Sunday 25 March 2018

केबीबीएफच्या ग्लोबल मीटने दिला उद्यमशीलतेला चालना



                बेळणे (ता. कणकवली) - केबीबीएफ (कऱ्हाडे ब्राह्मण बनेव्होलंट फोरम) या संस्थेची ग्लोबल मीट निसर्गसौंदर्याने नटलेल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यात बेळणे (ता. कणकवली) १० मार्च रोजी पार पडली. वेगवेगळ्या विषयांवरच्या व्याख्यानांनी उद्यमशीलतेला चालना दिली. सिंधुदुर्ग केबीबीएफचे अध्यक्ष प्रदीप जोशी यांच्या नेतृत्वाखाली पार पडलेला हा मेळावा नीटनेटक्या नियोजनामुळे संस्मरणीय ठरला. या मेळाव्याचा संक्षिप्त आढावा येथे घेतला आहे.
रत्नागिरीचे नगराध्यक्ष राहुल पंडित यांच्या हस्ते  ग्लोबल मीटचे उद्घाटन झाले. शेजारी मान्यवर

                आपल्या समाजात व्यावसायिकतेची गोडी वाढावी, त्यात उपलब्ध होणाऱ्या संधी ज्ञातिबांधवांपर्यंत पोहोचाव्या, शिवाय ज्ञातिबांधवांना एक व्यासपीठ उपलब्ध होऊन ज्ञातीअंतर्गत संपर्ककक्षा वाढाव्यात, यासाठी या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. मेळाव्याच्या उद्घाटनाचा छोटेखानी समारंभ झाला. यावेळी केबीबीएफ-ग्लोबलचे श्री. गुणे, सचिव अमित शहाणे, अजिता भावे, व्याख्याते डॉ. यश वेलणकर, विनोद देशपांडे, अमोल करंदीकर, मुकुंद सप्रे, रत्नागिरी केबीबीएफचे अध्यक्ष योगेश मुळ्ये, सिंधुदुर्ग केबीबीएफचे सर्व पदाधिकारी तसेच अन्य शाखांचे प्रतिनिधी मिळून सुमारे १५० जण उपस्थित होते. रत्नागिरीचे नगराध्यक्ष राहुल पंडित यावेळी खास उपस्थित होते. आपण आधी उद्योजक आहोत, त्यानंतर नगराध्यक्ष आणि अन्य भूमिका मी निभावत आहे. उद्योजक या नात्याने केबीबीएफला आवश्यक ती मदत आपण करणार असल्याची ग्वाही त्यांनी दिली.
                आयुर्वेदाचार्य यश वेलणकर यांनी भगवद्गीतेतील तीन सूत्रांच्या आधारे व्यवसाय आणि त्यातून येणाऱ्या ताणतणावांसंदर्भाची उत्तम मांडणी केली. मेंदूची रचना आणि कार्य, ताणतणावासंदर्भातील मेंदूतील केंद्रे, ताणामुळे शरीरात होणारे बदल याविषयी त्यांनी स्लाइडशोसह सविस्तर माहिती दिली. व्यवसायासाठी गाठीभेटी, संपर्क आवश्यक आहेच, पण कोणत्याही परिस्थितीत मनाचा समतोल ढळून चालणार नाही, असे त्यांनी सांगितले. तणावमुक्त जगता यावे, अशी अपेक्षा असते. मात्र ताणतणाव आले, तरच उद्योजकाला यशस्वी होता येते. योग्य प्रमाणात तणाव असला, तर तो एक प्रकारची ऊर्जा निर्माण करत असतो. आवश्यक त्या गोष्टींवर लक्ष केंद्रित करण्याकरिता मेंदूला एक प्रकारचे प्रशिक्षण देणे आवश्यक आहे. लहानपणापासूनच तसे शिकविले गेले पाहिजे. व्यवसायातही तो वाढविण्यासाठी आणि टिकविण्यासाठी माइंडफुलनेस म्हणजे पूर्णभानाची आवश्यकता असते. त्याकरिता मेंदूची कार्यक्षमता वाढविली गेली पाहिजे, सजगता आली पाहिजे, असे त्यांनी सांगितले. मनावरचा ताण कमी करण्याकरिता दोन छोट्या योगक्रिया त्यांनी यावेळी शिकविल्या.
                डोंबिवली नागरी सहकारी बँकेला मल्टीस्टेट शाखांचा परवाना मिळाला आहे. बँकेने रत्नागिरीपाठोपाठ सिंधुदुर्गातही कुडाळमध्ये शाखा सुरू केली आहे. अन्य बँकांपेक्षा काही वेगळ्या कर्जयोजना बँकेकडे आहेत, अशी माहिती बँकेतर्फे पराग नवरे यांनी दिली.
                व्यक्तिमत्त्व आणि व्यवसायवृद्धी या विषयावर बेळगावचे विनोद देशपांडे यांनी कन्नड आणि मराठी भाषेतील विविध म्हणी आणि वाक्प्रचारांचा वापर करत मार्गदर्शन केले. एखाद्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांना भेट देण्याची टाळाटाळ करणारे प्रधानमंत्री देशी-विदेशी उद्योजकांसाठी खास वेळ देतात, त्यांच्यासमवेत वेळ व्यतीत करतात. हे लक्षात घेऊन ब्राह्मण उद्योजकांनी आर्थिकदृष्ट्या सक्षमता आणि उद्योग क्षेत्रात उत्तुंगता गाठली पाहिजे, असे श्री. देशपांडे यांनी सांगितले. उद्योग-व्यवसाय करताना आवश्यक असलेल्या अनेक बारकाव्यांचा त्यांनी तपशिलाने ऊहापोह केला. उद्योगांसाठी एखादे उत्पादन घ्यायलाच हवे असे नाही. ॲमेझॉनसारख्या अनेक कंपन्या स्वतःचे उत्पादन नसतानाही जागतिक पातळीवर आपला व्यवसाय करत आहेत. उद्योग सुरू करताना किंवा वाढविताना अशा नव्या आणि वेगळ्या संधींकडे लक्ष दिले पाहिजे. भविष्याचा वेध घेतला पाहिजे. एकत्रित सेवा देता येतील का, कोणते आधुनिक तंत्रज्ञान वापरता येईल, तंत्रज्ञानाच्या वापरातून विस्तार कसा करता येईल, भविष्यातील गरजा यांचा वेध घेतला पाहिजे. उद्योगांच्या नवनवीन शाखा आणि नवनवी उत्पादने तयार करायला हवीत. उद्योग करताना सर्पदृष्टी आणि गरुडदृष्टी हवी. म्हणजे अल्पकालीन आणि दीर्घकालीन दृष्टिकोन आवश्यक आहे. सर्वांत महत्त्वाचे म्हणजे आपण तयार केलेले एखादे उत्पादन किंवा दिलेली एखादी सेवा एका ब्राह्मण उद्योजकाने दिली आहे, त्यामुळे ती उत्तम आणि उत्कृष्टच असणार, असा विश्वास आपल्याबाबत आपल्याला निर्माण करता आला पाहिजे, असा कानमंत्री श्री. देशपांडे यांनी दिला.
                कणकवलीजवळच सुरू असलेल्या पंचगव्य थेरपीविषयी डॉ. धनंजय प्रभुदेसाई यांनी माहिती दिली. अधिक माहितीसाठी त्यांच्याशी (०२३६७) २४७८२५ किंवा ९८६०७९७२७४ या दूरध्वनीवर संपर्क साधता येईल.
                पितांबरी प्रॉडक्ट्सतर्फे पराग साळवी यांनी सगुंधी कोकण या संकल्पनेची माहिती दिली. गवती चहाच्या उत्पादनावर पितांबरी उद्योगाने आता लक्ष केंद्रित केले असून साखळोली (दापोली), तळवडे (राजापूर) आणि पेढांबे (चिपळूण) या रत्नागिरी जिल्ह्यात सुरू असलेली लागवड, गवती चहाची वैशिष्ट्ये, लागवडीचे चक्र इत्यादीविषयी त्यांनी सांगितले. गवती चहाच्या लागवडीपासून दरवर्षी दरएकरी ३० हजार ते ४० हजार रुपयांचे उत्पन्न मिळू शकते. किमान सहा एकर क्षेत्रात लागवड केली गेली, तर त्याच परिसरात प्रक्रिया करता येऊ शकेल. हा सर्व माल पितांबरी उद्योग विकत घेऊ शकेल. या लागवडीसाठी कंपनीकडून मार्गदर्शन आणि लागवडीसाठी वाण मिळू शकेल, असे त्यांनी सांगितले. पराग साळवी यांचा संपर्क क्रमांक ९५४५७०७०६६.
                सायंकाळच्या सत्रात कृषी आणि उद्योजकता या विषयावर कृषी अधिकारी अमोल करंदीकर आणि जिल्हा उद्योग केंद्राचे मुकुंद सप्रे यांनी मार्गदर्शन केले. राज्य शासनाच्या कृषी विभागामार्फत विस्तार, फलोत्पादन, गुणनियंत्रण आणि प्रशासन या चार टप्प्यांमध्ये कशी मदत केली जाते, अभ्यास दौरे, अपघात विमा योजना, विविध पुरस्कार, महात्मा गांधी रोजगार हमी योजना, मागेल त्याला शेततळे, जलयुक्त शिवार योजना, चांदा ते बांदा योजना अशा विविध योजनांची नेमकी माहिती श्री. करंदीकर (९४२३६८४०९५) यांनी अत्यंत विनोदी निवेदनातून दिली.
                सिंधुदुर्ग जिल्हा उद्योग केंद्राचे मुकुंद सप्रे यांनी नवउद्योजकांना सिंधुदुर्ग जिल्ह्यात नारळ आणि काजू या पिकांच्या प्रक्रिया उद्योगाच्या किती व्यापक संधी आहेत, याचा आढावा घेतला. नारळाचा काथ्यापासून तयार केल्या जाणाऱ्या कुंड्यांमधील रोपांची निर्मिती, शोभेच्या वस्तू, खोके असे अनेक उद्योग करता येणे शक्य आहे. महिला उद्योजकांना दिला जाणारा १०० टक्के इन्सेन्टिव्ह, उद्योगांनुसार मिळणारी अनुदाने आणि पतपुरवठा याबाबत त्यांनी माहिती दिली. फळप्रक्रिया उद्योगांमध्ये प्रचंड वाव असल्याचे त्यांनी उदाहरणांसह स्पष्ट केले. बांबू प्रक्रिया उद्योगाकडेही त्यांनी लक्ष वेधले. अधिक माहितीसाठी त्यांना त्यांच्या कार्यालयीन दूरध्वनीवर (०२३६२-२२८७०५) किंवा व्यक्तिगत (८८०५८९५६५७) संपर्क साधता येऊ शकेल.
                मेळावा यशस्वी होण्यासाठी केबीबीएफ सिंधुदुर्ग चाप्टरचे अध्यक्ष प्रदीप जोशी, उपाध्यक्ष विहंग देवस्थळी, सचिव नितीन घाटे, खजिनदार संजय पाध्ये आणि त्यांच्या संपूर्ण चमूने उत्तम तयारी केली होती. त्यांना मयूरेश पुरोहित सक्रिय मदत करताना दिसत होते. कार्यक्रम वेळेत सुरू होऊन वेळेत संपला. नियोजित कार्यक्रमापैकी कोणताही कार्यक्रम रद्द झाला नाही. एकंदरीत मेळावा यशस्वी झाल्याची पावती उपस्थितांकडून दिली जात होती.
                ...................


बेळणे (ता. कणकवली, जि. सिंधुदुर्ग) येथे केबीबीएफच्या ग्लोबल मीटमध्ये सहभागी झालेले प्रतिनिधी


No comments:

Post a Comment