Wednesday 25 November 2015

अण्णा शिरगावकरांचे कार्य समाजाला दिशा देणारे



डॉ. सुभाष देव : यशवंतराव चव्हाण गौरव पुरस्कार प्रदान



रत्नागिरी : ``पुराणपुरुष अण्णा शिरगावकर यांनी ध्येयाने प्रेरित होऊन केलेले कार्य समाजाला निश्चित दिशा देणारे आहे``, असे गौरवोद्गार रत्नागिरीच्या गोगटे-जोगळेकर महाविद्यालयाचे माजी प्राचार्य डॉ. सुभाष देव यांनी आज येथे काढले.
मुंबईतील यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानतर्फे विभागीय स्तरावर प्रथमच सुरू झालेला यशवंतराव चव्हाण गौरव पुरस्कार दाभोळ (ता. दापोली) येथील इतिहाससंशोधक अण्णा शिरगावकर यांना प्रदान करण्यात आला. पंधरा हजार रुपये रोख आणि मानपत्र असे पुरस्काराचे स्वरूप होते. पटवर्धन हायस्कूलच्या नाटेकर सभागृहात झालेल्या या समारंभात प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. देव बोलत होते. यावेळी प्रतिष्ठानचे विभागीय अध्यक्ष राजाभाऊ लिमये, उपाध्यक्ष डॉ. श्रीरंग कद्रेकर, जिल्हाध्यक्ष बापू काणे, माजी प्राचार्य डॉ. सुरेश जोशी, भारत शिक्षण मंडळाचे कार्याध्यक्ष विनायक हातखंबकर इत्यादी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते. डॉ. देव यांनी यावेळी यशवंतराव चव्हाण यांची राजकीय आणि साहित्यिक कामगिरी विशद केली. त्यांचे कृष्णाकाठ हे दोन भागांतील आत्मचरित्र राजकीय आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी सतत समोर ठेवावे, असे आवाहन त्यांनी केले. अण्णा शिरगावकर यांनी इतिहासाच्या संशोधनासाठी केलेल्या धडपडीचाही त्यांनी आढावा घेतला. समाजासाठी कार्य करणाऱ्या अशा व्यक्तींना पाठबळ देण्याचे काम संस्थांनी करायचे असते. अण्णांना पुरस्कार देऊन यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानने ते केले आहे, असेही डॉ. देव म्हणाले.
अण्णा शिरगावकर यांना मानपत्र प्रदान करण्यात आले.
समाजसेवेची प्रेरणा आपल्याला आईकडून मिळाल्याचे प्रारंभी नमूद करून सत्काराला उत्तर देताना अण्णा शिरगावकर म्हणाले, ``स्वातंत्र्यासाठी लढा देणारे आपले अनेक पूर्वज फाशी गेले, तुरुंगात गेले. अनेक हालअपेष्टा त्यांनी सोसल्या. त्या काळात पुरस्कार नव्हते. त्यांचे वाढदिवस साजरे होत नव्हते. आजकाल मात्र कोणाचे ना कोणाचे पुरस्कार आणि वाढदिवस सतत सुरूच असतात. त्यामुळे खरे समाजकार्य करणारे दुर्लक्षितच राहतात. पण समाजसेवेची दखल घेणारे आजही आहेत, याचे समाधान वाटते. शेवटपर्यंत कार्यरत राहायची माझी इच्छा आहे.``
डॉ. श्रीरंग कद्रेकर यांनी प्रास्ताविक केले. प्रतिष्ठानतर्फे विभागीय स्तरावर प्रथमच सुरू झालेल्या यशवंतराव चव्हाण पुरस्काराविषयी तसेच प्रतिष्ठानच्या कोकण विभागाने आयोजित केलेल्या दोन दिवसांच्या गीतारहस्य चर्चासत्राविषयी माहिती दिली. या चर्चासत्रातील निबंध संकलित केलेल्या पुस्तकाचे प्रकाशन यावेळी करण्यात आले. हे चर्चासत्र आणि पुस्तकाच्या प्रकाशनाविषयीची माहिती पुस्तकाचे संपादक डॉ. सुरेश जोशी यांनी दिली. ते म्हणाले ``लोकमान्य टिळकांच्या गीतारहस्य या शतकोत्सवी ग्रंथाविषयी महाराष्ट्रात कोठेच चर्चासत्र झाले नाही. लोकमान्यांच्या जन्मभूमीत ते व्हावे, अशी इच्छा राजाभाऊ लिमये यांच्याकडे व्यक्त केल्यानंतर गेल्या १ आणि २ ऑगस्ट रोजी रत्नागिरीत हे सांगोपांग चर्चासत्र झाले. ते पुस्तकस्वरूपात तयार करण्यासाठीही यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानने पुढाकार घेतला. हाताशी कोणतीही अभ्यासाची सामग्री नसताना लोकमान्यांनी तुरुंगावसात गीतारहस्य लिहिले. पीएचडीचे प्रबंध लिहिणाऱ्या किंवा संशोधन करणाऱ्या आजच्या तरुणांना ते आजही मार्गदर्शक आहे.`` राजाभाऊ लिमये यांनीही यावेळी मनोगत व्यक्त केले. प्रतिष्ठानचे कार्यवाह एम. के. गावडे यांनी आभार मानले. निशा काळे यांनी सूत्रसंचालन केले.
..............
गीतारहस्य चर्चासत्र पुस्तकाचे प्रकाशन

राज्यस्तरीय पुरस्कार प्रदान
प्रतिष्ठानच्या पुण्यातील कृषी-सहकार व्यासपीठाने शिक्षकांसाठी आयोजित केलेल्या `कथा जोतिबा सावित्रीची` या विषयावरील राज्यस्तरीय निबंध स्पर्धेतील विजेत्यांना यावेळी पारितोषिके देण्यात आली. ते शिक्षक असे : लीलाधर मोहन कूड (द्वितीय क्रमांक, ७५० रु.- शिवार आंबेरे, रत्नागिरी), योगेश पेढांबकर (तृतीय ५०० रु., चिपळूण) आणि विश्वनाथ रामचंद्र चिले (उत्तेजनार्थ ३०० रु., - वरवडे, ता. रत्नागिरी).
``

पुरस्कार कोणाला देऊ?
सत्काराला उत्तर देताना अण्णा शिरगावकर पत्नीच्या आठवणीने भावनावश झाले. ते म्हणाले, ``आतापर्यंत मला मिळालेला पुरस्कार मी माझ्या पत्नीकडे देत असे. यमराजाने जीवनगौरव पुरस्कार देऊन तिला आमच्यातून नेले. त्यामुळे आता मी पुरस्कार कोणाला देऊ, हा प्रश्न पडला आहे. मी मात्र माझे काम अखेरपर्यंत करत राहणार आहे. मी इतिहासाचा अभ्यास करताना जमविलेल्या वस्तू ठाण्याच्या प्राच्यविद्या संस्थेला दिल्या. आताही माझ्याकडे जुना अमोल ग्रंथसंग्रह आहे. तो रत्नागिरी जिल्ह्यातल्या संस्थेने स्वीकारावा आणि अपरान्त संशोधन केंद्र सुरू करावे, अशी माझी अपेक्षा होती. त्यासाठी कोणत्याच संस्थेने स्वारस्य दाखविले नाही. त्यामुळे नाइलाजाने हा ठेवाही जिल्ह्याबाहेर द्यावा लागणार आहे.``

Friday 20 November 2015

झाशीच्या राणीचा इतिहास तरुणांच्या मनावर ठसवायला हवा



डॉ. सच्चिदानंद शेवडे : सैन्यात जायला तरुण तयार होत नाहीत ही खंत

कोट (ता. लांजा) : झाशीच्या राणीचा प्रेरणादायी इतिहास आजच्या तरुणांसाठी आदर्श आहे. खरा इतिहास आजच्या पिढीपर्यंत पोहोचत नाही, म्हणूनच सैन्यात जायला तरुण तयार होत नाहीत,’’ अशी खंत इतिहासाचे प्रगाढ अभ्यासक डॉ. सच्चिदानंद शेवडे यांनी येथे व्यक्त केली.

     

झाशीची राणी लक्ष्मीबाई हिचे माहेर आणि सासर लांजा तालुक्यात कोलधे आणि कोट येथे आहे. तिचा इतिहास आजच्या पिढीला समजावा आणि तिचे स्मारक गावात उभारले जावे कोट आणि कोलधे ग्रामस्थांनी स्मारक समिती स्थापन केली आहे. या समितीमार्फत कोट येथे राणीची १८१ वी जयंती काल (ता. १९) उत्साहात साजरी करण्यात आली. त्यावेळी डॉ. शेवडे यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. त्यावेळी ते म्हणाले, ``कोणत्याही व्यक्तीचे मूळ महत्त्वाचे असते. राणी लक्ष्मीबाई बालपणात या गावांमध्ये आली की नाही, याला महत्त्व नाही. त्यांचे मूळ गाव महत्त्वाचे आणि त्यांची आठवण ग्रामस्थांकडून ठेवली जाते, हे त्याहून महत्त्वाचे आहे. रणरागिणी लक्ष्मीबाईचा इतिहास तेजस्वी आहे. इतिहास शाईने नव्हे, तर क्रांतिकारकांच्या रक्ताने लिहिला जातो. राणीने १८५७ साली स्वातंत्र्यसंग्राम सुरू केला आणि त्यानंतर १९४७ साली भारत स्वतंत्र झाला. मात्र भारताला स्वातंत्र्य मिळाले, असे सांगितले, शिकविले जाते. ते चुकीचे आहे. स्वातंत्र्य म्हणजे मागितल्यानंतर मिळणारे दान किंवा भीक नव्हे. ज्ञात-अज्ञात असंख्य क्रांतिकारकांच्या बलिदानातून भारताने स्वातंत्र्य मिळविले आहे. तसेच सांगितले गेले पाहिजे. ते न सांगितले गेल्यामुळे आजच्या पिढीला स्वातंत्र्य सहज मिळाले, असे वाटते. त्यामुळे स्वातंत्र्याचे मोल कळत नाही. म्हणूनच देशाच्या संरक्षणासाठी सैन्यात भरती व्हायला तरुण मिळत नाहीत. प्रेरणादायी कविता, धडे अभ्यासातून काढून टाकले गेले. त्यामुळे प्रेरणादायी खरा इतिहास मुलांना समजतच नाही. देशाच्या सीमा तलवारीच्या टोकाने आखल्या जातात, चरख्याच्या सुताने नव्हेत, हे तरुणांना पटविणे आवश्यक आहे.``

राणी लक्ष्मीबाईचे शौर्य, तिचा संघर्षमय जीवनप्रवास, १८५७ चा स्वातंत्र्यसंग्राम, त्याबाबत ब्रिटिशांनी लिहून ठेवलेल्या चुकीच्या नोंदी, चुकीचा इतिहास शिकविल्यामुळे झालेले नुकसान, स्वातंत्र्यपूर्व काळापासून सुरू असलेला मिठावरील कर, न्यायव्यवस्थेमुळे विश्वासाला गेलेला तडा इत्यादीविषयी शेवडे यांनी ओघवत्या शैलीत आपले विचार मांडले. त्यामुळे सभागृह भारावून गेले. संत आणि राष्ट्रपुरुष एखाद्या जातीसाठी, समाजासाठी नव्हे, तर देशासाठी कार्य करतात, हे नेहमीच लक्षात ठेवले पाहिजे, असे आवाहनही त्यांनी शेवटी केले.
प्रारंभी अंध कलाकार योगिता अरुण तांबे हिचा शिवसेनेतर्फे सत्कार करण्यात आला. अॅड. विलास कुवळेकर यांनी प्रास्ताविक केले. राणी लक्ष्मीबाईच्या स्मारकाला पर्यटनस्थळाचा नव्हे, तर स्फूर्तिस्थळाचा दर्जा मिळावा, अशी अपेक्षा त्यांनी यावेळी व्यक्त केली. दिनकर नेवाळकर यांनी डॉ. शेवडे यांचा सत्कार केला.
       समारंभाला आमदार राजन साळवी, जिल्हा परिषद अध्यक्ष जगदीश राजापकर यांच्यासह परिसरातील लोकप्रतिनिधी आणि ग्रामस्थ उपस्थित होते..
.........

स्मारकासाठी २५ लाखाची तरतूद
``राणी लक्ष्मीबाईच्या कोट येथील नियोजित स्मारकासाठी जिल्हा नियोजन मंडळातून २५ लाख रुपयांच्या निधीची तरतूद केली जाईल आणि समितीच्या येत्या बैठकीत त्याची नोंद घेतली जाईल, असे आश्वासन जिल्ह्याचे पालकमंत्री रवींद्र वायकर यांनी दिले आहे``, अशी माहिती राजापूरचे आमदार राजन साळवी यांनी यावेळी केली. या स्मारकासाठी आपणही प्रयत्नशील राहू आणि निधी मंजूर करून घेण्यासाठी प्रयत्न करू, असे आश्वासन श्री. साळवी यांनी यावेळी दिले.