Monday 3 June 2019

पवन प्रभू, सुधांशु सोमण, अक्षय जांभळे यांना स्वरसिंधुरत्न पुरस्कार

कुडाळ : श्री शंकरा दादर (मुंबई) आणि वालावलच्या श्री लक्ष्मीनारायण भक्तांनी आयोजित केलेल्या
स्वरसिंधुरत्न अभंग, भक्तिगीत गायन स्पर्धेत तीन वेगवेगळ्या गटांमध्ये पवन उमेश प्रभू, सुधांशु समीर
सोमण आणि अक्षय मंगेश जांभळे स्वरसिंधुरत्न पुरस्काराचे मानकरी ठरले.
पवन उमेश प्रभू (कुडाळ)
वालावल (ता. कुडाळ) येथील श्री लक्ष्मीनारायणाच्या आषाढी एकादशी उत्सवाच्या निमित्ताने दादर (मुंबई) येथील श्री शंकरा संस्था आणि श्री लक्ष्मीनारायणाच्या भक्तांनी सिंधुदुर्ग जिल्हास्तरीय स्वरसिंधुरत्न अभंग, भक्तिगीत स्पर्धा आयोजित केली आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील संगीत कला जोपासली गेली पाहिजे आणि त्याद्वारे गायकांना योग्य ती संधी मिळाली पाहिजे, या उद्देशाने स्पर्धेचे आयोजन केले होते. स्पर्धा शालेय, महाविद्यालयीन आणि खुल्या गटात झाली. कणकवली, कुडाळ आणि सावंतवाडीत पहिल्या फेरीची स्पर्धा पार पडली. त्यामधून प्रत्येक गटातून प्रत्येकी तीन अशा एकूण २७ स्पर्धकांची निवड अंतिम स्पर्धेसाठी करण्यात आली. स्पर्धेची दुसरी आणि अंतिम फेरी कुडाळच्या संत राऊळ महाराज महाविद्यालयात २ जून रोजी झाली. या स्पर्धेत शालेय गटातून पवन उमेश प्रभू (कुडाळ), महाविद्यालयीन गटातून सुधांशु समीर सोमण आणि खुल्या गटातून अक्षय मंगेश जांभळे (दोघेही देवगड) स्वरसिंधुरत्न पुरस्काराचे मानकरी ठरले. स्पर्धेचे परीक्षक म्हणून सलग तीन वर्षे महाराष्ट्र शासनाचा उत्कृष्ट पार्श्वसंगीत पुरस्कार मिळविणारे विजय गवंडे, ज्येष्ठ शास्त्रीय गायक बाळ आंबर्डेकर आणि प्रदीप धोंड यांनी काम पाहिले.
सुधांशु समीर सोमण (देवगड)
स्वरसिंधुरत्न पुरस्कार हा स्पर्धेपुरता मर्यादित न ठेवता ही जिल्ह्यातील संगीत क्षेत्रासाठी एक चळवळ निर्माण करण्याचा मानस आहे, असे स्पर्धेचे संयोजक प्रशांत धोंड यांनी आपल्या ऋणनिर्देशपर भाषणात सांगितले.
दरम्यान, तिन्ही पुरस्कारविजेत्यांना प्रत्येकी दहा हजार रुपये आणि स्वरसिंधुरत्न पुरस्काराने गौरविण्यात येणार आहे. तसेच त्या तिघांच्याही गायनाचा कार्यक्रम १२ जुलै २०१९ रोजी वालावल येथील लक्ष्मीनारायण मंदिरात आषाढी एकादशीला करण्यात येणार आहे. या कार्यक्रमाच्या वेळीच त्यांना पुरस्कार प्रदान करण्यात येतील. याशिवाय १८ ऑगस्ट रोजी मुंबईत दादर येथील शिवाजी मंदिरमध्येही पुरस्कारविजेत्या तिघांच्या गायनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात येणार आहे. शिवाजी मंदिरात होणाऱ्या या कार्यक्रमात संगीत क्षेत्रातील दिग्गज उपस्थित राहणार आहेत. या सर्व कार्यक्रमांचा आस्वाद घेण्याचे आवाहन आयोजकांतर्फे करण्यात आले आहे.
.........


अक्षय मंगेश जांभळे (देवगड)



स्वरसिंधुरत्न अभंग, भक्तिगीत गायन स्पर्धेत तेजल गावडे, समृद्धी सावंत, धामापूरकर प्रथम

       
सावंतवाडी : स्वरसिंधुरत्न अभंग, भक्तिगीत गायन स्पर्धेतील
सावंतवाडी केंद्रातील विजेत्यांसह परीक्षक
प्रदीप धोंड, बाळ आंबर्डेकर, प्रशांत धोंड, सतीश पाटणकर, अशोक प्रभू
सावंतवाडी : श्री शंकरा दादर (मुंबई) आणि वालावलच्या श्री लक्ष्मीनारायण भक्तांनी आयोजित केलेल्या स्वरसिंधुरत्न अभंग, भक्तिगीत गायन स्पर्धेत तीन वेगवेगळ्या गटांमध्ये तेजल गावडे, समृद्धी सावंत आणि नीतिन धामापूरकर यांनी सावंतवाडी केंद्रात पहिल्या फेरीत प्रथम क्रमांक पटकावला.
वालावल (ता. कुडाळ) येथील श्री लक्ष्मीनारायणाच्या आषाढी एकादशी उत्सवाच्या निमित्ताने दादर (मुंबई) येथील श्री शंकरा संस्था आणि श्री लक्ष्मीनारायणाच्या भक्तांनी सिंधुदुर्ग जिल्हास्तरीय स्वरसिंधुरत्न अभंग, भक्तिगीत स्पर्धा आयोजित केली आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील संगीत कला जोपासली गेली पाहिजे आणि त्याद्वारे गायकांना योग्य ती संधी मिळाली पाहिजे, या उद्देशाने स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. स्पर्धा शालेय, महाविद्यालयीन आणि खुल्या गटात झाली. कणकवली, कुडाळ आणि सावंतवाडीत पहिल्या फेरीची स्पर्धा पार पडली. सावंतवाडीच्या केंद्राची सावंतवाडी, वेंगुर्ले आणि दोडामार्ग तालुक्यांसाठीची स्पर्धा सावंतवाडीतील श्रीराम वाचन मंदिराच्या सभागृहात झाली. स्पर्धेत एकूण ३५ स्पर्धकांनी भाग घेतला. स्पर्धेतील अनुक्रमे तीन विजेते असे – गट पहिला (१२ वर्षांपर्यंत) - तेजल गावडे, गीता गवंडे, श्रेया केसरकर. गट दुसरा (१८ वर्षांपर्यंत) - समृद्धी सावंत, देवयानी केसरकर, विधिता केंकरे. गट तिसरा (खुला गट) - नीतिन धामापुरकर, सौ. सिद्धी परब, गीतेश कांबळे. पहिल्या ते तिसऱ्या क्रमांकाच्या विजेत्यांना अनुक्रमे एक हजार, ७५० आणि ५०० रुपयांची पारितोषिके देण्यात आली. स्पर्धेचे परीक्षक म्हणून ज्येष्ठ शास्त्रीय गायक बाळ आंबर्डेकर आणि प्रदीप धोंड यांनी काम पाहिले.
...................

स्पर्धेतल्या एका स्पर्धकाचा व्हिडीओ पाहण्यासाठी सोबतची लिंक क्लिक करा -
https://youtu.be/98e6NDVisu0


Sunday 5 May 2019

रत्नागिरी : अवयवदानाचे महत्त्व अनन्यसाधारण – डॉ. बोल्टे

रत्नागिरी : अवयवदानाचे महत्त्व अनन्यसाधारण – डॉ. बोल्टे
रत्नागिरी : पूर्वी रक्तदान श्रेष्ठ दान म्हटले जात होते. आता मात्र अवयवदानाला महत्त्व आले आहे. एका देहापासून आठ ते दहा जिवांना जीवनदान मिळू शकते. अशा या अवयवदानाच्या प्रसारासाठी आयुष्यव वाहिलेल्या आपटे दांपत्याने चालविलेली चळवळ अत्यंत उपयुक्त आहे, असे प्रतिपादन जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अशोक बोल्टे यांनी केले.
राज्य शासनाचा सार्वजनिक आरोग्य विभाग, जिल्हा रुग्णालय, अवयवदान महासंघ, जटायू आणि विविध सामाजिक संस्थांतर्फे अवयवदानाबद्दल बोलू काही, या विषयावर रत्नागिरीच्या जिल्हा शासकीय रुग्णालयातील नेत्र विभागाच्या सभागृहात झालेल्या कार्यक्रमात ते बोलत होते. शिल्पा रेडीज आणि रोहन सावंत या मरणोत्तर देहदान करणाऱ्या दोघांना अभिवादन करून कार्यक्रमाचा प्रारंभ झाला. बालरोगतज्ज्ञ डॉ. दिलीप मोरे यांनी प्रास्ताविकात अवयवदानाविषय़ी माहिती दिली. ते म्हणाले की, १९५० पासून अवयवदान सुरू असले, तरी त्याबाबतची जनजागृती झालेली नसल्याने लोक पुढे येत नाहीत. आता त्याची गरज आहे. प्रसिद्ध नेत्रशल्यविशारद डॉ. तात्याराव लहाने यांना त्यांच्या आईने आपले मूत्रपिंड दिले होते. त्यामुळे पुढच्या आयुष्यात डॉ. लहाने फार मोठे कार्य करू शकले. हे महत्त्व लक्षात घेऊन लोकांनी स्वयंस्फूर्तीने देहदान आणि अवयवदानासाठी पुढे यावे.
श्रीकांत आपटे आणि त्यांच्या पत्नी सौ. नीला आपटे यांनी देहदान आणि अवयवदानाच्या उपयुक्ततेविषयी स्लाइड शो आणि प्रश्नोत्तराच्या माध्यमातून माहिती दिली. बँक ऑफ महाराष्ट्रमधून निवृत्त झाल्यानंतर गेल्या २०१६ पासून आपण या चळवळीला वाहून घेतले आहे, असे सांगून ते म्हणाले की, अवयव प्रत्यारोपणाची व्यवस्था असलेल्या रुग्णालयात नेत्रदान, अवयवदान, देहदान करता येते. रत्नागिरीत नेत्रदान करता येते, तर डेरवणच्या वालावलकर रुग्णालयाच्या वैद्यकीय महाविद्यालयात अवयवदान, देहदानाची व्यवस्था होऊ शकते. जिवंत असताना मूत्रपिंड, यकृत आणि आतड्याच्या काही भागाचे दान, तर मृत व्यक्ती, मेंदुमृत व्यक्तींचे अवयवदान करता येऊ शकते. दररोज सुमारे दोन लाख ७० हजार लोकांना जगण्यासाठी विविध अवयवांची गरज असते. जिवंत किंवा मृतांच्या अवयवदानातून अशांना मरणासन्न रुग्णांना नवे जीवन मिळू शकते. मृतदेहाचे दहन करण्यापूर्वी शरीरावरचे दागिने काढून घेतले जातात. त्याच पद्धतीने मृताच्या अवयवरूपी दागिन्यांचेही दान करण्याची मानसिकता निर्माण झाली पाहिजे. नेत्र, त्वचा आणि अस्थींचे दान करता येते. मरणोत्तर देहदान केल्यास त्यावर दहा वैद्यकीय विद्यार्थ्यांचे शिक्षण होऊ शकते. नवजात बालकापासून कोणीही अवयवदान करू शकतो.
अवघ्या शंभर तासांनी मरण पावलेल्या बालकाच्या मूत्रपिंडाचे केलेले रोपण, प्रौढाच्या हातांचे एका सैनिकाला केलेले रोपण अशा काही चित्रफितीही श्री. आपटे यांनी यावेळी दाखविल्या.
.......
श्रीकृष्ण आपटे यांचे विचार आणि त्यांची अवयवदानाविषयीची कविता ऐकण्यासाठी सोबतच्या यूट्यूब लिंकवर क्लिक करा.

https://youtu.be/yJj-sz2aI1g


Wednesday 19 December 2018

रत्नागिरीतील पाचवी जागतिक देवरुखे ब्राह्मण परिषद यशस्वी



      रत्नागिरी : पूर्वसंध्येला निघालेल्या भव्य शोभायात्रेसह रत्नागिरीत १४ ते १६ डिसेंबर या काळात झालेली तीन दिवसांची जागतिक देवरुखे ब्राह्मण परिषद यशस्वी झाली. शिस्तबद्धता आणि पर्यावरणस्नेह हे या परिषदेचे वैशिष्ट्य होते. प्रदूषणमुक्तीसाठी प्लास्टिकमुक्तीचा संदेश परिषदेतून दिला जात असल्याचे परिषदेचे अध्यक्ष डॉ. चंद्रशेखर निमकर यांनी उद्घाटन समारंभात सांगितले. तसेच तो उद्देश साध्य झाल्याचे त्यांनी समारंभ संपल्यानंतरही आवर्जून नमूद केले.
                रत्नागिरीच्या प्रमोद महाजन क्रीडा संकुलात उभारलेल्या आर. सी. काळे नगरीमध्ये ही परिषद झाली. जगभरातून सुमारे तीन हजार प्रतिनिधी परिषदेला उपस्थित होते. अमेरिकेतील सीटी ग्रुपचे डायरेक्टर प्रशांत जुवेकर उद्घाटन समारंभाला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. एआय, डेटा ॲनलिसिस, बिग डेटा, अशा स्वरूपाचे नवे अभ्यासक्रम येत आहेत. त्याचा उपयोग बँकिंग, विमा व वैद्यकीय क्षेत्रात केला जात आहे. त्यामुळे करिअरसाठी नव्या संधी आहेत. युरोप, अमेरिकेतील अनेक कंपन्या चीनमध्ये गेल्या आणि आयटी कंपन्या येथे येत आहेत. विद्यार्थ्यांनी विचार करून याचा फायदा उठवला पाहिजे, असे आवाहन त्यांनी केले. ते पुढे म्हणाले की, मी रसायन अभियांत्रिकी शिकलो. सिटी ग्रुपच्या ग्लोबल केमिकलचा मॅनेजिंग हेड आहे. माझी टीम लंडन, हाँगकाँगमध्ये काम करते. जगभरातील पेट्रोकेमिकल उद्योगांचा आम्ही सर्वांगीण अभ्यास करतो. ब्राझीलमध्ये मक्यापासून इथेनॉल निर्माण करतात आणि ते लिटरमागे दहा टक्के या प्रमाणात वापरतात. मात्र पेट्रोलमुळे मोठे प्रदूषण होत आहे. त्यामुळे आता इलेक्ट्रिक कार्स वापरणार्यांरची संख्या वाढणार आहे. येत्या २०२५ पर्यंत ही संख्या दहा टक्क्यांवर पोहोचेल.
                यावेळी खासदार विनायक राऊत यांनी रत्नागिरी शहर दर्जेदार बनवण्यासाठी सर्व सोयीसुविधा देण्याचा प्रयत्न असल्याचे सांगितले. नगराध्यक्ष राहुल पंडित यांनीही शुभेच्छा दिल्या. मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सुहास पेडणेकर, विद्यार्थी साहाय्याक संस्था व परिषदेचे अध्यक्ष डॉ. चंद्रशेखर निमकर, देवरुखे विद्यार्थी वसतिगृह संस्थेचे अध्यक्ष विनोद जोशी, सतीश शेवडे, नगरसेवक उमेश कुलकर्णी, राजू भाटलेकर, अभिनेत्री संपदा जोगळेकर-कुलकर्णी दिवाकर निमकर, श्रीनिवास कानडे, इंद्रनील भोळे आदी व्यासपीठावर उपस्थित होते. डॉ. आनंद जोशी, श्रीकांत मुकदम, वीणा ढापरे, प्रशांत जोशी, सुरेश शितूत, दीपक निमकर, उल्हास मुळे, सुरेंद्र कुलकर्णी, अनिल पिंपुटकर, ॲड. श्रीनिवास भोळे, जयंत चापेकर, वृंदा निमकर, अरुण जोशी, समीर निमकर, पत्रकार अरविंद कोकजे, यांचा यावेळी सत्कार करण्यात आला.
                कुलगुरू डॉ. पेडणेकर म्हणाले की, मुंबई विद्यापीठाअंतर्गत आठशे महाविद्यालयांत नऊ लाख विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. रत्नागिरी उपकेंद्राची ताकद वाढवण्यासाठी माझे प्रयत्न सुरू आहेत. उपकेंद्र सक्षम नसल्याने नवे अभ्यासक्रम सुरू करता येत नाहीत. लवकरच पालघर आणि वेंगुर्ले येथे नवीन उपकेंद्रे सुरू केली जाणार असून तेथे ओशनोग्राफी अभ्यासक्रम सुरू केला जाईल. ते म्हणाले की, १६१ वर्षे इतिहास असलेल्या या विद्यापीठाने देशाला पाच भारतरत्न, एक राष्ट्रपती आणि पंतप्रधान दिले. अशा विद्यापीठाला झपाट्याने बदलणाऱ्या जगाचीही दखल घेणे आवश्यक आहे. चौथी औद्योगिक क्रांती होत आहे. आणखी वीस वर्षांनंतर इंटरनेटवर आधारित ५० टक्के डिजिटल जॉब असतील. ऑफिस ही संकल्पना आता कमी होत जाणार आहे. शाळा-महाविद्यालयातही डेटा, थ्रीड डी प्रिंटिंग रोबोटिक्स, एआय असे अभ्यासक्रम सुरू झाले पाहिजेत. विद्यापीठात एआय मास्टर सायन्स सुरू केले आहे. मुंबईत विद्यापीठाच्या कलिना कँपस येथे इन्क्युबेटर सेंटर सुरू केले जाणार आहे. जर्मनीत कौशल्यावर आधारित पाच दशलक्ष, तर चीनमध्ये २० दशलक्ष नोकर्याम उपलब्ध आहेत. भारतातही काम वाढेल. त्यांच्यासाठी उपयुक्त अभ्यासक्रम सुरू होतीलच. पण आपण कोण आहोत, आपली स्वतःची ओळख झाली पाहिजे आणि समाज आणि देशासाठी शिक्षणाचा उपयोग करता आला पाहिजे. बदलणार्याओ जगात नवे ज्ञान शिकेल तोच टिकेल. मुलांना आधुनिक अभ्यासक्रम शिकण्यासाठी प्रोत्साहन द्यावे, असेही कुलगुरू म्हणाले.
                देशात असिष्णुता वाढली म्हणून पुरस्कार परत केले जातात. दुसरीकडे लोक रस्त्याला विरोध करतात. गंभीर हल्ले करायला तयार होतात. अंतर्गत आणि बाह्य मार्गाने ही संकटे देशावर आघात करत असतात. देशाच्या प्रगतीच्या आड न येता विकासात्मक भूमिका लोकांनी घ्यावी, असे आवाहन ज्येष्ठ सरकारी वकील पद्मश्री उज्ज्वल निकम यांनी परिषदेत केले.
                जागतिक देवरुखे ब्राह्मण परिषदेमध्ये श्री. निकम लेखक अच्युत गोडबोले आणि बाळासाहेब ठाकरे यांचे वकील बाळकृष्ण जोशी यांच्या प्रकट मुलाखतीचा कार्यक्रम झाला. त्यावेळी निकम यांनी आपली सडेतोड मते मांडली. वकिलीचा प्रवास, विविध खटले व तपास यासंदर्भात त्यांनी दिलखुलास मुलाखत दिली.
                निकम म्हणाले की, हल्ल्यांसाठी काही वेळा काही कारणांचे भांडवल केले जाते, त्यांना राजकीय हवापाणी मिळते. देशाच्या सुरक्षिततेला धोका पोहोचू नये, यासाठी नागरिकांनी लक्ष ठेवले पाहिजे. ट्रंप यांनी अमेरिकेत व्हिसासंदर्भात निर्णय घेतला, त्याबद्दल मला आनंद वाटला. कारण भारतीय हुशार विद्यार्थी तेथे जाऊन आपली बुद्धिमत्ता वापरतात. त्यांनी भारतातच राहून विकासासाठी आपली बुद्धी वापरावी. आपण नेहमी चांगले राहिले पाहिजे.
                अच्युत गोडबोले म्हणाले, ३२ वर्षे आयटी क्षेत्रात सीईओ, परदेशांत नोकरी केली. कोट्यवधी रुपये मिळवले. पण फक्त पैसे मिळवून काही नाही. त्यामुळे मराठी ज्ञानभाषा होण्यासाठी ३२ पुस्तके लिहिली. मला वाचकांचे भरपूर प्रेम मिळते, त्यामुळे समाधान वाटते. माझी पुस्तके वाचून १४ जण आत्महत्येपासून परावृत्त झाले, हे माझ्यासाठी खूप आहे.
                बाळकृष्ण जोशी यांनी सांगितले की मी १९८५ मध्ये मुलुंडमध्ये शिवसेनेचा पहिला नगरसेवक झालो. बाळासाहेबांच्या भाषणांनी प्रभावित झालो होतो आणि शिवसैनिक बनलो. बाबरी मशीद पाडली त्यावेळी बाळासाहेबांवरही खटला सुरू होता. खटला लढवायला लखनौला गेलो होतो. मी तिकडून येईपर्यंत बाळासाहेब जेवलेसुद्धा नव्हते. मला मुंबईत परत पाहिल्यावर ते जेवले. या प्रसंगामुळे मी भारावून गेलो.
                दरम्यान, प्रकट मुलाखतीनंतर पत्रकारांशी संवाद साधताना श्री. निकम यांनी नरेंद्र दाभोळकर हत्या प्रकरणातील संशयित आरोपींना जामीन मिळाल्याबद्दल तपास यंत्रणेला फटकारले. ते म्हणाले की, तपास यंत्रणांनी याचा गंभीरपणे विचार करावा. काल पुणे न्यायालयाने नरेंद्र दाभोळकर हत्या प्रकरणातील अटक करण्यात आलेल्या तीन संशयितांना जामीन दिला. अमोल काळे, राजेश बंगेरा आणि अमित दिगवेकर यांच्या विरोधात सीबीआयने ९० दिवसांत आरोपत्र दाखल केले नसल्याने या तिघांना पुणे न्यायालयाने जामन मंजूर केला. अशा प्रकराच्या हत्या कटातून निर्माण होत असतात. त्यासाठी तपास यंत्रणेला वेळ लागतो. पण अशा घटनांमध्ये तपासयंत्रणांनी वेळेत दोषारोपपत्र दाखल करणे आवश्यक असते. तसे झाले नसल्याने आरोपींनी जामीन मिळाला, असे श्री. निकम यांनी स्पष्ट केले.
                गांधीवादामुळे ७० वर्षांत देश अपयशी ठरला आहे. मात्र आज सावरकरवाद स्वीकारण्याची गरज असून तो स्वीकारला तरच भारत हिंदू राष्ट्र म्हणून यशस्वी ठरेल. विज्ञानाची कास, भाषाशुद्धी, संरक्षण सज्जता आणि अंधश्रद्धा निर्मूलनाचा विचार त्यांनी मांडला होता, असे प्रतिपादन अभिनेते शरद पोंक्षे यांनी केले.
                परिषदेत बोलताना ते म्हणाले की, स्वातंत्र्यवीर सावरकर ज्या भूमीत स्थानबद्ध होते आणि त्यांनी राष्ट्राला वंदनीय कार्य केले, तेथे बोलताना मला नेहमीच भरून येते. पतितपावन मंदिर असो वा कारागृहातील स्मारकात नतमस्तक कोणीही व्हावे. खरा इतिहास नेहरूंपासून सार्यांबनी लपवून स्वा. सावरकरांना बदनाम केले. भारत १९४७ मध्ये स्वतंत्र झाला तरी सावरकरांना १९६३ पर्यंत स्वातंत्र्यसैनिक म्हणून सिद्ध करण्यासाठी प्रयत्न करावे लागले, हे दुर्दैव. स्वा. सावरकरांना हिंदुत्ववादी सरकार अजूनही भारतरत्न देत नाही, यापेक्षा दुर्दैव कोणते?
                देशाने ७० वर्षे गांधीवाद जोपासला. नेहरूंनी पंतप्रधानपद स्वीकारल्यानंतर स्वा. सावरकरांनी काही सूचनांचे पत्र पाठवले होते. विज्ञानवादी राहा आणि सुरक्षा व्यवस्थेतील सैनिक, पोलीस आणि शिक्षणकार्य करणार्या  शिक्षकांना समाधानी ठेवा. ही सूचना न ऐकल्यामुळेच आज सैनिक किंवा पोलिसांबद्दल वाट्टेल ते बोलले जाते. शिक्षक मनापासून शिकवत नाहीत. गुरुकुल शिक्षण पद्धत अमलात आणा. सर्वाधिक संहारक शस्त्रे आपल्या दलामध्ये सामील करा, या सूचनेचेही पालन केली नाही. त्यामुळे चीनविरुद्ध आपण हरलो. दुबळ्या माणसाच्या तोंडी अहिंसा शोभून दिसत नाही. त्यामुळे सुरक्षेची काळजी घ्यायला हवी होती. चरख्यावरच्या सुताने नव्हे तलवारीच्या पात्याने व रक्ताने देशाच्या सीमा सुरक्षा करायल्या हव्या होत्या.
                कस्तुरबा गांधी आणि स्वा. सावरकर व त्यांच्या पत्नीची भेट रत्नागिरीतील वास्तव्यात झाली होती. गांधी व सावरकर यांची दीड तास चर्चा झाली पण दोघांची मते भिन्न होती. त्यानंतर गांधीजींनी सौ. सावरकरांना वंदन केले आणि ते म्हणाले, मी आज यांच्या मतांमध्ये पोळून निघालो. तू यांच्याशी संसार कसा करतेस, असा प्रसंग श्री. पोंक्षे यांनी सांगितला.
               
                दोन दिवसांची परिषद संपल्यानंतर परिषदेचे अध्यक्ष डॉ. चंद्रशेखर निमकर यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. ते म्हणाले, पर्यावरणस्नेही, प्लास्टिकमुक्तीचा संदेश देण्यात जागतिक देवरुखे ब्राह्मण परिषद झाली. आर. सी. काळेनगरी अर्थात प्रमोद महाजन क्रीडासंकुलची फारशी स्वच्छता करावी लागली नाही. खऱ्या अर्थाने हे संमेलन आनंददायी आणि पर्यावरणस्नेही झाले. देश-विदेशातील ज्ञातिबांधवांच्या उपस्थितीमुळे हे संमेलन संवादातून संपन्नतेकडे नेणारे ठरेल. प्लास्टिकमुक्त परिषदेचा संकल्प शंभर टक्के यशस्वी झाला. प्लास्टिक पिशव्या, बाटल्यांचा वापर केला नाही. परिषद संपल्यानंतर तासाभरातच आर. सी. काळे नगरीची साफसफाई करण्यात आली. पतितपावन मंदिरापासून निघालेल्या शोभायात्रेच्या शेवटी स्वच्छता पथक कार्यरत होते. त्यामुळे कोणत्याही कचऱ्याचा त्रास रत्नागिरीकरांना झाला नाही. फटाके टाळले आणि ध्वनी, वायुप्रदूषण टाळण्यात यश आले.
                मी परिषदेच्या निमित्ताने ७५ गावे, शहरांना भेट दिली. तेथील ज्ञातिबांधवांना परिषदेची माहिती दिली. संस्थेला अनेकांनी केलेल्या दानाचा विनियोग अधिक चांगल्या प्रकारे केला जाणार आहे. परिषदेच्यानिमित्त शंभर दिवस पत्राच्या माध्यमातून लिहीत होतो. कित्येक जणांनी या पत्रांचे पुस्तक प्रकाशित करण्याची सूचना केली आहे. परिषदेकरिता भेटलेले ज्ञातिबांधव, कामाचा आढावा, आलेल्या अडचणी सोडवल्या. जागतिक परिषदेच्या निमित्ताने समोर ठेवलेली उद्दिष्टे साध्य करण्यासाठी आजपासून सुरवात झाली आहे. पुढच्या वर्षी जे काम करायचे आहे, त्याची ही सुरवात आहे. आजपासून खऱ्या अर्थाने कामाला लागणार आहोत. त्यासाठी यापुढेही ज्ञातीबांधवांचे सहकार्य आवश्यक आहे, असेही ते म्हणाले. देवरुखे ज्ञातिबांधवांची जनगणना गेल्या चार महिन्यांपासून सुरू आहे. अजून काही दिवस ती सुरू राहणार आहे. आपण एकत्र राहणे महत्त्वाचे आहे. काम करताना मतभेद असले त्या त्या वेळी चर्चा करून प्रश्नस सोडवले पाहिजेत. यामुळेच आपला अधिक विकास होईल, असेही डॉ. निमकर म्हणाले. सामाजिक बांधिलकीच्या नात्याने परिषदेत शंभर जणांनी रक्तदान केले.
                विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास हा मुद्दा केंद्रस्थानी आहे. परीक्षेतील गुण महत्त्वाचे आहेतच. पण कला, क्रीडा, इतर छंद याप्रमाणे करावेसे वाटेल त्यात विद्यार्थ्यांचा परफॉर्मन्स नक्कीच चांगला असेल. परिषद यशस्वी करण्यासाठी विद्यार्थी साहाय्यक संस्थेचे विश्वस्त, कार्यकारिणी, देवरुखे विद्यार्थी वसतिगृह संस्थेचे अध्यक्ष विनोद जोशी व कार्यकारिणीचे मोलाचे योगदान लाभले. वृत्तपत्र, वृत्तवाहिन्या आणि सोशल मीडियावर परिषदेच्या बातम्यांना चांगली प्रसिद्धी मिळाल्याबद्दल डॉ. निमकर यांनी विशेष आभार मानले.
...................................

पाचव्या जागतिक देवरुखे परिषदेचे अध्यक्ष डॉ. चंद्रशेखर निमकर यांचे मनोगत पाहण्यासाठी कोकण मीडिया यूट्यूब चॅनेलच्या खालील लिंकवर क्लिक करा -

https://youtu.be/IkvDKT3o09c

Friday 30 November 2018

वेदमूर्ती जनूकाका फडके यांची जन्मशताब्दी कुर्धे-मेर्वी येथे सुरू


     
 रत्नागिरी : कुर्धे-मेर्वी गावचे माजी सरपंच वेदमूर्ती जनार्दन नारायण ऊर्फ जनूकाका फडके 
यांच्या जन्मशताब्दीच्या दोन दिवसांच्या कार्यक्रमाला आज (ता. ३० नोव्हेंबर) प्रारंभ झाला. त्यांच्या शिष्यांनी विविध धार्मिक विधींनी शताब्दी साजरी करायचे ठरविले आहे.
     
पवमान पंचसूक्त
कै. वेदमूर्ती जनार्दन नारायण फडके गुरुजी यांचा जन्म २५ नोव्हेंबर १९१८ रोजी झाला. काही काळ मेर्वी-कुर्धे ग्रामपंचायतीचे सदस्य आणि सरपंच म्हणून त्यांनी काम केले. या काळात गावातील सार्वजनिक विहिरीसह विविध सामाजिक कामे त्यांनी केली. गावातील पहिले गोबर गॅस संयंत्र स्वतःच्या घरी सुरू करून त्यांनी गावाला ऊर्जेच्या नव्या स्रोताची दिशा दिली. कुर्धे गावातील शतकोत्सवी वेदपाठशाळेत त्यांनी सुमारे २५ वर्षे ८० विद्यार्थ्यांना वेदांचे शिक्षण दिले. त्यांनी कीर्तन-प्रवचनेही केली.
     अशा या बहुआयामी व्यक्तिमत्त्वाची तिथीनुसार जन्मशताब्दी साजरी करण्यासाठी त्यांच्या वेदपाठशाळेत शिकलेल्या ५० विद्यार्थ्यांनी कुर्धे येथे दोन दिवसांच्या धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. आज पहिल्या दिवशी उदकशांत, पुण्याहवाचन, व्यासपूजा, पवमान, रुद्र, सौर, ब्रह्मणस्पती आणि रुद्रसूक्ताचा जप, वेदमूर्ती प्रभाकर पाध्ये यांचे प्रवचन, मंत्रजागर, आरती-मंत्रपुष्प, आगवे येथील मुळ्ये मंडळींचे भजन इत्यादी कार्यक्रम पार पडले. कै. फडके यांचे कुटुंबीय, स्नेही, विद्यार्थ्यांनी लिहिलेल्या आठवणींचे 'जनाशताब्दीहे पुस्तक आज प्रकाशित झाले. ज्येष्ठ लेखिका सौ. आशाताई गुर्जर, पत्रकार प्रमोद कोनकर, कै. फडके यांचे सुपुत्र प्रकाश फडके यांच्या हस्ते प्रकाशन झाले. रत्नागिरीच्या कोकण मीडियातर्फे हे पुस्तक प्रकाशित करण्यात आले आहे.
     
रुद्रावर्तने
उद्या सकाळी देवतापूजन, हवन, यतेआराधना आणि तीर्थराजपूजन होणार असून कार्यक्रमाची सांगता होईल.
........

'जनाशताब्दी’ संग्रह बुकगंगावर
..................

जनाशताब्दी हा संग्रह bookganga.com या संकेतस्थळावर ई-बुक स्वरूपात मोफत उपलब्ध करून देण्यात आला आहे. हे पुस्तक पुढील लिंकवर क्लिक करून डाउनलोड करून वाचता येईल. (बुकगंगाचा ई-बुक रीडरही डाउनलोड करावा लागेल.)




कुर्धे (ता. रत्नागिरी) : माजी सरपंच वेदमूर्ती जनूकाका फडके यांच्या जन्मशताब्दीनिमित्ताने प्रसिद्ध करण्यात आलेल्या 'जनाशताब्दी संग्रहाचे प्रकाशन करताना ज्येष्ठ लेखिका सौ. आशाताई गुर्जर, वेदमूर्ती मुंडले, प्रमोद कोनकर, प्रकाश फडके


Thursday 29 November 2018

स्कुबा डायव्हिंग पॉइंटमुळे रत्नागिरीच्या पांढऱ्या समुद्रकिनाऱ्याचा पर्यटन विकास



पांढऱ्या समुद्रकिनाऱ्यावरून सूर्यास्ताचे दर्शन
..........................................................................
      रत्नागिरी  : रत्नागिरीतील हर्षा स्कुबा डायव्हिंगचा डायव्हिंग पॉइंट आता मिऱ्याऐवजी रत्नागिरीच्या पांढरा समुद्र भागात स्थलांतरित करण्यात आला आहे. त्यामुळे डायव्हिंगसाठी येणाऱ्या पर्यटकांना समुद्राच्या शांत किनाऱ्यावरील जीवन आणि वैविध्याचा आस्वाद घेता येणार आहे. तसेच त्या भागातील पर्यटनाच्या विकासालाही चालना मिळणार आहे.
      सुमारे तीस वर्षांपूर्वी पांढरा समुद्र हे रत्नागिरीचे गजबजणारे पर्यटनस्थळ होते. मात्र त्या भागात सुकत घातली जाणारी मासळी आणि धूपप्रतिबंधक बंधाऱ्याच्या कामामुळे पांढरा समुद्र हे ठिकाण रत्नागिरीच्या पर्यटनाच्या नकाशावरून पुसले गेले. मात्र आता पुन्हा येथे पर्यटन विकासाचे प्रयत्न सुरू झाले आहेत. मासळी सुकविण्याचे केंद्र मिरजोळे येथे स्थलांतरित करण्यात आला आहे. शिवाय हर्षा स्कुबा डायव्हिंग या संस्थेने मिऱ्या गावातून आपला डायव्हिंग पॉइंट पांढऱ्या समुद्रकिनाऱ्यावर हलविला आहे.
      पांढरा समुद्र भागातील समुद्र खूप शांत आहे. या भागातील मोठ्या प्रमाणावर असलेल्या पांढऱ्या वाळूमुळे या किनाऱ्याला पांढरा समुद्र असे म्हटले जाते. सागरी आक्रमणामुनळे या किनाऱ्याची धूप होऊ नये, तेथे टेट्रॉपॉडचा धूपप्रतिबंधक बंधारा उभारण्यात आला आहे. त्यामुळे थेट समुद्राच्या लाटा या किनाऱ्यावर येत नाहीत. परिणामी हा किनारा सुरक्षित झाला आहे. या भागात पार्किंगची सुविधा असून स्थानिकांनी पर्यटकांसाठी विविध स्टॉल थाटले आहेत. लवकरच त्या भागात प्रशस्त रस्ताही होणार आहे. या किनाऱ्यावरील मुरूगवाडा, पंधरा माड येथील लोक विकासासाठी एकत्र आले आहेत. स्थानिकांनी एकत्र येऊन येथे स्टॉल मांडले आहेत. स्वच्छता केली आहे. स्कूबा डायव्हिंग पॉइंटमुळे या किनाऱ्यावर येणाऱ्या पर्यटकांची संख्या वाढली आहे. त्यांना या परिसरातील विविध प्रकारचे मासे व प्रवाळ पाहण्याची संधी मिळते. किनाऱ्यावर हजारो प्रकारचे शंख, शिंपले आढळतात. सात फूट लांबीच्या पंखाचा पसारा लाभलेल्या समुद्री गरुडाचे दर्शन या परिसरात होते. ब्राह्मणी घार, छोटे पक्षी तसेच व्हिंब्रेल, रेड शांक, ग्रीन शांक, प्लोवर, वेस्टर्न रिफ हेरॉन यासारखे अनेक स्थलांतरित पक्षीही येथे पाहायला मिळतात. रत्नदुर्ग किल्ल्याच्या भौगोलिक रचनेमुळे उत्तरेला पांढर्यास समुद्रावरील वाळूचा किनारा आहे. नारळी पौर्णिमेच्या मागे-पुढे पंधरा दिवस हा किनारा एका वेगळ्याच रूपात सजतो. रंगीबेरंगी शंख-शिंपल्यांनीही किनारा सजतो. पाऊल ठेवायलाही जागा नसते. हे शंख-शिंपले न्याहाळणे म्हणजे आनंददायी क्षण असतो. समुद्राच्या पूर्वेला काही अंतरावर मोठे कांदळवन असून त्यात जैवविविधता पद्धतीने अनुभवता येते. या खाजणात ऑक्टोपसचे दर्शनही होते, अशी माहिती पर्यावरण अभ्यासक सुधीर रिसबूड यांनी दिली.
     पांढऱ्या समुद्रकिनारी वाळू पायाला फार चिकटत नाही. रत्नदुर्ग किल्ला, दुर्मिळ औषधी वनस्पतींनी युक्त मिऱ्या डोंगर, शंखशिंपले, कांदळवनातील जैवविविधता, मत्स्यालय अशी पर्यटकांना आवडणारी अनेक स्थळे या किनाऱ्यावर असल्याने पांढरा समुद्रकिनारा पर्यटकांचे प्रमुख आकर्षण ठरणार आहे.
.............



रत्नागिरीतील हर्षा स्कुबा डायव्हिंगच्या पांढऱ्या समुद्रावरील डायव्हिंग पॉइंटवरून समुद्राच्या तळाशी गेल्यानंतर घडणारे समुद्राखालील सृष्टीचे दर्शन पाहण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.


.................
...............


हर्षा स्कुबा डायव्हिंगसाठी संपर्क - ७७१९९०५५३३९८२२२९०८५९
..........................




Tuesday 6 November 2018

‘कोकणातील जलवैभव आणि कलेचा वारसा जपायला हवा’


कोकण मीडियाच्या दिवाळी अंकाचे उक्षीच्या कातळशिल्पाजवळ प्रकाशन

उक्षी (रत्नागिरी) : ‘कोकणात सापडलेल्या कातळ-खोदचित्रांमध्ये पाणघोडा, हत्ती अशा अनेक प्राण्यांच्या प्रतिमा आहेत, ज्यातील बहुतांश प्राणी पाण्याशी निगडित आहेत. ही शिल्पे दहा हजार वर्षांपूर्वीची म्हणजेच अश्मयुगीन काळातील असल्याचा तज्ज्ञांचा अंदाज आहे. याचाच अर्थ असा, की कोकणातील जलसमृद्धीलाही एवढा इतिहास आहे,’ असे प्रतिपादन कातळ-खोद-चित्रांचे शोधकर्ते सुधीर तथा भाई रिसबूड यांनी केले. रत्नागिरीतील साप्ताहिक कोकण मीडियाच्या दिवाळी अंकाच्या प्रकाशनावेळी ते बोलत होते. कोकणातील जलवैभव, तसेच विविध कलांचा वारसा जपण्याची गरज या कार्यक्रमात मान्यवरांनी व्यक्त केली.

साप्ताहिक कोकण मीडियाच्या दिवाळी अंकाचे प्रकाशन करताना (डावीकडून) प्रमोद कोनकर, हरिश्चंद्र बंडबे, सरपंच मिलिंद खानविलकर, भाई रिसबूड, डॉ. रमेश साळुंखे आणि कांचन आठल्ये.
साप्ताहिक कोकण मीडियाच्या दिवाळी अंकाचे यंदा तिसरे वर्ष असून, यंदाच्या अंकात जलवैभव विशेष विभाग आहे. तसेच कोकणातील कातळ-खोद-चित्रांच्या ठेव्याची दीर्घ गूढरम्य शोधकथाही शोधकर्त्यांनी अंकात लिहिली आहे. याचे औचित्य साधून रत्नागिरी तालुक्यातील उक्षी येथील कातळ-खोद-चित्राजवळ वसुबारसेच्या दिवशी अंकाचे प्रकाशन करण्यात आले.


माजी अतिरिक्त जिल्हाधिकारी डॉ. रमेश साळुंखे, कातळ-खोद-चित्रांचे शोधकर्ते भाई रिसबूड, कोकण मीडियाचे संपादक प्रमोद कोनकर, ‘हर्षा हॉलिडेज’चे प्रतिनिधी कांचन आठल्ये, उक्षीचे सरपंच मिलिंद खानविलकर, उपसरपंच हरिश्चंद्र बंडबे, ग्रामविकास अधिकारी पद्मजा खटावकर, गावप्रमुख गणपत घाणेकर, मंगेश नागवेकर, अरविंद बंडबे, चंद्रकांत घाणेकर, संतोष देसाई आणि ग्रामस्थ या कार्यक्रमाला उपस्थित होते.

उक्षी गावात लोकसहभागातून संरक्षित करण्यात आलेले हत्तीचे कातळ-खोद-चित्र
‘या गावात सापडलेले हत्तीचे कातळशिल्प लोकसहभागातून संरक्षित करण्यात आले आहे. हा आदर्श जास्त लोकांपर्यंत पोहोचावा या हेतूने अंकाचे प्रकाशन उक्षी गावात करण्यात आले,’ असे संपादक प्रमोद कोनकर यांनी सांगितले. तसेच कोकणातील चांगल्या गोष्टी जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचण्याच्या उद्देशाने साप्ताहिक कोकण मीडिया कार्यरत असल्याचेही त्यांनी नमूद केले.


भाई रिसबूड यांनी या वेळी त्यांच्या शोधकार्याबद्दल थोडक्यात सांगून, ग्रामस्थांनी केलेल्या सहकार्याबद्दलही आवर्जून सांगितले. तसेच, ‘लोकसहभागातून कातळशिल्प संरक्षित केल्यामुळे गावात पर्यटक येऊ लागले. त्यामुळे चहावाल्याचा व्यवसाय वाढला. त्याचप्रमाणे पर्यटक अधिक प्रमाणात आले, तर सर्वांचाच फायदा होईल. म्हणूनच गावाची अस्मिता जपण्याची गरज आहे. गावातील तरुणच गाइड म्हणून तयार झाले, तर गावाचाच फायदा होईल,’ असे त्यांनी नमूद केले.

‘हर्षा हॉलिडेज’चे कांचन आठल्ये यांनीही हाच मुद्दा उचलून धरला आणि पर्यटकांना अशा गोष्टीच पाहण्यात रस असल्याचे आणि गावातील तरुणांनी माहिती दिल्यास ते अधिक उपयुक्त ठरेल, असे त्यांनी सांगितले.

माजी अतिरिक्त जिल्हाधिकारी डॉ. रमेश साळुंखे यांनी कातळशिल्प लोकसहभागातून संरक्षित केल्याबद्दल गावकऱ्यांचे कौतुक केले. ‘आता जग छोटे झाले आहे. त्यामुळे अमेरिकेतीलही क्षणात कळते; पण लिखित स्वरूपातील माध्यमे महत्त्वाची आहेत. तो अक्षर ठेवा आहे. कोकण मीडियाच्या माध्यमातून प्रसिद्ध होत असलेल्या विषयांचे हेच महत्त्व आहे. मिलिंद खानविलकरांसारखे उत्साही सरपंच गावाला लाभले आणि त्यांना लोकांचे सहकार्य मिळाले, त्यामुळे गावाचे नाव अजरामर झाले आहे. भाई रिसबूड यांचे कार्य अत्यंत मोलाचे आहे. त्यांच्या कार्यामुळे उक्षी गाव जगाच्या नकाशावर आले आहे. त्यांच्या म्हणण्याप्रमाणे गावातील तरुण मुलांनी गाइड होण्यासाठी प्रयत्न करावेत. अश्मयुगातील जुनी माणसे आज नसली, तरी कलेच्या रूपाने आजही ती जिवंत आहेत. अश्मयुगातील ही कला गावापुरती सीमित न राहता सर्वत्र जावी आणि पिढ्यानपिढ्या जपावी. त्यातूनच उपजीविकेचे साधनही उपलब्ध होईल. हा ठेवा जपला, तर पर्यटकांमध्येही गणपतीपुळे, पावसबरोबरच ही कला, इतिहास, संस्कृती बघण्याची आवड निर्माण होईल,’ असे डॉ. साळुंखे म्हणाले.

सरपंच मिलिंद खानविलकर यांनी आपले अनुभव सांगितले. ‘भाई रिसबुडांनी या कातळशिल्पाचे महत्त्व सांगितल्यावर आम्ही तो ठेवा जपण्यासाठी गावकऱ्यांपुढे प्रस्ताव ठेवला. गावकऱ्यांच्या सहकार्यामुळेच आम्ही तो ठेवा संरक्षित करू शकलो. कोणताही सरकारी निधी आम्ही घेतलेला नाही. कातळशिल्पाच्या माध्यमातून गावाची प्रसिद्धी झाली. अनेक माणसे येथे येत असतात. पुरातत्त्व विभागाचे संचालक तेजस गर्गे, आयुक्त जगदीश पाटील यांनीही अलीकडेच येथे भेट दिली. हा ठेवा आम्ही जतन केला, तसा आजूबाजूच्या परिसरातील लोकांनीही करावा,’ असे खानविलकर म्हणाले.

उपसरपंच हरिश्चंद्र बंडबे यांनी आभारप्रदर्शन केले.

(साप्ताहिक कोकण मीडियाचा दिवाळी अंक फक्त १२५ रुपये असून, ‘बुकगंगा डॉट कॉम’वरून अंक घरपोच मागविण्यासाठी https://www.bookganga.com/R/7X0YW येथे क्लिक करा. ‘बुकगंगा’वर अंक ई-बुक स्वरूपातही उपलब्ध आहे. ई-बुकची किंमत फक्त १०० रुपये. अंकासाठी आणि वार्षिक वर्गणीसाठी संपर्क : 9422382621)

(अंकाच्या प्रकाशनसोहळ्याची आणि उक्षीच्या कातळशिल्पाची झलक पाहा सोबतच्या व्हिडिओत...)