Saturday 2 May 2015

होतकरू विद्यार्थ्यांच्या विकासासाठी `वसा वाचनाचा` अभियान



`नवजीवन`चा उपक्रम :  स्पर्धा, निबंध, कथा व लेख स्पर्धेतून बौद्धिक खुराक


रायपाटण (ता. राजापूर) - उन्हाळी सुट्टीत होतकरू विद्यार्थ्यांच्या विकासासाठी `वसा वाचनाचा` अभियान येथील नवजीवन विकास सेवा संस्था राबविणार आहे. वाचनातून स्पर्धा, निबंध, कथा आणि लेख स्पर्धेतून विद्यार्थ्यांना बौद्धिक खुराक देणे हे या अभियानाचे उद्दिष्ट आहे.
      परीक्षा संपल्यानंतर सुरू झालेल्या उन्हाळी सुटीत मुलांच्या ऊर्जेला वाट करून कशी द्यायची, असा प्रश्न शिक्षक आणि पालकांनाही पडतो. त्याचा एक प्रयत्न म्हणून रायपाटण येथील शिक्षण व शेती क्षेत्रात कार्यरत असलेल्या नवजीवन विकास सेवा संस्थेने वसा वाचनाचा अभियान गेल्या वर्षी सुरू केले. यावर्षीही ते राबविण्यात येणार आहे. रायपाटण येथील जिजामाता विद्यालयातील एका विद्यार्थिनीने संस्थेच्या उपक्रमात भाग घेतल्यानंतर राज्यस्तरावरील तेरा हजार विद्यार्थ्यांमधून लेखन स्पर्धेत राज्यस्तरावर प्रथम क्रमांक मिळाला. त्यातून या उपक्रमाचा प्रारंभ झाल्याची माहिती संस्थेचे अध्यक्ष महेश पळसुले-देसाई यांनी दिली. वयम आणि साधना या दोन वाचनीय बालविशेषकांचे मोफत वितरण करून त्याआधारे विविध स्पर्धांचे आयोजन असे या "वसा वाचनाचा" उपक्रमाचे स्वरूप आहे. "वयम"मधील व आणि "साधना"मधील "स" या आद्याक्षरांचा वापर करून "वसा वाचनाचा" उपक्रम राबविण्यात येत आहे. तो चौथी ते बारावीच्या वयोगटातील कल्पक, चौकस, हुशार आणि होतकरू मुलांसाठी आहे. वक्तृत्व, कथाकथन, निबंध, अभिनय, वादविवाद अशा स्पर्धांसह विविध प्रकाचे सुयश मिळविसेस्आ किशोरवयीन मुलांना या उपक्रमात सहभाग राहील. अशा विद्यार्थ्यांची नावे पालकांनी, वर्गशिक्षकानी किंवा मुखाध्यापकांनी नवजीवन संस्थेला कळविल्यानंतर विद्यार्थ्यांना 'वयम' आणि 'साधना' अंक टपालाने मोफत पाठविला जाणार असून स्पर्धेचे स्वरूप कळविले जाईल. विजेत्यांना पुस्तके, सीडी, डीव्हीडी अशा स्वरूपात पारितोषिके दिली जाणार असून पारितोषिक वितरण समारंभ ऑगस्टमध्ये होईल. एखाद्या शाळेला, संस्थेला किंवा पालकांच्या गटाला वसा वाचनाचा उपक्रमात शिबिराचे आयोजन करायचे असेल तर तशी सशुल्क व्यवस्थाही रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांत केली जाणार आहे.
अधिक माहितीसाठी संस्थेचे अध्यक्ष महेश पळसुलेदेसाई (९४००५५६८,   ९४२२७३, ९६८९७७६८२) यांच्याशी संपर्क साधता येईल. तसेच nvssindia.com या संकेतस्थळावर माहिती मिळू शकेल. इच्छुकांनी navjeevan@gmail.com या ईमेलवर संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

नवजीवन विकास संस्थेच्या वसा वाचनाचा उपक्रमातील शिबिराचे संग्रहित छायाचित्र

Saturday 25 April 2015

पुरुषोत्तमशास्त्री फडके अनंतात विलीन



रत्नागिरीतील संस्कृतचे गाढे अभ्यासक पुरुषोत्तम नारायण तथा अप्पाशास्त्री फडके शनिवारी (ता. 25 एप्रिल) अनंतात विलीन झाले. मिरकरवाडा येथील स्मशानभूमीत त्यांच्यावर झालेल्या अंत्यसंस्कारांच्या वेळी त्यांचे नातलग, शेकडो चाहते आणि विद्यार्थी उपस्थित होते.
शतायुषी फडकेशास्त्रींचे शुक्रवारी (ता. 24) रात्री साडेआठ वाजता रत्नागिरीत जोशी पाळंद येथील त्यांच्या निवासस्थानी निधन झाले. निधनाची माहिती अल्पावधीत सर्वत्र पसरली आणि त्यांचे चाहते त्यांच्या घरी जमा झाले. पुणे आणि दापोलीतून पुत्र, तसेच पुण्यातून कन्या रत्नागिरीकडे रवाना झाल्या. शनिवारी सकाळी अंत्यविधी सुरू झाले. अकरा वाजण्याच्या सुमारास अंत्ययात्रा निघाली. विविध व्यवसायांमध्ये स्थिरावलेले तसेच विद्यार्थिदशेत असलेले त्यांचे विद्यार्थी, नातलग आणि सुहृदांचा अंत्ययात्रेत सहभाग होता. सुमारे तीस वर्षे फडकेशास्त्रींनी ज्या फाटक प्रशालेत अध्यापन केले, तेथे त्यांच्या मृतदेहाला पुष्पचक्र वाहून श्रद्धांजली वाहण्यात आली. संस्कृत पाठशाळा आणि रत्नागिरीचे ग्रामदैवत भैरीमंदिराजवळही त्यांना फुले वाहून मानवंदना देण्यात आली.
अंत्ययात्रा स्मशानभूमीत पोहोचल्यानंतर प्रसिद्ध लेखिका आणि शास्त्रींच्या कन्या सौ. आशा गुर्जर यांनी वडिलांविषयीच्या भावना व्यक्त केल्या. वडिलांचे व्रतस्थ जीवन, विद्यार्थ्यांना दिलेली शिकवण, दान आणि त्यांच्या कार्याला कन्येने उजाळा दिला. आपला सुहृद निवर्तल्यानंतर काही तरी सोडून देण्याची पद्धत असते. फडकेशास्त्री गेल्यानंतर काही सोडण्याऐवजी त्यांच्या अनेक सद्गुणांपैकी एक तरी गुण अंगीकारावा, अशी अपेक्षा त्यांनी यावेळी व्यक्त केली. त्यांच्याविषयीच्या आठवणी संकलित करण्यासाठी सर्वांनी सहकार्य करावे, असे आवाहनही त्यांनी केले. त्यानंतर ज्येष्ठ पुत्र नीलकंठ यांनी अंत्यसंस्कार केले.
यावेळी पुत्र डॉ. अनिरुद्ध फडके, जामात लेखक रवींद्र गुर्जर, अन्य दोन कन्याही उपस्थित होत्या.

शतायुषी पुरुषोत्तमशास्त्री फडके यांचे निधन





पुरुषोत्तमशास्त्रींनी शंभराव्या वर्षात पदार्पण केले,
त्या दिवशीच्या समारंभातील छायाचित्र

रत्नागिरीतील संस्कृतचे गाढे अभ्यासक पुरुषोत्तम नारायण फडके ऊर्फ फडकेशास्त्री यांचे शुक्रवारी (ता. २४) रात्री निधन झाले. तारखेने येत्या मे रोजी, तर तिथीने येत्या ४ मे रोजी बुद्धपौर्णिमेला ते वयाची शंभरी पूर्ण करणार होते.
कुर्धे (ता. रत्नागिरी) हे पुरुषोत्तमशास्त्री फडके यांचे मूळ गाव. व्याकरणवाचस्पती दिगंबरशास्त्री जोशी काशीकर गुरुजी यांच्याकडे त्यांचे अध्ययन झाले. १९३२ ते १९४४ या एका तपात त्यांनी अत्यंत कठीण अशा परीक्षा उत्तीर्ण करून पुण्याच्या वेदशास्त्रोत्तेजक सभेची व्याकरणचूडामणी आणि काशीच्या संस्कृत विद्यापीठाची व्याकरणाचार्य अशा दोन पदव्या मिळविल्या. त्याशिवाय बडोदे आणि म्हैसूर संस्थानच्या व्याकरण परीक्षेत त्यांनी उच्च श्रेणी मिळविली. रत्नागिरीच्या फाटक प्रशालेत १९४२ पासून त्यांनी शिक्षकीपेशा स्वीकारला. तेथे संस्कृत आणि प्राकृत (अर्धमागधी) या भाषांचे अध्ययन त्यांनी केले. तसेच १९४७ पासून संस्कृत पाठशाळेत प्रधानाध्यापकपदही त्यांनी भूषविले. या दोन्ही सेवांमधून ते १९७३ साली निवृत्त झाले. निवृत्तीनंतर आचरणास अत्यंत कठीण असे गायत्रीपुरश्चरण त्यांनी केले. त्यानंतर त्यांनी आजीवन अपरिग्रह व्रत स्वीकारले. या काळात संस्कृतच्या हजारो विद्यार्थ्यांना त्यांनी अखंड विद्यादान केले.
भगवद्गीता, उपनिषदे, वैदिक वाङ्मय, महाभारत, रामायण, भारतीय संस्कृती अशा अनेक विषयांवर त्यांनी दहा हजारांहून अधिक व्याख्याने दिली. सुबोध उपनिषत्सार आणि सुबोध योगवासिष्ठसार या प्रमुख ग्रंथांसह विविध विषयांवर सहा पुस्तके त्यांनी लिहिली.
रत्नागिरीसह जिल्ह्यातील अनेक ठिकाणी विविध विधियुक्त स्वाहाकार, वेदांचे घनपाठ, वेगवेगळे याग आणि होम त्यांनी स्वतः पुढाकार घेऊन घडवून आणले. शिक्षक कल्याण निधी, रत्नागिरी जिल्हा माध्यमिक शिक्षक पतपेढी, रत्नागिरी संचय सहकारी सोसायटी अशा संस्था स्थापन करून त्यांनी स्थैर्य प्राप्त करून दिले.
त्यांच्या निष्काम सेवेला मानवंदना म्हणून अनेक संस्थांनी त्यांना पुरस्कारांनी विभूषित केले. मात्र उत्तरायुष्यातील अपरिग्रह व्रताच्या काळात त्यांनी कोणताही आर्थिक लाभ तसेच पुरस्कारही स्वीकारला नाही.
त्यांचे दोन्ही पुत्र उच्चविद्याविभूषित आहेत. लेखिका आशा गुर्जर ही त्यांची कन्या, तर लेखक रवींद्र गुर्जर हे त्यांचे जामात होत.


सात्त्विकता आणि सज्जनता यांचे खरेखुरे दर्शन घ्यायचे असेल, तर अप्पांच्या (फडकेशास्त्रींच्या) सहवासात यायला हवे, असे गौरवोद्गार पांडुरंगशास्त्री आठवले यांनी काढले होते.


पुण्याच्या देवदेवेश्वर संस्थानाने पुरुषोत्तमशास्त्री फडके यांना दिलेले मानपत्र