Sunday 20 November 2016

शहर विकासाच्या १७० योजना तीन वर्षांत पूर्ण करणार – देवेंद्र फडणवीस

रत्नागिरी : राज्यातल्या शहर विकासाच्या ८६ हजार कोटी रुपयांच्या १७० प्रलंबित योजना तीन वर्षांच्या कालबद्ध कार्यक्रमानुसार पूर्ण केल्या जाणार असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज (दि. २०) रत्नागिरीत दिली.
जिल्ह्यातल्या चार पालिका आणि एका नगर पंचायतीच्या निवडणुकीतील भाजप उमेदवारांच्या प्रचारसभेत ते बोलत होते. ग्रामीण भागातून शहरांकडे मोठ्या प्रमाणात स्थलांतर झाल्याने शहरांची अनिर्बंध वाढ झाल्याचे सांगून ते म्हणाले की, एकीकडे गावे ओस पडत असताना नियोजबद्ध विकासाच्या अभावामुळे शहरे बकाल होत आहेत. वाढते शहरीकरण म्हणजे विकासाची संधी असल्याचे मानून शहरांचा विकास करण्याचे राज्य शासनाचे धोरण आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विचारानुसार देशाच्या सकल राष्ट्रीय उत्पन्नातील ६५ टक्के वाटा शहरांकडून मिळतो. त्यामुळे शहरीकरण म्हणजे शाप समजू नये. ती एक संधी समजावी. शहरे रोजगार, आरोग्य देणारी शहरे बनवा, असे पंतप्रधानांचे म्हणणे आहे. पिण्याचे शुद्ध पाणी, घनकचरा व्यवस्थापन, सांडपाण्याचा निचरा आणि वीज इत्यादी मूलभूत सुविधा शहरांमधील नागरिकांना हव्या असतात. त्या देण्यासाठी नियोजनबद्ध विकासाची आवश्यकता आहे. राज्यात शहर विकासाचे आराखडे वर्षानुवर्षे प्रलंबित राहत असत. आधीच्या १५ वर्षांत केवळ ५० आराखडे मंजूर झाले. विलंबामुळे शहरे म्हणजे काँक्रीटची जंगले बनतात. गेल्या दोन वर्षांमध्ये मात्र ७० आराखड्यांना मंजुरी देण्यात आली आहे. रत्नागिरी शहराचे दोन टप्प्यांमधील आराखडे तीस वर्षे प्रलंबित आहेत. आता मात्र अत्यंत कमी वेळेत ते मंजूर होतील. चिपळूणच्या विकास आराखड्याला तर तब्बल दोन हजार ६०० आक्षेप घेण्यात आले. विकास आराखडे म्हणजे परस्पर सहभागाची प्रक्रिया असते. लोकांचे आक्षेप लक्षात घेऊन आराखडे मंजूर केले जातील. कोकणातील २१ हजार कोटी रुपयांच्या २७ प्रलंबित योजना येत्या दोन वर्षांत पूर्ण केल्या जातील. योजना मंजूर झाल्यानंतर एका महिन्यात निविदा प्रक्रिया आणि १०० दिवसांत वर्कऑर्डर निघाली पाहिजे. दिलेल्या निधीचा विनियोग योग्य पद्धतीने होत आहे की नाही, याचे लेखापरीक्षण त्रयस्थ यंत्रणेमार्फत केले जाणार आहे.  खेड, चिपळूण आणि राजापूरच्या पाणी योजनाही लवकरात लवकर मंजूर केल्या जातील. प्रदूषणामध्ये कारखान्यांचा वाटा अवघा दहा टक्के असतो. उर्वरित प्रदूषण शहरांमधून होते. ही स्थिती बदलण्यासाठी नथिंग इज वेस्ट, एव्हरिथिंग इज वेल्थ असे मानून काम करण्याची गरज आहे. प्रत्येक शहराचे सांडपाणी प्रक्रिया करूनच बाहेर पाठविले जाईल. घनकचऱ्यापासून खत आणि गॅसची निर्मिती करून शहरे स्वच्छ ठेवण्य़ावर भर दिला जाईल. त्यामुळे आरोग्याचा प्रश्नही निर्माण होणार नाही, असे मुख्यमंत्री म्हणाले.
रत्नागिरीसारख्या शहरात भुयारी गटार योजना राबविण्याची गरज सांगून ते म्हणाले की, शहर येत्या दोन वर्षांत वाय फाय करावे. त्याचा मोठा फायदा होतो. कारभारात पारदर्शकता राहते. भ्रष्टाचाराला वाव राहत नाही. संपूर्ण डिजिटल गव्हर्नन्सचा वापर करतानाच दोषी अधिकाऱ्यांना शिक्षेची तरतूद केली जाणार असल्याचेही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले. केंद्र सरकारच्या नोटाबंदीच्या निर्णयामुळे देश नव्या आर्थिक स्वातंत्र्याकडे वाटचाल करीत असल्याचे त्यांनी सांगितले.
केद्रात आणि राज्यात ज्या पक्षाचे सरकार असेल, त्याच पक्षाचे सरकार नगरपालिकेत असेल, तर विकास वेगाने होऊ शकतो. त्यामुळे रत्नागिरी जिल्ह्यातील मतदारांनी भाजपचे नगराध्यक्षपदाचे सर्व उमेदवार आणि नगरसेवक पदाच्या सर्व उमेदवारांना निवडून देऊन विकासाच्या प्रक्रियेत सहभागी व्हावे, असे आवाहन श्री. फडणवीस यांनी शेवटी केले.
सभेला महेंद्र मयेकर (रत्नागिरी), रवींद्र बावधनकर (राजापूर), सौ. सुरेखा खेराडे (चिपळूण) आणि मिलिंद जाडकर (खेड) हे भाजपचे जिल्ह्यातील नगराध्यक्षपदाचे उमेदवार, जिल्हाध्यक्ष बाळ माने, राज्यमंत्री रवींद्र चव्हाण, प्रदेश प्रवक्ते मधू चव्हाण इत्यादी मान्यवर उपस्थित होते.
.................................................................................................




Saturday 19 November 2016

पालिका निवडणूक प्रचारासाठी मुख्यमंत्री रविवारी रत्नागिरीत



      रत्नागिरी :  रत्नागिरी जिल्ह्यातील नगरपालिका आणि नगर पंचायत निवडणुकीच्या प्रचारासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उद्या (दि. २० नोव्हेंबर) रत्नागिरीत येत आहेत. रत्नागिरीत स्व. प्रमोद महाजन क्रीडा संकुल येथे होणार असलेल्या त्यांच्या सभेची जय्यत तयारी झाली आहे. मुख्यमंत्र्यांच्या दौर्‍यामुळे भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड उत्साहाचे वातावरण आहे.
     
मुख्यमंत्र्यांच्या दौर्‍याची तयारी अंतिम टप्प्यात असून शहरातील भाजप कार्यकर्त्यांमध्ये उत्साही वातावरण आहे. यावेळच्या निवडणुकीत भाजप स्वबळावर लढत असल्याने त्यांच्या मागे ताकद उभी करण्यासाठी मुख्यमंत्री प्रचाराला येत आहेत. जिल्ह्यात चार पालिका व एक नगरपंचायतीच्या निवडणुकीत सत्ता मिळवण्याचे उद्दिष्ट भाजपने ठेवले आहे.
      जिल्ह्यात सर्व पालिका निवडणुकीमध्ये भाजपने रणनीती आखली आहे. काही ठिकाणी अनुभवी उमेदवार असून नवोदित आणि सुसंस्कृत, सुशिक्षित उमेदवारांनाही संधी दिली आहे. मुख्यमंत्री त्यांच्या सभेमध्ये या सर्व उमेदवारांना मार्गदर्शन करणार आहेत. सबका साथ सबका विकास या ध्येयाने प्रेरित होऊन महाराष्ट्राचा विकास करण्याचे मुख्यमंत्र्यांचे उद्दिष्ट आहे. राज्य शासनाच्या योजना अधिक सक्षमतेने रत्नागिरी जिल्ह्यातही राबवण्याचे प्रयत्न आहेत. यादृष्टीने पालिकांवर सत्ता मिळवणे महत्त्वाचे असून याकरिता सुयोग्य नियोजन करण्यात आले आहे. मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यामुळे त्याला पाठबळ मिळेल, अशी अपेक्षा भाजपचे जिल्हाध्यक्ष बाळ माने यांनी व्यक्त केली.
      दरम्यान, निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर रत्नागिरीतील भारतीय जनता पक्षाचे सर्व उमेदवार व नगराध्यक्षपदाचे उमेदवार महेंद्र मयेकर यांच्या जोरदार प्रचारफेर्‍या सुरू आहेत. आता प्रत्येक प्रभागात हायटेक प्रचार करण्याचे ठरवण्यात आले आहे. प्रत्येक उमेदवार, नेत्यांच्या मुलाखती व मतदानासाठी आवाहन गाड्यांमधील एलईडी स्क्रीनवर दाखविले जात आहे. शहरासाठी केल्या जाणार्‍या नव्या योजनांची माहितीही यात दिली जात आहे. रत्नागिरी शहराच्या विकासात भाजपने यापूर्वी मोठे योगदान दिले आहे. केंद्र व राज्यातील भाजप सरकारने शहराच्या विकासासाठी नव्या योजना घोषित केल्या आहेत. नळपाणी योजना, रस्त्यांचे डांबरीकरण इत्यादींचा फायदा रत्नागिरीकरांना मिळत आहे. केंद्रातील मोदी सरकारने व विशेषतः केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी लक्ष घातल्यामुळे मुंबई-गोवा महामार्गाचे चौपदरीकरण सुरू आहे. तसेच कोकणचे खास व केंद्रीय रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांच्या कल्पकतेमुळे कोकण रेल्वेचे दुपदरीकरण सुरू झाले आहे. कोकण विकासासाठी भाजप सरकारच महत्त्वाची भूमिका बजावत आहे, हे यातून सिद्ध होत आहे. त्याचा भाजपला नक्कीच उपयोग होईल व भाजप स्वबळावर सत्ता मिळवेल, असा दावा भाजपचे शहराध्यक्ष प्रशांत डिंगणकर व सरचिटणीस उमेश कुळकर्णी यांनी केला.
      रत्नागिरी जिल्ह्यातील ४ नगरपालिका आणि एका नगरपंचायतीच्या निवडणुकीतही भाजप सत्ता मिळवण्यासाठी जोरदार प्रयत्न करत आहे. मतदारांपर्यंत पोहोचून माहिती सांगणे, विकासयोजना पोहोचवणे, जाहीरनामा सांगणे असा प्रचार सुरू आहे. मुख्यमंत्र्यांची सभा हायटेक प्रचारातून प्रचाराला खरी धार येणार आहे. त्यामुळे भाजप प्रत्येक प्रभागात हायटेक प्रचार सुरू करत आहे. मुख्यमंत्र्यांच्या सभेनंतर हा प्रचार सुरू होणार आहे. आता निवडणुकीसाठी एकच आठवडा शिल्लक राहिला आहे. त्यामुळे रात्रीचा दिवस करून प्रचार करण्यात कार्यकर्ते मग्न आहेत.
..........


सभेचे थेट प्रक्षेपण
      पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी चालू केलेल्या डिजिटल इंडिया उपक्रमाचा आविष्कार रत्नागिरीतही घडणार आहे. मुख्यमंत्र्यांच्या सभेचे थेट प्रक्षेपण सकाळी ११ वाजल्यापासून मोबाइलद्वारे कोठेही पाहता येणार आहे. त्याकरिता मोबाइलधारकांना  http://185.105.4.126/tgc  या लिंकवर लॉग इन करावे. ही सुविधा उपलब्ध करून देणारे ग्लोबल कनेक्ट सर्व्हिसेसचे प्रतिनिधी सचिन घोलप यांनी ही माहिती दिली.
.......................
मुख्यमंत्र्यांच्या सभेसाठी तयार करण्यात आलेला मंडप



Tuesday 25 October 2016

कोकणाच्या इतिहासाचा मागोवा नव्या पिढीने घ्यावा - ॲड. विलास पाटणे


रत्नागिरी – कोकण मीडियाच्या दिवाळी विशेषांकाच्या प्रकाशन समारंभात बोलताना
ॲड. विलास पाटणे, प्रमोद कोनकर, डॉ. किशोर सुखटणकर, प्रा. डॉ. रमेश कांबळे

-    प्रकाशन समारंभाला उपस्थित रसिक.
कोकण मीडियाच्या दिवाळी विशेषांकाचे प्रकाशन

रत्नागिरी : कोकणातील ऐतिहासिक घटनांचा मागोवा कोकण मीडियाच्या दिवाळी अंकाने घेतला आहे. पण ऐतिहासिकदृष्ट्या समृद्ध कोकणाच्या इतिहासाचा मागोवा नव्या पिढीने घ्यायला हवा, अशी अपेक्षा रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीचे कार्याध्यक्ष ॲड. विलास पाटणे यांनी येथे व्यक्त केली. साप्ताहिक कोकण मीडियाच्या दीपोत्सव विशेषांकाच्या प्रकाशनाचा सोहळा मंगळवारी (२५ ऑक्टोबर २०१६) महाविद्यालयाच्या कॉन्फरन्स हॉलमध्ये झाला. त्या वेळी अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. या वेळी प्राचार्य डॉ. किशोर सुखटणकर, साप्ताहिक कोकण मीडियाचे संपादक प्रमोद कोनकर, महाविद्यालयाच्या इतिहास विभागाचे प्रमुख प्रा. डॉ. आर. एच. कांबळे, तसेच महाविद्यालयातील प्राध्यापक, विद्यार्थी आणि नागरिक उपस्थित होते. या कार्यक्रमाचे फेसबुकद्वारे लाइव्ह प्रसारणही करण्यात आले.

ॲड. पाटणे पुढे म्हणाले, की मराठी माणसाला नाटके आणि दिवाळी अंकांचे वेड आहे. हे वेड पुरविलेही जाते. कोकण मीडियाच्या दिवाळी अंकानेही त्यात चांगली भर टाकली आहे. अंकात कोकणातील घटना आणि व्यक्तींचा समावेश आहे, हे स्तुत्यच आहे. पण त्यानिमित्ताने आणखी अनेक बाबींचा उल्लेख करावासा वाटतो. मूळचे राजापूर येथील आचार्य भागवत यांनी विवेकानंदांना संस्कृत शिकविले होते. रत्नागिरीच्या जिल्हा न्यायालयाला दीडशे वर्षे झाली  आहेत. या न्यायालयात डॉ. बाबासाहेब आंबेडकर, प्र. के. अत्रे येऊन गेले. सेनापती बापट यांच्याविरुद्धचा खटला या न्यायालयात चालला. रवींद्रनाथ टागोरांचे भाऊ जिल्हा न्यायाधीश होते. त्यानिमित्ताने रवींद्रनाथ रत्नागिरीत दहा दिवस मुक्कामाला होते. सुभाषचंद्र बोस यांचे सेनापती जगन्नाथराव भोसले सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडीचे होते. रत्नागिरी जिल्ह्यातल्या दाभोळ बंदराला साडेपाच हजार वर्षांचा इतिहास आहे. अशा अनेक गोष्टी कोकणात घडल्या आहेत. नव्या पिढीने त्याचा अभ्यास करायला हवा. चुकीच्या इतिहासाची पुनरावृत्ती होऊ नये, यासाठी इतिहास शिकायला हवा.

प्राचार्य डॉ. किशोर सुखटणकर म्हणाले, आज आपण फ्लॅट संस्कृतीत राहतो; पण जुन्या काळातली, मामाचं गाव अशी संकल्पना जपलेली काही घरं आजही कोकणात आहेत, याची माहिती साप्ताहिक कोकण मीडियाच्या दिवाळी अंकातून मिळते. हा अंक म्हणजे कोकणाबद्दलच्या सर्व ऐतिहासिकदृष्ट्या महत्त्वाच्या गोष्टींचा एकत्रित असा दस्तऐवज आहे. आजच्या सोशल मीडियाच्या जगात प्रिंट मीडियाचा वारसा चालवण्यासाठी कोनकर यांनी हे साप्ताहिक सुरू केले आहे. त्यांच्या या दिवाळी अंकात कोकणातल्या कला, शास्त्र, संस्कृती, इतिहास, व्यक्तिमत्त्वे, पूर्वीचा काळ आणि येणारा काळ अशा सगळ्या विषयांवर अभ्यासपूर्ण लेख आहेत. आपण जेव्हा बाहेर जाऊ, तेव्हा कोकणाच्या संदर्भासाठी हा अंक जवळ असण्याची गरज आहे.

आपल्याकडचे वेगवेगळे लोक चांगले काम करत असतात. कोकणातही एक महत्त्वाची संस्था या नात्याने हे काम लोकांपर्यंत पोहोचवणे हे आमचे कर्तव्य आहे. याच भावनेतून आम्ही आमच्या संस्थेत हा साप्ताहिक कोकण मीडियाच्या दिवाळी अंकाच्या प्रकाशनाचा कार्यक्रम करतो आहोत,' अशी भूमिका इतिहास विभागप्रमुख डॉ. आर. एच. कांबळे यांनी मांडली. कोकणात घडलेल्या महत्त्वाच्या ऐतिहासिक घटना-घडामोडींची माहिती देणारे विस्तृत लेखन डॉ. कांबळे यांनी या अंकात केले आहे.

'दिवाळी अंकांना १०८ वर्षांची परंपरा आहे. 'मनोरंजन'चा पहिला दिवाळी अंक निघाला होता, त्यात सावंतवाडीची एक पानभर जाहिरात होती. त्यामुळे पहिल्या अंकापासूनच कोकणाचा सहभाग यात होता. बाळशास्त्री जांभेकरांनी पहिले मराठी वर्तमानपत्र सुरू केले. तेही मूळचे कोकणातलेच. अशी ही परंपरा पुढे नेण्याचा प्रयत्न म्हणून हे साप्ताहिक सुरू केलं आहे. आतापर्यंतचा कोकणाचा इतिहास असं सांगतो, की अनेक व्यक्ती कोकणातून बाहेर गेल्यानंतर त्यांनी नाव कमावलं. 'विको'च्या पेंढरकरांपासून आणखी अनेक क्षेत्रांतील नामवंत व्यक्तींची नावं त्यात सांगता येतील. अर्थात त्या वेळी कोकण आर्थिकदृष्ट्या किंवा अन्य सर्वच बाबींत मागास असल्यामुळे तशी वेळ आली होती. आज मात्र परिस्थिती बदलली आहे. आज रेल्वेपासून सगळी दळणवळणाची साधने कोकणात आहेत. कोकण आर्थिक मागास नाही. त्यामुळे कोकणातच काही तरी सुरू करण्याच्या उद्देशानं हा उपक्रम सुरू केला आहे,' असे प्रतिपादन प्रमोद कोनकर यांनी केले.

आपल्याला मुंबई-पुण्यातल्या साहित्यावरच अवलंबून राहावे लागते. तिकडची वृत्तपत्रे, अन्य साहित्य आपल्याकडे येते. ते यावेच; पण आपल्याकडेही देण्यासारखे बरेच काही आहे, ते मुंबई, पुणे, कोल्हापूर अशा वेगवेगळ्या ठिकाणी जावे या उद्देशाने साप्ताहिक कोकण मीडिया सुरू करण्यात आले आहे,' अशी भूमिका कोनकर यांनी मांडली.
.............
साहित्य ऑडिओ रूपातही

पालघरपासून सिंधुदुर्गापर्यंत पसरलेल्या संपूर्ण कोकणाला वाहिलेले साप्ताहिक कोकण मीडिया ज्येष्ठ पत्रकार प्रमोद कोनकर यांनी सुरू केले आहे. दीपोत्सव विशेषांकाच्या रूपाने त्याचा पहिला अंक प्रकाशित करण्यात आला. कोकणात गेल्या शतकात आणि त्यापूर्वी घडलेल्या महत्त्वाच्या घटना-घडामोडी, होऊन गेलेली लोकोत्तर व्यक्तिमत्त्वे, ऐतिहासिक वारसा असलेल्या वास्तू यांचा आढावा घेणाऱ्या 'मागोवा - शतकाचा, शतकापूर्वीचा' या संकल्पनेवर हा दिवाळी अंक आधारित आहे. या अंकातील निवडक साहित्य, कोकणातील प्रादेशिक बोलींतील कविता वेबसाइटवर (kokanmedia.webs.com) उपलब्ध करून  देण्याचा अनोखा प्रयोगही करण्यात आला आहे. त्यातील एक कविताही कार्यक्रमात उपस्थितांना ऐकवण्यात आली.