Friday 15 April 2016

मठ येथील लक्ष्मीपल्लीनाथाची शनिवारी चतुःषष्टी राजोपचार पूजन



रत्नागिरी  :  मठ (ता. लांजा) येथील श्रीलक्ष्मीपल्लीनाथ मंदिराच्या पहिल्या वर्धापनदिनाच्या निमित्ताने उद्या (दि. १६) चतुःषष्टी राजोपचार पूजन होणार आहे.
पल्लीनाथाच्या कुलोपासकांनी मठ येथे दोन एक जागा घेऊन तेथे चार वर्षांपूर्वी स्वतंत्र मंदिर उभारायचे ठरविले. त्यानुसार मंदिराचा गाभारा, कळस आणि मंडपाचे काम पूर्ण झाले आहे. गेल्या वर्षी मंदिरात पंचकुंडी यज्ञासह प्राणप्रतिष्ठा करण्यात आली. या मंदिराचा पहिला वर्धापनदिन शनिवारी साजरा करण्यात येणार आहे. षोडशोपचार पूजनानंतर राजोपचार पूजा केली जाते. त्यामध्ये मंगलाचरण, गायन, कीर्तन, नाट्य आदी कलांचा आविष्कार, तसेच छत्र, चामरांसह हत्ती, घोडे, रथातून मिरवणूक काढली जाते. पूर्वी राजेरजवाडे आणि संस्थानिकांकडे असे पूजन केले जात असे. आता दुर्मिळ झालेल्या राजोपचाराद्वारे पल्लीनाथाचे पूजन केले जाणार आहे.
वर्धापनदिनानंतर दुसऱ्या दिवशीपासून सहा दिवस पल्लीनाथाचा शतकोत्सवी चैत्रोत्सव १७ एप्रिलपासून सुरू होत असून तो २२ एप्रिलपर्यंत चालणार आहे. त्यासाठी पंचायतन याग, सौरयाग, मंत्रजागर, रुद्रस्वाहाकार, गणेशयाग, लघुविष्णु स्वाहाकार,  दत्तयाग आणि नवचंडी असे धार्मिक कार्यक्रम तसेच कीर्तन-प्रवचनाचे कार्यक्रमा आयोजित करण्यात आले आहेत. या सर्व कार्यक्रमांना उपस्थित राहण्याचे आवाहन लक्ष्मीपल्लीनाथ संस्थानतर्फे करण्यात आले आहे.

रत्नागिरीतील संस्कृत पाठशाळेचा रविवारपासून शतक महोत्सव



रत्नागिरी :  रत्नागिरीतील गोविंद कृष्ण रानडे संस्कृत पाठशाळा शतक महोत्सव साजरा करत असून त्यानिमित्ताने दोन दिवसांच्या कार्यक्रमाचे आयोजन येत्या रविवारपासून (दि. १७ एप्रिल) करण्यात आले आहे. पाठशाळेच्या विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष वैद्य रघुवीर भिडे यांनी आज (दि. १५ एप्रिल) पत्रकार परिषदेत ही माहिती दिली.
रत्नागिरीच्या वेदशाळेत १९१४ साली पाठशाळेची सुरवात झाली. गोविंद कृष्ण रानडे यांच्या भरीव देणगीतून विश्वस्त मंडळाने २२ जून १९१६ रोजी संस्कृत पाठशाळेची रीतसर नोंदणी केली. त्याला शंभर वर्षे पूर्ण होत असून त्यानिमित्ताने दोन दिवसांच्या विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
पहिल्या दिवशी दुपारी साडेतीन वाजता सत्कार समारंभ, स्मरणिका प्रकाशन आणि निबंध स्पर्धेचे पारितोषिक वितरण रत्नागिरीचे नगराध्यक्ष महेंद्र मयेकर आणि पुण्यातील संस्कृत विद्वान पं. शिवराम कृष्ण धायगुडे यांच्या प्रमुख उपस्थितीत होईल. सायंकाळी ६ वाजता चिपळूणचे धनंजय चितळे यांचे भाषासु मुख्या मधुरा या विषयावर प्रवचन होईल. सोमवारी (दि. १८ एप्रिल) सकाळी वास्तुशांत, सत्यनारायण पूजा, सायंकाळी ५ वाजता हभप प्रा. नरहर चिंतामणी अपामार्जने यांचे कीर्तन होईल. या सर्व कार्यक्रमांना उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
गुरुपरंपरेनुसार बाळशास्त्री गाडगीळ, व्याकरणाचार्य पुरुषोत्तम नारायण फडके, व्याकरणरत्न बाळकृष्णशास्त्री हर्डीकर, काव्यतीर्थ दामोदर गोपाळ जोशी, काव्यतीर्थ विनायक नारायण पोखरणकर इत्यादी विद्वानांनी पाठशाळेत संस्कृत अध्यापन केले. कालौघात गुरुपरंपरा आणि संस्कृतचे अध्यापनही पाठशाळेत होत नाही. मात्र पाठशाळेच्या शतकोत्सवाच्या औचित्याने संस्कृत शिकू इच्छिणाऱ्या सर्वांसाठी प्रशिक्षण वर्ग सुरू केले जाणार आहेत. शाळामहाविद्यालयांमध्ये मराठी माध्यमातून संस्कृत शिकविले जाते. अभ्यासक्रमानुसार प्रश्नोत्तरेही मराठीतच दिली जातात. त्यामुळे हमखास गुण मिळवून देणारा विषय एवढेच संस्कृतचे महत्त्व राहिले आहे. परिणामी मूळ संस्कृत ग्रंथ वाचले आणि अभ्यासले जात नाहीत. त्यासाठी पाठशाळेतर्फे प्रयत्न केले जाणार आहेत. मूळ संस्कृत भाषेचे ज्ञान घेण्याची प्रवृत्ती वाढावी, यासाठी हे प्रयत्न असल्याचे पत्रकार परिषदेत सांगण्यात आले. पाठशाळेत जुने २०० संस्कृत ग्रंथ असून त्यापैकी सुमारे ५० ग्रंथ दुर्मिळ आणि जीर्ण झाले आहेत. त्या सर्वांचे डिजिटायझेशन केले जाणार आहे. त्या सर्व प्रकल्पांसाठी संस्कृतप्रेमींनी सहकार्य करावे, अशी अपेक्षाही यावेळी व्यक्त करण्यात आली.
पत्रकार परिषदेला प्रा. कल्पना आठल्ये आणि श्री. श्रीकृष्ण जोशी उपस्थित होते.

Sunday 10 April 2016

मठ येथील लक्ष्मीपल्लीनाथाचा शतकोत्सवी चैत्रोत्सव १७ पासून


       रत्नागिरी :  मठ (ता. लांजा) येथील श्रीलक्ष्मीपल्लीनाथाचा शतकोत्सवी चैत्रोत्सव येत्या १७ एप्रिलपासून सुरू होत असून तो २२ एप्रिलपर्यंत चालणार आहे.
लक्ष्मीपल्लीनाथ हे जागृत देवस्थान असून तो चाळीस कुळांचा स्वामी आहे. मूळ मंदिरात सेवा करताना येणाऱ्या अडचणींमुळे पल्लीनाथाच्या कुलोपासकांनी मठ येथे दोन एक जागा घेऊन तेथे चार वर्षांपूर्वी स्वतंत्र मंदिर उभारायचे ठरविले. त्यानुसार मंदिराचे काम पूर्णत्वाकडे आले आहे. मंदिराचा गाभारा म्हैसूरमधील ग्रॅनाइटमध्ये, तर रेखीव कळसाचे काम कोकणातील जांभ्या दगडात करण्यात आले आहे. गेल्या मंदिरात पंचकुंडी यज्ञासह प्राणप्रतिष्ठा करण्यात आली. या मंदिराचा वर्धापनदिन १६ एप्रिल रोजी साजरा करण्यात येणार आहे.
पल्लीनाथाचा चैत्रोत्सव १९१५ साली सुरू झाला. यावर्षी उत्सवाचा शतकोत्सव साजरा होत आहे. त्यासाठी पंचायतन याग आणि चतुःषष्टी राजोपचार पूजा केली जाणार आहे. रविवारी (ता. १७) सौरयाग आणि मंत्रजागराने उत्सवाला प्रारंभ होईल. त्यानंतर वेगवेगळ्या दिवशी रुद्रस्वाहाकार, गणेशयाग, लघुविष्णु स्वाहाकार, दत्तयाग आणि नवचंडी असे धार्मिक कार्यक्रम आणि २२ एप्रिल रोजी रात्री साडेनऊ वाजता स्वप्नील गोरे (सावंतवाडी) यांचा अभंग आणि नाट्यगीतांचा कार्यक्रम होईल. उत्सवकाळात रात्री कैलासबुवा खरे (रत्नागिरी) आणि मकरंदबुवा रामदासी (पुणे) यांची कीर्तने होणार आहेत. शास्त्र काय सांगते या विषयावर १९ एप्रिल रोजी विवेकशास्त्री गोडबोले (सातारा) यांचे प्रवचन होणार आहे. अखेरच्या दिवशी २३ एप्रिल रोजी पहाटे पाच वाजता मकरंदबुवा रामदासी यांचे लळिताचे कीर्तन होऊन उत्सवाची सांगता होईल.
      चैत्रोत्सवाला उपस्थित राहण्याचे आवाहन लक्ष्मीपल्लीनाथ संस्थानतर्फे करण्यात आले आहे.
      उत्सवकाळात निवासाची व्यवस्था, वैयक्तिक श्रीपूजा, अभिषेक, लघुरुद्र आदी उपासना कार्यक्रमासाठी उत्सवापूर्वी किमान आठ दिवस संपर्क साधावा. संपर्कासाठी दूरध्वनी क्र. : (०२३५२) २४९०११, २४९३६४. मोबाइल क्र. – ९४२२६४६७६५, ७८७५८९३२९, ७८७५९९३६९९.

Monday 4 April 2016

संस्कृतपंडित दा. गो. जोशी यांचे निधन

रत्नागिरी : येथील विख्यात संस्कृत पंडित दामोदर गोपाळ जोशी (वय ९९) यांचे रविवारी (ता. ३ एप्रिल) रात्री राहत्या घरी निधन झाले. ते शेवटपर्यंत सक्रिय होते. आज सकाळी चर्मालय अमरधाम येथे जोशी यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
कै. जोशी यांचा संस्कृत, पाली, मोडी भाषांचा सखोल अभ्यास होता. ते मूळचे बेळगावजवळील कोवाड गावचे. इचलकरंजी येथील पाठशाळेत सुरुवातीचे शिक्षण झाल्यावर त्यांनी काव्यतीर्थ ही पदवी संपादन केली. रत्नागिरीच्या पटवर्धन हायस्कूलमध्ये त्यांनी ३२ वर्षे संस्कृतचे अध्यापन केले. निवृत्तीनंतरही अनेक वर्षे ते शालेय, महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना उत्तम मार्गदर्शन करीत होते. संस्कृत पाठशाळेमध्येही ते अनेक काळ अध्यापन करत होते. त्यांनी वाई येथे तीन वर्षे धर्मकोशाचे उपसंपादक म्हणून काम केले. रत्नागिरी कऱ्हाडे ब्राह्मण संघाच्या समितीत ते कार्यरत होते. काही काळ उपाध्यक्ष म्हणूनही त्यांनी काम केले. ते सतत व्यासंगरत होते. उत्तरायुष्यात त्यांनी श्रीमद्शंकराचार्यांच्या गीताभाष्याचे मराठीत भाषांतर सुंदर हस्ताक्षरात लिहिले. ते आता ते प्रकाशनाच्या वाटेवर आहे. सन १९९४ मध्ये महाराष्ट्र शासनाने दा. गो. जोशी यांचा संस्कृत विद्वान म्हणून सत्कार केला होता. २०१३ मध्ये कोजागिरी पौर्णिमेला सांगलीच्या पु. ना. गाडगीळ शाखेनेनेही संस्कृत विद्वान म्हणून मानपत्र देऊन सत्कार केला होता.
कै. जोशी यांच्या पश्चात मुलगा, सून, मुलगी, चार विवाहित मुली, नातवंडे, पतवंडे असा मोठा परिवार आहे.

Sunday 3 April 2016

पर्यावरण आणि पर्यटन विकास साधणारा गिधाड संवर्धन प्रकल्प



दिसायला किळसवाणा तरीही स्वभावाने खूपच शांत असलेला आणि सध्या दुर्मिळ होणारा पक्षी म्हणजे गिधाड.  या पक्ष्याचे संवर्धन रायगड जिल्ह्यातील म्हसळा तालुक्यात होत आहे. सिस्केप या संस्थेचे प्रमुख प्रेमसागर मेस्त्री याने गिधाडांची संख्या नेसर्गिक पद्धतीने वाढविण्याची चळवळ उभी करून तेथील जंगल टिकविण्याचे काम केले आहे. हेच काम आता पर्यावरण संतुलनासाठी मार्गदर्शक ठरत आहे.

      श्रीवर्धनला जाताना म्हसळ्याच्या अलीकडेच देहेण, भापट परिसरातून वर पाहिले तर आकाशात घिरट्या घालणारा पक्ष्यांचा थवा नजरेत येतो. तो पक्षी म्हणजे गिधाड.  म्हसळा तालुक्यातील चिरगाव-बागेची वाडी हे सध्या गिधाडांचे आश्रयस्थान बनले आहे. या चिरगाव-बागेची वाडी येथील ३२.२१ हेक्टर क्षेत्रफळातील व समुद्रसपाटीपासून ३५० ते ४५० फूट उंचीवर असलेल्या जंगलात सातवीण, आंबा, अर्जुन, बेहडा, शेडाम, वनभेंड, इरडा या जातीच्या उंच व दरीच्या कठड्यावरील झाडांवर गिधाडांची सुमारे २५ घरटी पाहायला मिळतात. घरट्याच्या आसपास २०-२२ गिधाडांचा वावर आणि आकाशात ३५-४० गिधाडांचा विहार पाहायला मिळतो. म्हसळा वनखाते आणि चिरगाव-बागेची वाडी येथील ग्रामस्थ यांच्या सहकार्यातून महाडच्या सिस्केप संस्थेचे प्रमुख प्रेमसागर मेस्त्री यांनी १३ वर्षापासून गिधाड संवर्धनाची नैसर्गिक मोहीम राबविल्याने सध्या गिधाडांच्या संख्येत वाढ झालेली दिसून येत आहे.
        पक्षीमित्र व  सिस्केप संस्थेचे अध्यक्ष प्रेमसागर मेस्त्री यांनी सांगितले की भारत देशातून गिधाडांची ९७ टक्के संख्या संपलेली आहे. उरलेल्या तीन टक्के गिधाडांच्या जातींमध्ये लाँगबील व्हल्चर व व्हाईटबॅक व्हल्चर या दोन जाती रायगड जिल्ह्यात सापडतात. म्हसळा तालुक्यातील चिरगाव या गावातील जंगलात व्हाईटबॅक व्हल्चर म्हणजे पांढऱ्या पाठीचा गिधाड या जातीच्या गिधाडावर काम सुरू आहे. २००० ते २००४ मध्ये चिरगाव येथे पांढ-या पाठीच्या गिधाडांच्या वसाहतीचा शोध लागला. त्यावेळी या गिधाडांची दोन घरटी आढळली. आजमितीस या गिधाडांच्या घरट्यांची संख्या 24 झाली आहे तर या जातीची एकूण गिधाडांची संख्या १५० पर्यंत पोहोचलेली दिसून येते. ही संख्या आणि इथले जंगल वाढवण्यात इथल्या ग्रामस्थांनी व विशेषत तत्कालीन सरपंच किशोर घुलघुले यांचे अथक प्रयत्न उपयोगी पडले आहेत. झाडांची संख्या वाढल्याने झाडांवर घरटी वाढविण्यात गिधाडांना शक्य झाले. वेळोवेळी संस्थेच्या माध्यमातून मृत जनावरांचा पुरवठा केल्यामुळे त्यांच्या विणीच्या हंगामात पिलांना चार ते सात दिवसात पुरेसे अन्न मिळू लागले. पूर्वी स्वच्छतेच्या नावाखाली ढोरटाकी बंद केल्यामुळे त्यांना मृत जनावरे मिळत नव्हती. येथील संवर्धनाचे वैशिष्ट्य म्हणजे या गिधाडांना बंदिस्त न करता त्यांना निसर्गात विहरू दिले जाते. त्यांना त्यांचे खाद्य नैसर्गिक पद्धतीने भक्षण करण्यास दिल्यामुळे हा बदल दिसून आला आहे असेही मेस्त्री यांनी सांगितले.
        
गेली तेरा वर्षे नियमितपणे या गिधाडांना अन्न पुरविण्याचे काम सिस्केप संस्थेने केले आहे. २०० किलोमीटरच्या अंतरात कोठेही जनावर मृत झाले तर सिस्केप संस्थेला याची कल्पना दिली जाते. सिस्केप संस्थेचे सदस्य या मृत जनावरांची रीतसर परवानगी घेत वाहतूक करून चिरगाव येथील नव्याने निर्माण केलेल्या ढोरटाकीवर गिधाडांसाठी टाकली जातात. यात स्थानिक ग्रामस्थांची मदतही होते. गिधाडांना अन्न पुरविण्याच्या कामी संस्थेने अनेक दात्यांकडून तर कधी स्वतःच्या खिशाला चाट देऊन गिधाडांसाठी जिवापाड मेहनत घेतली. लाखो रुपये याकरिता प्रेमसागर मेस्त्री यांनी पैसे जमविले आणि संपविले.
         चिरगावच्या ग्रामस्थांनी सिस्केपच्या या उपक्रमाला पहिल्यापासून साथ दिली. या गावातील ही देवरहाटी म्हणजे देवराई काही प्रमाणात त्यांनी जपली परंतु गावाशेजारील भागातील इतर ग्रामस्थांनी त्यांची जमीन वृक्षतोड करणाऱ्यांना दिल्याने आजूबाजूचे पठारावरील जंगल कमी झालेले दिसते. पण वाढत्या गिधाडांमुळे चिरगाव जगाच्या नकाशात ठळक दिसेल म्हणून आता सर्वच ग्रामस्थांनी सहकार्य करण्याचे ठरविले आहे.
       चिरगावचे माजी सरपंच किशोर घुलघुले यांनी सांगितले की सागर मेस्त्री यांनी सांगितल्यावर आम्हाला कळले की हा गिधाड पक्षी आहे म्हणून. आम्हाला या पक्ष्याविषयी काहीच माहिती नव्हती. पण याचे पर्यावरणाला मिळणारे साह्य ऐकून आम्हीदेखील सागर मेस्त्री यांना सहकार्य करण्याचे ठरविले. सागर मेस्त्री यांना इथे राहण्यासाठी आमच्या गावकीची खोलीदेखील दिली होती. या ठिकाणी येऊन त्यांनी भरपूर अभ्यास केला. त्यांच्या कामात माझा मुलगादेखील नोंदी ठेवायचा. अशा पद्धतीने सर्व ग्रामस्थांनी या कामात संस्थेला खूप मदत केली असल्याची माहिती घुलघुले यांनी व मुंबईला असणारे राजेश बारे यांनी सांगितली.
          गिधाडांना बंदिस्त जाळीत न ठेवता नैसर्गिक पद्धतीने त्यांच्या विणीच्या हंगामात त्यांना योग्य आहार देऊन त्यांची संख्या वाढविण्याचा हा उपक्रम सध्या देशातील पहिला उपक्रम ठरत आहे. या गिधाडांच्या संख्येत होणारी वाढ तेथील पर्यावरणाचा समतोल राखला जातोय हे निश्चित. त्यामुळे आता हा समतोल पुढे कितीतरी वर्षे तसाच राखला पाहिजे. भविष्यात या ठिकाणी गिधाड संवर्धन व माहिती केंद्राची स्थापना होणार असून जैवविविधतेसंबंधी पर्यटनातून या गावाचा विकास करण्याचा सिस्केप संस्थेचा विचार आहे. महिलांकडे न्याहारी व भोजन व्यवस्था देऊन त्यांच्या बचत गटाला बळकटी देण्याच्या दृष्टीने संस्था एक पाऊल पुढे टाकणार असून यात  विविध महिलांना शिलाई मशीनचे वाटप करून कागदी व कापडी पिशव्यांचा उद्योग देऊन पर्यावरण रक्षक बनविण्याचे कामही संस्था करणार आहे. देश-विदेशातून या कामाची पाहणी करण्यासाठी यातील अभ्यासक येत  असतात. त्यांच्या येण्याचा फायदा येथील ग्रामस्थांना कसा होईल याचाही विचार संस्था करीत आहे. गावातील बारा महिने वाहणाऱ्या अखंड झऱ्याचा उपयोग करून येथील स्वावलंबन बळकट केले जाणार आहे.
प्रेमसागर मेस्त्री यांच्या बरोबर ठाणे येथील पर्यावरणअभ्यासक सुहास जावडेकर यांनीही काम करण्याचे ठरविले आहे. या गिधाड संवर्धन प्रकल्पाला आर्थिक सहाय्य करण्याचे आवाहन प्रेमसागर मेस्त्री यांनी केले आहे.
.........
संपर्क - प्रेमसागर मेस्त्री - 9657864290