Tuesday 29 September 2015

नाटे ग्रामस्थांनी सोडविला पिण्याच्या पाण्याचा प्रश्न



चाकरमान्यांचा पुढाकार – गणेशोत्सव सत्कारणी, जलवर्धिनीचे मार्गदर्शन


रत्नागिरी : नाटे (ता. राजापूर) येथील ग्रामस्थांनी श्रमदान आणि वर्गणीतून पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडविला आहे. मुंबईतील जलवर्धिनी प्रतिष्ठान संस्थेच्या मार्गदर्शनाखाली भराडीणवाडी (मधली वाडी) येथील ग्रामस्थांनी चाकरमान्यांच्या पुढाकारातून दहा हजार लिटर क्षमतेची फेरोसिमेंटची टाकी अवघ्या तीन दिवसांत बांधून पूर्ण केली. यावर्षीचा गणेशोत्सव चाकरमान्यांनी सत्कारणी लावला.
जलवर्धिनी प्रतिष्ठानचे विश्वस्त उल्हास परांजपे पाणी साठविण्याबाबत माहिती देतात. मुंबईतील वॉटर वर्क्स असोसिएशनचे ते सदस्य असून या संस्थेतही ते पावसाचे पाणी साठविण्याच्या विविध चर्चासत्रांमध्ये मार्गदर्शन करतात. अत्यंत कमी खर्चात स्थानिक वस्तूंचा वापर करून फेरोसिमेंटची मजबूत टाक्या कशा बांधता येतात, याची प्रात्यक्षिकेही त्यांनी दाखविली. संस्थेचे एक कर्मचारी महादेव घाडी यांनी ही प्रात्यक्षिके अनेकदा पाहिली आणि आपल्या गावातही पाणी साठविण्याचा हा प्रयोग करायचे ठरविले. ती कल्पना त्यांनी गावातील मधली वाडी नवतरुण मंडळासमोर ठेवली. मंडळातील तरुणांनी ती उचलून धरली. वाडीतील २३ घरांसाठी पाणी योजना तयार करण्याचे निश्चित करण्यात आले. मंडळाचे मुंबईतील कार्यकर्ते गिरीश शिंदे तसेच इतर चाकरमानी आणि ग्रामस्थांनी त्यासाठी पुढाकार घेतला. गेल्या सहा महिन्यांपासून वर्गणी गोळा करण्याचे काम सुरू होते. दरवर्षीप्रमाणे गणेशोत्सवाला गावाला गेल्यानंतर टाकी उभारण्याचे निश्चित करण्यात आले.
ठरल्यानुसार उत्सवाच्या काळातच ग्रामस्थांनी ठरविलेल्या जागी टाकी उभारायचे ठरविले. जलवर्धिनीचे विजय खरे यांच्या मार्गदर्शनाखाली पाया आणि टाकी बांधण्यात आली. दहा हजार लिटर पाण्याची क्षमता असलेली ही टाकी बांधायला सुमारे ३० हजार रुपये खर्च आला. फेरोसिमेंटने बांधलेली ही टाकी अवघ्या तीन दिवसांत उभी राहिली. वाडीतील २७ लोकांनी श्रमदानही केले. पाण्याचा पुरवठा करणाऱ्या विहिरीतून या टाकीमध्ये पाणी साठविले जाणार असून वाडीतील २३ घरांना पाण्याचा पुरवठा केला जाणार आहे. त्याकरिता विजेचा पंप तसेच जलवाहिन्या बसविण्याचे कामही वर्गणीतून केले जाणार असून ते मे महिन्यापर्यंत पूर्ण केले जाणार आहे. त्यानंतर योजना कार्यान्वित होईल.
ग्रामपंचायतीवर अवलंबून न राहता ग्रामस्थांनी स्वतः पुढाकार घेऊन पाणी योजना राबविण्याचे ठरविल्याबद्दल सरपंच संजय बांधकर यांनी ग्रामस्थ तसेच चाकरमान्यांची प्रशंसा केली आहे. तसेच टाकीच्या बांधकामासाठी आलेल्या खर्चाकरिता ग्रामपंचायतीकडून शक्य तेवढे अनुदान देण्याचा प्रयत्न केला जाईल, असे आश्वासनही त्यांनी दिले आहे.
............................................


बांधकाम कारागिरांना प्रशिक्षण


फेरोसिमेंटची टाकी मुख्यत्वे पावसाचे पाणी साठविण्यासाठी बांधली जाते. मात्र नाटे येथील मधली वाडी ग्रामस्थांनी नळपाणी योजनेसाठी ही टाकी बांधली आहे. त्यामागे केवळ टाकी बांधणे एवढाच उद्देश नव्हता. शहरांमध्ये पावसाचे पाणी साठविणे अनिवार्य करण्यात आले आहे. गावांमध्येही यापुढच्या काळात पर्जन्यजल साठवण गरजेची ठरणार आहे. त्याकरिता कमी खर्चाच्या फेरोसिमेंटच्या टाक्या बांधणे उपयुक्त ठरणार आहे. नाटे गावात घरांचे आणि अन्य बांधकाम करणाऱ्या कारागिरांना अशा टाक्या बांधण्याचे प्रशिक्षण मिळावे आणि त्यांनी गावात पावसाचे पाणी साठविण्यासाठी टाक्या बांधून द्याव्यात, अशी चाकरमान्यांची अपेक्षा होती. ती यशस्वी झाली. फेरोसिमेंट टाकीच्या बांधकामाचे प्रात्यक्षिक पाहिल्यानंतर गावातील अनेक कारागिरांनी मागणीनुसार तशा टाक्या बांधून देणार असल्याचे सांगितले.
.......................................................
(संपर्क – गिरीश शिंदे – ९१६७१६३७७०, महादेव घाडी – ९२२०९८२६७७)
..........................................................................................................................................


 
नाटे (राजापूर) – मधली वाडी येथे फेरोसिमेंटची टाकी बांधण्यासाठी तयार करण्यात आलेला तारांचा सांगाडा

तयार झालेली टाकी

Saturday 26 September 2015

परतीच्या कोकण रेल्वे प्रवासात चाकरमान्यांना फसवणुकीमुळे भुर्दंड



बनावट तिकीट देणाऱ्या मुंबईतील एजंटाची करामत चार महिन्यांनी उघड

प्रमोद कोनकर
pramodkonkar@gmail.com


रत्नागिरी : मोठ्या भक्तिभावाने गणेशोत्सव आटोपून कोकण रेल्वेने मुंबईला निघालेल्या काही चाकरमान्यांना एजंटांनी केलेल्या फसवणुकीचा फटका बसला. परतीच्या प्रवासात एजंटाने केलेल्या या फसवणुकीमुळे या प्रवाशांना मानहानी तर पत्करावी लागलीच, पण दंडासह तिकिटाच्या रकमेएवढ्या फरकाची रक्कम भरण्याचा भुर्दंडही सहन करावा लागला.
मंगळवारी (ता. २२) रात्री गोव्याहून मुंबईकडे निघालेली कोकणकन्या एक्स्प्रेस गाडी कणकवली स्थानकात पोहोचली. बी-४ या वातानुकूलित डब्यात विजय कुंटे आणि त्यांचे इतर पाच कुटुंबीय डब्यात चढले. कन्फर्म तिकीट आणि मनाजोगत्या जागा मिळाल्याने ते खुशीत होते. चार महिन्यांपूर्वी तिकिटासाठी केलेली धडपडीचे सार्थक झाल्याचे समाधान त्यांच्यासह कुटुंबीयांच्या चेहऱ्यावर होते. याच समाधानात त्यांनी ट्रेन तिकीट एक्झॅमिनर अर्थात कंडक्टरला आपले तिकीट दाखविले. तिकीट तपासल्यानंतर टीटीईने त्यांना दंडासकट साडेपाच हजार रुपये भरावे लागतील, असे सांगितले. त्यामुळे कुंटे कुटुंबीय संतापलेच. टीटीईविरुद्ध कम्प्लेन्ट करण्याची धमकीही त्यांनी दिली. मात्र टीटीई बधला नाही. कारण तसेच होते. प्रवाशांनी सादर केलेले ८१३६०६३१०१ या पीएनआर क्रमांकाचे तिकीट आणि टीटीईकडे असलेल्या चार्टवरचा तपशील जुळत नव्हता. तिकिटावर प्रवाशांच्या नावासमोर ५१, ५०, ५६, ३६ आणि ३५ असे वय नमूद करण्यात आले होते, तर टीटीईकडच्या चार्टवर हेच वय अनुक्रमे ११, १०, ५, ६ आणि ५ असे दिसत होते. साहजिकच हे सर्व प्रवासी लहान मुले असल्याचे टीटीईचे म्हणणे होते. तिकिटाची रक्कमही निम्मीच भरल्याचे दिसत होते. राहिलेली निम्मी रक्कम आणि दंडासह साडेपाच हजार रुपये भरायला टीटीईने सांगितले. त्यावरून डब्यात मोठाच गोंधळ झाला. दंड थोपटले गेले. मात्र टीटीई ठाम राहिल्याने प्रवाशांना दंड भरावाच लागला.
माहिती घेतल्यानंतर स्पष्ट झाले की, हे तिकीट श्री. कुंटे यांनी लालबाग (मुंबई) येथील एजंटाकडून चार महिन्यांपूर्वी खरेदी केले होते. एजंटाने आयआरसीटीसीमार्फत काढलेल्या या तिकिटाच्या प्रिंटमध्ये घोळ केला. प्रवाशांना दिलेल्या तिकिटावर योग्य तो तपशील लिहिला, मात्र आयआरसीटीसीवर नोंद करताना चुकीचा तपशील लिहिला. प्रत्येक प्रवाशाचे वय १२ वर्षांपेक्षा कमी लिहिले. परिणामी सर्वच प्रवासी मुले ठरली. तेवढीच अधिकृत नोंद अंतिम चार्टमध्ये झाली. प्रवाशामागे ३०० रुपये या दराने १८०० रुपये श्री. कुंटे यांनी आधीच एजंटाला दिले होते. त्याशिवाय कमी रकमेच्या तिकिटामुळे साडेपाच हजाराचा भुर्दंड रेल्वेला भरावा लागला. त्यामुळे ८३५ रुपयांचे प्रतिमाणशी असलेले तिकीट त्यांना दुपटीहून अधिक रकमेला पडले.

पाच दिवसांच्या गणपतीचे विसर्जन करून श्री. चंद्रकांत कोकणकन्या एक्स्प्रेसमध्ये कणकवली स्थानकावर चढले. बी-१ डब्यातल्या ५७ क्रमांकाच्या आपल्या आसनापर्यंत ते पोहोचले. बघतात तर तेथे एक प्रवासी आपलीच सीट असल्याच्या थाटात आधीच स्थानापन्न झाला होता. श्री. चंद्रकांत खवळलेच. त्यांनी त्या प्रवाशाशी हुज्जत घालायला सुरुवात केली. मग दोघांनीही आपापली तिकिटे एकमेकांना दाखवली आणि दोघेही चक्रावलेच. कारण दोघांच्याही तिकिटावर एकच आसन क्रमांक लिहिलेला होता.
अखेर दोघांनीही टीटीईकडे धाव घेतली. टीटीईने आपला चार्ट पाहिला आणि आधीच बसलेल्या प्रवाशाचे तिकीट अधिकृत असल्याचे सांगून त्याच्या बाजूने आपला कौल दिला. तिकिटावरचा आणि चार्टवरचा तपशील जुळत नव्हताच. त्यामुळे श्री. चंद्रकांत संतापले. ``एकाच सीटचे तिकीट दोघांना देऊन रेल्वेने एसटीसारखाच घोळ घातला आहे. ते काही मला माहीत नाही. मला माझी सीट द्याच``, असा आग्रह त्यांनी धरला. अखेर टीटीईने त्यांचे तिकीट तपासले. पीएनआर ८७३४९१९४९२ क्रमांकाच्या या तिकिटाची खातरजमा त्यांनी रेल्वेच्या १३९ या क्रमांकावर केली. तेव्हा उत्तर आले की या हे तिकीट दुसऱ्या दिवशी सुटणाऱ्या गाडीचे आहे! चंद्रकांत यांना एजंटाने दिलेले तिकीट बनावट होते. खऱ्या पीएनआरचे दुसऱ्या दिवशीच्या प्रवासाचे तिकीट दुसऱ्याच प्रवाशाला विकले गेले होते. श्री. चंद्रकांत यांना अखेर माघार घ्यावी लागली. गणेशोत्सव आटोपून पुन्हा मुंबईला जायचा प्रवास सुखाचा व्हावा, म्हणून तिकिटाच्या ८३५ रुपयांपेक्षा जादा ३०० रुपये देऊन त्यांनी चार महिन्यांपूर्वी हे तिकीट खरेदी केले होते. सुखाच्या प्रवासाचा त्यांच्या भ्रमाचा भोपळा फुटला. आपण एजंटाकडून फसवले गेलो आहोत, हे समजेपर्यंत रत्नागिरी स्थानक आले होते. एजंटाला भरलेले ते सर्व पैसे गेलेच, पण विनातिकीट प्रवासी समजून संपूर्ण तिकिटाचे पैसे आणि दंडाची रक्कम मिळून जादा १२०० रुपये त्यांना भरावे लागले.
कोकणकन्या एक्स्प्रेस या सर्वाधिक लोकप्रिय गाडीत एकाच दिवशी केवळ वातानुकूलित डब्यात अशा पद्धतीने सहा तिकीटधारक प्रवाशांची फसवणूक झाल्याचे निष्पन्न झाले. चाकरमान्यांच्या परतीसाठी कोकण रेल्वेमार्गावर आणखी सहा दिवस दररोज सुमारे ३० जादा गाड्या धावणार आहेत. त्या प्रत्येक गाडीतील  अनेक प्रवाशांची अशा तऱ्हेने फसवणूक झालेली असू शकेल.
.....

फसवणूक रेल्वेच्या पथ्यावर?
प्रवाशांची अनधिकृत एजंटांकडून झालेली ही फसवणूक एक प्रकारे रेल्वेच्या पथ्यावरच पडली आहे. एकदा गाडीत चढलेले प्रवासी गाडीतून उतरण्याच्या आणि गर्दीच्या गाडीतून पुन्हा प्रवासाचे दिव्य करण्याच्या मन:स्थितीत नसतात. ते प्रवासी दंड आणि फरकाची रक्कम भरून त्याच गाडीने प्रवास करण्याला पसंती देतात. झोपायला किंवा बसायला जागा नसली, तरी त्यांची हरकत नसते. अशा स्थितीत प्रवाशाला सीट न देताच दंड आणि तिकिटाची रक्कम रेल्वेला आपसूकच मिळत असते.


दोन्ही तिकिटांवर एकच मोबाइल
फसवणूक झाल्याचे उघड झालेल्या आणि एकमेकांना ओळखत नसलेल्या दोन वेगवेगळ्या प्रवाशांच्या तिकिटावर प्रवाशाचा मोबाइल क्रमांक या रकान्यात ८४५२९७७७७२ हाच क्रमांक आहे. या क्रमांकावर फोन लावल्यास तो उचलला जात नाही. तसेच परळ (पूर्व), मुंबई – १२ हा एकच पत्ता त्या दोन्ही तिकिटांवर आहे. हे सारेच संशयास्पद आहे.


प्रवाशांनी तिकिटाची खात्री करावी
रेल्वेने रीतसर परवाना देऊन अधिकृतपणे सिटी बुकिंगसाठी एजंट नेमले आहेत. त्यांच्याकडून अशी फसवणूक होण्याची शक्यता नाही. आयआरसीटीसीवरून सहज तिकिटे मिळत असल्याने अनधिकृत एजंट अशा तऱ्हेची फसवणूक करू शकतात. प्रवाशांनी तिकीट ताब्यात घेतल्यानंतर पीएनआरच्या मदतीने वेबसाइटवरून किंवा मोबाइलवरून एसएमएसवरून आपल्या तिकिटांची आणि इतर तपशिलाची खात्री करून घ्यावी. तसे केल्यासच अशा तऱ्हेची फसवणूक टळू शकेल. फसल्या गेलेल्या प्रवाशांनी रेल्वेशी संपर्क साधल्यास एजंटाचा तपास करून कारवाई करता येऊ शकेल. खासगी एजंटांकडून तिकीट खरेदी केलेल्या मुंबईकडे जाणाऱ्या सर्वच चाकरमान्यांनी आपल्या तिकिटाची खातरजमा करून घेणे आवश्यक आहे.
- बाळासाहेब निकम,
आरआरएम, कोकण रेल्वे,
रत्नागिरी स्थानक
.......................................................

 (प्रसिद्धी - सकाळ, तरुण भारत, लोकमत- रत्नागिरी आवृत्ती, ता. २५-९-२०१५)