Friday 27 May 2016

कोकण रेल्वेचा हमसफर सप्ताह सुरू

रत्नागिरी : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्रातील एनएडीए सरकारला दोन वर्षे पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर भारतीय रेल्वेने कालपासून (ता. २६) हमसफर सप्ताह सुरू केला आहे.  कोकण रेल्वेनेही हा सप्ताह साजरा करायला सुरवात केली आहे. काल स्वच्छता दिवस तर आज सत्कार दिवस साजरा करण्यात आला.

राज्यराणी एक्स्प्रेसमधील प्रवाशांशी
संवाद साधताना विभागीय रेल्वे
व्यवस्थापक बाळासाहेब निकम
एनडीए सरकारच्या दोन वर्षांच्या कालावधीत झालेल्या लोकहिताच्या विविध कामांची माहिती जनतेला देण्यासाठी केंद्र सरकारच्या प्रत्येक खात्याने विविध उपक्रम राबविले आहेत. त्यानुसार रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी लपासून हमसफर सप्ताह राबविण्याची सूचना भारतीय रेल्वेला केली. हा सप्ताह २६ मे रोजी सुरू झाला असून तो १ जूनपर्यंत चालणार आहे. प्रत्येक दिवस वेगवेगळ्या उपक्रमांसाठी साजरा केला जात आहे. हमसफर सप्ताह साजरा करण्यासाठी रत्नागिरीचे विभागीय रेल्वे व्यवस्थापक बाळासाहेब निकम यांनी आपल्या कार्यक्षेत्रातील सर्व २८ स्थानकांचे पालकत्व वेगवेगळ्या अधिकाऱ्यांकडे सोपविले आहे. त्यांच्यामार्फत संपूर्ण विभागात काल आणि आज स्वच्छता आणि सत्कार दिवसाच्या निमित्ताने अभियान राबविण्यात आले. श्री. निकम यांनी काल स्वतः संगमेश्वर, आरवली, सावर्डे, कामथे आणि चिपळूण या स्थानकांच्या स्वच्छतेची पाहणी केली. आवश्यक तेथे स्वच्छता करण्यात आली. राज्यराणी एक्स्प्रेस संगमेश्वर स्थानकात आली असता तेथे श्री. निकम यांनी प्रवाशांशी संवाद साधला. गाडीतील एका डब्यातील अस्वच्छ स्वच्छतागृह आणि तुंबलेल्या बेसिनकडे प्रवाशांनी त्यांचे लक्ष वेधले. त्याची त्वरित देखल घेऊन गाडी रत्नागिरी स्थानकावर आल्यानंतर स्वच्छता करण्यात आली. याच पद्धतीने रत्नागिरी विभागातील सर्व स्थानके, मार्गावरून धावणाऱ्या गाड्यांच्या स्वच्छतेची पाहणी करण्यात आली.
स्थानकावरील उपाहारगृहांची स्वच्छता, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था आणि योग्य दरपत्रक लावले आहे का, याची पाहणी आजच्या सत्कार दिवसाच्या निमित्ताने करण्यात आली. रेल्वेच्या पॅन्ट्री कारच्या पाहणीचाही त्यामध्ये समावेश होता. उपाहारगृहांमध्ये तसेच गाडीत प्रवाशांना दर्जेदार पदार्थ दिले जात आहेत का, हेही तपासण्यात आले. याच पद्धतीने उद्यापासून (ता. २८) सेवा दिवस, सतर्कता दिवस, सामंजस्य दिवस, संयोजन दिवस आणि संचार दिवस साजरा केला जाणार असल्याची माहिती विभागीय व्यवस्थापक बाळासाहेब निकम यांनी दिली.

.............

रेल्वेस्थानकांवरील स्वच्छता करताना रेल्वेचे कर्मचारी

-    रत्नागिरी रेल्वेस्थानकावरील उपाहारगृहांची तपासणी करण्यात आली.

Monday 23 May 2016

डम्पिंग ग्राउंड नव्हे, पर्यटनस्थळ

डम्पिंग ग्राउंड म्हणजे दुर्गंधी आणि कचऱ्याची बजबजपुरी असेच चित्र डोळ्यांसमोर येते. कमी-अधिक प्रमाणात सर्वच शहरांची अशीच स्थिती आहे; मात्र याच कचऱ्याच्या आगाराचे रूपांतर एका पर्यटनस्थळामध्ये करायचे ठरवून वेंगुर्ले नगरपालिकेने एक वेगळाच आदर्श निर्माण केला आहे.
..............................................................................

     मुंबईतील देवनार येथील डम्पिंग ग्राऊंडला लागलेल्या आगीचा विषय बरेच दिवस धुमसत आहे. मुंबईप्रमाणेच बहुतेक सर्वच शहरांना कचऱ्याच्या समस्येने ग्रासून टाकले आहे. ग्रामीण भागातील लोकांचे शहराकडे मोठ्या प्रमाणावर होणारे स्थलांतर, त्यामुळे शहरांवर पडणारा अतिरिक्त ताण आणि त्यातून निर्माण होणाऱ्या समस्यांमध्ये कचरा ही सर्वांत मोठी समस्या आहे.
सुक्या कचऱ्यापासून ब्रिकेट्स तयार केल्या जातात.
शहरात दररोज तयार होणाऱ्या टनावारी कचऱ्याचे करायचे काय, जागेअभावी तो साठवायचा किंवा टाकायचा कोठे, कचऱ्याची विल्हेवाट कशी लावायची, याचे उपाय शोधून काढण्यात नगर प्रशासन अयशस्वी ठरते. मग शहरात कचऱ्याचे ढीग साठतात. डम्पिंग ग्राऊंडही भरून गेले, तर कचरा जाळून टाकण्याचा सोपा मार्ग सर्वत्रच अवलंबिला जातो. त्यातून मोठ्या प्रमाणावर वायुप्रदूषण होते. नागरिकांचा संतापही अनावर होतो. मोर्चे निघतात. थातूरमातूर उत्तरे दिली जातात. मोर्चेकऱ्यांचे समाधान होते. पुन्हा अगदी दुसऱ्या दिवशीपासून नागरिक आणि पालिका प्रशासनही कचऱ्याच्या आपल्या "जबाबदाऱ्या" आदल्या दिवशीप्रमाणेच पुढे पार पाडतात. शहरे मोठी असतील, तर त्या प्रमाणात डम्पिंग ग्राऊंडची संख्या वाढते आणि त्या त्या भागातील नागरिकांना त्याच प्रमाणात त्रास सोसावा लागतो. कचऱ्याची ही समस्या सोडविण्यासाठी बायोगॅस आणि खतनिर्मितीचे प्रकल्प राबवून कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी पालिकांना विविध योजनांमधून अनुदान दिले जाते. प्रकल्प मोठ्या उत्साहात सुरू होतात. मात्र अल्पावधीतच ते अडगळीत जातात. कमीअधिक प्रमाणात सर्वच शहरांमध्ये हेच चित्र दिसते.
 डम्पिंग ग्राऊंडवर पर्यटकांसाठी उभारली जात असलेली झोपडी.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वेंगुर्ले शहरही सहा महिन्यांपूर्वी कचऱ्याच्या या समस्येला अपवाद नव्हते. कोकणातील आणि किनारपट्टीवरील शहर असल्याने मासळी आणि त्यापासून उद्भवणाऱ्या कचऱ्याचीही समस्या शहराला भेडसावत होती. अशा या शहराचा अक्षरशः आठ-दहा महिन्यांत कायापालट झाला आहे. केवळ कोकण आणि राज्यातीलच नव्हे, तर देशातील पहिले स्वच्छ शहर असा नावलौकिक वेंगुर्ले शहराने मिळविला आहे. पालिकेचे तडफदार मुख्याधिकारी रामदास कोकरे यांना त्यांच्या तेथील कारकिर्दीच्या अवघ्या दहा महिन्यांत राज्य शासनाचे तीन पुरस्कार मिळाले. हागंदारीमुक्त शहराचा पुरस्कार २ ऑक्टोबर २०१५ रोजी, स्वच्छ शहर पुरस्कार यावर्षीच्या ३ फेब्रुवारीला, तर उत्कृष्ट मुख्याधिकारी पुरस्कार याच वर्षी २० एप्रिल रोजी त्यांना मिळाला. एकाच वर्षात मुख्यमंत्र्यांच्या हस्ते तीन वेळा गौरव होणारा हा एकमेव अधिकारी असावा.
अर्थात अशा पुरस्कारांवर यश मोजता येणार नाही, हे खरे आहे. कारण कोकणातील बहुतेक सर्वच पालिकांना स्वच्छतेचे पुरस्कार गेल्या पंधरा-वीस वर्षांत मिळाले. मात्र त्यांची स्वच्छता त्या पुरस्कारापुरतीच राहिली. पुरस्कार जाहीर झाल्यानंतर तो प्रत्यक्ष मिळेपर्यंतच्या अवधीतच शहरे पुन्हा बकाल झाली. वेंगुर्ल्याच्या बाबतीत मात्र सध्या तरी तसे म्हणता येणार नाही. कारण उत्स्फूर्त लोकसहभाग, जागरूक प्रशासन आणि योग्य व्यवस्थापनामुळे कोकणातील या छोट्याशा शहराने देशातील प्लास्टिकमुक्त आणि कचरा व्यवस्थापनाबाबत देशात आदर्श ठरणारे शहर असा लौकिक प्राप्त केला आहे. डम्पिंग ग्राऊंडचा पर्यटनस्थळ म्हणून विकास करण्याच्या दृष्टीने वेंगुर्ले पालिकेने पावले उचलली आहेत, एवढे नमूद केले, तरी पालिकेच्या लौकिकाचे वेगळे प्रमाण देण्याची गरज नाही.
दोन-तीन वर्षे कृषी अधिकारी, तेवढाच काळ पोलिस अधिकारी आणि पाच-सहा वर्षे दापोली आणि औसा येथील पालिका मुख्याधिकारी म्हणून काम केलेले रामदास कोकरे गेल्या वर्षी जूनमध्ये वेंगुर्ल्यात दाखल झाले. आधीच्या सर्वच अनुभवाचा पुरेपूर वापर करून त्यांनी स्वच्छ आणि मुख्यत्वे प्लास्टिकमुक्त शहराचा ध्यास घेतला. देशभरातील विविध शहरांचा अभ्यास केला आणि स्वच्छतेसाठी चतुःसूत्री तयार केली. ओला कचरा, सुका कचरा, धातू आणि प्लास्टिकचा कचरा नागरिकांकडून वर्गीकरण करून संकलित करण्याची ही चतुःसूत्री शहरात कठोरपणे राबविली गेली. असे वर्गीकरण करून कचरा संकलन करणारी ही देशातील पहिली पालिका आहे. हे सर्व राबविताना कचरा टाकणाऱ्यांना आणि जाळणाऱ्यांना वचक बसावा म्हणून ५०० रुपये दंड आकारला जातो आणि तो वसूल केला जातो. याबद्दल अनेकांनी टीका केली. अडचणी आणल्या. रस्त्याच्या कडेला कचरा टाकल्याचे नाकारणाऱ्या एका नागरिकाच्या घरासमोरील कचऱ्यात सापडलेल्या औषधाच्या प्रिस्क्रिप्शनवरून त्याचा गुन्हा उघड केला आणि त्याच्याकडून दंड वसूल करण्यात आला. शहरात हागंदारीमुक्ती राबविताना तर अनेकदा सूचना देऊनही त्यांचे पालन न करणाऱ्यांची ढोलताशांच्या गजरात गांधीगिरीने मिरवणूक अर्थात धिंड काढली. त्यामुळे मुख्याधिकाऱ्यांना काही लोकांच्या रोषाला सामोरे जावे लागले. त्यांची बदली करण्याचे प्रयत्नही काही असंतुष्टांकडून झाले. मात्र श्री. कोकरे यांची भूमिका स्वच्छ भारत अभियानाशी सुसंगतच असल्याने ते प्रयत्न यशस्वी होऊ शकले नाहीत. श्री. कोकरे जोमाने काम करतच राहिले.
निश्चित दिशेने स्वच्छता अभियान राबविले जात असल्याची खात्री पटल्यानंतर युनियन बँक, बँक ऑफ महाराष्ट्र, बँक ऑफ इंडिया इत्यादींनी या उपक्रमाकरिता कचराकुंड्या देण्यापासून फलक उभारणीपर्यंत विविध टप्प्यांवर आर्थिक हातभार लावला. मुख्याधिकारी आणि पालिका प्रशासनाचा झपाटा पाहून नागरिकांनीही स्वतः उत्स्फूर्तपणे शहरात काही ठिकाणी कचरापेट्यांची उभारणी केली. पालिकेच्या कचरा गोळा करणाऱ्या गाड्यांना जीपीएस प्रणाली बसविण्यात आली आहे. त्यामुळे कोणती गाडी कोठे आहे, याची दररोज नोंद केली जाते. दररोज देखरेख ठेवली जाते. परिणामी कोठेही गफलत होत नाही. अशा पद्धतीने दररोज संकलित होणाऱ्या कचऱ्याचे योग्य व्यवस्थापन केले जाते. शहरात दररोज दीड ते दोन टन ओला, तर सुमारे साडेचार टन सुका कचरा संकलित होतो. प्लास्टिक कचऱ्याचे प्रमाण दररोज सुमारे ५० किलो असते. ओल्या कचऱ्यापासून वीज आणि बायोगॅसची निर्मिती केली जाते. ब्रिकेट आणि शेगडीकरिता गोळे तयार करून कागद आणि पालापाचोळ्याच्या सुक्या कचऱ्याची विल्हेवाट लावली जाते. वेंगुर्ल्यात काजूप्रक्रिया प्रकल्पांची संख्या मोठी आहे. या प्रकल्पांना बॉयलरसाठी लाकूड आणि इतर इंधन मोठ्या प्रमाणावर लागते. त्यांच्यासाठी सुक्या कचऱ्यापासून तयार केलेल्या ब्रिकेट उपयुक्त ठरत आहेत. प्लास्टिक कचरा बारीक करून तो रस्त्यावरच्या डांबरात वापरला जातो. पहिला प्लास्टिकचा रस्ता वेंगुर्ले पालिकेनेच दोन महिन्यांपूर्वी तयार केला आहे आणि आता ती नियमित प्रक्रिया झाली आहे. मात्र ती निरंतर चालू राहण्याची शक्यता वाटत नाही. त्याचे कारण म्हणजे प्लास्टिकमुक्तीच्या निर्धारामुळे नागरिकही प्लास्टिकऐवजी कापडी आणि कागदी पिशव्यांचा वापर आणि आग्रह करू लागले आहेत. परिणामी प्लास्टिकच्या कचऱ्याचे प्रमाण खूपच घटले आहे. बायोगॅस, वीज, ब्रिकेट, गोळे, कंपोस्ट खत तयार करण्यासाठी विविध यंत्रे बसविण्यात आली आहेत. त्यासाठी आलेला सुमारे एक कोटी रुपयांचा खर्च नागरी विकासाच्या विविध योजनांमधून केंद्र आणि राज्य सरकारकडून पालिकेने सातत्याने पाठपुरावा करून मिळविला आहे. याशिवाय तूर्त तरी प्रक्रिया करता येत नाही, अशा काच आणि धातूच्या बाटल्या रिसायकलिंगसाठी विकल्या जातात. त्यांच्या विक्रीतून आलेला निधी पुन्हा याच प्रकल्पाच्या आवश्यक बाबींसाठी खर्च केला जातो.
या सर्व प्रक्रिया पालिकेच्या सहा एकर डम्पिंग ग्राऊंडवर केल्या जातात. अगदी सात-आठ महिन्यांपूर्वी या ग्राऊंडच्या परिसरात राहणाऱ्या नागरिकांना दुर्गंधीमुळे जिणे नकोसे झाले होते. आता परिस्थिती पूर्ण बदलली आहे. गोळा होणाऱ्या कचऱ्यावर रोजच विविध प्रक्रिया होत असल्याने डम्पिंग ग्राऊंडवर कचराच शिल्लक राहत नाही. या मोकळ्या जागेचे पर्यटनस्थळ म्हणून रूपांतर करण्याची योजना आता आकाराला येत आहे. ग्राऊंडच्या काही भागात सोनचाफ्याची झाडे लावली आहेत. यथावकाश स्थानिक पर्यावरणाशी निगडित झाडांची लागवड केली जाणार असून कोकणाची जैवविविधता पाहण्यासाठी लोक या पर्यटनस्थळाला आवर्जून भेट देतील, अशी व्यवस्था लवकरच केली जाणार आहे. डम्पिंग ग्राऊंडचे पर्यटनस्थळात रूपांतर करणारीसुद्धा वेंगुर्ले ही पहिलीच पालिका ठरणार आहे.

-     प्रमोद कोनकर
pramodkonkar@yahoo.com
.............................................................................................................................................
डम्पिंग ग्राऊंडवर साकारलेले क्रीडांगण.



भारतात संस्कृतकडे दुर्लक्ष ही गंभीर बाब : दिनेश कामत

रत्नागिरी : भारतात संस्कृतबद्दल अज्ञान व जगभरात संस्कृतची जाण आहे. संस्कृतमधील असंख्य ग्रंथ आज परदेशांमध्ये आहेत. सुमारे ४०० विद्यापीठांमध्ये संस्कृत अनिवार्य केले आहे. पण भारतातच संस्कृतकडे दुर्लक्ष केले जाते. ही गंभीर बाब आहे, असे प्रतिपादन संस्कृत भारतीचे अ. भा. संघटनमंत्री दिनेश कामत यांनी व्यक्त केले.
संस्कृत भारतीतर्फे येथील गोगटे-जोगळेकर महाविद्यालयात आयोजित दहा दिवसांच्या प्रशिक्षण शिबिराची आज (दि. २३ मे) सांगता झाली. त्यावेळी ते बोलत होते. ते पुढे म्हणाले की, जो संस्कृत जाणतो, त्याच्यासाठी अन्य भाषा शिकणे कठीण नाही. संस्कृतशिवाय अन्य भाषांना अस्तित्त्व नाही. संस्कृत वगळून भारत म्हणजे इंडिया आहे. देशात ३२ ठिकाणी संस्कृतचे वर्ग सुरू आहेत. संस्कृत भारती देशात जोमाने काम करत आहे. सर्व शास्त्रे, विद्यांचे ज्ञानभांडार संस्कृतमध्ये आहे.
सांगता समारंभास उपस्थित असलेले जिल्हा परिषद प्राथमिक विभागाचे शिक्षणाधिकारी एकनाथ आंबोकर यांनी राज्याच्या प्रधान सचिवांकडे संस्कृत अध्ययनाचा परिपूर्ण प्रस्ताव देण्याची सूचना संस्कृत भारतीला केली. लहान वयात संस्कृतचे संस्कार झाले तर उच्चारणासाठी फायदा होईल. पुढील वर्षी संस्कृत संभाषण वर्गात नक्की प्रवेश घेऊ, असेही त्यांनी आवर्जून सांगितले. रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीचे कार्याध्यक्ष अॅवड. विलास पाटणे यांनी सांगितले की, संस्थेच्या परदेशी भाषा केंद्रातही संस्कृतचे वर्ग सुरू करू. यातून संस्कृतप्रेमींची संख्या वाढेल. परदेशी भाषा शिकण्यासह संस्कृतचाही अभ्यास होईल.
कोकण प्रांत मंत्री चिन्मय आमशेकर यांनी प्रास्ताविक केले. संस्कार भारतीच्या कार्याचा आढावा संस्कृत विभागप्रमुख डॉ. कल्पना आठल्ये यांनी घेतला. वर्गाधिकारी श्री. शेवडे यावेळी उपस्थित होते.
रत्नागिरीत तीन प्रकारचे वर्ग घेण्यात आले. कोकण प्रांतातून १२५ हून अधिक शिबिरार्थींनी यात भाग घेतला. रुमानियाचा मोइझ आयोनट या तरुणासह सॉफ्टवेअर डेव्हलपर अर्जुन व्यास आणि ७५ वर्षीय निवृत्त शिक्षणाधिकारी डॉ. शिवणेकर यांचाही त्या समावेश होता. पूर्णपणे संस्कृत निवेदन आणि भाषणांनी वातावरण संस्कृतमय झाले. या कार्यक्रमाला सुजाण रत्नागिरीकरांची उपस्थिती लाभली.
...........


Thursday 5 May 2016

विवेकानंद केंद्रातर्फे रत्नागिरीत १३ मेपासून निवासी युवा सेवा शिबिर



                रत्नागिरी : कन्याकुारी येथील विवेकानंद केंद्रातर्फे १३ ते १५ या कालावधीत रत्नागिरीत निवासी युवा सेवा शिबिर होणार आहे. शिबिर गोगटे-जोगळेकर हाविद्यालयात होईल. १८ वर्षे वयोगटावरील विद्यार्थ्यांना प्रवेश िळेल. 
    शिबिरात १२ रोजी सायंकाळी ५ वाजता नावनोंदणी होईल. १३ ते १५ दरम्यान दररोज प्रातःस्रण, सूर्यनस्कार, योगासने, श्रदान, बौद्धिक व्याख्यान व ंथन, गटचर्चा, खेळ, सायंप्रार्थना, आनंदेळा असा दिनक्र असेल. १६ ला सकाळी ८ वाजता सांगता होईल.
      शिबिरासंदर्भात आयोजक उा जोशी यांनी सांगितले की,  विवेकानंद केंद्र ही एक सेवाभावी संस्था असून ुख्यतः शिक्षण, ग्राविकास, योग, हिला व बालविकास या क्षेत्रात का करते. तािळनाडू,  शान्य आणि पूर्व भारतात केंद्राच्या अनेक शाळा आहेत. युवकांध्ये देशाभिान व सााजिक जबाबदारी यांची जाणीव, जोपासना करण्यासाठी संस्थेचे का चालते. नुष्य निर्ाण व राष्ट्रपुनरुत्थान हे ब्रीदवाक्य असलेल्या या संस्थेचे हे राष्ट्रीय कार्य पुढे नेण्याचे का संस्था करत आहे. त्याचाच एक भाग म्हणून रत्नागिरीत युवा सेवा शिबिर आयोजित करण्यात आले आहे.
         शिबिरासाठी प्रवेशशुल्क २०० रुपये असून नावनोंदणीसाठी उा जोशी (९४२१२३३८६२) यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

बीएडच्या प्रवेशासाठी महर्षी कर्वे स्त्रीशिक्षण संस्थेचे आवाहन



रत्नागिरी : येत्या १२ जून रोजी शिक्षणशास्त्र पदवी (बीएड) अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी सामायिक प्रवेश चाचणीचे अर्ज भरण्याचा प्रारंभ ४ मे रोजी झाला आहे. इच्छुक विद्यार्थिनींनी शिरगाव (रत्नागिरी) येथील महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेच्या शिक्षणशास्त्र महिला महाविद्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन प्राचार्यांनी केले आहे.
                केवळ महिलांसाठी असलेल्या या महाविद्यालयाच्या आवारात विद्यार्थिनी वसतिगृहाची व्यवस्था आहे. शैक्षणिक शुल्कासाठी बँकेचे कर्ज मिळण्याची तसेच शैक्षणिक शुल्क हप्त्यानुसार भरण्याचीही सुविधा आहे. मागासवर्गीय विद्यार्थिनींना सरकारी नियमानुसार शिष्यवृत्ती मिळेल. या महाविद्यालयात शालेय व्यवस्थापन पदविकेचा अभ्यासक्रमही उपलब्ध आहे. इच्छुकांना (०२३५२) २३३४९९, २३२१५५, ९४२०२७४११९ या दूरध्वनीवर संपर्क साधल्यास अधिक माहिती मिळू शकेल.