Saturday 2 May 2015

राजापूर तालुक्यात आढळली आणखी काही पाषाणखोद शिल्पे



प्रागैतिहासिक संस्कृतीच्या पाऊलखुणांबाबत संशोधन आवश्यक


 (प्रमोद कोनकर)
रत्नागिरी – कोकणातल्या पर्यटनस्थळांचा परिचय देशीविदेशी पर्यटकांना करून देण्यासाठी रत्नागिरीत तीन दिवसांचा पर्यटन महोत्सव सुरू झाला आहे. त्याचा आस्वाद घेतानाच पर्यटकांना प्रागैतिहासिक संस्कृतीच्या आणखी काही पाऊलखुणा धनंजय मराठे आणि सुधीर रिसबूड यांच्या प्रयत्नातून खुल्या झाल्या आहेत. या दोघा निसर्गप्रेमींना राजापूर तालुक्यात आणखी काही कातळशिल्पे आढळली असून ती सुमारे तीन हजार वर्षांपूर्वीची असावीत, असा अंदाज आहे.
      `कोकणातील पक्षी` या पुस्तकाचे लेखक सुधीर श्रीकांत रिसबूड भ्रमंतीसाठी प्रसिद्ध आहेत. कोकणात निसर्गाचा वेध घेण्यासाठी त्यांचा ठिकठिकाणी वावर असतो. त्यातूनच त्यांनी कोकणातल्या पक्ष्यांविषयीही माहिती त्यांच्या पुस्तकात संकलित केली आहे. त्यांचे राजापूरचे मित्र धनंजय मराठे यांच्याकडून नुकतीच त्यांना राजापूर तालुक्यात कातळात खोदलेल्या काही आकृत्या दिसल्याची माहिती मिळाली. राजापूरपासून सुमारे दहा किलोमीटर अंतरावर माळरानावर कातळात ही शिल्पे होती. आठ दिवसांपूर्वी नेपाळमध्ये भूकंप झाला, त्यादिवशी त्या दोघांनी त्या स्थळाला भेट दिली. शिल्पांचे आकार स्पष्ट होण्यासाठी तेथे खुणा केल्या. त्यामधून लज्जागौरी, काही प्राणी, पक्षी, दिशादर्शक शिल्पे आणि भौमितिक रचना स्पष्ट झाल्या. एकीकडून पाहिल्यास जहाज तर दुसऱ्या बाजूने पाहिल्यानंतर दोन वाघांच्या मध्ये असलेला माणूस अशी द्विमितीय चित्रेही तेथे दिसली. एक हजार चौरस फुटाच्या परिसरात सुमारे एकतीस शिल्पे आढळली. जिल्ह्यात यापूर्वी निवळी, रामरोड-गणपतीपुळे (ता. रत्नागिरी), पडवे, देवीहसोळ, उपळे, बारसूचा सडा (ता. राजापूर) येथेही अशी पाषाणशिल्पे आढळली आहेत. (राजापूर तालुक्यातील शिल्पांचा उल्लेख प्रभाकर मराठे यांच्या `राजापूरचा इतिहास` या अलीकडेच प्रसिद्ध झालेल्या पुस्तकात आला आहे.) त्यांचा अभ्यास श्री. रिसबूड यांनी केला आहे. त्याआधारे राजापूर तालुक्यात नुकतीच सापडलेली शिल्पे पाहता पुरातन काळी दिशादर्शक साखळी म्हणून ही शिल्पे कोरली गेली असावीत, असा अंदाज त्यांनी व्यक्त केला असून याबाबत संशोधनाची गरज व्यक्त केली आहे.
राजापूर तालुक्यात नुकत्याच आढळलेल्या या शिल्पांविषयीची माहिती सुधीर रिसबूड (9422372020) किंवा धनंजय मराठे (9423297736) यांच्याशी संपर्क साधल्यास मिळू शकेल. जिल्ह्यात महोत्सवाच्या निमित्ताने आलेल्या पर्यटकांनी या शिल्पांना भेट द्यावी, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली आहे.
.................................................


धनगराकडून माहिती
धनंजय मराठे यांना त्या गावातील एका धनगराने कातळात खोदलेल्या काही आकृत्या दिसल्याची माहिती दिली. श्री. मराठे यांनी त्याचा मागोवा घेतला. निसर्गप्रेमी श्री. रिसबूड यांना त्याची माहिती दिली. त्यानंतर त्या दोघांनी त्या ठिकाणाला भेट देऊन शिल्पांच्या भोवती साफसफाई केली. निसर्गप्रेमी असलेले जिल्ह्याचे पोलिस अधीक्षक डॉ. संजय शिंदे यांना याबाबत सांगितल्यावर त्यांनीही तेथे जाऊन पाहणी केली आणि हा पुरातन ठेवा जतन करण्यासाठी प्रयत्न आवश्यक असल्याचे मत व्यक्त केले.
.................................................
 
अभ्यासकांचा दुजोरा
राजापूर तालुक्यातील या पाषाणशिल्पांबाबत अखिल महाराष्ट्र इतिहास परिषदेचे रवींद्र लाड आणि पुण्याच्या डेक्कन कॉलेजचे प्रा. डॉ. सचिन जोशी यांना श्री. रिसबूड आणि श्री. मराठे यांनी माहिती दिली. शिल्पांचा तपशील सांगितल्यानंतर या दोघा अभ्यासकांनी शिल्पे पुरातन असल्याचा दुजोरा दिला. त्यांनी सांगितले की, त्या भागात कोणे एके काळी संस्कृती नांदत होती, याचा तो पुरावा आहे. वर्णनावरून ही शिल्पे मोंहेंजोदडो किंवा हडप्पा संस्कृतीच्याही पूर्वीची म्हणजे तीन हजार वर्षांपूर्वीची असल्याचा अंदाज त्यांनी व्यक्त केला.
-       राजापूरजवळ नव्याने आढळलेले पाषाणशिल्प

-       नव्याने आढळलेले पाषाणशिल्प

बारसू (ता. राजापूर) येथील शिल्प

उपळे (ता. राजापूर) येथील शिल्प

निवळी (ता. रत्नागिरी) येथील पाषाणखोद शिल्प

होतकरू विद्यार्थ्यांच्या विकासासाठी `वसा वाचनाचा` अभियान



`नवजीवन`चा उपक्रम :  स्पर्धा, निबंध, कथा व लेख स्पर्धेतून बौद्धिक खुराक


रायपाटण (ता. राजापूर) - उन्हाळी सुट्टीत होतकरू विद्यार्थ्यांच्या विकासासाठी `वसा वाचनाचा` अभियान येथील नवजीवन विकास सेवा संस्था राबविणार आहे. वाचनातून स्पर्धा, निबंध, कथा आणि लेख स्पर्धेतून विद्यार्थ्यांना बौद्धिक खुराक देणे हे या अभियानाचे उद्दिष्ट आहे.
      परीक्षा संपल्यानंतर सुरू झालेल्या उन्हाळी सुटीत मुलांच्या ऊर्जेला वाट करून कशी द्यायची, असा प्रश्न शिक्षक आणि पालकांनाही पडतो. त्याचा एक प्रयत्न म्हणून रायपाटण येथील शिक्षण व शेती क्षेत्रात कार्यरत असलेल्या नवजीवन विकास सेवा संस्थेने वसा वाचनाचा अभियान गेल्या वर्षी सुरू केले. यावर्षीही ते राबविण्यात येणार आहे. रायपाटण येथील जिजामाता विद्यालयातील एका विद्यार्थिनीने संस्थेच्या उपक्रमात भाग घेतल्यानंतर राज्यस्तरावरील तेरा हजार विद्यार्थ्यांमधून लेखन स्पर्धेत राज्यस्तरावर प्रथम क्रमांक मिळाला. त्यातून या उपक्रमाचा प्रारंभ झाल्याची माहिती संस्थेचे अध्यक्ष महेश पळसुले-देसाई यांनी दिली. वयम आणि साधना या दोन वाचनीय बालविशेषकांचे मोफत वितरण करून त्याआधारे विविध स्पर्धांचे आयोजन असे या "वसा वाचनाचा" उपक्रमाचे स्वरूप आहे. "वयम"मधील व आणि "साधना"मधील "स" या आद्याक्षरांचा वापर करून "वसा वाचनाचा" उपक्रम राबविण्यात येत आहे. तो चौथी ते बारावीच्या वयोगटातील कल्पक, चौकस, हुशार आणि होतकरू मुलांसाठी आहे. वक्तृत्व, कथाकथन, निबंध, अभिनय, वादविवाद अशा स्पर्धांसह विविध प्रकाचे सुयश मिळविसेस्आ किशोरवयीन मुलांना या उपक्रमात सहभाग राहील. अशा विद्यार्थ्यांची नावे पालकांनी, वर्गशिक्षकानी किंवा मुखाध्यापकांनी नवजीवन संस्थेला कळविल्यानंतर विद्यार्थ्यांना 'वयम' आणि 'साधना' अंक टपालाने मोफत पाठविला जाणार असून स्पर्धेचे स्वरूप कळविले जाईल. विजेत्यांना पुस्तके, सीडी, डीव्हीडी अशा स्वरूपात पारितोषिके दिली जाणार असून पारितोषिक वितरण समारंभ ऑगस्टमध्ये होईल. एखाद्या शाळेला, संस्थेला किंवा पालकांच्या गटाला वसा वाचनाचा उपक्रमात शिबिराचे आयोजन करायचे असेल तर तशी सशुल्क व्यवस्थाही रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांत केली जाणार आहे.
अधिक माहितीसाठी संस्थेचे अध्यक्ष महेश पळसुलेदेसाई (९४००५५६८,   ९४२२७३, ९६८९७७६८२) यांच्याशी संपर्क साधता येईल. तसेच nvssindia.com या संकेतस्थळावर माहिती मिळू शकेल. इच्छुकांनी navjeevan@gmail.com या ईमेलवर संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

नवजीवन विकास संस्थेच्या वसा वाचनाचा उपक्रमातील शिबिराचे संग्रहित छायाचित्र