Thursday 3 September 2015

`गीतारहस्य` ग्रंथाच्या उपयुक्ततेची तोंडओळख

लोकमान्य टिळक यांनी लिहिलेल्या गीतारहस्य या ग्रंथाच्या शताब्दीच्या निमित्ताने रत्नागिरीत दोन दिवसांचे चर्चासत्र 1 आणि 2 ऑगस्टला पार पडले. सांगोपांग चर्चा करण्याचा संयोजकांचा विचार असला, तरी प्रत्यक्षात केवळ तोंडओळखच झाली. आजच्या स्थितीत ग्रंथाची उपयुक्तता किती आहे, याबाबत फारच थोडे मुद्दे मांडले गेले. तरीही वैचारिक ग्रंथावर अशी चर्चा होणेही आवश्यक होतेच.
....................
बीजभाषण करताना डॉ. सदानंद मोरे. सोबत प्रा. डॉ. सुरेश जोशी, राजाभाऊ लिमये,
प्रकाश (बापू) काणे, अॅड. मिलिंद पिलणकर
लोकमान्य टिळकांनी भगवद्गीतेवर लिहिलेल्या `गीतारहस्य’ या ग्रंथाची छापील आवृत्ती प्रसिद्ध झाली, त्याला शंभर वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने रत्नागिरीत नुकतेच दोन दिवसांचे एक चर्चासत्र पार पडले. यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानचा कोकण विभाग आणि गीता मंडळाने चर्चासत्राचे आयोजन केले होते. ग्रंथाचा सांगोपांग परिचय करून देण्यासाठी चर्चासत्र आयोजित केल्याचे संयोजकांचे म्हणणे असले, तरी ग्रंथाचा विषय आणि आवाका पाहता सांगोपांग परिचयासाठी महिनाभराचा काळसुद्धा अपुराच ठरेल. तरीही या ग्रंथावर चर्चा करणारे कार्यक्रम फारसे कोठे झाले नाहीत. त्यामुळे लोकमान्यांच्या जन्मभूमीत त्यांनी जन्माला घातलेल्या वैचारिक ग्रंथाविषयीचे चर्चासत्र आयोजित करून मोठे औचित्य साधले गेले.
घुमान येथील 88 व्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉ. सदानंद मोरे यांनी चर्चासत्राचे बीजभाषण केले. त्यांनी साहित्यिक मूल्य या दृष्टिकोनातून गीतारहस्याची थोरवी सांगितली. दीडशे वर्षे भारतावर राज्य करणाऱ्या ब्रिटिशांच्या लेखी काव्याला साहित्यप्रकार म्हणून मान्यता नव्हती. सुमारे सातशे ते आठशे वर्षे मराठीत ओव्या, अभंग इत्यादी प्रकारचे काव्यच लिहिले गेले. गद्य साहित्य लिहितानाही वैचारिक परिशीलन, अन्य भाषांमधील साहित्याचे संदर्भ, तुलनात्मक विचार मांडणाऱ्या साहित्यालाच मान्यता होती. हे सर्व निकष गीतारहस्याने पूर्ण केले. न्या. रानडे यांनी मुंबई विद्यापीठात मराठी भाषेला मान्यता मिळविण्यासाठी जे प्रयत्न केले, तेव्हा गीतारहस्याला साहित्य म्हणून मिळालेली मान्यता उपयुक्त ठरली. मराठीतील पहिली पद्यात्मक दीर्घ रचना म्हणजे बाराव्या शतकात लिहिलेली ज्ञानेश्वरी भगवद्गीतेवर आधारित होती, तर मराठीतील पहिले गद्य वाङ्मय ठरलेला विसाव्या शतकात लिहिला गेलेला गीतारहस्य ग्रंथही गीतेवरच आधारित होता, हेही श्री. मोरे यांनी स्पष्ट केले. हा ग्रंथ गीतेवरचे भाष्य करणारा असला, तरी भारताच्या पारतंत्र्याविरुद्ध मराठी समाजाला कार्यप्रवण करण्याचा टिळकांचा अंतःस्थ हेतू होता. म्हणूनच महाराष्ट्राच्या वैचारिक विकासातला`गीतारहस्य’  हा फार मोठा टप्पा असल्याचे साहित्य संमेलनाध्यक्षांनी सांगितले. आगरकरांसारखे विद्वान पाश्चात्य तत्त्ववेत्त्यांचे नीतिशास्त्र मांडत असताना टिळकांनी मात्र गीतेच्या आधारे भारतीय नीतिशास्त्र श्रेष्ठ असल्याचे वारंवार ठामपणे सांगितले. गीता म्हणजे निवृत्ती सांगणारा नव्हे, तर कार्यप्रवण करणारा ग्रंथ आहे, हेच टिळकांनी पटवून दिले. त्या काळात एकाच वेळी टिळकांना गीतेतील कर्मसंन्यासाचा पारंपरिक विचार मांडणारे, पाश्चात्त्य विचारांचा पुरस्कार करणारे आणि पारंपरिक विचार कालबाह्य झाल्याचे सांगणारे अशा तिहेरी विचारसरणीचा प्रतिकार करून वेगळा विचार मांडायचा होता. तो टिळकांनी मांडला. म्हणूनच आध्यात्मिक नव्हे, तर सामाजिक आणि राजकीयदृष्ट्या तत्त्वज्ञान सांगणारा हा ग्रंथ आजच्या काळातही उपयुक्त असल्याचे डॉ. मोरे म्हणाले.
डॉ. मोरे यांच्या बीजभाषणाने ग्रंथाविषयीचे कुतूहल वाढविले, मात्र दोन दिवसांतल्या सहापैकी एखाददुसऱ्या वक्त्यानेच सामाजिक आणि राजकीय स्थितीविषयी ग्रंथात काय सांगितले आहे, य़ाचे काही उल्लेख केले. उर्वरित वक्त्यांनी ग्रंथातील आध्यात्मिक तत्त्वज्ञानावरच अधिक भर दिला. पहिल्या दिवशीच्या पहिल्या सत्रात ज्येष्ठ पत्रकार श्रीराम शिधये यांनी `लोकमान्य टिळक आणि गीतारहस्य` या विषय़ावरचा आपला निबंध सादर केला. ज्ञान, भक्ती आणि कर्म यांचा उत्तम मेळ साधूनच श्रीकृष्णाने अर्जुनाला युद्धासाठी प्रवृत्त केले. तेच गीतेचे रहस्य असून गीतारहस्य हा ग्रंथ लिहिताना लोकमान्यांनी भारतीय जनतेला ब्रिटिशांविरुद्ध लढण्यास प्रवृत्त केले, असे मत त्यांनी मांडले. त्याच्या पुष्ट्यर्थ त्यांनी टिळकांच्या आयुष्यातील विविध टप्पे, त्यांनी केलेला अभ्यास, चिंतन आणि लेखनाविषयीचे पुरावे दिले. टिळकांची भाषणे, सामाजिक उपक्रम आणि राजकीय चळवळींचा मागोवाही श्री. शिधये यांनी घेतला. गीतेचे तत्त्वज्ञानच त्यांना वेळोवेळी अंगीकारल्याचे दिसते, असेही ते म्हणाले. वैज्ञानिक प्रगती आणि भोगवादामुळे निर्माण होणारा संदेह दूर करण्यासाठी टिळकांनी लिहिलेला गीतारहस्य ग्रंथ मार्गदर्शक ठरेल, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. `आद्य शंकराचार्य आणि टिळक` या विषयावरील निबंध प्रा. डॉ. शं. रा. तळघट्टी यांनी सादर केला. त्यामध्ये त्यांनी आद्यशंकराचार्य आणि टिळक यांच्यामधील साम्य आणि भेद स्पष्ट केले. त्या दोघांच्या गीतेविषयीच्या भूमिका परस्परविरोधी असल्याचे मानले जात असले, तरी प्रत्यक्षात गीतेतील तत्त्वज्ञानाकडे पाहण्याच्या दोघांच्याही भूमिका परस्परपूरकच आहेत. गीतेचा व्यावहारिक उपयोग टिळकांनी सांगितला, जो आजही कर्माला म्हणजेच कार्य करत राहण्याला प्रवृत्त करतो, असे त्यांनी सांगितले. अखेरच्या सत्रात डॉ. कल्याण काळे यांनी `कर्मविपाक आणि कर्मयोग` या विषयावरचा निबंध सादर केला. भारतीय लोक अजूनही पूर्वजन्माशी आणि आपल्या कर्माशी संबंध लावतात. यातील वस्तुस्थितीचा अभ्यास टिळकांनी गीता, महाभारत, मनुस्मृती आणि वेदवाङ्मयाचा शोध घेऊन केल्याचे डॉ. काळे यांनी सांगितले. पापपुण्याच्या कल्पना, संचित, प्रारब्ध आणि क्रियमाण कर्म, कर्माचे फळ इत्यादींची माहिती देऊन सविस्तर विवेचन त्यांनी केले.
दुसऱ्या दिवशी चिपळूण येथील संत साहित्याचे अभ्यासक धनंजय चितळे यांनी अभ्यासक म्हणून लोकमान्य टिळकांची जगाला कशी ओळख होती, याबाबतच्या निबंधाचे वाचन केले. भारतीय असंतोषाचे जनक आणि तेल्यातांबोळ्यांचे पुढारी मानले जाणारे लोकमान्य टिळक जगभरातील प्राच्यविद्या अभ्यासकांना तसेच संस्कृत पंडितांना वेदवाङ्मयाचे अभ्यासक म्हणून ओळखत होते, असे त्यांनी सांगितले. अनेक लेखकांची मते उद्धृत करून त्यांनी टिळकांच्या अभ्यासू वृत्तीचा आढावा घेतला. पाश्चात्य तत्त्वज्ञानाबरोबरच भारतीय वाङ्मयातील वेद, उपनिषदे, ज्ञानेश्वरी, दासबोध, तुकारामाची गाथा इत्यादींचाही टिळकांनी सखोल अभ्यास केला. बौद्ध आणि जैन धर्मांच्या तत्त्वज्ञानाचाही त्यांनी अभ्यास केला. एवढ्या चिंतनाचा त्यांना मंडाले येथील तुरुंगात गीतारहस्य लिहिताना उपयोग झाला. तेथे त्यांनी फ्रेंच, जर्मन, पाली भाषांचा आणि त्या त्या भाषांमधील मिल, स्पेन्सर, कान्ट, ग्रीन इत्यादी तत्त्ववेत्त्यांच्या चारशेहून अधिक पुस्तकांचा अभ्यास केला. गीतारहस्य हा ग्रंथ उत्तम अभ्यास कसा करावा, याचा अभ्यास करण्यासाठी उपयुक्त आहे, असेही श्री. चितळे यांनी सांगितले. ``भगवद्गीतेसाठी टिळकांनी संसारशास्त्र हा सुंदर शब्द प्रथम वापरला```, असा संदर्भ देत श्रीमती प्रतिभा बिवलकर यांनी गीतारहस्यातील कर्मयोगशास्त्राविषयी विवेचन केले. त्या म्हणाल्या, ``योग्य काय आणि अयोग्य काय, याचा निर्णय घेण्यासाठी गीता उपयुक्त ठरते. गीता हे नीतिशास्त्र आणि कोणत्या प्रसंगी कसे वागावे, हे सांगणारे व्यवहारशास्त्र आहे, असे टिळकांनी सांगितले. आसक्ती हे दुःखाचे मूळ आहे. कर्माचे फळ केव्हा आणि कसे मिळेल, हे सांगणे अवघड असते.`` पौराणिक आणि आधुनिक काळातील कथा आणि प्रसंग सांगून आपले मुद्दे त्यांनी अधिक स्पष्ट केले. श्रीमती बिवलकर यांचे बंधू कणकवलीचे डॉ. विद्याधर करंदीकर यांनी `गीतारहस्यातील पुरुषार्थ विचार आणि वर्णाश्रमविचार` या विषयावरचा आपला निबंध विविध उदाहरणांसह सादर केला. निवृत्ती हाच गीतेचा संदेश असल्याचे मानले गेल्याने प्रवृत्तीकडे कल असलेल्या, पुरुषार्थी, पराक्रमी समाजाची निर्मिती झाली नाही. त्यामुळेच भारत पारतंत्र्यात ढकलला गेला, अशी त्यांची खंत होती. तत्कालीन राजकीय स्थिती लक्षात घेता थेट शब्दांत गीतारहस्यामध्ये ती खंत आली नसली, तरी ती जाणवावी अशा अनेक जागा गीतारहस्यात असल्याचे डॉ. करंदीकर यांनी स्पष्ट केले.
       समारोप समारंभात पंचागकर्ते आणि खगोल अभ्यासक दा. कृ. सोमण यांनी, शिस्त आणि जबाबदारीचा अभाव असलेल्या आजच्या काळात त्या ग्रंथातील तत्त्वज्ञानाची अधिक गरज असल्याचे मत मांडले. ``शेतकऱ्यांच्या आत्महत्या, दुष्काळ, पाणीटंचाई, औद्योगिक प्रश्नांबाबत पीएचडीच्या विद्यार्थ्यांनी संशोधन करायला हवे. मात्र ज्ञानाच्या अभिवृद्धीकडे प्राध्यापक लक्ष देत नाहीत, असे टिळकांनी म्हटले होते. त्यांचे ते विधान आजही खरे आहे. त्यामुळे आजचा समाज कोणीतरी अवतार घेईल आणि आपला उद्धार करील, म्हणून वाट पाहतात. बोगस महाराज आणि भोंदू साधू गल्लोगल्ली निर्माण होत आहेत. समाज त्यांच्या भजनी लागत आहे. खरा ईश्वर लोकांनी ओळखलाच नाही. अशा स्थितीत समाजात शिस्त आणि जबाबदारीचा अभाव जाणवतो. यावेळी वर्तमानात जगा, सतत कार्यरत राहा, असा संदेश देणाऱ्या लोकमान्यांच्या गीतारहस्याच्या अभ्यासाची आणि अनुकरणाची खरी गरज आहे``, असे त्यांनी सांगितले. हा ग्रंथ निवृत्तीचा नव्हे, तर सतत कार्यरत राहण्याचा संदेश देत असल्याने तो निवृत्तीच्या काळात नव्हे, तर तरुणांनी वाचायचा हा ग्रंथ आहे, हे श्री. सोमण यांचे मत पटल्याचे चर्चासत्राला उपस्थित असलेल्या मोजक्या तरुणींनी व्यक्त केले. राजकीय पक्षांचे पुढारी, सामाजिक संस्था, संघटनांनी या चर्चासत्राकडे फारसे लक्ष दिले नाही, ही वस्तुस्थिती जाणवली.


-    प्रमोद कोनकर, रत्नागिरी

Sunday 2 August 2015

वेदवाङ्मयाचे अभ्यासक म्हणूनच लोकमान्य टिळकांची जगाला ओळख - धनंजय चितळे

 बिवलकर, करंदीकर बहीणभावांनी उलगडला संसारशास्त्र-पुरुषार्थ विचार


गीतारहस्य चर्चासत्र - दुसरा दिवस


रत्नागिरी - ``भारतीय असंतोषाचे जनक आणि तेल्यातांबोळ्यांचे पुढारी मानले जाणारे लोकमान्य टिळक जगभरातील प्राच्यविद्या अभ्यासकांना तसेच संस्कृत पंडितांना वेदवाङ्मयाचे अभ्यासक म्हणून ओळखत होते``, असे प्रतिपादन संत साहित्याचे अभ्यासक धनंजय चितळे यांनी व्यक्त केले. अखेरच्या दिवशीच्या या सत्रात प्रतिभा बिवलकर आणि डॉ. विद्याधर करंदीकर या दोघा भावंडांनी गीतारहस्यातील संसारशास्त्र आणि पुरुषार्थ विचार उलगडून दाखविला.
अभ्यासक लोकमान्य टिळकांविषयी सांगताना
धनंजय चितळे. व्यासपीठावर प्रा. डॉ. सुरेश जोशी

लोकमान्य टिळकांच्या गीतारहस्य ग्रंथाच्या शताब्दीनिमित्ताने ग्रंथाचा सांगोपांग परिचय करून देणारे दोन दिवसांचे चर्चासत्र रत्नागिरीत शनिवारी (ता. १) सुरू झाले. दुसऱ्या दिवशीच्या पहिल्या सत्रात श्री. चितळे यांनी `गीतारहस्यातून दिसणारे अभ्यासक टिळक` या विषयावरील निबंध सादर केला. त्यामध्ये त्यांनी अनेक लेखकांची मते उद्धृत करून टिळकांच्या अभ्यासू वृत्तीचा आढावा घेतला. ते म्हणाले, ``स्वातंत्र्याची चळवळ आणि राजकारण सांभाळतानाच त्यांचे चिंतन आणि वाचन सतत सुरू होते. अफाट स्मरणशक्ती आणि कुशाग्र बुद्धीची देणगी त्यांना लाभली होती. पाश्चात्य तत्त्वज्ञानाबरोबरच भारतीय वाङ्मयातील वेद, उपनिषदे, ज्ञानेश्वरी, दासबोध, तुकारामाची गाथा इत्यादींचाही सखोल अभ्यास केला. गीतेचा अभ्यास करतानाही एकच गीता त्यांनी प्रमाण मानली नाही. महाभारत आणि गीतेतील 400 साम्यस्थळे त्यांच्या निदर्शनाला आली. गीता आणि उपनिषदातील साम्य, महाभारत आणि गीतानिर्मितीचा काळ यांचाही मागोवा त्यांनी घेतला. उपनिषदे आणि ब्रह्मसूत्रेच नव्हे, तर बौद्ध आणि जैन धर्मांच्या तत्त्वज्ञानाचाही त्यांनी अभ्यास केला. एवढ्या चिंतनाचा त्यांना मंडाले येथील तुरुंगात गीतारहस्य लिहिताना उपयोग झाला. तेथे त्यांनी फ्रेंच, जर्मन, पाली भाषांचा अभ्यास केला. त्या त्या भाषांमधील मिल, स्पेन्सर, कान्ट, ग्रीन इत्यादी तत्त्ववेत्त्यांची चारशेहून अधिक पुस्तके त्यांनी संदर्भ लक्षात ठेवून गरजेनुसार मागवून घेतली. स्वतःचे ग्रंथालय, अन्य ठिकाणचे संग्रह आणि वेळप्रसंगी परदेशांतूनही पुस्तके मागविली. त्यांचा एवढा सारा अभ्यास त्यांनी कसा केला असेल, याची कल्पना केली तरी थक्क व्हायला होते. आजच्या माहितीच्या युगात एका क्लिकवर विविध संदर्भ सापडू शकतात. टिळकांच्या काळात ते शक्य नव्हते आणि कारावासात असताना तर मुळीच शक्य नव्हते. त्यातून सिद्ध झालेला गीतारहस्य हा ग्रंथ उत्तम अभ्यास कसा करावा, याचा अभ्यास करण्यासाठी उपयुक्त आहे. टिळकांमधील अभ्यासक याच ग्रंथातून प्रकट होतो.``
श्रीमती प्रतिभा बिवलकर यांनी गीतारहस्यातील
संसारशास्त्र उलगडून दाखवले.

            ``भगवद्गीतेसाठी टिळकांनी संसारशास्त्र हा सुंदर शब्द प्रथम वापरला```, असा संदर्भ देत श्रीमती प्रतिभा बिवलकर यांनी गीतारहस्यातील कर्मयोगशास्त्राविषयी विवेचन केले. त्या म्हणाल्या, ``योग्य काय आणि अयोग्य काय, याचा निर्णय घेण्यासाठी गीता उपयुक्त ठरते. गीता हे नीतिशास्त्र आणि कोणत्या प्रसंगी कसे वागावे, हे सांगणारे व्यवहारशास्त्र आहे, असे टिळकांनी सांगितले आहे. प्रत्येकाने आपापले विहित कर्म करावे. कर्मयोग म्हणजे कर्म करण्याची शैली किंवा पद्धती. जीवन हा यज्ञ आहे. यज्ञचक्र चालविण्यासाठी कर्म हवेच. प्रत्येकाने चांगले काम करत राहावे. फळाची आसक्ती धरू नये. आसक्ती हे दुःखाचे मूळ आहे. कर्माचे फळ केव्हा आणि कसे मिळेल, हे सांगणे अवघड असते.`` कर्मफल कर्म करण्याचा उद्देश किंवा हेतू, कर्माचे चिंतन, पद्धती, परिणाम आणि कर्म करतानाची स्थिती या पाच निकषांवर आधारित असते, असे सांगून श्रीमती बिवलकर यांनी या पाचही निकषांचा ऊहापोह केला. पौराणिक आणि आधुनिक काळातील कथा आणि प्रसंग सांगून आपले मुद्दे त्यांनी अधिक स्पष्ट केले.
     
गीतारहस्यातील पुरुषार्थ विचारांची मांडणी
डॉ. विद्याधर करंदीकर यांनी केली.
श्रीमती बिवलकर यांचे बंधू कणकवलीचे डॉ. विद्याधर करंदीकर यांनी `गीतारहस्यातील पुरुषार्थ विचार आणि वर्णाश्रमविचार` या विषयावरचा आपला निबंध विविध उदाहरणांसह सादर केला. निवृत्ती हाच गीतेचा संदेश असल्याचे मानले गेल्याने प्रवृत्तीकडे कल असलेल्या, पुरुषार्थी, पराक्रमी समाजाची निर्मिती झाली नाही. त्यामुळेच भारत पारतंत्र्यात ढकलला गेला, अशी त्यांची खंत होती. तत्कालीन राजकीय स्थिती लक्षात घेता थेट शब्दांत गीतारहस्यामध्ये ती खंत आली नसली, तरी ती जाणवावी अशा अनेक जागा गीतारहस्यात असल्याचे डॉ. करंदीकर यांनी स्पष्ट केले. ते म्हणाले, ``समाजाला श्रेयस्कर ठरेल, अशी काही व्यवस्था महाभारतपूर्व काळापासून अस्तित्वात होती. पुरुषार्थ, आश्रम आणि चातुर्वर्ण्य या संकल्पना त्याच्याच भाग आहेत. चार पुरुषार्थांपैकी धर्म याचा अर्थ अलीकडे हिंदू, ख्रिश्चन, मुस्लिम अशा अर्थी घेतला जातो. मात्र महाभारतकाळात हे धर्मच अस्तित्वात नव्हते. त्यामुळे `स्वधर्मे निधनं श्रेयः` हे गीतावचन आजच्या धर्मांतराच्या संदर्भाने घेता येणार नाही. नैसर्गाने विशिष्ट जबाबदारी स्त्रीवर सोपविली आहे. ती तिला पूर्ण क्षमतेने पार पाडता यावी, यादृष्टीने पुरुषांवर धर्म, अर्थ आणि काम हे पुरुषार्थ बंधनकारक असावेत.`` या सर्व पुरुषार्थांबद्दल लोकमान्यांनी गीतारहस्यात सविस्तर विवेचन केले आहे. समाजधारणेसाठी कोणती व्यवस्था असावी, हे सांगण्याचा गीतेचा उद्देश नाही. व्यवस्था कोणतीही असली, तरी संपूर्ण समाजाचे हित साधतानाच आत्मश्रेय साधले गेले पाहिजे, हे कीताशास्त्राचे तात्पर्य असल्याचे टिळक सांगतात, असेही डॉ. करंदीकर यांनी सांगितले. अनाचार आणि अत्याचार करणाऱ्या पुरुषांनाच पुरुषार्थ या शब्दाचा खरा अर्थ समजावून देण्याची वेळ आली आहे. त्याकरिता आश्रमव्यवस्थेची नव्याने बांधणी करायला हवी आहे. गीतारहस्याच्या परिशीलनातून हे कार्य होऊ शकेल, अशी अपेक्षा डॉ. करंदीकर यांनी शेवटी व्यक्त केली.
      चर्चासत्रात दोन दिवस सहभागी झालेल्या श्रोत्यांनी आपल्या प्रतिक्रिया यावेळी दिल्या. निवृत्तांनी नव्हे, तर तरुणांनीच गीतारहस्य वाचायला हवे, याची जाणीव चर्चासत्राने करून दिल्याचे मत वर्षा फाटक यांनी व्यक्त केले. श्रीकांत वहाळकर, वैशाली कानिटकर, रेणुका भडभडे, विश्वनाथ बापट इत्यादींनीही आपापली मते व्यक्त केली.

लोकमान्य टिळकांनी मराठी गद्याला आधुनिक बनवले

गीतारहस्य चर्चासत्रातील डॉ. सदानंद मोरे यांचे बीजभाषण

रत्नागिरी - ``लोकमान्य टिळकांनी गीतारहस्य हा ग्रंथ लिहून मराठी गद्य साहित्याला आधुनिक बनवले``, असे मत घुमान येथील 88 व्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे अध्यक्ष सदानंद मोरे यांनी व्यक्त केले.
गीतारहस्य ग्रंथाच्य शताब्दीनिमित्ताने आयोजित चर्चासत्राचे बीजभाषण करताना अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉ. सदानंद मोरे. शेजारी प्रा. डॉ. सुरेश जोशी, राजाभाऊ लिमये, बापू काणे, अॅड. मिलिंद पिलणकर
लोकमान्य टिळकांनी भगवद्गीतेवर लिहिलेल्या `गीतारहस्यया ग्रंथाला शंभर वर्षे पूर्ण होत असल्याच्या निमित्ताने या ग्रंथाचा सांगोपांग परिचय करून देणारे दोन दिवसांचे चर्चासत्र रत्नागिरीत शनिवारी (1 ऑगस्ट) सुरू झाले. हा कार्यक्रम यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच कोकण विभाग आणि गीता मंडळाच्या संयुक्त विद्यमाने गीता भवनमध्ये झाला. या चर्चासत्राचे बीजभाषण डॉ. मोरे यांनी केले. लीळाचरित्राचा अपवाद वगळला, तर गीतारहस्यापूर्वी सहाशे वर्षांहून अधिक काळ मराठीतले सर्व साहित्य पद्यातच लिहिले गेले, असेही ते म्हणाले. ते पुढे म्हणाले, ``पारतंत्र्यातील मराठी समाजाला कार्यप्रवण करण्यासाठी लोकमान्य टिळकांनी `गीतारहस्यचे लेखन केले. महाराष्ट्राच्या वैचारिक विकासातला `गीतारहस्यहा फार मोठा टप्पा असून मराठी भाषा घडवण्यातसुद्धा त्याचा मोठा वाटा आहे. 1915 मध्ये लोकमान्य टिळकांनी गीतारहस्य ग्रंथ छापला. त्याला 100 वर्षे पूर्ण होत आहे. महाराष्ट्राच्या लोकांना भगवद्गीता कळावी म्हणून टिळकांनी गीतारहस्य लिहिले. गीतारहस्य हे मराठी भाषेला मिळालेले फार मोठे योगदान आहे. त्यावेळी लोकांना अल्प दरात ग्रंथ उपलब्ध करून देण्यासाठी टिळकांनी विशेष प्रयत्न केले. आधुनिक गद्यलेखनाचा वस्तुपाठ या ग्रंथाने दिला.``
     
पगडी घालून डॉ. मोरे यांचा सत्कार करण्यात आला.
``यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानने टिळकांच्या जन्मभूमीत हे चर्चासत्र आयोजित करून मोठे औचित्य साधले आहे. यानिमित्ताने यशवंतरावांची एक आठवण सांगण्यासारखी आहे. यशवंतराव चव्हाणांच्या राजकीय कारकिर्दीच्या प्रारंभीच्या काळात ब्राह्मणेतर चळवळ जोरात होती. खुद्द यशवंतरावांचे मोठे बंधू त्या चळवळीत अग्रस्थानी होते. यशवंतराव मात्र टिळकांना मानणारे होते. त्यांनी या चळवळीबाबत आणि टिळकांबाबत स्वतंत्र विचार केला होता.``
मराठीतील सर्वांत पहिला मोठा ज्ञानेश्वरी हा पद्यात्मक ग्रंथ भगवद्गीतेवर आधारित होता, तर सर्वांत मोठा गीतारहस्य हा गद्यग्रंथही गीतेवरच आधारित आहे, असे सांगून डॉ. मोरे पुढे म्हणाले, ``मराठीव्यतिरिक्त अन्य भाषांमध्ये कृष्णाच्या रासलीलांवर गीते लिहिली गेली. मराठीने मात्र कृष्णाच्या तत्त्वज्ञानाला प्राधान्य दिले, हे ज्ञानेश्वरी आणि गीतारहस्याच्या लेखनातून स्पष्ट झाले. भगवद्गीता हा लोकमान्यांच्या चिंतन-मननाचा भाग होता. लहानपणी वडिलांच्या आजारपणात त्यांना वाचून दाखविताना त्यांची भगवद्गीता मुखोद्गत झाली. त्यानंतरच त्यांचे गीतेविषयीचे चिंतन सुरू झाले. जानेवारी 1902 मध्ये त्यांनी नागपूरला महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसमोर सर्वप्रथम गीतेवर भाषण केले, तर 1904 साली संकेश्वर मठात शंकराचार्यांसमोर गीतेविषयीचे आपले विचार मांडले. मंडालेच्या तुरुंगात असताना केवळ पेन्सिलने त्यांनी हा ग्रंथ लिहिला. याचवेळी ते तुरुंगात जर्मन, फ्रान्स आणि पाली भाषा शिकले. मोठ्या चिंतनातून त्यांनी हा ग्रंथ साकार केला. त्यामुळे त्यांना गीतेचे भाष्यकार म्हणून मान्यता मिळाली. सामान्य लोक तर त्यांना भगवान टिळक म्हणूनच ओळखू लागले होते. आगरकरांसारखे विद्वान जॉन स्टुअर्ट मिल, स्पेन्सरसारख्या पाश्चात्य तत्त्ववेत्त्यांचे सुखदायी नीतिशास्त्र मांडत असताना टिळकांनी मात्र गीतेच्या आधारे भारतीय नीतिशास्त्र श्रेष्ठ असल्याचे वारंवार ठामपणे सांगितले. गीता म्हणजे निवृत्ती सांगणारा नव्हे, तर कर्म करा, असे सांगणारा ग्रंथ आहे, हेच त्यांनी गीतारहस्यातूनही पटवून दिले. त्या काळात एकाच वेळी टिळकांना गीतेतील कर्मसंन्यासाचा पारंपरिक विचार मांडणारे, पाश्चात्त्य विचारांचा पुरस्कार करणारे आणि पारंपरिक विचार कालबाह्य झाल्याचे सांगणारे अशा तिहेरी विचारसरणीचा प्रतिकार करून वेगळा विचार मांडायचा होता. तो त्यांनी गीतारहस्यातून मांडला. ज्ञान मिळविण्यासाठी कर्म करावे आणि ज्ञानप्राप्तीनंतर संन्यास घ्यावा, असे विचार शंकराचार्य मांडत असताना ज्ञानपूर्व आणि ज्ञानोत्तरही कर्मच करत राहण्याचा उपदेश भगवद्गीतेने कसा केला आहे, हे टिळकांनी पटवून दिले.``
चर्चासत्राला उपस्थित श्रोते
दीपप्रज्वलनाने कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. यावेळी अध्यक्ष म्हणून प्रा. सुरेश जोशी, डॉ. कल्याण काळे, प्रतिभा बिवलकर, डॉ. विद्याधर करंदीकर, डॉ. शं. रा. तळघट्टी, यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानचे विभागीय अध्यक्ष राजाभाऊ लिमये, पंचांगकर्ते दा. कृ. सोमण आदी मान्यवर उपस्थित होते.
गीतारहस्य चर्चा हा बौद्धिक पातळीवरचा कार्यक्रम असल्याचे डॉ. सुरेश जोशी यांनी सांगून कार्यक्रमाच्या आयोजनामागील हेतू स्पष्ट केला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक राजाभाऊ लिमये यांनी केले. यशवंतरावांना टिळकांबद्दल आदर होता. म्हणूनच त्यांच्या नावाच्या प्रतिष्ठानमार्फत चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले आहे, असे त्यांनी सांगितले. टिळकांचे पणतू आणि `केसरी`चे सध्याचे संपादक दीपक टिळक यांनी मात्र या चर्चासत्राच्या बाबतीत कोणताच प्रतिसाद दिला नाही, अशी खंत राजाभाऊंनी व्यक्त केली.
यावेळी डॉ. सदानंद मोरे यांचा सत्कार करण्यात आला. सूत्रसंचालन सौ.निशा काळे यांनी केले, तर विनायक हातखंबकर यांनी आभार मानले.
...............
चर्चासत्राला उपस्थित राहण्यापूर्वी साहित्य संमेलनाध्यक्षांनी लोकमान्य टिळकांच्या जन्मस्थानी त्यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून पुण्यतिथीनिमित्ताने आदरांजली वाहिली.
-----------------------------------------------------



आजच्या काळात गीतारहस्याच्या तत्त्वज्ञानाची अधिक गरज

दा. कृ. सोमण – गीतारहस्य ग्रंथावरील चर्चासत्राचा रत्नागिरीत समारोप

चर्चासत्राच्या समारोप सत्रात बोलताना खगोल अभ्यासक
दा. कृ. सोमण. व्यासपीठावर डॉ. सुरेश जोशी, पद्मश्री
मधू मंगेश कर्णिक, प्रकाश काणे
रत्नागिरी - ``निद्रिस्त समाजाला जागृत करण्यासाठी शंभर वर्षांपूर्वी लोकमान्यांनी गीतारहस्य ग्रंथ लिहिला असला, तरी शिस्त आणि जबाबदारीचा अभाव असलेल्या आजच्या काळात त्या ग्रंथातील तत्त्वज्ञानाची अधिक गरज आहे``, असे मत पंचागकर्ते आणि खगोल अभ्यासक दा. कृ. सोमण यांनी व्यक्त केले.
लोकमान्य टिळकांच्या गीतारहस्यच्या प्रकाशनाच्या शताब्दीनिमित्त रत्नागिरीत दोन दिवसांचे विशेष चर्चासत्र यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान आणि गीता मंडळाने आयोजित केले होते. चर्चासत्राच्या समारोप सत्रात श्री. सोमण बोलत होते. यावेळी व्यासपीठावर चर्चासत्राचे समन्वयक प्रा. डॉ. सुरेश जोशी, ज्येष्ठ साहित्यिक पद्मश्री मधू मंगेश कर्णिक आणि यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानचे जिल्हाध्यक्ष प्रकाश काणे उपस्थित होते. श्री. सोमण पुढे म्हणाले, ``गीतारहस्यावर शताब्दीच्या निमित्ताने दोन दिवस चर्चा झाली. अशा तऱ्हेची चर्चा महाराष्ट्रात सर्वप्रथम रत्नागिरीत झाली. वास्तविक ती टिळकांच्या कर्मभूमीत म्हणजे पुण्यात व्हायला हवी होती. हा ग्रंथ निवृत्तीचा नव्हे, तर सतत कार्यरत राहण्याचा संदेश देतो. म्हणूनच निवृत्तीच्या काळात नव्हे, तर तरुणांनी वाचायचा हा ग्रंथ आहे. वास्तविक शेतकऱ्यांच्या आत्महत्या, दुष्काळ, पाणीटंचाई, औद्योगिक प्रश्नांबाबत पीएचडीच्या विद्यार्थ्यांनी संशोधन करायला हवे. मात्र ज्ञानाच्या अभिवृद्धीकडे प्राध्यापक लक्ष देत नाहीत, असे टिळकांनी म्हटले होते. त्यांचे ते विधान आजही खरे आहे. त्यामुळे आजचा समाज कोणीतरी अवतार घेईल आणि आपला उद्धार करील, म्हणून वाट पाहतात. बोगस महाराज आणि भोंदू साधू गल्लोगल्ली निर्माण होत आहेत. समाज त्यांच्या भजनी लागत आहे. खरा ईश्वर लोकांनी ओळखलाच नाही. अशा स्थितीत समाजात शिस्त आणि जबाबदारीचा अभाव जाणवतो. यावेळी वर्तमानात जगा, सतत कार्यरत राहा, असा संदेश देणाऱ्या लोकमान्यांच्या गीतारहस्याच्या अभ्यासाची आणि अनुकरणाची खरी गरज आहे.``
समारंभात मधू मंगेश कर्णिक, श्री. सोमण यांचा पगडी देऊन सत्कार करण्यात आला. समन्वयक प्रा. डॉ. सुरेश जोशी यांनी चर्चासत्राच्या आयोजनाचा हेतू साध्य झाल्याचे सांगितले. निबंध स्पर्धेतील बक्षिसाचे वितरण करण्यात आले. यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानचे जिल्हाध्यक्ष प्रकाश काणे यांनी आभार मानले. यावेळी विनायक हातखंबकर, कृ. आ. पाटील, चंद्रमोहन देसाई यांच्यासह चर्चासत्राच्या आयोजकांचे प्रतिनिधी उपस्थित होते.
.............

समारोप सत्रात बोलताना पद्मश्री मधू मंगेश कर्णिक.
शेजारी डॉ. जोशी, श्री. सोमण, श्री. काणे

चर्चासत्र म्हणजे राष्ट्रीय भावना - कर्णिक

``लोकमान्य टिळक आणि त्यांनी लिहिलेले गीतारहस्य लोकोत्तर आहेच, पण या ग्रंथाविषयीच्या चर्चासत्राचे आयोजन म्हणजे ऱाष्ट्रीय भावना आहे. या चर्चासत्रातून जिज्ञासा जागृत होते आणि जिज्ञासा ज्ञानापोटी जन्माला येते``, अशा शब्दांत पद्मश्री मधू मंगेश कर्णिक यांनी अध्यक्षीय समारोपात चर्चासत्राच्या आयोजनाचा गौरव केला. ते म्हणाले, ``लोकमान्यांनी मंडाले येथील तुरुंगात गीतारहस्याचे लेखन केले. त्यामुळे त्यांना झालेला तुरुंगवास ही इष्टापत्तीच होती, असे म्हणावे लागेल. परदेशी तत्त्वज्ञानाचा अभ्यास करून त्यांनी गीतेवरचे भाष्य लिहिले आणि स्वतःचे तत्त्वज्ञान निर्माण केले. इतरांपेक्षा भारतीय तत्त्वज्ञान श्रेष्ठ होते, हेच त्यांनी सिद्ध केले. ते करतानाच सर्वसामान्यांच्या जिज्ञासेला पोषक अशा शब्दांत त्यांनी या ग्रंथाचे लेखन केले. ``

गीतेच्या माध्यमातून ब्रिटिशांविरुद्ध लढण्यास लोकमान्यांनी प्रवृत्त केले

गीतारहस्य चर्चासत्र


श्रीराम शिधये – पहिल्या दिवशी शं. रा. तळघट्टी, डॉ. कल्याण काळे यांचेही निबंधवाचन


 रत्नागिरी - ``ज्ञान, भक्ती आणि कर्म यांचा उत्तम मेळ साधूनच श्रीकृष्णाने अर्जुनाला युद्धासाठी प्रवृत्त केले. तेच गीतेचे रहस्य असून गीतारहस्य हा ग्रंथ लिहिताना लोकमान्यांनी भारतीय जनतेला ब्रिटिशांविरुद्ध लढण्यास प्रवृत्त केले``, असे मत ज्येष्ठ पत्रकार श्रीराम शिधये यांनी व्यक्त केले.

  लोकमान्य टिळक आणि गीतारहस्याविषयी
विचार मांडताना श्रीराम शिधये
टिळकांनी भगवद्गीतेवर लिहिलेल्या गीतारहस्य या ग्रंथाला शंभर वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने या ग्रंथाचा सांगोपांग परिचय करून देणारे दोन दिवसांचे चर्चासत्र रत्नागिरीत शनिवारी (ता. १) सुरू झाले. चर्चासत्राचा प्रारंभ घुमान येथील अ. भा. साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉ. सदानंद मोरे यांच्या बीजभाषणाने झाला. त्यानंतर श्री. सिधये यांनी `लोकमान्य टिळक आणि गीतारहस्य` या विषय़ावरचा आपला निबंध सादर केला. ते म्हणाले, ``टिळकांच्या विचारधारेला तत्त्वज्ञानाची पक्की बैठक होती. अव्वल इंग्रजी अमदानीत कायद्याची परीक्षा देणाऱ्या टिळकांनी इंग्रजी माणसाची वृत्ती आणि मनोधारणा पक्की ओळखली होती. त्यामुळे त्यांच्याविरुद्ध लढण्यासाठी नेमके काय करायला हवे, याचे पक्के आराखडे त्यांनी मनाशी बांधले होते. त्यांच्या आणि तत्कालीन भारतीय राजकारणाच्या प्रगतीच्या दृष्टीने त्यांच्या आयुष्याचे तीन कालखंड दिसतात. शैक्षणिक, सामाजिक आणि राजकीय वाटचाल करताना सोळाव्या वर्षापासून भगवद्गीतेतील तत्त्वज्ञानाचा त्यांनी केलेला अभ्यासही त्यांच्या कामी आला. त्यातूनच सहा वर्षांचा मंडालेच्या तुरुंगातील शिक्षेचा काळ त्यांना गीतारहस्य लिहिण्यास उपयुक्त ठरला.`` टिळकांची भाषणे, सामाजिक उपक्रम आणि राजकीय चळवळींचा मागोवाही श्री. शिधये यांनी घेतला. गीतेचे तत्त्वज्ञानच त्यांना वेळोवेळी अंगीकारल्याचे दिसते, असेही ते म्हणाले. वैज्ञानिक प्रगती आणि भोगवादामुळे निर्माण होणारा संदेह दूर करण्यासाठी टिळकांनी लिहिलेला गीतारहस्य ग्रंथ मार्गदर्शक ठरेल, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.
`आद्य शंकराचार्य आणि टिळक` या विषयावरील निबंध प्रा. डॉ. शं. रा. तळघट्टी यांनी सादर केला. ते

प्रा. डॉ. शं. रा. तळघट्टी यांनी शंकराचार्य आणि
टिळकांची तुलना करणारे अभ्यासपूर्ण विवेचन केले.
शेजारी प्रा. डॉ. सुरेश जोशी

म्हणाले, ``आद्यशंकराचार्य आणि लोकमान्य टिळक यांच्या गीतेविषयीच्या भूमिका परस्परविरोधी असल्याचे मानले जाते. प्रत्यक्षात गीतेतील तत्त्वज्ञानाकडे पाहण्याच्या दोघांच्याही भूमिका परस्परपूरकच आहेत. मात्र गीतेच्या प्रयोजनासंबंधी दोघांची मते भिन्न आहेत. मोक्ष म्हणजेच निवृत्ती हेच गीतेचे प्रयोजन आहे, असे शंकराचार्यांचे मत आहे, तर टिळकांच्या मते कर्मयोगस्वरूपाच्या धर्म या पुरुषार्थाची सिद्धी म्हणजेच प्रवृत्ती हाच गीता सांगण्याचा उद्देश आहे. गीतेचा व्यावहारिक उपयोग टिळकांनी सांगितला, जो आजही कर्माला म्हणजेच कार्य करत राहण्याला प्रवृत्त करतो.`` शंकराचार्य, टिळक, समर्थ रामदासांचे विविध दाखले देऊन त्यांनी आपल्या मुद्द्याचे स्पष्टीकरण केले.
डॉ. कल्याण काळे यांना पगडी घालून सत्कार करताना
प्रा. चंद्रमोहन देसाई. शेजारी प्रा. डॉ. सुरेश जोशी
अखेरच्या सत्रात डॉ. कल्याण काळे यांनी `कर्मविपाक आणि कर्मयोग` या विषयावरचा निबंध सादर केला. जातीधर्म, पुरुष-स्त्री अशी मानवी जीवनातील विविध प्रकारची विषमता दूर करण्यासाठी अनेक प्रयत्न केले जात आहेत. त्यांचा चांगला परिणाम होत असला, तरी शारीरिक व्यंगे, आर्थिक दैन्य, आकस्मिक संकटे इत्यादींमुळे होणारी सुखदुःखाची विषमता दूर करता येत नाही. अशा वेळी भारतीय लोक पूर्वजन्माशी आणि आपल्या कर्माशी त्याचा संबंध लावतात. चुकांची पुनरावृत्ती टाळतात. सावधानता बाळगतात. यातील वस्तुस्थितीचा अभ्यास टिळकांनी गीता, महाभारत, मनुस्मृती आणि वेदवाङ्मयाचा शोध घेऊन केल्याचे डॉ. काळे यांनी सांगितले. माणसाने केलेल्या कर्माचे फळ म्हणजे कर्मविपाक असे स्पष्ट करून त्यांनी याबाबत गीतेतील तत्त्वज्ञान टिळकांनी सोपे करून सांगितल्याचे नमूद केले. पापपुण्याच्या कल्पना, संचित, प्रारब्ध आणि क्रियमाण कर्म, कर्माचे फळ इत्यादींची माहिती देऊन सविस्तर विवेचन त्यांनी केले.
.................

Saturday 1 August 2015

मुलांवर गीतेचे संस्कार होण्यासाठी `झोंपाळ्यावरची गीता`

सदानंद मोरे – रत्नागिरीत 98 व्या वर्षी पुनर्प्रकाशन

रत्नागिरी - ``मुलांवर गीतेचे संस्कार लहान वयातच व्हावेत, यासाठी कवी अनंततनय यांनी `झोंपाळ्यावरची गीता` लिहिली. दोनच वर्षांनी शंभर वर्षे पूर्ण करणार असलेली ही गीता पुन्हा एकदा चांगले औचित्य साधून प्रसिद्ध होत आहे. ते उपयुक्त आहे``, असे प्रतिपादन घुमान येथील अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉ. सदानंद मोरे यांनी केले.
`झोपाळ्यावरची गीता`चे प्रकाशन करताना साहित्य संमेलनाध्यक्ष डॉ. सदानंद मोरे.
सोबत (डावीकडून)  प्रकाशक प्रमोद कोनकर, प्रा. डॉ. सुरेश जोशी, राजाभाऊ लिमये,
प्रकाश (बापू) काणे, 
अॅड. मिलिंद पिलणकर
दत्तात्रेय अनंत आपटे ऊर्फ कवी अनंततनय यांनी १९१७ साली लिहिलेल्या झोंपाळ्यावरची गीता` या श्लोकसंग्रहाचे पुनर्प्रकाशन शनिवारी (ता. 1) रत्नागिरीत झाले. लोकमान्य टिळकांच्या गीतारहस्यच्या प्रकाशनाच्या शताब्दीनिमित्त रत्नागिरीत दोन दिवसांचे विशेष चर्चासत्र यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान आणि गीता मंडळातर्फे सुरू झाले. तेच औचित्य साधून झोपाळ्यावरच्या गीतेचे पुनर्प्रकाशन श्री. मोरे यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. ते पुढे म्हणाले, ``दत्तात्रेय आपटे हे लोकमान्य टिळकांच्या अऩुयायांपैकी एक होते. त्यांनी लोकमान्यांचे ओवीबद्ध चरित्रही लिहिले. त्याचा दुसरा भाग मात्र प्रसिद्ध होऊ शकला नाही. लोकमान्यांचे गीतारहस्य 1915 साली प्रसिद्ध झाले. गीतारहस्य छापले गेल्यानंतर गीता हा महाराष्ट्रात चर्चाविषयाचा केंद्रबिंदू झाला. सगळीकडे लोक चर्चा करू लागले. टिळकभक्त अनंततनयांनाही गीतेविषयी काही लिहावे, असे वाटले आणि दोनच वर्षांनी 1917 मध्ये त्यांनी झोंपाळ्यावरची गीता लिहिली. मुळात झोपाळ्यावरची गीता म्हणजे काय, हे समजायला हवे. प्रत्यक्ष गीतेचे संस्कार लहनापणापासूनच मुलांवर व्हायला हवेत, असे त्यांना वाटले. मुलांवर आईच संस्कार करू शकते. पण आईला तरी गीता माहीत व्हायला हवी, हे लक्षात घेऊन त्यांनी त्या काळच्या महिला सीता गीताप्रमाणे ओव्या म्हणत, त्या पद्धतीने गीतेतील श्लोकांचा अर्थ लावला. त्याकाळचा हा वेगळा प्रयोग होता. झोपाळ्यावर झोका घेता घेता विशेषतः महिलांना गीतेचे तत्त्वज्ञान सांगता आले पाहिजे, यासाठी महिलवर्ग आणि मुलींना पुढे ठेवून झोपाळ्यावरची गीता त्यांनी लिहिली.``

मूळचे रत्नागिरीचे रहिवासी आणि पुण्यातील पत्रकार अनिकेत कोनकर यांनी हे संकलन केले असून रत्नागिरीच्या सत्त्वश्री प्रकाशनने ही पुस्तिका प्रकाशित केली आहेतरुण वयातच गीतेविषयीचे संकलन करावेसे वाटणाऱ्या अनिकेतचे प्रयत्न कौतुकास्पद आहेत, असेही ते म्हणाले.


...............