतो आहोत, याचेच भान राहिलेले नाही. अर्थात ही बाब याआधीच्याही अनेक अपघात, दुर्घटनांच्या कव्हरेजवेळी दिसून आली आहे. अपघातात जी माणसं बेपत्ता झाली आहेत, त्यांच्या जवळच्या नातेवाइकांना तुम्हाला आत्ता काय वाटतंयहा प्रश्न ही माध्यमं कसा काय विचारू शकतात? असा प्रश्न विचारण्याची आणि त्यापुढे जाऊन त्याचं लाइव्ह टेलिकास्टकरण्याची काय गरज आहे? त्यांना भावनावेग आवरत नसल्याचं समोर स्पष्ट दिसतंय, तरी त्या व्यक्तींना प्रश्न विचारून त्यांच्या जखमेवर मीठ चोळण्याची काय आवश्यकता आहे? एवढीही संवेदनशीलता माध्यमांकडे असू नये? आजच्या काळात याच इलेक्ट्रॉनिक माध्यमांमुळे प्रश्न प्रभावीपणे मांडले जातात, सर्वदूर पोहोचतात आणि बऱ्याचदा अपेक्षित परिणामही साध्य होतो; पण म्हणून त्यांनी ऊठसूट कशाचेही प्रसारण करावे, हे चुकीचेच आहे.
हे आणि असे अनेक छोटे-छोटे, पण महत्त्वाचे प्रश्न अलीकडे अनेकदा सर्वसामान्य नागरिकांना पडत असतात; पण त्यांची उत्तरे मिळण्याचे त्यांचे भाग्य नाही….मग सरकार कोणत्याही पक्षाचे का असेना!


 http://blogs.maharashtratimes.indiatimes.com/imouse/questions-questions-and-questions/

.....................

Monday 1 August 2016

क्लोरीनच्या बाटल्यांसाठी कर्जत तालुक्यातील गावे वाट पाहतात जलवर्धिनीची

जलजागृती सप्ताहाचे वारे त्या गावांपर्यंत पोहोचलेच नाहीत

            कर्जत : मुंबईतील जलवर्धिनी प्रतिष्ठानतर्फे यावर्षीही कर्जत (जि. रायगड) तालुक्यातील चाफेवाडी परिसरातील वीस गावांना जलशुद्धीकरणासाठी क्लोरीनच्या बाटल्यांचे वितरण केले. या बाटल्यांसाठी जलवर्धिनीच्या कार्यकर्त्यांची वाट पाहणारे ग्रामस्थ पाहिल्यानंतर शासनाच्या जलजागृती सप्ताहाचे वारे या गावांपर्यंत पोहोचलेच नसल्याचेही सिद्ध झाले.
          
पावसाळ्याच्या सुरुवातीला नदीतील ग
  शुद्ध पिण्याचे पाणी आणि ग्रामस्वच्छता या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. त्या ग्रामस्थांना समजाव्यात, त्यांना पिण्याचे पाणी शुद्ध स्वरूपात मिळावे, शुद्ध पाणी मिळणे हा त्यांचा अधिकार असला तरी ते मिळविण्यासाठी गाव स्वच्छ ठेवणे हे त्यांचे कर्तव्य असल्याचे त्यांना समजावे, अशा विविध उद्देशांनी राज्य शासनाने गेल्या महिन्यात विशेष जलजागृती सप्ताह आयोजित केला होता. ग्रामीण भागावरही लक्ष केंद्रित करून ग्रामस्थांना सजग करण्याचा या सप्ताहाचा हेतू होता. पिण्याचे पाणी दूषित होण्यामागची कारणे लोकांना समजावून देणे, गावातील सांडपाणी कोणतीही प्रक्रिया न करता थेट जलस्रोतात सोडण्यापासून त्यांना परावृत्त करणे, गावाला पाणीपुरवठा करणाऱ्या जलस्रोतांची निगा राखणे
, विविध जलशुद्धीकरणाच्या पद्धतीचा वापर समजावून देणे असे उपक्रम राबवायचे ठरविण्यात आले होते. सप्ताह थाटात साजरा झाला, तरी ग्रामीण भाग मात्र या जागरणापासून किती दूर होता, हे कर्जत तालुक्यातील ग्रामीण भागात जलवर्धिनी संस्थेला यावर्षीही दिसून आले.
पाणी साठविण्याचे महत्त्व लोकांना कळावे, यासाठी मुंबईतील जलवर्धिनी प्रतिष्ठान ही संस्था गेली बारा वर्षे काम करत आहे. संस्थेचे विश्वस्त उल्हास परांजपे यांनी कमी खर्चात पाणी साठविण्याच्या विविध पद्धती विकसित केल्या आहेत. कर्जतजवळ कोंढणे गावी त्यांनी त्याचे संग्रहालय उभारले आहे. गावागावांमध्ये जाऊन त्याविषयी माहिती देत असताना त्यांना पिण्याच्या पाण्यासाठी ग्रामीण भागात चाललेली वणवण दिसली. तसेच उन्हाळ्यातील पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर पावसाळ्याच्या सुरुवातीला दूषित पाण्याचा वापर पिण्यासाठीही होत असल्याचे त्यांच्या लक्षात आले. पावसाळ्यात दूषित पाण्याचे प्रमाण अधिक असल्याने या काळातील जलशुद्धीकरणाचे महत्त्व त्यांनी ग्रामस्थांना पटवून दिले. जलशुद्धीकरणामुळे अतिसार, हगवण, डायरियासारख्या पावसाळ्यात उद्भवणाऱ्या जलजन्य आजारांपासून संरक्षण होत असल्याचेही ग्रामस्थांना सांगण्यात आले. त्यानंतर त्यांनी २००६ पासून त्या भागातील दहा वाड्यांमधील प्रत्येक घराला जलशुद्धीकरणासाठी क्लोरीनच्या बाटल्यांचे वितरण सुरू केले. शंभर मिलिची ही बाटली एका कुटुंबाला साधारणतः तीन महिने पुरते. अशा पद्धतीने दरवर्षी सुमारे ५०० बाटल्यांचे वितरण करण्यात येते. क्लोरीनच्या वापरानंतर जलजन्य साथींचे प्रमाण कमी झाल्याचे ग्रामस्थांनीच सांगितले. त्यासाठीच दरवर्षी जलवर्धिनीच्या कार्यकर्त्यांची वाट त्या गावांमध्ये पाहिली जाते.
गढूळ पाण्याने भरलेली विहीर
यावर्षी अधिक वाड्यावस्त्यांना क्लोरीनच्या बाटल्या पुरविण्याचे प्रतिष्ठानतर्फे ठरविण्यात आले. त्यानुसार २० वाड्यांना १२०० बाटल्या वितरित करण्यात आल्या. त्याकरिता नाना पालकर स्मृती समिती आणि अनेक वैयक्तिक दात्यांनी आर्थिक मदत केली. प्रारंभी ३ जुलै रोजी मोरेवाडी, ताडवाडी, चाफेवाडी, वडाची वाडी, पादीर वाडी, टेपाची वाडी या वाड्यांमध्ये सुनील मिश्रा आणि त्यांची मित्रमंडळी, विकास गोपाळ तसेच सौ. उत्तरा परांजपे यांच्या उपस्थितीत वितरण करण्यात आले. त्यानंतर ११ जुलैला विजय, जनार्दन, विकास आणि इतरांनी आनंदवाडी, भक्ताची वाडी, गावंडवाडी, खनाद, पिंगळास, फणसवाडीतील ग्रामस्थांना क्लोरीनच्या बाटल्या दिल्या. २३ जुलै रोजी बांगरवाडी, नांगुर्लेवाडी, डोरेवाडी, ठाकूरवाडी, पादिरवाडी, नागेची वाडी, पीटर वाडी, कशेळे या भागात रवी पाटील आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी वितरण केले.
जलवर्धिनी प्रतिष्ठान ही सामजिक संस्था पाण्याच्या क्षेत्रात काम करते. दरवर्षीच्या पावसाळ्याच्या सुरुवातीला कर्जत तालुक्यातील काही गावे या स्वयंसेवी संस्थेच्या कार्यकर्त्यांची वाट पाहतात. अशा स्थितीत शासकीय यंत्रणेची काहीच जबाबदारी नाही का, असा प्रश्न पडतो. मोठा गाजावाजा आणि खर्च करून यावर्षी मार्च महिन्यात जलजागृती सप्ताह साजरा झाला. जलपूजनाचे कार्यक्रम प्रत्येक जिल्ह्यात राबविले गेले. सप्ताह यशस्वी झाल्याचा दावा शासनातर्फे केला गेला. या यशापासून कर्जत तालुक्यातील ही गावे दूरच होती, हे सिद्ध झाले.

वाळूच्या खड्ड्यातील (डवरा) स्वच्छ पाणी
उल्हास नदीला मिळणाऱ्या विविध उपनद्यांच्या परिसरात ही गावे वसली आहेत. या गावांमध्ये उन्हाळ्यात पाण्याची टंचाई असते. ओढे, नद्या आणि विहिरी कोरड्या पडतात. त्यानंतर येणाऱ्या पावसाळ्यात हे पाणवठे पाण्याने भरतात. मात्र हे पाणी गढूळ आणि दूषित असते. टंचाईनंतर उपलब्ध होणारे हे पाणी ग्रामस्थांकडून वापरले जाते. त्यातून जलजन्य साथी उद्भवतात. काही महिला त्यातल्या त्यात शुद्ध पाणी वापरण्याचा प्रयत्न करतात. नदी आणि विहिरींचे पाणी गढूळ दिसते. त्याऐवजी पाणवठ्याजवळच वाळूमध्ये खड्डा (डवरा) खोदला, तर त्यामध्ये स्वच्छ पाणी दिसते. ते वापरले जाते. मात्र गाळून आलेले हे पाणी शुद्ध असतेच, असे नाही. या गावांमध्ये शासनाने जाहीर केलेल्या जलशुद्धीकरणाच्या कोणत्याच पद्धती राबविला जात नसल्याने साथींचा प्रादुर्भाव होत आहे. जलवर्धिनी प्रतिष्ठानच्या कार्याकडे शासनाच्या प्रतिनिधींनी लक्ष दिले, तर चांगला परिणाम साधला जाणार आहे.
.............................



क्लोरीनच्या बाटल्यांचे वितरण करणारे उत्साही तरुण. सोबत उल्हास परांजपे, सौ. उत्तरा परांजपे.



...............................
संपर्क - उल्हास परांजपे. विश्वस्त, जलवर्धिनी प्रतिष्ठान, मुंबई. 09820788061

Saturday 30 July 2016

एसटीचे मावळते विभाग नियंत्रक कैलास देशमुख गुरुस्थानी

रत्नागिरी एसटीच्या रत्नागिरी विभागाचे मावळते विभाग नियंत्रक कैलास देशमुख गुरुस्थानी असल्याची कृतज्ञता अनेक कर्मचाऱ्यांनी व्यक्त केली. एखाद्या अधिकाऱ्याबद्दल अशी कृतज्ञता व्यक्त झालेली पाहताना अनेकांना गहिवरून आले.
एसटी विभागातून जुलैमध्ये सेवानिवृत्त होणार्‍या अधिकारी, कर्मचार्‍यांचा सत्कार शनिवारी (ता. ३० जुलै) स्वयंवर मंगल कार्यालयात करण्यात आला. त्यामध्ये विभाग नियंत्रकर कैलास देशमुख यांचाही समावेश होता. श्री. देशमुख यांना आमदार उदय सामंत आणि अधीक्षक अशोक यांच्या हस्ते मानपत्र, पुष्पगुच्छ देण्यात आला. या वेळी विवेक भागवत, प्रमोद घाग, अंकुश पवार, अनिलकुमार जाधव, सतीश जोशी, मेहबूब दर्शवाल, सदानंद खरात, राजाराम लिंगायत, सूर्यकांत जाधव, प्रदीप सावंत, गजानन फडणीस, समाधान आखाडे या कर्मचार्‍यांचा सहकुटुंब सत्कार करण्यात आला.
या वेळी जिल्हा पोलिस अधीक्षक प्रणय अशोक, एसटीचे मुंबई प्रादेशिक व्यवस्थापक राहुल तोरो, माजी महाव्यवस्थापक आर. सी. पाटील, मुंबईचे विभाग नियंत्रक श्री. सुपेकर व प्रवासी संघटनेचे अध्यक्ष सुरेश मराठे, सौ. ज्योती देशमुख उपस्थित होते. आमदार श्री. सामंत म्हणाले की, मी पहिलाच असा अधिकारी पाहतो आहे की, सर्व कर्मचार्‍यांनी मिळून सेवानिवृत्तीनिमित्त भव्य सत्कार केला. श्री. देशमुख यांनी लोकांशी चांगले नातेसंबंध जोपासले आहेत. ते एसटीतून निवृत्त होत असले तरी सार्वजनिक जीवनात त्यांची नवी इनिंग सुरू होणार आहे.
कार्यक्रमात अनेकांनी मनोगतामध्ये देशमुख यांच्या गुणगान केले. ते कोणत्याही कठीण प्रसंगाला सामोरे जातात. यामुळेच ते गुरुस्थानी असल्याचे अनेकांनी सांगितले.
सत्काराला उत्तर देताना श्री. देशमुख यांनी सांगितले की, आर. सी. पाटील हे गुरुस्थानी आहेत. सर्वांच्या सहकार्यामुळेच ३० वर्षे नोकरी करू शकलो.

सौ. राजलक्ष्मी सुर्वे यांनी सूत्रसंचालन केले. पी. एस. जाधव यांनी प्रास्ताविक केले. कार्यक्रमाला मुंबई, नगर, भोर, पुणे, मोहोळ, सटाणा, नाशिक, कोल्हापूर या एसटी आगारातून अधिकारी, कर्मचारी, महाराष्ट्र एसटी कामगार संघटना, इंटकचे पदाधिकारी उपस्थित होते.
.........................................................................................................
रत्नागिरी : एसटीतील सेवानिवृत्त झालेले कर्मचारी. त्यांच्या सत्कार समारंभाच्या वेळी मागे उभे आमदार उदय सामंत, जिल्हा पोलिस अधीक्षक प्रणय अशोक, एसटीचे प्रादेशिक व्यवस्थापक राहुल तोरो, कैलास देशमुख आदी.

'मेरी सडक' निष्प्रभ करणारा महामार्ग

Wednesday 27 July 2016

अखिल चित्पावन ब्राह्मण विद्यार्थी मंडळातर्फे रत्नागिरीत श्रावण कीर्तन सप्ताह


         रत्नागिरी - येथील अखिल चित्पावन ब्राह्मण विद्यार्थी सहाय्यक मंडळातर्फे श्रावण महिन्याचे औचित्य साधून
कीर्तन महोत्सवाचे आयोजन केले आहे. कीर्तन सप्ताह ३ ते ९ ऑगस्टदरम्यान दररोज सायंकाळी ५.३० ते ७.३०
या वेळेत मंडळाच्या कै. ल. वि. केळकर वसतिगृहाच्या भगवान परशुराम सभागृहात होणार आहे.
        सप्ताहाच्या पहिल्या दिवशी ३ ऑगस्टला आंजर्ले-दापोली येथील विजय निजसुरे यांचे कीर्तन होईल.
बुलंद बुरूज या आख्यान विषयावर कीर्तन करतील. त्यांनी (कै.) संजय जोशी (मुर्डी) यांच्या प्रेरणेने सन २००२
पासून  कीर्तनाचा अभ्यास केला. आजपर्यंत त्यांची ३८७ कीर्तने केली.
        चिपळूणचे प्रसिद्ध कीर्तनकार महेश काणे हे दत्तभक्त शेतकरी विषयावर ४ ऑगस्टला कीर्तन करतील.
हभप कै. नरेंद्र हाटे हे त्यांचे कीर्तनातील गुरू, डॉ. कविता गाडगीळ गायनातील गुरू. संगीत विशारद, देवर्षी
 नारद, कीर्तन केसरी, कीर्तन विशारद, कीर्तन भास्कर या पदव्यांनी ते सन्मानित आहेत. आकाशवाणी मुंबईचे
बी ग्रेड कलाकार आहेत. महाराष्ट्र, गोवा, कर्नाटक, मध्य प्रदेश, गुजरातमध्ये गेल्या २० वर्षांत सुमारे
दोन हजार कीर्तने केली आहेत.
        देवरूखचे युवा कीर्तनकार हभप कुमार विष्णू भाट्ये यांचे सुधन्वा चरित्र यावर ५ ऑगस्टला आख्यान
होईल. त्यांचे एमएपर्यंतचे शिक्षण झाले. ते काही वर्षांपासून कीर्तनाचा व्यासंग उत्तमरीत्या सांभाळत आहेत.
अनेक ठिकाणी कीर्तनसेवा केली आहे.
        पुण्याचे प्रसिद्ध कीर्तनकार चारुदत्त आफळे यांच्या शिष्या सौ. रेशीम मुकुंद खेडकर (मरकळे) यांचे
संत सावतामाळी या विषयावरचे कीर्तन ६ ऑगस्टला होईल. सौ. खेडकर बीकॉम, जीडीसी अँड ए असून
एमए-संगीत, हार्मोनियम विशारद पदव्या प्राप्त आहेत. १९९९ पासून त्या कीर्तन शिक्षण घेत असून श्री हरी
कीर्तनोत्तेजक सभा, पुणे येथे पाच वर्षांचा अभ्यासक्रम पूर्ण केला. २००३ पासून आफळे यांच्याकडे कीर्तनाचे
शिक्षण सुरू झाले. त्या पायपेटी, ऑर्गनची उत्तम साथसंगत करतात. युवती, गानकोकिळा, संगीत प्रमोदिनी
या कीर्तनातील पुरस्कारांनी त्या सन्मानित आहेत. आत्तापर्यंत त्यांची महाराष्ट्र, गोवा, दिल्ली, लखनौ,
कोलकाता, अहमदाबाद, बडोदा, ग्वाल्हेर, कर्नाटक, आंध्र प्रदेश येथे ५५० कीर्तने झाली.
        पुण्याच्या युवा कीर्तनकार हभप सौ. संज्योत संजय केतकर (पूर्वाश्रमीच्या उत्कर्षा जावडेकर) यांचे
महानंदा यावर आख्यान ७ ऑगस्ट रोजी होईल. सौ. केतकर यांना बीए-संस्कृत ही पदवी प्राप्त असून
तबलावादनाच्या पाच परीक्षा उत्तीर्ण आहेत. १२ वर्षे चित्रकलेचे शिक्षण घेतले आहे. राष्ट्रीय कीर्तनकार उद्धव
जावडेकर, हभप भिडे, नारद मंदिर, पुणे येथे त्यांचे कीर्तनाचे शिक्षण झाले आहे. तसेच आई, बहीण,
पं. शरद गोखले यांच्याकडून गायनाचे मार्गदर्शन मिळाले. नारद मंदिराचा युवती कीर्तनकार हा पुरस्कार
त्यांना प्राप्त आहे. त्यांनी आतापर्यंत १०० कीर्तन केली आहेत.
        मीरा रोड, ठाणे येथील कीर्तनकार भालचंद्र पटवर्धन यांचे ८ ऑगस्टला पार्थरथी हनुमान यावर
कीर्तन होईल. ते इलेक्ट्रिकल इंजिनिअर असून मध्य प्रदेश विद्युत मंडळ, टेक्स्टाईल मिलमध्ये त्यांनी नोकरी केली.
सन २००३ ते २००६ पर्यंत अखिल भारतीय कीर्तन संस्था दादर (मुंबई) येथून हभप श्रीधर भागवत यांच्या
मार्गदर्शनाखाली कीर्तनालंकार हा पाठ्यक्रम पूर्ण केला. गोवा, महाराष्ट्र, छत्तीसगड, गुजरातमध्ये
त्यांची ४०० कीर्तने, प्रवचने झाली. २००८ मध्ये लंडन, २०१० मध्ये स्वित्झर्लंड येथे कीर्तने केली.
        राजापूरचे कीर्तनकार दत्तात्रय रानडे हे मानाची पालखी या विषयावर ९ ऑगस्टला कीर्तन करतील.
ग्रंथ हेच गुरू समजून कीर्तन तरंगिणी शिरवळकर बुवांची पुस्तके व अन्य ग्रंथांचा अभ्यास करून त्यांनी
कीर्तनविद्या आत्मसात केली. दत्तदास घाग, आफळेबुवा, रामचंद्र भिडे, नाना जोशी, पाटणकरबुवा,
वीरकरबुवा यांना त्यांनी कीर्तनातील आदर्श मानले आहे.
        कीर्तन सप्ताहाला ऑर्गनची साथ वाटद-खंडाळा येथील प्रसिद्ध वादक राजेंद्र भडसावळे,
तबलासाथ कशेळी-राजापूर येथील वादक आनंद ओळकर करणार आहेत. कीर्तन सप्ताहातील सर्व
कीर्तनांच्या लाभ सर्व कीर्तनप्रेमींनी कुटुंबीय व मित्रमंडळींसह उपस्थित राहून घ्यावा, असे आवाहन मंडळाचे
कार्याध्यक्ष श्रीनिवास जोशी, कार्यवाह राजेंद्र पटवर्धन, कोषाध्यक्ष सौ. राधिका वैद्य व मंडळाचे सर्व
पदाधिकाऱ्यांनी केले आहे.
......................
 

Tuesday 19 July 2016

सौ. सुहासिनी भडभडे यांचे निधन

रत्नागिरी : येथील सौ. सुहासिनी सुभाष भडभडे (वय  ६६) यांचे शनिवारी (ता. १६ जुलै) सकाळी हृदयविकाराने निधन झाले. त्या धार्मिक वृत्तीच्या व मनमिळाऊ होत्या. माणगाव (ता. कुडाळ, जि. सिंधुदुर्ग) येथील वासुदेवानंद सरस्वती विद्यालयातील निवृत्त शिक्षक, रत्नागिरीतील जनसेवा ग्रंथालय, गीतामंडळ, कोकण मराठी साहित्य परिषद आणि सर्वोदय छात्रालयाचे सक्रिय पदाधिकारी सुभाष दत्तात्रय भडभडे यांच्या त्या पत्नी होत.
कै. सौ. सुहासिनी भडभडे यांचे पूर्वाश्रमीचे नाव मालती शेवडे (निवेंडी). विवाहानंतर त्या पतीसमवेत माणगावला राहायला गेल्या. तेथील वासुदेवानंद सरस्वती ग्रंथालयात ग्रंथपाल म्हणून त्यांनी काही काळ काम केले. श्री. भडभडे यांच्या निवृत्तीनंतर त्यांचे कुटुंब रत्नागिरीतील टिळक आळीत स्थायिक झाले.
सौ. भडभडे यांना गेले काही महिने मधुमेह, हृदयविकार आणि मूत्रपिंडाच्या विकाराचा त्रास होत होता. प्रकृती बिघडल्याने त्यांना खासगी रुग्णालयात दाखल केले होते. तेथेच गेल्या शनिवारी त्यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चातत पती, मुलगा, मुलगी, सून, नाती असा परिवार आहे.


Sunday 17 July 2016

‘निशिगंध ते प्राजक्त’ने रत्नागिरीची सांस्कृतिक उंची वाढवली : ॲड. विलास पाटणे

रागसमय चक्रावर आधारित बारा तासांचा शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम

रत्नागिरी - निशिगंध ते प्राजक्त हा संपूर्णपणे शास्त्रीय संगीतावर आधारित कार्यक्रम सादर करून सौ. मुग्धा भट-सामंत आणि त्यांच्या शिष्यांनी रत्नागिरी शहराची सांस्कृतिक उंची वाढविली आहे, असे गौरवोद्गार रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीचे कार्याध्यक्ष ड. विलास पाटणे यांनी काढले.


-    रत्नागिरी - निशिगंध ते प्राजक्त कार्यक्रमाचे उद्घाटन करताना
रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीचे कार्याध्यक्ष ड. विलास पाटणे,
प्रभारी प्राचार्य डॉ. आर. एच. कांबळे, सोबत सौ. मुग्धा भट-सामंत,
राजू बर्वे, दिलीप केळकर
गुरुपौर्णिमेच्या पार्श्वभूमीवर सौ. मुग्धा भट-सामंत यांचे वडील गजानन भट यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ सौ. सामंत यांनी आणि त्यांच्या शिष्य परिवाराने निशिगंध ते प्राजक्त हा कार्यक्रम आयोजित केला होता. गोगटे-जोगळेकर महाविद्यालयाच्या राधाबाई शेट्ये सभागृहात तब्बल बारा तास चाललेल्या शास्त्रीय संगीतावर आधारित या कार्यक्रमाच्या उद्घाटनप्रसंगी ड. पाटणे बोलत होते. शास्त्रीय संगीत हा भारताचा ठेवा असून पॉप संगीताच्या आजच्या काळातही त्याला जगभरात मानाचे स्थान आहे, असेही ते म्हणाले. महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ. रमेश कांबळे यांनीही कार्यक्रमाचे कौतुक करून संगीताच्या विद्यार्थ्यांनी नियमित रियाज करून यश मिळवावे, असे आवाहन केले. ड. पाटणे, डॉ. कांबळे यांच्यासह ध्वनिसंयोजक राजू बर्वे आणि छायाचित्रकार दिलीप केळकर यांचा यावेळी विशेष सत्कार करण्यात आला.
-    कार्यक्रमात गीते सादर करताना विद्यार्थी
शास्त्रीय संगीत कसे मनोरंजक असू शकते हे समजावे, त्याची गोडी मुलांना लागावी, यासाठी कार्यक्रम आयोजित केल्याचे सौ. मुग्धा भट-सामंत यांनी सांगितले. गायनापेक्षाही संगीताची माहिती आणि अभ्यास त्यांनी करावा, हाच त्यातील हेतू आहे. तरुण पिढीने पारंपरिक शास्त्रीय संगीताचा प्रचार आणि प्रसार करावा, म्हणून असेच माहितीपूर्ण व अभ्यासपूर्ण कार्यक्रम करत राहण्याचा आपला संकल्प असल्याचे त्या म्हणाल्या.
निशिगंध ते प्राजक्त हा संपूर्ण शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम शनिवारी (ता. १६) सायंकाळी ६ ते रविवारी (ता. १७) सकाळी ६ या वेळेत सादर करण्यात आला. रागसमय चक्रावर आधारित या कार्यक्रमात ६ ते ६० वयोगटातील शिष्य सहभागी झाले. निशिगंध सायंकाळी हळुवार उमलत जातो आणि प्राजक्ताचा सडा सकाळी पडतो. तेच औचित्य साधून सायंकालीन रागांपासून प्रातःकाळापर्यंत वेगवेगळ्या प्रहरात नेमून दिलेले राग या कार्यक्रमात सादर झाले. त्या त्या वेळात राग गायला गेल्यानंतर साधलेल्या परिणामांचा अभ्यास सौ. सामंत यांच्या प्रारंभिक ते अलंकारपर्यंतच्या विद्यार्थ्यांनी केला. तोच यावेळी सादर करण्यात आला. रात्री १२ ते पहाटे ५ या वेळेत गायले जाणारे व विशेष न गायले जाणारे राग या कार्यक्रमात सादर झाले. कार्यक्रमात सूत्रसंचालन-निवेदनाची बाजू विद्यार्थ्यांनीच सांभाळली. सर्व रागांचे विद्यार्थ्यानी अभ्यासपूर्ण निवेदन केले. रागाच्या रसनिष्पत्तीमध्ये समयाचा मोठा वाटा असतो. त्या त्या समयी तो तो राग सादर झाला तर अधिक परिणाम साधू शकतो का याचा प्रत्यक्ष अनुभव विद्यार्थ्यांनी घेतला. राग, रस, स्वर, रंगय, समय या सगळ्यांचा एकमेकांशी कसा संबंध असतो याचा अभ्यास विद्यार्थ्यांनी केला. खमाज, काफी, भूप, दुर्गा, बागेश्री, विहाग, देस, जोग, नंद, हंसध्वनी, जयजयवंती, शंकरा, मियामल्हार, मालकंस, दरबारी कानडा, नायकी कानडा, चंद्रकंस, मधुकंस, बसंत, बहार, ललत, बिभास, अहिरभैरव, नटभैरव, भैरवी हे राग या कार्यक्रमात सादर केले गेले. रागांच्या वादी आणि संवादी स्वरांच्या रंगांचे पोषाख गायकांनी परिधान केले होते. कार्यक्रमाला प्रसाद वैद्य, राजू धाक्रस, केदार लिंगायत, निखिल रानडे (तबला), तर संतोष आठवले, वैभव फणसळकर, चैतन्य पटवर्धन, मधुसूदन लेले (हार्मोनिअम) यांनी संगीतसाथ केली.

राग आणि समय या विषयासंबंधी माहिती मिळविण्यासाठी प्रश्नावली तयार करून या कार्यक्रमात संगीत शिकणाऱ्या आणि न शिकलेल्या रसिकांकडून भरून घेण्यात आली.
.................................
-    निशिगंध ते प्राजक्तमधील गायक कलाकार आणि शिक्षकांसह सौ. मुग्धा भट-सामंत.