Sunday 5 May 2019

रत्नागिरी : अवयवदानाचे महत्त्व अनन्यसाधारण – डॉ. बोल्टे

रत्नागिरी : अवयवदानाचे महत्त्व अनन्यसाधारण – डॉ. बोल्टे
रत्नागिरी : पूर्वी रक्तदान श्रेष्ठ दान म्हटले जात होते. आता मात्र अवयवदानाला महत्त्व आले आहे. एका देहापासून आठ ते दहा जिवांना जीवनदान मिळू शकते. अशा या अवयवदानाच्या प्रसारासाठी आयुष्यव वाहिलेल्या आपटे दांपत्याने चालविलेली चळवळ अत्यंत उपयुक्त आहे, असे प्रतिपादन जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अशोक बोल्टे यांनी केले.
राज्य शासनाचा सार्वजनिक आरोग्य विभाग, जिल्हा रुग्णालय, अवयवदान महासंघ, जटायू आणि विविध सामाजिक संस्थांतर्फे अवयवदानाबद्दल बोलू काही, या विषयावर रत्नागिरीच्या जिल्हा शासकीय रुग्णालयातील नेत्र विभागाच्या सभागृहात झालेल्या कार्यक्रमात ते बोलत होते. शिल्पा रेडीज आणि रोहन सावंत या मरणोत्तर देहदान करणाऱ्या दोघांना अभिवादन करून कार्यक्रमाचा प्रारंभ झाला. बालरोगतज्ज्ञ डॉ. दिलीप मोरे यांनी प्रास्ताविकात अवयवदानाविषय़ी माहिती दिली. ते म्हणाले की, १९५० पासून अवयवदान सुरू असले, तरी त्याबाबतची जनजागृती झालेली नसल्याने लोक पुढे येत नाहीत. आता त्याची गरज आहे. प्रसिद्ध नेत्रशल्यविशारद डॉ. तात्याराव लहाने यांना त्यांच्या आईने आपले मूत्रपिंड दिले होते. त्यामुळे पुढच्या आयुष्यात डॉ. लहाने फार मोठे कार्य करू शकले. हे महत्त्व लक्षात घेऊन लोकांनी स्वयंस्फूर्तीने देहदान आणि अवयवदानासाठी पुढे यावे.
श्रीकांत आपटे आणि त्यांच्या पत्नी सौ. नीला आपटे यांनी देहदान आणि अवयवदानाच्या उपयुक्ततेविषयी स्लाइड शो आणि प्रश्नोत्तराच्या माध्यमातून माहिती दिली. बँक ऑफ महाराष्ट्रमधून निवृत्त झाल्यानंतर गेल्या २०१६ पासून आपण या चळवळीला वाहून घेतले आहे, असे सांगून ते म्हणाले की, अवयव प्रत्यारोपणाची व्यवस्था असलेल्या रुग्णालयात नेत्रदान, अवयवदान, देहदान करता येते. रत्नागिरीत नेत्रदान करता येते, तर डेरवणच्या वालावलकर रुग्णालयाच्या वैद्यकीय महाविद्यालयात अवयवदान, देहदानाची व्यवस्था होऊ शकते. जिवंत असताना मूत्रपिंड, यकृत आणि आतड्याच्या काही भागाचे दान, तर मृत व्यक्ती, मेंदुमृत व्यक्तींचे अवयवदान करता येऊ शकते. दररोज सुमारे दोन लाख ७० हजार लोकांना जगण्यासाठी विविध अवयवांची गरज असते. जिवंत किंवा मृतांच्या अवयवदानातून अशांना मरणासन्न रुग्णांना नवे जीवन मिळू शकते. मृतदेहाचे दहन करण्यापूर्वी शरीरावरचे दागिने काढून घेतले जातात. त्याच पद्धतीने मृताच्या अवयवरूपी दागिन्यांचेही दान करण्याची मानसिकता निर्माण झाली पाहिजे. नेत्र, त्वचा आणि अस्थींचे दान करता येते. मरणोत्तर देहदान केल्यास त्यावर दहा वैद्यकीय विद्यार्थ्यांचे शिक्षण होऊ शकते. नवजात बालकापासून कोणीही अवयवदान करू शकतो.
अवघ्या शंभर तासांनी मरण पावलेल्या बालकाच्या मूत्रपिंडाचे केलेले रोपण, प्रौढाच्या हातांचे एका सैनिकाला केलेले रोपण अशा काही चित्रफितीही श्री. आपटे यांनी यावेळी दाखविल्या.
.......
श्रीकृष्ण आपटे यांचे विचार आणि त्यांची अवयवदानाविषयीची कविता ऐकण्यासाठी सोबतच्या यूट्यूब लिंकवर क्लिक करा.

https://youtu.be/yJj-sz2aI1g


No comments:

Post a Comment