Saturday 5 October 2019

निर्मितीच्या ठिकाणीच कचऱ्याचे निर्मूलन हवे

महात्मा गांधींची दीडशेवी जयंती वेगळ्या पद्धतीने साजरी करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्लास्टिकमुक्त भारताची घोषणा केली. त्यासाठी अभियान मोठ्या प्रमाणावर देशभर राबविण्याचे ठरविण्यात आले आहे. रेल्वेसारखे सार्वजनिक उपक्रम आणि शासकीय कार्यालये कचरामुक्तीचे अभियान राबवत आहेत. पण मुळातच कचऱ्यासारख्या मूलभूत गोष्टीकडे पंतप्रधानांनी लक्ष द्यावे, त्यांनी आपला अधिकाधिक वेळ जनतेने स्वच्छता राखावी, असे सांगण्यासाठी घालवावा, त्यांचे अनुकरण म्हणून आणि शासकीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी नाइलाज म्हणून त्याची री ओढावी, हेच मुळात योग्य नाही. पंतप्रधानांपासून साध्या कर्मचाऱ्यांपर्यंत साऱ्यांचाच वेळ स्वच्छतेसारख्या तशा सामान्य वाटणाऱ्या गोष्टीसाठी खर्च व्हावा, त्या साऱ्यांनी त्यांना त्यांना नेमून दिलेली कामे पार पाडण्याच्या ऐवजी स्वच्छतेसाठी लक्ष द्यावे लागावे, हा तर सार्वजनिक श्रमशक्तीचा अपव्यय आहे. प्रत्येक व्यक्ती कचरा तयार करत असते. त्या प्रत्येक व्यक्तीने त्याच कचऱ्याचे स्वतः निर्मूलन केले, योग्य पद्धतीने त्याची विल्हेवाट लावली, तर सार्वजनिक स्वच्छतेचा प्रश्नच निर्माण होणार नाही. त्यासाठी शासनाच्या वेळेचा आणि खर्चाचा अपव्यय होणार नाही.
हे टाळण्यासाठी कचऱ्याची जेथे निर्मिती होते, त्याच ठिकाणी त्याची विल्हेवाट लावण्याची किंवा निर्मूलन करण्याची व्यवस्था सक्तीने तयार करण्यात आली पाहिजे. प्लास्टिकमुक्त भारताची संकल्पना सर्वसामान्यांनी राबवावी, असा आग्रह धरताना मुळातच प्लास्टिकची निर्मितीच थांबविली गेली आणि अर्थातच प्लास्टिकला योग्य तो पर्याय उपलब्ध करून दिला, तर कोणी प्लास्टिक वापरण्याचा प्रश्नच येणार नाही. त्यामुळे साहजिकच कचरा टाकलाही जाणार नाही, निर्मूलनाची समस्या राहणार नाही. पण प्लास्टिकशिवाय इतर अनेक गोष्टींचा कचरा होतो. तोसुद्धा प्रश्न आहे. एखाद्या साध्या नियमातून तो सोडविता येऊ शकतो. रेल्वेने कचऱ्याच्या निर्मूलनाचे अभियान राबविले आहे. रेल्वेगाड्यांमध्ये सर्वाधिक कचरा अर्थातच प्रवाशांकडून होतो. प्रवाशांना चहा आणि खाद्यपदार्थांचे वाटप विक्रेत्यांकडून होते. त्यासाठी वापरल्या जाणाऱ्या कागदी डिशेस, कप वापरानंतर प्रवासी डब्यात किंवा गाडीच्या बाहेर फेकून देतात. कचऱ्यासाठी प्रत्येक डब्यात कचराकुंड्यांची व्यवस्था केली असली तरी तेथे जाऊन कचरा टाकण्याची तसदी कोणी प्रवासी घेत नाही. चहा किंवा खाद्यपदार्थ जसे प्रत्येक प्रवाशाला त्याच्या आसनावरच उपलब्ध होतात, त्याच पद्धतीने त्यांनी तयार केलेला कचरा विक्रेत्यांनीच पुन्हा स्वीकारला पाहिजे आणि तो योग्य त्या ठिकाणी टाकला पाहिजे. तशी सक्तीच करावी लागेल. औषधाच्या दुकानांमध्येही जुनी आणि वापरली गेलेली औषधे, रिकाम्या झालेल्या बाटल्या पुन्हा स्वीकारण्याची व्यवस्था झाली पाहिजे. प्रत्येक हॉटेल, किराणा मालाची दुकाने, विजेच्या वस्तू, संगणक विक्री आणि अगदी रस्त्यावरच्या विक्रेत्यांसह साऱ्यांनीच त्यांनी विकलेल्या वस्तूंचा ग्राहकांकडून झालेला कचरा पुन्हा स्वीकारला पाहिजे आणि तो रिसायकलिंगसाठी योग्य त्या ठिकाणी पाठवला पाहिजे. तशीही व्यवस्था केली गेली पाहिजे. प्लास्टिकबंदीच्या कचरा निर्मूलनाच्या घोषणा करून काही होणार नाही. प्रत्येक व्यक्ती विविध प्रकारच्या वस्तूंची ग्राहक असते. त्यामुळे त्या प्रत्येक ग्राहकाकडून त्या त्या वस्तूचा कचरा होणार हे नक्की. या वस्तू विकण्याची व्यवस्था जेथे होते, त्याच ठिकाणी कचरा संकलित करण्याची व्यवस्था झाली पाहिजे. तसे झाले तर पंतप्रधानांसारख्या व्यक्तीपासून कोणालाही स्वच्छतेसाठी आपला वेळ आणि पैसा वाया घालवण्याची वेळ येणार नाही. त्यांना इतर अनेक मूलभूत प्रश्नांकडे लक्ष द्यायला वेळ मिळेल. उद्गम करकपातीप्रमाणेच उद्गम कचरा निर्मूलनाची योजना सक्तीने राबविली गेली पाहिजे. तरच कचरा निर्मूलनाच्या प्रश्नाचे निर्मूलन होऊ शकेल.
- प्रमोद कोनकर
(संपादकीय, साप्ताहिक कोकण मीडिया, रत्नागिरी. ४ ऑक्टोबर २०१९)


Saturday 28 September 2019

सारे काही तेच ते आणि तेच ते!

चारच महिन्यांपूर्वी लोकसभेची निवडणूक झाली. राज्य विधानसभेची निवडणूक आता जाहीर झाली आहे. पुढच्या पाच वर्षांसाठी विधानसभेतील प्रतिनिधी या निवडणुकीतून निवडले जाणार आहेत. आपल्यालाच लोकांनी निवडून द्यावे, यासाठी उमेदवार तर केव्हापासूनच सज्ज आहेत. विधानसभेत जाण्यासाठी आपणच कसे योग्य उमेदवार आहोत, याची खात्री पटविण्यासाठी प्रत्येक उमेदवार जंग जंग पछाडतो आहे. सत्तारूढ पक्षाचे प्रतिनिधित्व करणारे उमेदवार गेल्या पाच वर्षांमध्ये आपण केलेल्या कामांचा लेखाजोखा मांडत आहेत, तर विरोधातील उमेदवार आणि त्यांचे पक्ष गेल्या पाच वर्षांत कोणताच विकास कसा झाला नाही, हे सरकार कसे अयोग्य आहे, या सरकारने राज्याला किती मागे नेऊन ठेवले आहे, आम्ही सत्तेवर आलो, तर काय काय चांगले करणार आहोत, हे ओरडून ओरडून सांगत आहेत. अशा परस्परविरोधी प्रचारामुळे नेमके कोणाला निवडून द्यावे, याबाबत नेहमीप्रमाणेच मतदारांमध्ये संभमम आहे.
असा संभ्रम असताना कवी विंदा करंदीकर यांची कविता आठवते, ``तेच ते आणि तेच ते! सकाळपासून रात्रीपर्यंत तेच ते!! तेच ते!!`` रोजच्या जगण्यातील तोचतोपणा त्यांनी नेमकेपणाने कवितेत सांगितला आहे. त्यातील काही ओळी तर लोकशाहीचा उत्सव म्हटल्या जाणाऱ्या निवडणुकीच्या काळात चपखल बसतात.
``संसाराच्या वडावर स्वप्नांची वटवाघुळे,
त्या स्वप्नाचे शिल्पकार, कवी थोडे कवडे मार.
पडद्यावरच्या भूतचेष्टा; शिळा शोक, बुळा बोध.
नऊ धागे एक रंग, व्यभिचाराचे सारे ढंग.
पुन्हा पुन्हा तेच भोग. आसक्तीचा तोच रोग.
तेच मंदिर तीच मूर्ती. तीच मुले तीच स्मूर्ती.
तेच ओठ तेच डोळे, तेच मुरके तेच चाळे.....
कारण जीवनही तेच ते, आणि मरणही तेच ते!!``
पाच वर्षांनी येणाऱ्या निवडणुकांमधील प्रचार, आरोप-प्रत्यारोप, पक्षांतर, पक्षांतराला दिलेले तत्त्वनिष्ठेचे स्वरूप, परस्पर विरोधी उमेदवारांकडून परस्परविरोधातील मांडले जाणारे मुद्दे पाहिले की, `तेच ते` कवितेची समर्पकता लक्षात येते. निवडणुकीत उभे राहणारे उमेदवार आणि त्यांचे पक्ष म्हणजे स्वप्नाचे शिल्पकार असतात. ते विकासाचे जे काही चित्र उभे करतात, त्यामुळे मतदार हरखून जातात; पण थोड्याच काळात लक्षात येते की, पडद्यावरच्या त्या आभासी भूतचेष्टा होत्या. वेगवेगळे उमेदवार आपल्या सोयीचे पक्ष निवडतात. त्या पक्षाच्या झेंड्याच्या रंगात न्हाऊन जातात. तो रंग काही रंगपंचमीतल्यासारखा धुऊन न जाणारा रंग नसतो. रातोरात किंवा अगदी दिवसभरातसुद्धा वरवरचा हा रंग धुतला जाऊ शकतो. लगेच दुसरा रंग फासता येतो. त्या रंगामागचा चेहरा तोच असतो. रंगले गेलेले हे उमेदवार मूर्तिपूजकही असतात. नव्या मंदिरात गेले, तरी आधीच्या मंदिरातील मूर्तीशी ते एकनिष्ठ असतात. ती एकनिष्ठा ते वारंवार जाहीरपणे सांगत असतात. त्यांचे भक्त नव्या मूर्तिपूजकाच्या भक्तिरसाने भिजून जातात. कारण त्यांना माहीत असते, ``जीवनही तेच ते, आणि मरणही तेच ते!!`` हे भक्त म्हणजे सर्वसामान्य मतदार असतात.
मुळातच लोकशाहीची प्रक्रिया सामान्य जनतेला कधी खऱ्या अर्थाने कळली नाही. आपण ज्यांना निवडून देतो, ते विकासाची कामे करण्यासाठी निवडले गेलेले असतात, याची जाणच मतदारांना नसते. ती होऊ नये, यासाठीच जणू लोकशाहीची प्रक्रिया सामान्यांना कळू दिली गेली नाही, असे म्हणण्यासारखी परिस्थिती आहे. असे असले, तरी मतदानावर बहिष्कार टाकणे हा मात्र त्यावरचा  उपाय नक्कीच नाही. मतदान करणे एवढेच आपल्या हातात आहे. तेवढे करायला मात्र हवे. कारण ते  आपले कर्तव्य आहे. सर्वसामान्यांनी आपले कर्तव्य विसरायचे नसते!

- प्रमोद कोनकर
(संपादकीय, साप्ताहिक कोकण मीडिया, रत्नागिरी. २७ सप्टेंबर २०१९)

Saturday 21 September 2019

नाणार, नारायण आणि युतीचीच चर्चा

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कोकणात महाजनादेश यात्रेद्वारे दौरा केल्यानंतर नारायण राणे आणि नाणारचा रिफायनरी प्रकल्प आणि त्याच मुद्द्यांच्या आधारे आगामी निवडणुकीत युती होणार का, याचीच चर्चा सुरू झाली आहे. सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्यात मुख्यमंत्र्यांचे उत्साहात स्वागत झाले. सिंधुदुर्गातील सभेपूर्वी महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे अध्यक्ष आणि भाजपच्या पाठिंब्यावर राज्यसभेचे सदस्य झालेले खासदार नारायण राणे आणि त्यांच्या दोन पुत्रांनी त्यांचे स्वागत केले. राणे यांच्या भाजप प्रवेशावर गेल्या काही दिवसांपासून चर्चा सुरू होती. मुख्यमंत्र्यांची कणकवलीची सभा संपून ते कणकवलीतून रत्नागिरीकडे रवाना झाल्यानंतर पत्रकारांनी नारायण राणे यांना त्यांच्या भूमिकेविषयी विचारले. मुख्यमंत्र्यांनी शब्द दिला असल्यामुळे आपला भाजप प्रवेश नक्की आहे, असा विश्वानस राणेंनी व्यक्त केला. कणकवलीतून निघालेल्या मुख्यमंत्र्यांचे स्वागत रत्नागिरी जिल्ह्यात राजापूर येथे मोठ्या उत्साहात झाले. राजापूर तालुक्यातील नाणार रिफायनरी प्रकल्पाबाबत फेरविचार करण्याची ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तेथे दिली. राजापूर येथे नाणार रिफायनरी प्रकल्प व्हावा, यासाठी प्रयत्न करणाऱ्या कोकण जनकल्याण प्रतिष्ठानच्या नेतृत्वाखाली नाणारवासीयांनी रिफायनरी समर्थनाचे फलक घेऊन मुख्यमंत्र्यांचे स्वागत केले. त्याची दखल मुख्यमंत्र्यांनी घेतली. विरोध झाल्याने प्रकल्प थांबविण्याचा निर्णय घेतला होता. मात्र  प्रकल्पाला असलेले समर्थन लक्षात घेऊन रिफायनरी प्रकल्पाबाबत फेरविचार केला जाईल, असे त्यांनी तेथे सांगितले. रत्नागिरीतील भाषणातही त्यांनी नाणारच्या पुनरुज्जीवनाचा पुनरुच्चार केला. रिफायनरीमुळे दोन लाख लोकांना रोजगार मिळणार आहे. त्यामुळे त्याचा विचार केला जाईल, असे त्यांनी सांगितले.
राणेंनी कणकवलीत मुख्यमंत्र्यांचे केलेले स्वागत आणि नाणारबाबतचे मुख्यमंत्र्यांचे वक्तव्य हे महाजनादेश यात्रेतील दोन मुद्दे युतीबाबत प्रश्नचिन्ह निर्माण करणारे आहेत. नारायण राणे यांना भाजपने प्रवेश दिला, तर भाजपशी युती करणार नसल्याचे काही महिन्यांपूर्वी शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी जाहीर केले होते. त्यामुळे राणे यांनी स्वतःचा महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष काढला. स्वतःचा पक्ष असूनही ते भाजपचे उमेदवार म्हणून राज्यसभेचे खासदार झाले. त्यामुळे ते पुढे-मागे भाजपमध्ये जाणार असल्याची अटकळ होतीच. मात्र शिवसेनेच्या धोरणामुळे हा प्रवेश लांबणीवर पडत होता, असे सांगितले जात होते. आता राणे यांनीच आपला भाजपप्रवेश नक्की असल्याचे सांगितले आहे. नाणार येथील रिफायनरीचा विषयही तसाच आहे. रिफायनरीला शिवसेनेने कडाडून विरोध केला. आंदोलने केली. परिणामी प्रकल्प रद्द करण्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी लोकसभा निवडणुकीच्या आधी काही काळ केली. त्यानंतर युती जाहीर झाली. आता पुन्हा एकदा नाणारचा विषय पुढे आला आहे. मात्र अलीकडे शिवसेनेचे धोरण मवाळ झाले आहे का, याबाबतही चर्चा आहे. अन्य पक्षांमधील अनेक नेते भाजपमध्ये दाखल झाले. त्याबाबत उद्धव ठाकरे यांना छेडले असता ते म्हणाले होते की, युती असली, तरी पक्षात कोणाला प्रवेश द्यायचा हा त्या पक्षाचा निर्णय आहे. अलीकडेच कोकण दौरा करून गेलेले शिवसेनेचे युवा नेते आदित्य ठाकरे यांना ठाण्यात नाणारबाबत मुख्यमंत्र्यांच्या वक्तव्याबाबत विचारले असता ते म्हणाले की, लोकांचा प्रकल्पाला विरोध नसेल तर आमचाही विरोध नाही. शिवसेना कोठेही विकासाच्या आड नाही.
मुख्यमंत्र्यांच्या महाजनादेश यात्रेनंतर त्यांनी उभ्या केलेल्या विकासाच्या चित्राविषयी चर्चा होण्यापेक्षाही नाणारविषयीचे त्यांचे वक्तव्य आणि राणेंची भूमिका, त्यावरून युती होईल की तुटेल, याविषयीचीच चर्चा अधिक आहे. जणू काही कोकणाचा विकास युतीवरच अवलंबून आहे!
- प्रमोद कोनकर
- (संपादकीय, साप्ताहिक कोकण मीडिया, रत्नागिरी. २० सप्टेंबर २०१९)



Saturday 14 September 2019

मूर्तीबरोबरच भावभक्तीही समुद्रात अर्पण

कोकणवासीयांचा लाडका गणेशोत्सव आता संपला आहे. तो अनेक आठवणी मागे ठेवून गेला आहे. समुद्रावर आणि वाहत्या नद्यांच्या काठावर एखादा फेरफटका मारला, तर या आठवणी मूर्त रूपात दिसू शकतील. मूर्ती आणि उत्सवाच्या आठवणी आहेतच, पण उत्सव संपला तरी ज्याचा उत्सव केला, त्या गणपतीच्या भग्नावस्थेतील मूर्ती आणि त्याला भावभक्तीने म्हणून जे काही अर्पण केले, ते सारे निर्माल्य समुद्राने आणि नद्यांनी आपापल्या काठावर आणून पुन्हा सोडले आहे. मोठ्या भावभक्तीने साजरा झालेला उत्सव या अशा आठवणी मागे ठेवून जात असेल, तर त्याला उत्सवाला भावभक्तीचा उत्सव म्हणावे का असाच प्रश्न पडतो. मुळातच अशा तऱ्हेचा उत्सव का साजरा केला जातो, हेच कळत नाही.
आपण ज्याची पूजा केली ती मूर्ती आणि त्याला जे काही मनोभावे अर्पण केले, त्याचे तयार झालेले निर्माल्य विसर्जनानंतर विकृत रूपात पुन्हा किनाऱ्यावर येणार असेल आणि नाइलाजाने पायदळी तुडवले जात असेल, तर त्या भक्तीला काहीच अर्थ उरत नाही. रत्नागिरीत भारतीय पर्यावरणशास्त्र आणि तंत्रज्ञान संस्थेतर्फे निर्माल्याच्या संकलनाची व्यवस्था गेली काही वर्षे केली जात आहे. इतरही अनेक सामाजिक संस्था त्यासाठी आता पुढे येत आहेत. या निर्माल्यापासून खताची निर्मिती केली जाते. दरवर्षी असे निर्माल्य संकलित केल्याचे दिसत असूनही निर्माल्य टाकणाऱ्यांची  संख्या काही कमी झालेली नाही. त्यामुळे निर्माल्याच्या संकलनाची संकल्पना लोकांना समजलीच नाही, असा अर्थ निघतो. जिद्दी माउंटेनिअर्स संस्थेने गेली काही वर्षे आणखी एक वेगळा उपक्रम सुरू केला आहे. समुद्रामध्ये अर्पण केल्यानंतर दुसऱ्या दिवशी किनाऱ्यावर पुन्हा आलेल्या आलेल्या मूर्तींचे पुन्हा विसर्जन करणे असा तो उपक्रम आहे. मातीच्या मूर्तींचे पाण्यात विघटन होते. मात्र सजावटीला उपयुक्त म्हणजेच दिखाऊ आणि वजनाने हलकी प्लास्टर ऑफ पॅरिसची मूर्ती आणण्याकडेच लोकांचा कल असतो. अशी मूर्ती पर्यावरणाचे प्रदूषण मोठ्या प्रमाणावर करते, असे विविध माध्यमांमधून सातत्याने सांगितले गेले, तरी त्याकडे मूर्तिकार आणि मूर्ती खरेदी करणाऱ्या भक्तांचेही सोयीस्कर दुर्लक्ष होते. त्यामुळे विसर्जनाच्या दुसऱ्या दिवशी या मूर्ती भग्नावस्थेत पुन्हा किनार्यारवर येतात. प्लास्टिक आणि थर्माकोलला शासकीय बंदी असली, तरी सजावटीसाठी याच साहित्याचा वापर मोठ्या प्रमाणावर अजूनही केला जातो आणि गणेशमूर्तींसोबतच विघटन न होणाऱ्या कचऱ्यात रूपांतर झालेले हे सजावटीचे साहित्य समुद्रात किंवा पाणवठ्यावर विसर्जित केले जाते. अशा तऱ्हेने सर्वसामान्य लोकांनी स्वच्छता आणि पर्यावरणाविषयीच्या नीतिनियमांकडे दुर्लक्ष केल्यामुळे आणि पर्यायाने मूर्ती आणि निर्माल्यासोबतच तथाकथित भावभक्तीही समुद्राला अर्पण केल्यामुळे निर्माण झालेली समस्या सोडविण्यासाठी स्वयंसेवी संस्थेला काम करावे लागते, हाच मुळी नामुष्कीचा विषय आहे. गणेशोत्सवात कथा, प्रथा आणि परंपरांमधून गणेशाचे माहात्म्य सांगितले जाते. त्याच गणपतीच्या मूर्तीची आणि निर्माल्याची अवहेलना गणपतीच्या भक्तांकडून सहन केली जाते, याचे आश्चार्य वाटते. म्हणूनच मूर्ती आणि निर्माल्यासोबतच हे भक्त भावभक्तीचेही विसर्जन करतात, असे म्हणण्याची वेळ येते. ती अर्पण केल्यानंतर काहीच शिल्लक राहत नाही. उत्सव साजरा करून पुण्य मिळते, असे वाटत असेल, तर त्यापेक्षा कितीतरी पटींनी अधिक पाप भक्तांच्या खात्यावर जमा होत असते आणि पर्यावरण प्रदूषणाच्या रूपाने ते आपल्या आणि पुढच्या पिढ्यांनाही भोगावे लागते. सामाजिक सुधारणांची शिकवण देणाऱ्या गणेशोत्सवाने तशी मानसिकता तयार व्हायला हवी.
- प्रमोद कोनकर
- (संपादकीय, साप्ताहिक कोकण मीडिया, रत्नागिरी. १३ सप्टेंबर २०१९)


Saturday 7 September 2019

प्लास्टिकच्या विसर्जनाचे काय झाले?

कोकणातील सर्वांत महत्त्वाचा गणेशोत्सव थाटात सुरू झाला आहे. पारंपरिकतेला आधुनिकतेची जोड देऊन उत्सव उत्साहात सुरू आहे. सार्वजनिक उत्सवांबरोबरच घरगुती उत्सवातही सजावटीकडे लक्ष दिले जाऊ लागले आहे. ते लक्षात घेऊन सजावट स्पर्धाही ठिकठिकाणी भरविल्या जात आहेत. त्यांनाही चांगला प्रतिसाद मिळत आहे. ही सजावट करताना मात्र पारंपरिकतेला छेद देऊन आधुनिकतेची कास धरल्याचे दिसते. त्यामध्ये पूर्ण बंदी घातलेल्या प्लास्टिकला पर्याय स्वीकारला गेल्याचे दिसत नाही. प्रदूषणकारी प्लास्टिकचे संपूर्णपणे विसर्जन करण्याचे कायदे कागदावरच राहिले असल्याचेही प्रकर्षाने जाणवते.
आज प्लास्टिकने सगळ्यांचेच जीवन व्यापले आहे. वापरायला सोपे, सहज उपलब्ध आणि स्वस्त अशा या गुणधर्मामुळे आपले जगणे प्लास्टिकमय झाले आहे. पण प्लास्टिक नष्ट होत नाही, ते आपल्या पर्यावरणात टिकून राहते आणि शेवटी पर्यावरणाच्या र्‍हासाला कारणीभूत ठरते. त्यामुळे त्याच्या वापरावर नियंत्रण असावे, हा मुद्दा गेल्या काही वर्षांत पुढे येत गेला. मुंबईत २००५ साली झालेल्या अतिवृष्टीत जागोजागी पाणी तुंबायला  प्लास्टिकच कारणीभूत असल्याचे निष्पन्न झाले होते. या पार्श्वभूमीवर केंद्र तसेच राज्य स्तरावर वीस वर्षांपासून प्लास्टिकच्या वापरावर नियंत्रण आणणारे विविध कायदे झाले. तरीदेखील आपण प्लास्टिकच्या विळख्यातून बाहेर पडू शकलो नाही. गणेशोत्सवासारख्या उत्सवात ते दिसून येते. मूर्ती, सजावटीचे साहित्य भिजू नये म्हणून आणि फुले, फळे ताजी राहावीत, यासाठी बंदी असली, तरी प्लास्टिकचाच वापर सर्रास होताना दिसतो. गावांपासून शहरांपर्यंत अनिर्बंधपणे टाकलेले गेलेले कचर्‍याचे ढीग पाहिले, की हे लक्षात येते. प्लास्टिकबंदीच्या अंमलबजावणीच्या पातळीवर आनंदीआनंद आहे, हे कारण आहेच, पण त्यापेक्षाही प्लास्टिकला पर्याय उपलब्ध करून दिला गेलेला नाही, हे सर्वांत महत्त्वाचे कारण आहे. एखादी गोष्ट करू नको, असे सांगायचे असेल, तर कोणती गोष्ट कर हेही सांगितले गेले पाहिजे. तसे ते केले गेले नाही, तर त्याची अवस्था प्लास्टिकबंदीच्या कायद्यासारखी होते. राज्याचे पर्यावरणमंत्री रामदास कदम यांनी राज्यात संपूर्ण प्लास्टिकबंदीची घोषणा केली. मात्र त्यांनीच प्लास्टिकला पर्याय सांगितला नसल्याने बंदीच्या घोषणेचा फोलपणा लक्षात आला होता. फक्त तो शासन आणि शासनकर्त्यांच्या लक्षातच आलेला नाही. प्लास्टिकमुक्तीच्या फसव्या आकडेवारीनेच ते सिद्ध होते.
अशा स्थितीत प्लास्टिकचा विचार करायला हवा. ते प्रदूषणकारी असेल तरीही त्याला पर्याय नसेल, तर प्रदूषणकारी कारखान्यांच्या बाबतीत जे केले जाते, तेच अमलात आणायला हवे. तूर्त तरी प्लास्टिकला पर्याय नाही, हे मान्य करायला हवे. वापरू नका, असे सामान्य लोकांना सांगण्यापेक्षा अशा प्लास्टिकची निर्मितीच थांबवायला हवी. ते शासकीय पातळीवरच होऊ शकते. निर्मितीच थांबली, तर वापरही आपोआपच थांबणार आहे. सामान्य माणसांनी प्लास्टिक वापर थांबवायचे ठरविले, तरी ते होणार नाही. सामाजिक संस्थांचा उपक्रम आणि सोशल मीडियावरचा त्या उपक्रमांचा गवगवा यापलीकडे त्यातून काही साध्य होणार नाही. हल्ली प्रत्येक गोष्टीत ‘वापरा आणि फेका’ संस्कृती रुजली आहे. एखाद्या वस्तूचा उपयोग संपल्यानंतर तिचे अन्य उपयोग करून शेवटपर्यंत ती वापरत जाणे हा वास्तविक मानवी मूलस्वभाव आहे. पण ‘वापरा आणि फेका’च्या जमान्यात हे सारेच विसरले गेले आहे. त्यामुळेच प्लास्टिक वापरणे नव्हे, तर ते इतस्ततः फेकून देणे हा गुन्हा ठरवायला हवा. त्यानंतर प्लास्टिकच्या पुनर्वापराकडे वळायला हवे. अन्यथा गणेशोत्सवात प्लास्टिकबंदीचे देखावे होतील, पण उत्सव मात्र प्लास्टिकचाच असेल.
- प्रमोद कोनकर
- (संपादकीय, साप्ताहिक कोकण मीडिया, रत्नागिरी ६ सप्टेंबर २०१९)





Thursday 29 August 2019

कोकण मीडिया - दीपोत्सव विशेषांकासाठी कोकणातील बोलीभाषा कथा स्पर्धा



दीपोत्सव विशेषांकासाठीकोकणातील बोलीभाषा कथा स्पर्धा


     साप्ताहिककोकण मीडियारत्नागिरीतून गेली तीन वर्षे प्रसिद्ध होत आहे. कोकणातील विविध विषय त्यामध्ये हाताळले जात आहेत.
साप्ताहिकाची सुरुवात दिवाळी अंकापासून झाली. पहिल्याच दिवाळी अंकाला मुंबईतील महाराष्ट्र मुक्त पत्रकार संघाचा उत्कृष्ट अंकाचा पुरस्कार मिळाला. पहिल्या वर्षी कोकणाचा शतकाचा मागोवा हा विषय घेण्यात आला होता. दुसऱ्या वर्षी दिवाळीत प्रसिद्ध झालेल्या कोकणातील वास्तुसौंदर्य विशेषांकाचेही चांगले स्वागत झाले. गेल्या वर्षीच्या दिवाळी अंकात कोकणातील जलसौंदर्याचा आढावा घेण्यात आला. या अंकाची दखल मुंबई वृत्तपत्र लेखक संघाने घेतली आणि उत्कृष्ट अंकाचा पुरस्कार देऊन गौरव केला.
     यावर्षीच्या दिवाळी अंकासाठी साप्ताहिककोकण मीडियाने कोकणातील बोलीभाषांमधील कथा स्पर्धेचा विषय घेतला आहे.
     संवादाच्या दृष्टीने भाषांना आणि त्यातही बोली भाषांना खूप महत्त्व आहे. ते लक्षात घेऊन संयुक्त राष्ट्र संघाने २०१९ हे आंतरराष्ट्रीय स्थानिक भाषा वर्ष म्हणून घोषित केले आहे. स्वतःची भाषा, मातृभाषा, स्थानिक भाषा किती महत्त्वाची आहे, हे यावरून स्पष्ट होते.
     मराठी ही महाराष्ट्राची भाषा आहे. ती सुंदर, सङ्कृद्ध भाषा आहेच; पण तिची प्रत्येक बोलीही अतिशय संपन्न आहे. त्यातील प्रत्येक बोलीची काही वैशिष्ट्ये आहेत. प्रत्येक बोलीचा लहेजा, सौंदर्यस्थळे, रांगडेपणा, भावना थेट व्यक्त करण्याची क्षमता वेगवेगळी आहे. मात्र वापर घटल्याने बोलीभाषा मागे पडत चालल्या आहेत. केवळ क्रियापद मराठी आणि बाकीचे शब्द हिंदी, इंग्रजीतून अशी वाक्यरचना अलीकडे सर्वत्र केली जाते. समाजमाध्यमांच्या वाढत्या वापरामुळे प्रत्येक जण व्यक्त होत असला, तरी जसे बोलले जाते, तशाच प्रकारे लिहिण्याचे प्रमाणही वाढले. त्यामुळे मराठी शब्दांचा अभाव असलेली मराठी लिहिली-वाचली जाऊ लागली आहे. प्रमाणभाषेचीच ही स्थिती असल्याने बोलीभाषाही त्याच मार्गाने जात आहेत. गेल्या काही वर्षांत जगातील इतर सर्व भाषांप्रमाणेच मराठीतीली बोलीभाषा नष्ट होण्याची भीती भाषातज्ज्ञांना वाटते. ती भीती नष्ट करण्याचे सामर्थ्य  बोलीभाषा बोलणाऱ्या सामान्य लोकांमध्ये आहे. हे लक्षात घेऊनच साप्ताहिककोकण मीडियाच्या या वर्षीच्या दिवाळी अंकासाठी कोकणातील बोलीभाषांमधील कथा स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. कोकणात प्रमाण मराठीबरोबरच मालवणी, बाणकोटी, संगमेश्वरी, आगरी, दालदी, सामवेदी इत्यादी चौदा बोलीभाषा बोलल्या जातात. त्यापैकी कोणत्याही भाषेत लिहिलेली कथा या स्पर्धेसाठी पाठविता येईल. बोलीभाषेत लिहिताना निवेदनासाठी कथेमध्ये मराठी भाषेचा वापर केल्यासही चालेल.
     स्पर्धेतील विजेत्यांना पारितोषिकेही दिली जातील. विजेत्या कथा साप्ताहिक कोकण मीडियाच्या दिवाळी २०१९ च्या अंकात प्रसिद्ध केल्या जातील. तसेच अन्य उल्लेखनीय कथांचाही प्रसिद्धीसाठी विचार केला जाईल.

स्पर्धेचा तपशील :
* शब्दमर्यादा एक हजार
* पूर्वी प्रसिद्ध झालेली कथा पाठवू नये.
* कथा हस्तलिखित स्वरूपात असेल, तर सुस्पष्ट शब्दांत लिहावी.
* टंकलिखित कथाही चालेल.
* युनिकोडमध्ये लिहिलेली कथा ईमेलने पाठविल्यास उत्तम.
* कथालेखकाचा संपूर्ण पत्ता, दूरध्वनी, व्हॉट्सअॅपसह मोबाइल क्रमांक, ईमेल कळवावा.
* कथा पोहोचण्याची अंतिम मुदत : ३० सप्टेंबर २०१९.

कथा टपालाद्वारे पाठविण्यासाठी पत्ता :
साप्ताहिक कोकण मीडिया,
कोकण मीडिया कन्सल्टन्सी अँड सर्व्हिसेस,
कुसुमसुधा’, 697, रामचंद्रनगर (श्रीनगर),
गांधी ऑटोमोबाइल्सच्या मागे,
आकाशवाणी प्रक्षेपण केंद्रासमोर,
खेडशी, रत्नागिरी ४१५६३९.
संपर्क : ९४२२३८२६२१ (व्हॉट्सअॅ)
-मेल : kokanmedia1@gmail.com

............

महत्त्वाची सूचना : ज्यांना कथा स्पर्धेत भाग घ्यावयाचा नसेल, त्यांनी मराठीसह कोकणातील बोलीभाषांमधील आपल्या कथाही दिवाळी अंकासाठी पाठवाव्यात.

याशिवाय....

दिवाळी अंकासाठी व्यंगचित्रे, विनोदी कथा, कोकणविषयक लेख, कविता इत्यादी साहित्याचेही स्वागत आहे.


Saturday 24 August 2019

पत्रकारांएवढेच वृत्तपत्र लेखकांनाही महत्त्व - सुकृत खांडेकर

  मुंबई :   पत्रकारांप्रमाणेच समाजातील अनेक समस्यांबाबत वृत्तपत्र लेखक वाचकांच्या पत्रव्यवहाराच्या सदरातून आपले विचार मांडतात. विविध उपाय सुचवतात. त्यामुळे त्यांनाही वृत्तपत्रांमध्ये पत्रकारांएवढेच महत्त्व असते. म्हणूनच कोणत्याही वृत्तपत्रांमध्ये संपादकीय पानावरच वृत्तपत्र लेखकांच्या पत्रांना स्थान दिले जाते, असे प्रतिपादन ‘नवशक्ति’चे संपादक सुकृत खांडेकर यांनी केले.

      मराठी वृत्तपत्र लेखक संघाचा ७० वा वृत्तपत्र लेखक दिन आणि ४४ वा दिवाळी अंक पुरस्कार सोहळा ताडदेव व्यायामशाळेतील रुसी मेहता सभागृहात गुरुवारी पार पडला. त्यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. सत्तर वर्षांपूर्वी ‘नवशक्ति’चे तत्कालीन संपादक प्रभाकर पाध्ये यांनी गिरगावच्या तांबे उपाहारगृहात २२ ऑगस्ट रोजी पहिला वृत्तपत्र लेखक मेळावा भरविला होता. तेच औचित्य साधून यावर्षी श्री. खांडेकर यांना प्रमुख पाहुणे म्हणून पाचारण करण्यात आले होते. त्यावेळी बोलताना ते पुढे म्हणाले, कोणतेही वृत्तपत्र हे कोणत्याही संचालकांचे किंवा संपादकांचे नसते तर ते वाचकांचेही असते. त्यातील लेखनाची उर्मी असलेले काहीजण स्थानिक समस्यांसह ज्वलंत आंतरराष्ट्रीय प्रश्नावर नवे विचार देण्याचे काम अतिशय प्रभावीपणे करीत असतात. ७० वर्षांपूर्वी सुरू झालेले मराठी वृत्तपत्र लेखक संघाचे चाललेले काम निर्विवादपणे समाजोपयोगी आणि दखल घेण्यासारखे आहे. लोकमानसाची दिशा अलीकडे प्रिंट माध्यमांसह इलेक्टॉनिक मीडिया व मोठ्या प्रमाणात वापर होत असलेल्या सोशल मीडियातून व्यक्त होत आहे. परंतु लोकमानसाची बूज राखत खऱ्या अर्थाने जनमनाचा कानोसा घेणारा आणि संपादकीय पानावर मानाने मिरवणारा वाचकांच्या पत्रव्यवहाराचा स्तंभ निर्विवाद महत्त्वाचा आहे. दादर येथील महापालिकेच्या शिंदेवाडी शाळेत असलेले कार्यालय महापालिकेने सील केले आहे. संस्थेच्या कार्यात अडचणी आणण्याचा अथवा तो आवाज दाबण्याचा सरकार किंवा प्रशासनाकडून प्रयत्न होत असेल तर न्याय मिळवून देण्यासाठी मी तुमच्यासोबत सदैव असेन.

      संघाध्यक्ष रवींद्र मालुसरे यांनी संघाच्या ७० वर्षाच्या कारकिर्दीचा आलेख मांडताना मुंबई महापालिका,   राज्य सरकारकडून संस्थेला कसे बेघर करण्याचा प्रयत्न होत आहे आणि न्याय मिळत नसल्याविषयी खंत व्यक्त केली. संघाचे साठावे संमेलन पुण्यात भरविण्यासाठी आवश्यक ती मदत मी करेन, असे आश्वासन ज्येष्ठ पत्रकार विकास वाळुंजकर यांनी दिले.

मुंबई - मराठी वृत्तपत्र लेखक संघाचा उत्कृष्ट दिवाळी अंकासाठी रत्नागिरीच्या `कोकण मीडिया`ला मिळालेला पुरस्कार
`नवशक्ति`चे संपादक सुकृत खांडेकर यांच्याकडून स्वीकारताना संपादक प्रमोद कोनकर. सोबत संघाध्यक्ष रवींद्र मालुसरे.

      ज्येष्ठ वृत्तपत्र लेखक आणि पत्रलेखन चळवळीत सक्रिय योगदान असलेले नंदकुमार रोपळेकर आणि  दत्ताराम घुगे यांना जीवन गौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला. संघाने आयोजित केलेल्या ४४ व्या राज्यस्तरीय दिवाळी अंक स्पर्धेतील विजेत्यांना पारितोषिके देण्यात आली. हे विजेते दिवाळी अंक असे - का. र. मित्र स्मृती सर्वोत्कृष्ट अंक शब्ददीप (पुणे), पु. ल. देशपांडे स्मृती उत्कृष्ट अंक पुण्यनगरी (कोल्हापूर), गणेश केळकर स्मृती उत्कृष्ट अंक रायगड माझा (कर्जत), साने गुरुजी  स्मृती उत्कृष्ट अंक उद्याचा मराठवाडा (नांदेड), प्रतापराव माने स्मृती उत्कृष्ट अंक मुंबई तरुण भारत (मुंबई), पांडुरंग रा भाटकर स्मृती उत्कृष्ट अंक कमलदूत (पुणे), कृष्णराव भानुसे स्मृती उत्कृष्ट अंक लोकजागर (सातारा), कोकण मीडिया (रत्नागिरी), तेजोमय (पुणे), मोहनगरी (पुणे), अक्षरभेट (मुंबई), वास्तव (मुंबई), जीवनज्योत (मुंबई),  (अमेरिका), बदलते जग (कोल्हापूर), शब्दालय (श्रीरामपूर), वसंत (मुंबई), मुक्तछंद (महाड), क्षत्रिय संजीवनी (मुंबई), संयम (भाईंदर), जीवनज्योत (मुंबई), रानभरारी (शहापूर ठाणे), उत्सवप्रभा-ब्लॅक व्हाइट टु कलर (मुंबई), दीपस्तंभ (मुंबई), पृथा (पुणे),

      उपस्थितांचे स्वागत कार्याध्यक्ष रमेश सांगळे, सूत्रसंचालन प्रमुख कार्यवाह प्रशांत घाडीगावकर यांनी केले. कोषाध्यक्ष आत्माराम गायकवाड यांनी आभार मानले. समारंभाला  नगरसेविका उर्मिला पांचाळ, मराठी विज्ञान परिषदेचे अ. पां. देशपांडे, ताडदेव व्यायामशाळेचे सेक्रेटरी सुरेश सांगळे मराठी साहित्य अकादमीचे प्रकाश भातंब्रेकर, सुप्रसिद्ध विनोदी लेखक सुधीर सुखटणकर यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.